Saturday, September 29, 2012

चांगुलपणा, तक्रार, गिरीश कुबेर....



आपण अधूनमधून काहीजणांच्या चांगुलपणाविषयी बोलत असतो. तो माणूस तसा भला आहे / चांगला आहे वगैरे वगैरे..तसं बघायला गेलं तर दुसऱ्यांची प्रशंसा करण्याच्या वृत्तीचा आपल्यात थोडा अभाव असल्याने आपण दुसर्यांच्या चांगलेपणाविषयी तसे अभावानेच बोलतो. चांगुलपणाची निरपेक्ष व्याख्या कशी असावी? जो माणूस मनुष्यजातीने आखून दिलेल्या सुसंस्कृत वागण्याच्या सर्व चालीरीती पाळतो, दुसर्यांना जमेल तितकी मदत करतो तो चांगला माणूस. आता एखादा माणूस चांगुलपणाने का वागतो? अशा चांगल्या माणसांचे विविध प्रकार असतात. काही माणसे भोवतालच्या परिस्थितीचा आपल्या चांगलेपणावर परिणाम होवू देत नाहीत. सुखदुःखात, सज्जन दुर्जन लोकांशी वागताना ती आपला चांगुलपणा कायम ठेवतात. काही माणसांचा चांगुलपणा मात्र परिस्थितीवर अवलंबून असतो. सर्व काही अनुकूल चालू असतानाच ते चांगले वागू शकतात. त्यानंतर काही प्रकार येतात ज्यात माणसे चांगलेपणाचा मुखवटा घालून वावरतात. मुद्दा असा आहे की आपण अवतीभोवतीच्या लोकांमधील चांगुलपणा बाहेर आणू शकतो का? प्रत्येक माणूस हे एक अनोखे व्यक्तिमत्व असते. हे व्यक्तिमत्व काही टक्के भागात एकदम व्यवस्थित वागते, पण एका छोट्याशा भागात ह्या व्यक्तिमत्वाची वागणूक अनाकलनीय बनू शकते. ह्या व्यक्तिमत्वाचा हा अनाकलनीय वागणुकीचा हा भाग कोणत्या परिस्थितीत बाहेर येतो हे त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना माहित असणे चांगले असते. जसा अनाकलनीय भाग तसा चांगला भागही, आपल्या जवळच्या लोकांचा चांगुलपणा आपण कसा बाहेर काढू शकतो यावर प्रत्येकाने थोडा विचार करणे चांगले असते.

दुसरा मुद्दा तक्रारीचा. आपला स्वभाव असा असतो की आपण बर्याच वेळा आपल्याजवळ जे काही आहे ते गृहीत धरतो आणि जे काही मिळाले नाही त्याविषयी तक्रार करीत बसतो. बारावीची माझी गोष्ट, भौतिक, गणित आणि रसायनात क्ष गुण मिळाले आणि यांत्रिकी / विद्युत ह्या शाखांत प्रवेश न मिळता स्थापत्य शाखेत प्रवेश मिळाला. क्ष + १ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना यांत्रिकी/ विद्युत शाखेत प्रवेश मिळाला.  भौतिक शास्त्राच्या परीक्षेत एका प्रश्नात सदिशाची दिशा आणि परिमाण दोन्ही अपेक्षित होते. मी दिशा काढणे विसरून गेलो. पुढे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात, सरदार पटेल महाविद्यालयातील मित्रांसोबत बोलताना मी त्या सदिशाच्या दिशेविषयी सदैव बोलत असे. एकदा एक मित्र म्हणाला अरे तुझे बाकीचे बरोबर आलेले प्रश्न देखील चुकण्याची शक्यता देखील होती. ते व्यवस्थित बरोबर आले त्याच्याविषयी तू कधी विचार करतोस का? त्याचे हे वाक्य माझ्या सदैव लक्षात राहिले. तसेच हल्लीच एका प्रशिक्षण वर्गात कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी म्हणाले की तुम्ही सुदैवी आहात हे लक्षात असू द्यात. इथे ह्या वर्गात बसलेल्या प्रत्येक व्यवस्थापकाइतकेच सक्षम लोक केवळ उत्तम संधी न मिळाल्याने बाहेर संघर्ष करीत आहेत. त्यांचे हे वाक्य मला अंतर्मुख करून केले.
आता दोन्ही गोष्टी एकत्र केल्यास थोडी गंमत येते. आपण बरेचजण केबल टीवीच्या वाईट परिणामाविषयी तक्रार करतो. पण त्यातही शोधल्यास चांगलेपणा आढळतो. डिस्कवरीच्या विविध वाहिन्यांवर मोटारगाड्या, जगातील विविध विस्मयकारक भूप्रदेश, विज्ञानातील नवनवे शोध यांची सुंदर माहिती मिळते. रात्री नऊनंतर संगीत वाहिन्यांवर लता, किशोर, गुलजार भेटतात. दूरदर्शनच्या ज्या काही वाहिन्या अजून आपले अस्तित्व टिकवून आहेत त्यात जुने साधे चित्रपट, संगीताचे कार्यक्रम पहावयास मिळतात. स्टार क्रिकेटवर जे जुने कसोटी सामने दाखवतात त्यात बेदी, चंद्रशेखर भेटतात. आणि दोन बळींच्या मधल्या वेळात मैदानावर खेळाडूंना पाहण्याची संधी मिळते जी आज जाहिरातीने हिरावून घेतली आहे.

