Tuesday, May 10, 2011

अभ्यास पद्धती






लौकिकार्थाने अभ्यास आणि आपले नाते जरी महाविद्यालयीन जीवनासोबत संपत असले तरी मागे वळून बघून आपली अभ्यास करण्याच्या तंत्रांचा उहापोह करणे हा एक चांगला फलदायी उपक्रम आहे असे माझे मत आहे. प्रत्येकाच्या अभ्यास करण्याच्या तंत्रावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा देखील काही प्रमाणात उलगडा होतो.

मराठी माध्यमातून शिकताना साधारणतः सातवीपर्यंत अभ्यास आवाक्यात असायचा. नियमितपणे गृहपाठ केल्यास परीक्षेच्या वेळी काही खास अभ्यास करावा लागत नसे. आठवीपासून हे चित्र काही प्रमाणात बदलत गेले. परीक्षेच्या आधीचे १-२ आठवडे सतत वाचन करावे लागत असे. N.C.Raut सर काही मुलांची नावे घेवून ती एकपाठी असल्याचे म्हणत असत. मला मात्र ते कधी जमले नाही. पहिले वाचन एकंदरीत विषयाचा आढावा घेण्यासाठी आणि मग नंतरची वाचने तो विषय आणि मसुदा डोक्यात पक्का करण्यासाठी. परीक्षेच्या जाण्याआधी पूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय मला चैन पडत नसे. थोड्याश्या घाबरट स्वभावाची ही लक्षणे होत. नववीत असताना फडके क्लासला जावू लागल्यानंतर मात्र माझ्या अभ्यास करण्याच्या शैलीत थोडा फरक झाला. पठण आणि लिखाणावर भर देण्याची ह्या कालावधीत मला सवय लागली. परंतु पूर्ण पुस्तक वाचून झाल्याचे आणि त्यातला कोणताही भाग आपल्या मर्जीनुसार आठवण्याचे मला आवश्यक वाटणारे समाधान मला मिळेनासे झाले. नववीनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत फडके सरांनी माझा भरपूर अभ्यास करून घेतला. साधारणतः दहावीचा ५५ - ६० टक्के अभ्यास ह्या वेळात पूर्ण झाला होता. परंतु शाळा सुरु झाल्यावर मात्र मी थोडा त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलो. आणि मला देखील शाळेत शिकवला जाणारा भाग आधीच माहीत असल्याची स्थिती नवीन होती. आणि त्यामुळे मी काही प्रमाणात बेफिकीर राहिलो. जानेवारी नंतर पेपर सोडविण्यावर फडके सरांचा भर होता आणि मी मात्र पूर्ण पुस्तक आपल्या डोक्यात बसविण्याच्या मागे होतो.

अकरावीत बर्याच गोष्टी बदलल्या. माध्यम बदलले, शाळेऐवजी कॉलेज आले. पहिल्या घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेआधी, पुस्तक डोक्यात बसविण्याचे सोडा, एकदा पूर्णपणे वाचून होणे सुद्धा जमले नाही मला. त्यामुळे परीक्षेचा लढा सुरु होण्यापूर्वीच मी थोडासा हतबल झालो होतो. अकरावी असेच गेले. अकरावीची वार्षिक परीक्षा सुरु असतानाच बारावीचा अग्रवाल क्लास सुरु झाला. सकाळी अकरावीचा पेपर आणि दुपारी १ - ७ बारावीचा क्लास असा एक आठवडा काढला. बारावीत रुपारेल होस्टेलवर गेल्यावर मात्र बराच फरक पडला. २४ तास अभ्यासमय असं ते वातावरण होते. अग्रवालच्या नियमित परीक्षा होत आणि होस्टेलवर राहणाऱ्या कॉलेजच्या शिक्षकांकडे पेपरचा क्लास लावला. पेपर सोडवता सोडवता माझा पुस्तक डोक्यात बसविण्याचा माझा प्रयत्न चालूच होता. अग्रवालने सुद्धा फडके सरांची पद्धत अनुसरत जानेवारीपासून पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा सुरु केल्या. प्रत्येक परीक्षेच्या वेळी माझा त्या त्या विषयाचे पुस्तक डोक्यात बसविण्याचा प्रयत्न थोडा थोडा पुढे सरकत होता. रुपारेलच्या जानेवारी अखेरीच्या सराव परीक्षेत एकदाची गुणांची नव्वदी गाठल्यावर मनाला थोडे समाधान आणि आत्मविश्वास लाभला. फेब्रुवारी महिना मात्र पूर्णपणे स्वयंअभ्यासासाठी लाभला आणि मग मात्र काही पुस्तके डोक्यात बसल्यावर मी धन्य झालो. परंतु Zoology साठी मात्र माझ्याकडे वेळ नव्हता. PCM करत असलो तरी काय झाले, रुपारेल होस्टेलवर Zoology चा काही भाग option ला टाकणारा मी एकमेव विद्यार्थी होतो.

एकपाठी नसणे, पूर्ण पुस्तक वाचून झाल्यशिवाय आत्मविश्वास न वाटणे, शेवटच्या क्षणी नवीन काही वाचून ते पेपरात उतरविण्याची क्षमता नसणे आणि रात्री दहानंतर मेंदूचा स्वीच बंद होणे अशा उणीवा बरोबर घेवून मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश केला. दररोजचा ट्रेनचा प्रवास, सबमिशन, क्रिकेटचे वेड ह्या सर्व गोष्टींमुळे परीक्षेच्या आधीच्या study leave वर सर्व भिस्त असायची. अभियांत्रिकी जीवनात एका पुस्तकावर अवलंबून असणे ही योग्य गोष्ट नव्हे परंतु मला माहित असलेल्या माझ्या मर्यादांमुळे मी तो मार्ग पत्करला.

असो वेळेच्या बंधनामुळे आता इथेच आटोपते घेत आहे. जमल्यास बाकीचा भाग पुन्हा कधी तरी लिहीन. लेख लिहिण्याचा एकच उद्देश स्वतःची आणि आपल्या मुलाची अभ्यास पद्धती काय आहे ते ओळखून घ्या. आपली अभ्यास पद्धती आपल्या स्वभावाचे द्योतक आहे, ती माहित असल्यास आपल्यास आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होईल. आपल्या मुलाची अभ्यास पद्धती ओळखता आल्यास त्यात थोडेफार योग्य बदल करण्याचा प्रयत्न करता येईल आणि असलेल्या मर्यादांमध्ये योग्य यश मिळविता येईल