Friday, July 26, 2013

वसई ते मुंबई - शिक्षण , नोकरीसाठी प्रवास!


गेल्याच आठवड्यात फेसबुकवरच्या वसई ग्रुपमध्ये अपलोड केलेला भाईदर पुलावरील जुन्या रेल्वेगाडीचा फोटो पाहिला. ह्या गाडीच्या रुपात आता आमुलाग्र बदल झाले असले तरी कायम राहिला आहे तो शिक्षण नोकरीसाठी वसईकरांना करावा लागणारा लोकलगाडीचा प्रवास. हा प्रवास सुसह्य करण्यासाठी पश्चिम रेल्वेने केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत तरीसुद्धा वसईकरांना प्रवासात खर्च करावा लागणारा वेळ, शक्ती ह्या गोष्टी मात्र कायम राहिल्या आहेत. काळानुसार ह्या खर्च कराव्या लागणाऱ्या वेळ आणि शक्तीचा वसईकरांच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामाचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न.
माझी आठवण सुरु होते ती माझ्या वडिलांच्या नोकरीपासून. त्यांची नोकरी कुलाब्याला NPC च्या ऑफिसात. सकाळी साडेसातच्या सुमारास ते घरातून बाहेर पडत. त्याआधी त्यांनी गाईचे दुध काढणे, तिला पाणी पाजणे अशी कामे आटोपली असत. त्यांच्या ट्रेनमध्ये चांगला ग्रुप होता. त्यामुळे डब्यात एकदा आत शिरले की मग फारशी चिंता नसे. विरारला डाऊन जाऊन आलेली मंडळी वांद्र्यापासून उठायला लागत आणि मग त्यांना बसायला मिळे. संध्याकाळी पाचला ऑफिस सुटले की उडी मारून चर्चगेटहून सुटलेल्या विरार गाडीत बसायला मिळाले की सातसाडेसातपर्यंत ते घरी पोहोचत. तेव्हाही गाईला पाणी पाजणे, गड्याने सुट्टी मारली असल्यास गाईचे दुध काढणे ह्या कामासाठी त्यांच्यात शक्ती बाकी असे.
दहावीपर्यंत वसईत शिक्षण घेतल्यावर अकरावीला रुपारेलला प्रवेश घेतल्यावर मी होस्टेलला राहिलो. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी वसईला येण्यासाठी आणि रविवारी संध्याकाळी / सोमवारी सकाळी होस्टेलला परतण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासापुरती रेलवे प्रवास मर्यादित राहिला. अभियांत्रिकी शाखेत स्थापत्य शाखेत VJTI आणि SPCE अशा दोन्ही ठिकाणी प्रवेश मिळत असताना वसईहून येण्यासाठी सोयीस्कर म्हणून SPCE ची निवड केली. त्यावेळी कॉलेज साडेचार, पाचच्या आसपास सुटत असल्याने गर्दीचा इतका त्रास होत नसे. परंतु घरी आल्यावर एकाग्रतेने अभ्यास करण्याची क्षमता कमी होत असे.  
ह्यात अजून एक मुद्दा येतो. वसईच्या हवेची शुद्धतेची पातळी ही निर्विवादपणे मुंबईच्या हवेपेक्षा बऱ्याच उच्च दर्ज्याची आहे. त्यामुळे रात्रीच्या गाढ झोपेनंतर माणूस ताजातवाना होवू शकतो आणि वसईत झोपी जाण्याची सरासरी वेळ अजूनही दहाच्या आसपास आहे ह्याउलट मुंबईत ती अकरा- साडे अकरा आहे.