आता थोडे विषयांतर, हल्लीच  एकदा एक जुनी मालिका बघितली. त्या मालिकेत दाखविलेले घर किती साधे होते, आजच्या मालिकांत कशी चकचकीत घरे असतात. ह्या मालिकेतील चकचकीत घरांचा महिला प्रेक्षक वर्गांवर हळूहळू प्रभाव पडतो. ही घरे अप्रत्यक्षरित्या मध्यमवर्गीयांच्या घरांचे मापदंड प्रस्थापित करतात. आणि आपण सर्व घरांच्या नूतनीकरणाच्या मागे लागतो. आज गिरीश कुबेरांचा लोकसत्तेतील 'चला चंगळवादी बनुयात' हा लेख वाचला. आपण सुस्थितीत असल्यास योग्य खर्च करून अर्थव्यवस्थेस चालना देणे अयोग्य नाही हा त्यांच्या लेखाचा विषय. त्यांचे एक वाक्य सुंदर आहे 'अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा अंथरूण मोठे करण्याचा देखील विचार करावा' असे ते म्हणतात. एकंदरीत त्यांच्या ज्ञानाचा, लेखनशैलीचा  मी चाहता बनत चाललो आहे!
 

Saturday, September 22, 2012

FM ते मुंबई ब



का कुणास ठाऊक मी आधुनिक कधी बनूच शकलो नाही. अगदी जुन्या काळातील पठडीचा नसलो तरी ७० - ८० च्या काळाच्या मानसिकतेतून मी अजूनही बाहेर पडलो नाही, आणि त्याची खंतही वाटत नाही. मॉल, फेसबुकची मानसिकता, भ्रमणध्वनीचा अतिरेकी वापर, प्रत्येक व्यक्तीने नव्याने शोधलेले व्यक्तीस्वातंत्र्य, प्रगतीच्या वाटा ह्या सर्व गोष्टी बघून जुनीच मानसिकता बरे असे वाटते. नवीन काळाची अजून एक खुण म्हणजे FM रेडिओ आणि त्यावरील निवेदकांची बाष्कळ बडबड. त्यापासून पळवाट म्हणून मी मुंबई ब चा आधार घेतला. माझी कार्यालयाची वेळ दुपारी एकची, मराठी गाण्यांच्या वेळेचा शोध घेता घेता मुंबई ब वरील शास्त्रीय संगीत ह्या कार्यक्रमाचा शोध लागला. मला शास्त्रीय संगीताचा गंध नाही परंतु ह्या कार्यक्रमांच्या २ -३ भागांचे श्रवण केल्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडलो. सकाळी थोडा वेळ कार्यालयीन काम केल्यानंतर कार्यालयात निघण्याआधी मी एक अर्धा-एक तासांची ताकदवान डुलकी :) घेतो. अशा वेळी १० वाजता मुंबई ब वरचा हा कार्यक्रम मला अतिशय एक सुखद शांतातादायी अनुभव देऊन जातो. मन अगदी एका वेगळ्या विश्वात निघून जाते.

