Tuesday, October 18, 2011

शिस्त, गुणवत्ता, कल आणि क्षेत्र



शीर्षकामध्ये नमूद केलेल्या चार गोष्टी एकमेकांशी तश्या म्हटल्या तर निगडीत आहेत. परंतु त्यामधील परस्पर संबंध म्हणावा तसा सरळ नाही.
अ> गुणवत्ता आणि कल

प्रत्येक व्यक्ती गुणवत्ता आणि कल यांचा बराच भाग जन्मतानाच घेवून येते. परंतु या दोन्ही बाबींचा काही भाग मात्र प्रयत्नपूर्वक जोपासला जावू शकतो.

ब> गुणवत्ता आणि क्षेत्र

प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. एखादी बुद्धिमान व्यक्ती अभ्यासक्षेत्रातील विविध विषयात वेगवेगळ्या प्रमाणात पारंगत असते.

क> गुणवत्ता आणि शिस्त

एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किती प्रमाणात यशस्वी होईल हे त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रातील गुणवत्तेवर अवलंबून असते. परंतु गुणवत्तेतील कमतरता काही प्रमाणात शिस्तीच्या आधारे भरून काढता येते. ज्या क्षेत्रात बर्याच संधी उपलब्ध असतात त्या क्षेत्रात शिस्तीच्या आधारे बरेचजण टिकून राहू शकतात. शिस्तीच्या जास्तीच आहारी गेल्यास त्या व्यक्तीची उरलीसुरली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचा धोका संभवतो.

शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे आपल्या उद्दिष्टाची व्याख्या बनवून आपल्या समजुतीनुसार ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे वेळापत्रक बनवून न कंटाळता ते वेळापत्रक पाळणे. ह्या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी, की प्रत्येक क्षेत्रातील शिस्तीची व्याख्या काळानुसार बदलत राहते. आणि शिस्तीवर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला शिस्तीची व्याख्या कालबाह्य होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

सारांश
  1. प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. आपला कल लक्षात घेवून आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी ज्या भाग्यवान लोकांना मिळते त्यांची गुणवत्ता आपसूकच जोपासली जाते आणि असे लोक शिस्तीत राहण्याची शक्यता जास्त असते.
  2. मुद्दा १ च्या व्याख्येत बसणारे भाग्यवान लोक ह्या दुनियेत फार कमी आहेत.
  3. वरच्या समीकरणात पैसा हा दुष्ट घटक समाविष्ट केल्यास वरील लेखाचा बराच भाग निरर्थक ठरतो!


Saturday, October 8, 2011

सुपूर्दता



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतांना अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात ज्या आपण प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणू शकतो. उदाहरणे द्यायची झाली ती अनेक, मला आवडलेले उदाहरण म्हणजे अडचण / धोका व्यवस्थापन (Risk Management). ऑफिसात अशा प्रकारच्या व्यवस्थापनासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवली जाते आणि ती बर्याच वेळा तपासून सुद्धा पाहिली जाते. आपल्या जीवनात सुद्धा याची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरते. घरकामवाल्या बाईने न सांगता सोमवारी सुट्टी मारणे, मुलाची शाळेची बस न येणे ह्या छोट्या छोट्या आपत्कालीन प्रसंगासाठी आपल्या सर्वांकडे Plan B तयार असणे आवश्यक असते. तसा तो आपल्याकडे तयार असतो पण तो चर्चिला / तपासाला गेलेला नसतो.

असो आज मला अशाच एका विषयावर लिहायचे आहे आणि तो म्हणजे Knowledge Transition अर्थात माहिती, संस्कृती यांची एका व्यक्तीकडून दुसर्याकडे यशस्वीरीत्या सुपूर्दता ! मागच्या पिढीपर्यंत एकत्र कुटुंबात ही सुपूर्दता नकळत होत असे, कारण देणारा आणि घेणारा दोघेही एका घरात राहत, एकाच प्रकारच्या व्यवसायात मग्न असत. परंतु आजच्या शहरात राहणाऱ्या पिढीमध्ये मात्र हे वहन बर्याच बाबतीत अपूर्णच राहिले. प्रत्येक ज्ञातीचे संस्कार, चालीरिती ह्या बर्याच प्रमाणात मागच्या पिढीकडून आजच्या पिढीकडे सुपूर्द झाल्याच नाहीत. आता ह्या बाबतीत सुपुर्दतेची गरज आहे किंवा नाही यावर मतभेद होवू शकतात. ठीक आहे परंतु किमानपक्षी ह्या गोष्टी लिखित स्वरुपात तरी उपलब्ध करून ठेवावायला हव्यात असे माझे म्हणणे. म्हणजे आज नाही पण पुढे कधीतरी कोणास हे संस्कार, चालीरिती माहित करून घ्यावेसे वाटले तर माहितीचा स्तोत्रच नाही अशी परिस्थिती नको! असो बहुधा ह्या स्थितीचे गांभीर्य मोठ्या शहरात जास्त असावे, छोट्या शहरात, गावांत मात्र ही सुपूर्दता यशस्वीरीत्या होत असावी असा भाबडा विश्वास बाळगूया!