सिंटेलमधला माझा पहिला प्रोजेक्ट वेळेच्या बाबतीत जरा अफलातून होता. आम्हाला सकाळी सीप्झमधील ऑफिसात साडेआठ वाजता पोहोचणे बंधनकारक होते. त्यामुळे सकाळी सव्वासातची वसई लोकल पकडण्याव्यतिरिक्त पर्याय नसे. रात्री साडेआठच्या आधी  ऑफिसातून निघणे अशक्यप्राय असे. ९८ सालची गोष्ट ही. त्यावेळी रात्री सात ते साडेनऊ ह्या वेळात अंधेरी स्थानकावर विरार लोकलमध्ये शिरणे हे महादिव्य असे. आता बऱ्याच अंधेरी लोकल झाल्याने परिस्थिती पालटली आहे. इतके करून वसई स्टेशन ते रमेदी ह्या प्रवासासाठी रिक्षांची मारामारी असे आणि बरेच वेळा पारनाका ते रमेदी चालत जावे लागे. रात्री साडेदहाच्या आसपास घरी पोहोचले कि दिवसातील पहिले पूर्ण जेवण समोर असे. पोट भरून जेवल्यावर कितीही अयोग्य असले तरी लगेचच झोपण्याशिवाय पर्याय नसे. परंतु त्या वयात हे सर्व खपून गेले. ह्यातील एक मजेदार आठवण. एकदा मी पावणेअकराच्या सुमारास वसई बस डेपोत आलो. दोन बस समोर होत्या. पारनाका आणि होळी. पारनाका बस पकडली असती तर पारनाका ते रमेदी चालत जावे लागले असते, होळी बस गिरिजला जावून मग होळी मार्गे रमेदी - पारनाका अशी जाणार होती. पारनाका - रमेदी अंतर चालायला लागू नये म्हणून मी गिरिज- होळी बस पकडली. दहा ते बारा मिनिटात बस गिरीजला पोहोचली तिथे ती वळण घेताना त्याच्या मागे नेमके झाड पडले! पावसाळ्याचे दिवस होते ते! आम्ही पाच - सहा जणच बस मध्ये होतो आम्ही गिरिजला अडकून बसलो. त्यावेळी भ्रमणध्वनी नव्हता माझ्याकडे. मग गिरिज ते रमेदी असा पल्ला मी कूच केला.
नशिबाने सिंटेलमध्ये नंतर चांगले प्रोजेक्ट मिळाले. संध्याकाळची पाचला सुटणारी बस पकडू शकण्याएवढे चांगले. त्यामुळे बऱ्याच वेळा पाच पंचवीसची अंधेरीला असणारी लोकल आणि सहा दहाच्या आसपास असणारी होळी बस ह्यांच्या मदतीने मी सहा चाळीसच्या आसपास घरी पोहोचत असे. २००४ मध्ये सिंटेल सोडली. तोवर अधूनमधून इंग्लंड, अमेरिकेच्या फेऱ्या होत राहिल्या. प्रत्येक फेरीनंतर विरार लोकलला सरावायला एखादा आठवडा जाई.
सिंटेलनंतर TCS. ही कंपनी जरा उशिरानेच जागी होई. लोक ऑफिसात दहाच्या आसपास यायला सुरुवात होई. लोकांना रात्री घरी निघण्याची अजिबात घाई नसे. त्यामुळे माझा जीव कासावीस होई. ४१५ बस कधी मिळेल आणि मग कोणती गाडी मिळेल ह्याची गणिते मी सात वाजल्यापासून मांडायला सुरु करी. TCS मधून सलग दोन वर्षे परदेशी राहून परतल्यावर वसईहून प्रवास करणे मला कठीण जावू लागले. ह्यात दोन घटकांचा समावेश होता. एक म्हणजे वाढलेले वय. रात्री उशिरा घरी पोहोचल्यावर इच्छा असून सुद्धा पूर्ण आहार करणे अपचनाच्या भीतीने शक्य नव्हते. आणि दुसर म्हणजे वाढलेली जबाबदारी! आधी स्वतःचे काम आटोपले की दुकान बंद! पण आता पूर्ण टीमची जबाबदारी अंगावर होती. मग बोरिवलीला राहण्याचा निर्णय घेतला. कालांतराने TCS सोडली आणि ऑफिस मालाडला आलं.
आता प्रवास अर्ध्या तासावर आला आहे. देवाची कृपा! आता प्रवासात वेळ आणि शक्ती वाचत असल्याने ओफिसातील कार्यक्षमता निर्विवादपणे वाढली आहे. रात्री विरार गाडी पकडण्याच्या दबावामुळे निर्माण होणारी घालमेल होत नाही. वेळ मिळाल्याने ब्लॉग लिहिण्याचे उद्योगहि करतो. आणि …। वसईबद्दलचे प्रेम अनेक पटीने वाढले आहे. दूर राहिल्यावर आपल्या वसईचे महत्त्व अधिकच जाणवत! अगदी सासुरवाशिणीसारखे!