अजूनही जुन्या बर्याच चांगल्या गोष्टी अस्तिवात आहेत. गरज आहे त्यांचे चांगलेपण कौतुकण्याची, आणि त्यांची माहिती एकमेकांना देण्याची!
 

Friday, September 21, 2012

संवाद कला


मनुष्यजातीला संवादकला बऱ्याच काळापूर्वी अवगत झाली. संवादाचा मूळ हेतू दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी लागणाऱ्या एकमेकांच्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या गरजेशी निगडीत होता. सुरुवातीला प्राथमिक अवस्थेत असणारी ही संवादकला काही जणांनी मग अगदी चांगल्या प्रकारे पारंगत केली. एखादा ज्ञानी मनुष्य आणि संवादकला यांचा दुधशर्करा योग काही जणांत जुळून आला. अशा लोकांनी आपल्या विद्वत्तेने मोठ्या जनसमुदायास प्रभावित करण्याचे काम उत्तमरीत्या पार पाडले.
पुढे काळ बदलला. ज्ञानी माणसांव्यतिरिक्त अजून काही जणांनी सुद्धा संवादकला हस्तगत केली. ह्यात दोन प्रकार आले, पहिल्या प्रकारातील लोकांनी संवादात गोडवा आणण्याची कला हस्तंगत केली. समोरच्या माणसाचे संवेदनशील मुद्दे ओळखून त्याभोवती त्यांना आवडेल असे संभाषण करून त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे काम करून घेण्यात ह्या लोकांनी यश प्राप्त केले. समोरच्या माणसाला आपण यात फसले जातो हे कळूनसुद्धा आपली स्तुती करून घेण्याचा मोह अनावर होत असल्याने ती माणसे ह्या पहिल्या प्रकारातील माणसांकडे वारंवार जातात. दुसऱ्या प्रकारातील लोकांनी जड शब्दांचे जंजाळ उभे करण्याची कला पारंगत केली. समोरची माणसे ह्या माणसांच्या शब्दसामर्थ्याने दिपून जातात, आणि मग संभाषणाचा मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. त्यामुळे ही माणसे आपल्याला हवा असणारा मुद्दा मान्य करून घेत. संभाषण पूर्ण झाल्यानंतर काही काळाने समोरचा माणूस भानावर येतो आणि मग त्याला कळते की आपली काही प्रमाणात फसवणूक झाली आहे. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली असते. आता ही माणसे कालांतराने शहाणी होतात आणि ह्या दुसऱ्या प्रकारातील माणसांशी सावधपणे वागू लागतात. ह्या दोन्ही प्रकारातील माणसांपासून थोडे सावध राहून वागावयास हवे कारण ही माणसे कमी प्रयत्नांत यश प्राप्ती करू इच्छितात. ह्या दोन्ही प्रकारातील माणसांपैकी काही जण आपले हे चातुर्य घरापर्यंत घेवून येतात आणि मग सर्वांसाठी बिकट परिस्थिती निर्माण होते.

बाकी वैयक्तिक जीवनात आपण संवादाला हवे तितके महत्त्व देत नाहीत असे मला वाटते. पूर्वीच्या पिढीतील कुटुंबांमध्ये, बऱ्याच प्रमाणात पिता -पुत्र, पती-पत्नी ह्या नात्यांत संवादांची कमतरता आढळून येत असे. ह्यातील प्रभावी घटकाने (पती, पिता) आपल्या नात्याचा प्रभाव कायम राहावा म्हणून हा उपाय योजला असावा असे मला वाटते. कालांतराने कमी संवादाची जागा विसंवादाने घेतली. बाहेरच्या लोकांशी बोलताना / वागताना असणारा समजूतदारपणा घरातील लोकांशी मात्र गायब होताना काही व्यक्तींच्या बाबतीत दिसतो. सुसंवादात अडथळे आणणारे घटक म्हणजे कार्यालयीन काम, दूरदर्शन, माहिती मायाजाळ, मॉल इत्यादी इत्यादी.. ह्या पातळीवरील संवादासाठी आपल्या जवळच्या माणसासाठी खास वेळ काढण्याची इच्छा असणे हा प्रभावी घटक बनतो.

