Wednesday, May 30, 2012

जगी सर्व सुखी असा कोण आहे?


समुद्राच्या लाटांचा किनार्यावरील खेळ बघणे हा सर्वांचा एक आवडता छंद. ही लाट येते आणि आपल्या मार्गावरील सपाट शांत अशा वाळूला उधळून लावते. वाळूचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकते. पण ह्या लाटेच्या मर्यादा असतात. त्यापलीकडील वाळू मात्र आपले जीवन शांतपणे जगत असते. असेच काही आपल्या जीवनशैलीतील बदलाबाबत होत असते. हे बदल प्रथम महानगरात पोहचतात. त्यानंतर ही लाट आजूबाजूच्या नगरांना आणि मोठ्या खेड्यांना व्यापून टाकते. त्यापलीकडील छोटी खेडी मात्र आपले जीवन पूर्वीप्रमाणेच जगत राहतात. तथाकथित विकसित भागातील लोकांची नजर मग ह्या दुर्गम भागाकडे पोहचते. ह्या दुर्गम भागातील लोक कसे अप्रगत, अशिक्षित आहेत आणि त्याना कशी विकासाची गरज आहे यावर चर्चा झडतात. बर्याच वेळा ह्या चर्चा पंचतारांकित हॉटेलात होतात ही गोष्ट वेगळी!

असो जोपर्यंत ह्या चर्चा अप्रगत / अशिक्षित ह्या मुद्द्याभोवती घोटाळत राहतात तोपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळी कोणी एखादा महाभाग हे लोक कसे सुखापासून वंचित आहेत असे विधान करतो त्यावेळी मात्र मी विचार करू लागतो. आपली सुखाची व्याख्या काय? प्रत्येक माणसागणिक ही व्याख्या बदलणार, काही जनांनी स्वतःसाठी सुख म्हणजे काय याची व्याख्या ठरविली देखील नसणार. काही लोकांना आपण आयुष्यात कधी सुखी होवू किंवा नाही याची शास्वती देखील नसणार.

आता आपण सुखाचा उहापोह करूयात. काही गोष्टी अशा असतात की ज्यांच्याशिवाय सर्वसाधारण माणसे सुखी होत नाहीत परंतु त्या गोष्टींचे अस्तित्व माणसास सुखी बनविण्यास पुरेसे नसते. ह्या गोष्टींमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा समावेश होतो. सर्वसाधारण माणसे ह्या गोष्टींशिवाय सुखी होवू शकत नाहीत. ह्याला अपवाद असतातच जी ह्या मुलभूत गरजाशिवाय सुखी राहू शकतात. असो परत आपण सर्वसाधारण माणसांकडे वळूयात. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक स्थितीत मुलभूत गरजांची चिकित्सा करण्याची पद्धत नव्हती. पण माणसाला देवाने बुद्धी दिली त्यामुळे ह्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये देखील माणसाने वैविध्य, विविध पातळ्या शोधल्या. ह्या वैविधतेचे दोन पैलू असतात; प्रथम म्हणजे तो मनुष्य खरोखर चोखंदळ असतो आणि दुसरे म्हणजे मनुष्यास आपणच दुसर्यापेक्षा कसे श्रेष्ठ हे दाखविण्याची उर्मी असते. आता पहिल्या प्रकारात माणसास समाधान मिळू शकते परंतु दुसर्या प्रकारात असतो तो केवळ आसुरी आनंद!
मुलभूत गरजांच्या पलीकडे बघितले तर मग येतात ते वाहनांचे, आभूषणांचे छंद आणि नाद. यात देखील वरती उल्लेख केल्याप्रमाणे दोन पैलू येतातच. त्यानंतर येतात ते माणसाचे छंद! कला, क्रीडा, वाचन, भटकंती ह्याला वाहून घेतलेली छंदिष्ट माणसे काही कमी नव्हेत. अशा माणसांना त्यांच्या छंदात असीम आनंद नक्कीच मिळतो पण ते सुखी असतात का? कधीतरी त्यांच्या जीवनात लौकिकार्थाने सुखी होण्यात काहीतरी कमतरता असू शकते.