शेवटी काय तर हा भावना आणि व्यवहाराचा प्रश्न आहे. वसईत सर्व वसईकरांच्या भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे वसई सोडायचा विचार फार कमी जण करू शकतात. परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलले आहे. अधिकाधिक वसईकर मोठ्या हुद्द्यावर आहेत. ही यादी पाहिली तर थक्क व्हायला होईल आपल्याला! ह्या नोकऱ्यातील कामाचा विचार सतत तुमच्यासोबत राहतो! आणि तो तुम्हाला जास्त थकावितो! ह्या नोकरीच्या बदलत्या स्वरूपामुळे माणसाला फोनवर आणि संगणकाच्या माध्यमातून सतत उपलब्ध असावे लागते. आणि तुम्ही मनाने ताजेतवाने असणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थित झोप, वेळच्या वेळी आहार  घेणे आवश्यक आहे. माझ्या कार्यालयात बाहेरून आलेले बरेच मित्र आहेत. बोरिवलीत वीस-बावीस हजाराच्या भाड्यावर २ BHK FLAT मिळतो. परंतु ते मालाडला अठ्ठावीस - तीस हजार भाडे भरून FLAT घेतात. त्यातील एक मित्र मला म्हणाला मी हे जास्तीचे पाच हजार अधिक / चांगले काम करून मिळवीन!
आता एक वेगळा विचार. पूर्वी मालाडचे चिंचोळीबंदर हा भाग अगदी अविकसित होता. परंतु गेल्या दहा वर्षात तिथे विश्वास न बसण्याइतकी प्रगती झाली. कार्यालये आली आणि त्याबरोबर इमारती आल्या. कार्यालयात काम करणारी लोकही जवळ येवून राहिली. ह्यामुळे समस्याहि निर्माण झाल्या हा भाग वेगळा. तीच गोष्ट नवी मुंबईची!
मी विचार करतो की वसईत TCS, IBM अशा कंपन्याची कार्यालये कधी येवू शकतील का? आपल्या वसईत अनेक दूरदृष्टी असणारे लोक आहेत. ह्यातील कोणाच्या अजेंडावर हा मुद्दा आहे काय? ह्यात कोणत्या अडचणी आहेत (विजेची आहे ते आपणा सर्वांना माहित आहेच!) आणि त्यावर उपाय कोणते? शहरीकरणामुळे कोणत्या समस्या निर्माण होवू शकतात? ह्याचादेखील विचार होणे आवश्यक आहे.
हा विचार येण्याचे कारण एकच! पुढील पिढीला वसईहून प्रवास करणे अधिकच कठीण होणार आहे, विशेषतः पावसाळ्यात! त्यांच्यासाठी आपण आताच विचार करून योग्य कृती करणे आवश्यक आहे!

Thursday, July 25, 2013

तपोवन - भाग १०


दाट जंगलातील निद्राधीन झालेल्या त्या आश्रमातील शांतता सिद्धार्थच्या अश्वाच्या दूरवरून येणाऱ्या टापांच्या आवाजाने काहीशी भंगली. आश्रमापासून काही अंतरावर सिद्धार्थ अश्वावरून पायउतार झाला आणि आश्रमात प्रवेश करता झाला. आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील सेवकांनी त्याला थेट महर्षी अगस्त्यांच्या कुटीत नेले. अशा अवेळी सिद्धार्थचे आगमन महर्षींना सुद्धा आश्चर्यचकित करून गेले. सिद्धार्थने त्यांना आपल्या भेटीचे प्रयोजन सांगितले आणि सीमंतिनीची भेट घेवून देण्याची विनंती केली. सिद्धार्थचा निर्धार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. महर्षीनी क्षणभर विचार केला. आणि सिद्धार्थला तिथेच थांबण्याची आज्ञा केली. जसे ही भेट सर्वांच्या नजरेसमोर होवून देणे योग्य नव्हते तसेच योग्य नव्हते सिद्धार्थला भेटीशिवाय परत पाठविणे. महर्षीनी सेवकांना फळांचा रस आणण्यासाठी पिटाळले. आणि मिळालेल्या संधीत सर्वांच्या नजरा चुकवून सीमंतिनी कुटीत आली. महर्षी अगस्त्यनी त्या दोघांना कुटीतील एका कक्षात एकांतात बोलण्याची संधी दिली.