अजून एक पातळी असते ती मित्रांमधील संवादाची. ह्यातील काही जीवाभावाच्या मित्रांना सततच्या संवादाची गरज नसते. कितीही कालावधीनंतर ते एकमेकाला भेटले तरी लगेच पूर्वीइतक्या तन्मयतेने एकमेकांशी संवाद साधू शकतात. याउलट काही जीवाभावाचे मित्र केवळ दोघांनीही संवाद साधण्याचा प्रयत्न न केल्याने दुरावतात. तसाच एक विशेष संवाद पूर्वी असायचा तो दोन प्रियकारांमाधला जो नजरेच्या माध्यमातून चालायचा. कधीही न बोलता प्रेम केवळ नजरेतून व्यक्त केले जायचे. इंटरनेट आले आणि हे सर्व दुर्मिळ संवाद प्रकार एकदम नष्ट झाले.

संवादाच्या पुढील पातळीत एक कुटुंब हा एक एकक बनतो. मग दोन कुटुंबांमधील संवाद हा चर्चेचा मुद्दा बनतो. पूर्वी असलेले दोन कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध सध्या झपाट्याने कमी होताना दिसतात. ह्यात दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवनात आपण अडथळा तर आणीत नाही आहोत नाही ना ही भिती प्राथमिक कारण असते. केवळ सुरुवातीचा पुढाकार न घेतल्याने हे संबंध प्रगत होत नाहीत. अशा पातळ्या पुढे वर वर जातात, एका समाजातील विविध कुटुंबांचा संवाद, दोन समाजातील संवाद, दोन राष्ट्रातील संवाद..एका विशिष्ट पातळीच्या पुढे संवाद राखण्यासाठी काही माणसांची नेमणूक केली जाते. अशा माणसांच्या कुशलतेवर त्या पातळीवरील ( उदा. दोन राष्ट्रांतील) संवादांची यशस्विता अवलंबून असते.

बाकी सर्व मनुष्यजात दोन प्रकारच्या संवादासाठी फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे.पहिला म्हणजे मनुष्य आणि सर्वशक्तिमान देव ह्यांतील संवाद आणि दुसरा म्हणजे मनुष्य आणि अंतरिक्षातील अजूनही न सापडलेल्या दुसऱ्या सजीवांशी संवाद! 