ह्यापलीकडे जावून बघितले तर मग येतात ती माणसाची नाती. माता, पिता, पती, पत्नी, कन्या, पुत्र, बंधू, भगिनी इथून सुरु होणारी ही नाती आपणास सुखसमाधान देतात तसेच कधीतरी दुःखही ! ही नाती असतात मात्र फार क्लिष्ट आणि गुंतागुंतीची! माणूस नात्यांमध्ये किती यशस्वी आहे यावर त्याचे सुख काही प्रमाणात अवलंबून असते. तसेच माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात ते त्याचे मित्र. हे मित्र त्याच्या सुख दुःखाच्या प्रसंगी हजर असतात. काही बाह्य घटकसुद्धा माणसाच्या जीवनात तत्कालीन सुख / दुःख निर्माण करतात. यात आजारपण, यश, जन्म मृत्यू अशा घटनांचा समावेश होतो.

माणसाचे मन वरील उल्लेखलेल्या सर्व घटकांचे पृथ्थकरण करीत असते. त्यानुसार प्रत्येकजण स्वतःला तात्कालीन सुखी / दुःखी आणि दीर्घकालीन सुखी / दुःखी समजत असतो. माणसाचा स्वभाव देखील यात महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीवरच आपण लक्ष केंद्रित केल्यास आपण कधीच सुखी होणार नाहीत. जसजशी माणसाचे क्षितीज उंचावत जाते तसतसे त्याला विश्वातील सुंदर , महागड्या वस्तूंचा परिचय होत जातो. ह्या वस्तूंच्या परिचयानंतर त्या वस्तूंची अभिलाषा निर्माण होते, किंवा त्या उच्चभ्रू वर्तुळात राहण्यासाठी ह्या वस्तूंची त्याला निकड भासते. अशा वस्तूंचा परिचय होऊन सुद्धा त्यापासून विरक्त राहणारा मनुष्य विरळाच! ह्या वस्तू मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षात माणसे बर्याच वेळा आपल्या प्रकृतीचा ऱ्हास करून घेतात.

सारांश म्हणजे सुखाची व्याख्या माणसागणिक बदलते. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वःतास माहित असावयास हवी. सुखाची ही व्याख्या निरपेक्ष असावी त्यात दुसर्या कोणाशी तुलना केलेली नसावी. त्याचबरोबर मला सुखी व्हायचे आहे की नाही हे ज्याने त्याने ठरवावे! कारण सुखी होणे आणि लौकिकार्थाने यशस्वी होणे ह्या बर्याच वेळा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. ह्या लेखाचा शेवट संत तुकडोजी महाराजांच्या ह्या कवितेने!
 
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

’तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥

Sunday, May 27, 2012

शक्तिमान विरुद्ध बुद्धीजीवी

 

कधी मला प्रश्न पडतो की मनुष्यजातीने बनविलेल्या नियमांत कसकसे बदल होत गेले असतील आणि ते कसे विकसित होत गेले असतील. म्हणजे बघा ना प्रथम बळी तो कान पिळी असाच नियम असणार. असेच मानव सर्व स्त्रोतांवर अधिकार गाजवीत असतील. मग ते शिकार असो की जमीन असो. बाकीचे त्यांचा अधिकार मान्य करून, शक्तीमानाने आपला हक्क गाजविल्यावर उरलेसुरले जे काही मिळेल ते आपले भाग्य असे समजून जीवन कंठीत असतील. मग हळूहळू ह्या गांजलेल्या लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला असेल. त्यांना कळून चुकले असेल की आपण बहुसंख्य आहोत आणि शक्तिमान अल्पसंख्य आहेत. तसेच शक्तीमानाला सुद्धा कळून चुकले असेल की अहोरात्र शक्तीच्या जोरावर सत्ता गाजविणे कठीण आहे. एक गाफील क्षण सुद्धा आपल्याला महागात पडू शकतो.

तत्कालीन शक्तीमानांकडे बुद्धी कमी असावी, त्यामुळे बहुसंख्य बुद्धीजीवांनी आपल्याला अनुकूल अशी नियमावली बनविण्यात पुढाकार घेतला असावा. ही सर्व नियमावली बनवून अमलात आणल्यावर शक्तीमानांना एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. परंतु आता उशीर झाला होता. बुद्धीजीवांनी पोलीस, न्यायालये अशी सुरक्षा कवचे बनविली होती आणि शक्तीमानांचे पंख झटून टाकले होते. काही काळ असाच गेला. शक्तीमानांना बळाचा वापर करायच्या कमी संधी मिळत गेल्या परंतु थोडा मोकळा वेळ मिळाला. कधी नव्हे तो त्यांनी विचार करायला सुरुवात केली. उघड स्वरूपात कायदा हाती घेणे शक्य नाही हे सत्य त्यांनी स्वीकारले. मग त्यांनी शत्रू गटातील काही सीमारेषेवरील बुद्धीजीवांशी हातमिळवणी केली आणि कायद्यातील पळवाटा शोधून काढल्या. आता हे शक्तीमानांना कायद्याच्या कचाट्यात पकडणे कठीण जावू लागले. बुद्धीजीवी वर्ग सुद्धा पवित्र राहिला नाही त्यातील बहुसंख्याने शक्तीमानांचे कायद्याशी उघड शत्रुत्व न पत्करता आपला स्वार्थ साधण्याचे धोरण स्वीकारले.