"सीमंतिनी, मी तुझ्याशी इथे विवाह करून तुला माझी पत्नी म्हणून घेऊन जाण्यासाठी आलो आहे", सिद्धार्थ बोलता झाला. स्थितप्रज्ञ असली म्हणून काय झालं, सीमंतिनीला आपल्या चेहऱ्यावरील लज्जेचे भाव लपवणे शक्य नव्हते. लज्जेने गुलाबी छटा पसरलेले तिचे गाल, खाली भूमीकडे झुकलेली तिची प्रणयिनीची नजर सिद्धार्थला सर्व काही सांगून गेली. आता कोणत्याही क्षणी सीमंतिनीच्या तोंडून होकार ऐकायला मिळेल अशीच सिद्धार्थची समजूत झाली. "महाराज," सीमंतिनीने बोलण्यास आरंभ केला. महाराज हा शब्द सिद्धार्थला खूपच खटकला. अशा ह्या क्षणी ह्या शब्दाचे प्रयोजन काय असा विचार येऊन सिद्धार्थ काहीसा रागावलासुद्धा. "आपण आपली जीवनसाथी म्हणून माझा विचार करता आहात, ही माझ्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सद्यपरिस्थितीत ह्या राज्याचे अधिपती म्हणून असलेले आपले कर्तव्य ही अधिक महत्वाची गोष्ट आहे असे मला वाटते. शत्रूने राज्याभोवती मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशा वेळी आपण विवाहबंधनात अडकून बसलात तर आपल्या तयारीत हयगय होण्याचा धोका संभवतो. आपण शत्रूचा पराभव करून आलात की मी जरूर आपल्या प्रस्तावाचा विचार करीन".
सीमंतिनीच्या ह्या शब्दांनी सिद्धार्थच्या मनात एका क्षणात अनेक भावना निर्माण झाल्या. प्रामुख्याने त्यात अपेक्षाभंग होता आणि आश्चर्यही होते. त्याला जितके आश्चर्य वाटलं त्याच्या दहा पटीने जास्त सीमंतिनीला वाटलं होत. आपण असे काही बोललो ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. इतके दिवस ज्याला अर्पण होण्याची आपण कामना मनी बाळगली त्या मनीच्या राजकुमाराने स्वतःहून आपणास मागणी घातली असताना आपण असे काही बोलू शकतो ह्याचेच तिला अति आश्चर्य होत होते. त्याच वेळी दुसर मन मात्र तिला तू हे योग्यच केलं असं सांगून तिची समजूत घालीत होते.
सिद्धार्थने मग तिथे जास्त वेळ घालविला नाही. पुढे सर्व काही अनिश्चितताच भरून राहिली होती. त्याने महर्षीचा निरोप घेवून राजनगरीकडे प्रस्थान केले. सिद्धार्थ आणि सीमंतिनी ह्या दोघांना बोलण्यासाठी महर्षीनी जरी एकांत दिला असला तरी त्यांचे बोलणे अजून कोणीतरी ऐकत होत.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात राजमाता शर्मिष्ठा उद्यानात फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. मनावर कितीही दगड ठेवला तरी अशा काही क्षणी घातलेले सर्व बंध तुटून पडायचे. ह्याच उद्यानात महाराज अंशुमत ह्यांच्यासोबत त्यांनी किती स्वप्ने रंगविली होती. डोळ्यातील येवू पाहणाऱ्या अश्रूंना त्यांनी आता मात्र रोखले नाही. आजूबाजूला महाराजांचे अस्तित्व आहे असा राहून राहून त्यांना भास होत होता.