Sunday, September 16, 2012

सामाजिक वर्गांचे विश्लेषण



मध्यमवर्गातील काही वर्गास हल्ली वाटत असते की सद्ययुगात महागाई, भ्रष्ट्राचार अनागोंदी वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर चुकीच्या वृत्तींचे नियंत्रण आहे. आंग्ल भाषेतील एका अग्रगण्य दैनिकाने सभ्येतेच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. साधारणतः २५ वर्षांपूर्वी असलेली मराठी वर्गाची सभ्यतेची व्याख्या लयास गेली आहे. एकंदरीत परिस्थितीचा भावनात्मक न होता विचार करण्याचा हा प्रयत्न. इथे मराठी समाजातील विविध वर्गांच्या दृष्टीने ह्या परिस्थितीचे पृथ्थकरण करण्याचा हा प्रयत्न!
१> मध्यमवर्गीय नोकरपेशा बुद्धीजीवी प्रगत वर्ग
साधारणतः ६० -७० च्या सुमारास हा वर्ग शिक्षकी पेशात, सरकारी नोकरीकडे वळला होता. ह्या वर्गाने बदलत्या सामाजिक परिस्थितीचा वैयक्तिक पातळीवर अभ्यास केला. आपल्याला आपली शैक्षणिक पातळी उंचावली पाहिजे हे त्याने जाणले. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन ह्या क्षेत्रात ह्या वर्गाने आपल्या पुढील पिढीला गुंतवले. आर्थिक उदारीकरणाच्या सुमारास उत्तम संधी उपलब्ध होताच ह्या वर्गाने त्या हस्तगत केल्या. परदेश, शहरात ह्या वर्गाने स्थलांतर केले. ह्या वर्गाची वैयक्तिक प्रगती होत असतानाच ह्या वर्गाचा सामाजिक जीवनातील सहभाग कमी झाला. सार्वजनिक जीवनातील कार्यक्रमांच्या दर्जावर ह्याचा विपरीत परिणाम झाला. ह्या वर्गाने आपली आर्थिक परिस्थिती महागाईने परिणाम होण्याच्या पलीकडे नेल्याने हा वर्ग सद्यस्थितीत गप्प बसला आहे. आपली उर्जा आपली वैयक्तिक परिस्थिती अजून उंचावण्याच्या कामी राखून ठेवण्याचा ह्या वर्गाचा कल आहे. आपली आर्थिक स्थिती ह्या वर्गास इतकी प्यारी झाली की ह्या वर्गातील उरलासुरली वीरता नाहीशी होण्याच्या मार्गावर आली आहे.
२> इतर मध्यमवर्गीय वर्ग
ह्यात आपण दोन गट पाडू शकतो.
अ> पहिल्या गटाने सामाजिक , व्यावसायिक जीवनात उपलब्ध असलेल्या संध्या (संधी ह्या शब्दाचे अनेकवचन) हेरल्या. ह्या वर्गाने योग्य वेळी धाडस दाखवीत ह्या संधी हस्तगत केल्याने, त्यांचा पुढील मार्ग सुकर झाला. आपल्या आर्थिक स्थितीच्या जोरावर ह्या वर्गाने एकंदरीत सामाजिक जीवनावर प्रभाव प्रस्थापित केला. परंतु समाजाला योग्य वैचारिक दिशा देण्याच्या क्षमतेचा ह्या वर्गाकडे अभाव असल्याने परिस्थिती एकंदरीत दीनवाणी झाली. ह्या वर्गाचे बाकी व्यावहारिक कौशल्य वाखाणण्याजोगे! मॉल, व्यापारीकरण केलेले गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र ह्या सारख्या उत्सवाद्वारे त्याने मूळ समस्यांपासून लक्ष दूर नेण्यात यश मिळविले.
ब> दुसरा गट तसा काहीसा कमनशिबी ठरला. कमनशिबी हा शब्दच ह्या वर्गाची कथा सांगून जातो. ह्या वर्गाने आपले भविष्य नशिबाच्या हाती सोपविले, आपल्या हाती घेतले नाही. ह्या वर्गाला ना शैक्षणिक क्षेत्रातील बदलाची चाहूल लागली ना सामाजिक क्षेत्रातील संधींची. सध्याच्या परिस्थितीत सर्वात भरडला गेला असेल तो हाच वर्ग. सरकारच्या मदतीची सर्वात जास्त गरज ह्याच वर्गास असते. परंतु ती न मिळाल्यास आवाज उठविण्यासाठी आवश्यक असलेला संघटीतपणा अथवा आत्मविश्वास याचा ह्या वर्गाकडे अभाव आहे.
३> सामाजिक अपवृत्ती
ह्या वर्गाने सुरवातीला २ अ वर्गाला पुढे करीत सामाजिक जीवनात चंचुप्रवेश केला आणि कालांतराने आपले पुन वर्गीकरण करीत सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली.
४> सुसंस्कृत गर्भश्रीमंत वर्ग
हा वर्ग समाजात एकंदरीत आपली आब राखून होता. आणि ह्या वर्गाचे वागणेही जबाबदारीचे. परंतु कालौघात ह्या समाजाचे आर्थिक वर्चस्व तितकेसे कायम राहिले नाही. २ अ आणि ३ ह्या वर्गाने ह्या वर्गास स्पर्धा प्रस्थापित केली. २ अ आणि ३ ह्या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची असलेली सवय. परंतु ४ वर्गाने आपला आब कायम ठेवीत आपल्या वागण्यात फारसा बदल केला नाही.
एकंदरीत हल्लीच्या समाजाचे ढोबळमानाने वर्गीकरण करण्याचा हा एक प्रयत्न. राजकारणी वर्गाला ह्या परिस्थितीचे योग्य आकलन आहे. २ ब हाच खरा गांजला गेलेला वर्ग, त्याला संघटीत होवू न देणे, सार्वजनिक उत्सवांद्वारे, IPL द्वारे त्याचे लक्ष विचलित केले जाते. प्रश्न असा आहे की ही परिस्थिती किती काळ कायम राहणार? दोनच गोष्टी ही परिस्थती बदलू शकतात. १> आर्थिक मंदीने वर्ग १ प्रभावित होवून त्याचा बफर नाहीसा झाला. २> २ अ आणि ३ ह्यांच्यात एका बिंदूवर स्त्रोतांसाठी संघर्ष निर्माण होऊन माफिया राज निर्माण झाले तर.....