मनुष्यजातीत सदैव evolution होत राहिले आहे. शक्तिमान आणि बुद्धीजीविंचा संघर्ष चालूच आहे. सध्या म्हणायला गेले तर कायद्याचे राज्य आहे पण आतून शक्तीमानच राज्य गाजवितात. हीच वेळ आहे बुद्धीजीवींना मनन करण्याची आणि आपल्या डावपेचात बदल घडवून आणण्याची. पण बुद्धीजीवी वर्ग त्याच्या शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिलाच नसेल तर?
 

Saturday, May 19, 2012

उम्र का हिसाब

 

सकाळी बोरिवलीहून वसईला निघालो. एकटाच असल्याने तयारी लवकर आटपली. सुदैवाने एक नंबरच्या फलाटावर वसई जलद लोकल गाडी मिळाली. सकाळची वेळ, मधल्या स्थानकांवर न थांबता सुसाट धावणारी लोकल, सारे काही प्रसन्न वाटत होते. नंतर मग जाणवले सर्वजण शांत विचारात गढून गेले आहेत. माणसाचं असंच असत, कधी अशी शांतता मिळाली की आपण सारे विचारात मग्न होतो. त्या डब्यात सर्वजण विचार करीत होते. विचार जर दृश्य असते तर? त्या डब्यात विचारांचा झंझावात दिसला असता. आता माणस अश्यावेळी कोणता विचार करीत असतील? तात्कालिक समस्या माणसाच्या विचारांना ग्रासणारा प्राथमिक घटक असेल. मग पाच - दहा मिनटांनी माणसाचे मन असंच मागे जात असावं .
तेव्हाच मला उमराव जान मधील गाण्यातील ह्या ओळी अचानक आठवल्या.
ये किस मकाम पर हयात मुझको लेके आ गयी
ना बस खुशी पे हैं जहाँ, ना गम पे इख्तयार है
तमाम उम्र का हिसाब मांगती हैं जिन्दगी
असेच काही निवांत क्षण मिळतात, आणि आपल्या गतआयुष्याचा हिशोब मांडायला प्रवृत्त करतात .