 

Friday, September 14, 2012

गुलजार आंधी चित्रपट




हा एक सत्तरच्या दशकातील गाजलेला चित्रपट. इंदिरा गांधीच्या आयुष्याशी असलेल्या काहीशा साधर्म्यामुळे ह्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. एका महत्वाकांक्षी स्त्रीने तरुणपणात आपल्या संसारातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, ९ वर्षानंतर पतीशी झालेली अचानक भेट. आयुष्यातील ध्येयाला मिळविण्यासाठी नायिकेने कठोर निर्णय घेतलेला असतो पण पतीशी भेट झाल्यानंतर स्वतःच्या भावनांना ती आवर घालू शकत नाही. त्यानंतर पतीच्या अस्तित्वामुळे तिच्या आयुष्यात येणारे वादळ..एक सुरेख चित्रपट.
ह्या चित्रपटातील गाणी जशी अप्रतिम तसेच संवाददेखील थेट हृदयाला भिडणारे. गाणी, संवाद या बरोबर संजीवकुमार आणि सुचित्रा सेनचा अभिनयही अवर्णनीय! काही प्रसंगांचे चित्रीकरण कायमचे लक्षात राहणारे. भेटीनंतर पतीच्या घरात शिरतानाची तिची भिरभिरती नजर. ही नजर आपणास बरेच काही सांगून जाते. माझ्याशिवाय हा कस आयुष्य जगतोय, ह्याच ठीक चाललंय ना, एक नजर बरेच काही सांगून जाते. संवाद ही कसे, एकाच वाक्यातून जीवनातील अर्थही सांगून जाणारे. दिर्घ काळानंतरच्या पहिल्याच भेटीत तो म्हणतो 'थोडा पतला हो गया हुं'. मी शरीराने तर खचलोच पण मानसिक दृष्ट्या (तुझा सहवास नसल्याने) कमजोर बनलो आहे. एका प्रसंगात नायिका म्हणते. तुम्हारी साथ कविता न होती तो तुम सामान्य होते. बर्याच वेळा असंच होत बघा, प्रेमिक एखाद्या गुणावर भाळून जातात. नायक नायिकेला जवळच्याच एका भग्न जुन्या वास्तूच्या स्थळाविषयी माहिती देवून म्हणतो की जेवणानंतर आपण तिथे फिरायला जात जाऊ, त्यानिमित्ताने ह्या उजाड इमारतीला थोडे जीवन तरी लाभेल.

ह्या चित्रपटातील ३ गाणी ऐकणार्यास मंत्रमुग्ध करून टाकतात. चित्रपटाच्या कथेत ही गाणी एकदम चपलख बसतात अगदी देहात वसणाऱ्या हृदयाप्रमाणे!
१> तुम आ गये हो नूर आ गया हैं
तू माझ्या जीवनात आल्याने माझ्या जीवनाचा कायापालट झाला आहे. जीवनात रस निर्माण झाला आहे. नाही तर जीवन एकदम भकास चालले होते. तू माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला आहेस. तू येण्याआधी मी एक दिशाहीन जीवन जगात होतो. कोठून कोठे चाललो आहे हे माझेच मला कळत नव्हते. पण मला विश्वास होता की जीवनाच्या एका वळणावर आपण परत भेटू. तुझी इच्छा मला तुझ्याकडे खेचून आणत होती.
२> इस मोड से जाते हैं
बहुदा हे गाणे चित्रपटात दोनदा येत. पहिल्यांदा नायक नायिका लग्नाआधी भेटतात तेव्हा आणि दुसर्यांदा नऊ वर्षानंतरच्या भेटीच्या वेळी.
आयुष्याच्या ह्या वळणावर आपण भेटलो आहोत. इथून जाणारे काही रस्ते वेगवान (नायिकेचा महत्वाकांक्षी मार्ग) आहेत तर काही सुस्त (नायकाने साध आयुष्य जगण्याचा घेतलेला निर्णय) आहेत. ह्या वळणावरून पुढे बनणारी काही नाती चिरेबंदी वाड्याप्रमाणे भरभक्कम आहेत तर काही काचेच्या महालासारखी क्षणभंगुर आहेत. एका सुसाट वादळाप्रमाणे जाणारा हा एक मार्ग माझ्या मार्गाजवळ आल्यावर मात्र काहीसा बुजरा होतो. ह्या अनेक मार्गांतील एक मार्ग असा असावा जो मला तुझ्याकडे घेवून जाईल.   

३> तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं
एक तू सोडलीस तर माझी जीवनाविषयी काहीच तक्रार नाही. पण तुझ्यावाचूनच्या जीवनाला जीवन म्हणणे जीवावर येते. माझी जीवनरेखा तुझ्या पाऊलवाटेशी मिळतीजुळती असती तर किती बरे झाले असते. तू जर बरोबर असलीस तर आयुष्यात ध्येयांची काही कमतरता नाही.
मग मध्येच संवाद येतो
ह्या ज्या फुलांच्या माळा दिसतायेय त्या माळा नाहीयेत अरबी भाषेतील रचना आहेत दिवसा स्पष्ट दिसतात दिवसा हा परिसर पाण्याने भरलेला असतो. नायिका त्याला अडवून म्हणते दिवसाच्या गोष्टी का करतोस, मी थोडीच दिवसा इथे येवू शकणार? मग नायक आकाशातील चंद्राकडे वळून म्हणतो हा दिवसा नसतो, रात्रीच येतो. इथे परिस्थितीमुळे दिवसा नायकाला भेटू न शकणारी नायिका लक्षात घ्या. पण मग कधी कधी अमावस्या येते, (कृष्णपक्ष), खरेतर कृष्ण पक्ष १५ दिवसांचा असतो पण या वेळी बराच काळ (९ वर्ष) टिकला. इथे नायिका भारावून म्हणते नऊ वर्षांचा दुरावा फार कठीण होता नाही?
खरेतर आपल्या महत्वाकांक्षी वृत्तीमुळे नायिकेने स्वतंत्र मार्ग पत्करलेला आहे. पण अशा क्षणी तिची नायकाच्या बाहुपाशात येवून आपली सर्व दुःख अश्रुद्वारे मोकळे करून टाकण्याची इच्छा अनावर होते. पुढची पंक्ती पहा. तुम जो कह दो तो आज कि रात चांद डूबेगा नही! नऊ वर्षांनी आज एकमेकाला परत भेटलेलो आपण, जर तुझी इच्छा असेल तर तर माझ्या आयुष्यातील ही रात्र , तुझ्या रूपाने आलेला चंद्र असाच कायम राहील. हे नायकाने नायिकेला आपल्याबरोबर राहण्यासाठी केलेले आर्जव किती अप्रतिमरीत्या रुपकाद्वारे मांडले गेले आहे.

घर असो वा आंधी, प्रेमी युगुलाचा वास्तविक जीवनातील प्रवास गाण्याभोवती गुंफला गेला आहे. प्रत्येक मनुष्याचे एक स्वत्व असत, प्रेमात असताना हे स्वत्व फुलून निघत, उजळून निघत. लग्नानंतर समोर येत ते व्यावहारिक जीवनातील कठोर सत्य. ह्यात दोन वेगळे जीव आपापली स्वत्व घेवून जीवन जगत असतात. जीवनरगाड्यात आपल स्वत्व तर हरवून जात तसच आपल्या साथीदाराच्या स्वत्वाच्या अस्तित्वाचा देखील कधी कधी विसर पडू शकतो. गुलजार यांची ही गाणी ह्या स्वत्वाभोवती कशी गुंफली जातात हे अनुभवण शब्दांच्या पलीकडल असत.