Monday, May 7, 2012

ग्यान, गलका, शिराळा, कसाब

 
एखा द्या देशाच्या परिस्थितीचा परिणाम त्या देशाच्या नागरिकांच्या मनोस्थितीवर होत असतो. आता आपल्या भारताचेच पहा ना! सर्व प्रसिद्धीमाध्यमांच्या मते आपण प्रगतीच्या वाटेवर कूच करीत आहोत. हे वाचून आपला आत्मविश्वास बळावतो. माझेच उदाहरण घ्या. मी स्वतःला ज्ञानी (ग्यानी म्हटले तर अजून प्रभाव पडतो!) समजू लागतो. ब्लोग लिहून जबरदस्तीने लोकांच्या ई मेल वर पाठवतो. चार लोक जमले की फंडे देतो. पण ई-मेल वर ज्ञान देणे आणि प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देणे यात फरक असतो. ई-मेल वरील ज्ञान लोक त्यांची खरोखर इच्छा असेल तर वाचतात अथवा बर्याच वेळा ई-मेलचा नाश करतात. परंतु प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देताना आपण समोरच्या व्यक्तीचा वेळ घेत असतो. इतकेच नाही तर त्याने आपल्या चेहऱ्यावर अनुकूल हावभाव आणले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते.
हल्लीचा जमाना मात्र बदलला आहे. फुकटात कोणी ऐकून घेत नाही. FM रेडिओवर उद्घोषक ३-४ मिनिटाच्या गाण्यानंतर १० मिनिटे वायफळ गडबड करतो. त्या वेळी आपण दुसरे स्टेशन लावतो. माझी प्रत्यक्षातील ज्ञानवाणी ऐकून घेणारे फार कमी लोक; बायको, मुलगा आणि कार्यालयातील टीम. कार्यालयातील टीम ही माझी ज्ञानवाणी ऐकण्यासाठी बांधील असते. त्या बैठकीच्या वेळी त्यांना मी बंधक बनवितो. तेथील माझ्या प्रवचनास ग्यान हा अधिक उचित शब्द आहे. ग्यान म्हणजे आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी वरच्या पदावरील माणसाने उधळलेली मुक्ताफळे!
घरी मात्र परिस्थिती वेगळी असते. लोकशाही भारताच्या कानाकोपर्यात, सर्व वयोगटात पसरली आहे याचा अनुभव मला येतो. बाबा, पुन्हा पुन्हा तेच काय सांगता, मला माहितेय असे का मुलगा बोलला की मी आवरते घेतो. बायकोकडे तर हजार उपाय. प्रवचन चालू असताना अचानक अरे आज भाजी आणावी लागेल, किंवा बिल भरावे लागेल असे लक्ष विचलित करणाऱ्या घोषणा ती करते. मात्र हल्ली सर्वजण सुज्ञ बनले आहेत. माझ्याकडून काही करून घ्यायचे असले की मात्र माझे प्रवचन ऐकून घेतले जाते.
आता आपण प्रवचन का देतो तर मुलाची जडणघडण (अर्थात formatting ) करण्यासाठी. बायको ही formatting च्या पलीकडे असते ही गोष्ट वेगळी. बायको ही आपले formatting करू शकते हे लक्षात असू द्यावे. ती ज्या नवऱ्यास लवकर कळली त्याचा संसार सुखाचा झाला. असो मुलाच्या जडणघडणीचे मार्ग कालौघात बदलले. पाठीवर धपाटा हा पूर्वीचा राजमान्य आणि सर्वात सोपा मार्ग. ह्याद्वारे मुलाला अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. इथे चर्चेला वाव नाही, मी इथला अधिकारी व्यक्ती आहे आणि बरेच काही. काळ बदलला, चर्चा करून, मन वळवून निर्णय घेण्याचे, ज्ञान देण्याचे दिवस आले. परंतु कधी कधी ह्याच्याही पुढे जावून प्रत्यक्ष कृतीतून धडा द्यावा लागतो.
आयुष्यात सदैव काही मनासारखे होणारे नाही. सुखानंतर दुःख हे येणारच सगळ्याला तोंड देता यायला पाहिजे, असे ज्ञान आपण सर्व तासनतास देवू शकतो. परंतु आपण हे ज्ञान स्वयंपाकघरातून सुद्धा देवू शकतो. रविवारी ,सुग्रास जेवणावर ताव मारल्यावर सोमवार, मंगळवार मुलावर गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्यांचा मारा करावा. त्यात मीठ, मसाला कमी टाकावा. जर आपला मुलगा ह्या भाज्या खाऊ शकला तर तो जीवनात कोठेही समाधानाने राहू शकेल. आता बघा मुलाला ह्या भाज्यांच्या महत्त्वाविषयी ग्यान देण्यापेक्षा हा उपाय केव्हाही सोपा, त्यातून एक पुढे आयुष्यात कामास येणारा महत्वाचा उपदेश मुलास मिळतो. वरिष्ठ पदावरील व्यक्ती न बोलता सुद्धा कृतीतून आपली वाट लावू शकतो. गलका, शिराळ्याच्या भाजीतून असा काही उपदेश देता येऊ शकतो हे ज्यावेळी मला जाणवले त्यावेळी मी एकदम धन्य झालो. बाकी ह्या भाज्या घेवून ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेल्यास एकच गलका होतो ही गोष्ट वेगळी!
कसाबला भारत देशाचे सर्व नागरिक पोसतात. मला खूप संताप येतो. असाच एकदा मी संतापलो होतो पण मग एक विचार डोक्यात आला. मृत्यूचे भय तर दहशतवाद्यांना नसणारच, पण तुरुंगात खिचपत पडण्याचा विचार त्यांना झेपत असेल का? मानसिक स्थिती झपाट्याने बिघडू शकते. आपले अधिकारी मुद्दाम तर त्याला जिवंत ठेवत नसावेत ना? असो.. तुरुंगात कसाबला गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्या देवून त्याचे फोटो पेपरात छापले तर?