असाच काही वेळ उद्यानात घालवून राजमाता आपल्या दालनात परतल्या तेव्हा सेनापती त्यांची प्रतीक्षा करीत असल्याची खबर सेविकेने त्यांना दिली. सेनापतींनी त्यांना रात्रीचा सर्व वृतांत कथन केला आणि सिद्धार्थ - सीमंतिनीचे बोलणेही! प्रथम राजमातेची मुद्रा क्रुद्ध झाली. सिद्धार्थने अशी हरकत करावी ह्याचे त्यांना दुःख झाले. महर्षीच्या वागण्याचेही त्यांना आश्चर्य वाटले. परंतु ज्यावेळी सीमंतिनीचा विचार त्यांच्या मनात आला त्यावेळी मात्र त्यांना त्या कधीही न पाहिलेल्या युवतीविषयी कौतुकाची भावना दाटून आली. ज्या सुखाची ह्या भूमातेवरील असंख्य कन्या मनोकामना बाळगून आहेत ते सुख समोर उभे असताना सुद्धा जी कर्तव्याचा विचार करू शकते आणि तो विचार राजापुढे मांडू शकते, तिला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली!"

Saturday, July 20, 2013

तपोवन - भाग ९


राज्याभिषेकाची धांदल पुढील दोन दिवस पुरली. तिसऱ्या दिवशी मात्र राजमाता शर्मिष्ठा ह्यांनी राजा प्रद्द्युत ह्यांना बैठकीस बोलावले. राजा सिद्धार्थ, सेनापती आणि प्रधान राजमहालाच्या खास दालनात बसून राजा प्रद्द्युत ह्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. सेवकांची चाहूल लागली आणि राजा प्रद्द्युत ह्यांचे आगमन झाले.  ते एकटे नव्हते त्यांच्याबरोबर राणी आश्लेषा ह्याही होत्या. राणी आश्लेषा ह्यांची ह्या बैठकीतील उपस्थिती काहीशी अनपेक्षित आणि शिष्टाचाराला अनुसरून नव्हते. मंडळींच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आठ्या पाहून राजमातेने त्यांना नजरेनेच शांत राहण्यासाठी खुणावले. शिष्टाचाराची चैन परवडण्याची ही योग्य वेळ नव्हे हे त्या पक्के जाणून होत्या.
चर्चेस सुरुवात झाली. राजा प्रद्द्युत ह्यांच्यासमोर संधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परस्परांच्या राज्यावर आक्रमण न करणे आणि कोणा एकाच्या राज्यावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतीस धावून येणे असे ह्या संधीचे स्वरूप होते. सद्यपरिस्थिती ध्यानात घेता, राजा प्रद्द्युत ह्यांना दर वर्षी पाच सहस्त्र सुवर्णमुद्रा सुद्धा देण्यात येणार होत्या. राजा प्रद्द्युत ह्यांची खुललेली मुद्रा सर्वांच्या लक्षात सुद्धा आली. ते उत्तर देण्यास सुरुवात करणार इतक्यात राणी आश्लेषा ह्यांनी त्यांना नजरेनेच थांबविले. त्यांच्या ह्या खुणेचा अर्थ राजा प्रद्द्युत ह्यांना समजला. "हा प्रस्ताव आम्हाला मंजूर नाही", राजा प्रद्द्युत ह्यांचे हे उद्गार सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देवून गेले. प्रधानांनी तरीही प्रयत्न करून पाहिला. परंतु एकंदरीत परिस्थितीत काही फरक पडला नाही.
बैठक संपली आणि मंडळी दालनातून बाहेर निघण्यासाठी निघाली. "आम्हांला तुमच्याशी काही खाजगीत बोलायचे आहे", राणी आश्लेषा राजमाता शर्मिष्ठा ह्यांना म्हणाल्या. सर्व मंडळी बाहेर पडल्याची खात्री झाल्यावर त्या राजमातेला म्हणाल्या "ह्या प्रस्तावाची गरजच काय? ह्या दोन राजघराण्यांचे नातेसंबंध जुळावेत अशीच आमची इच्छा आहे". राजमातेला हे ऐकून काहीसा धक्का बसला. सिद्धार्थचे इतक्यात विवाहाचे वय झाले नाही असेच त्याचं मत होते. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हा प्रस्ताव नक्कीच विचार करण्यासारखा होता. नवख्या सिद्धार्थला जबाबदारी पार पाडण्यासाठी एक मोठा आधार मिळणार होता. हा नातेसंबंध जुळून आला तर शत्रुघ्नसारख्या छोट्या वैऱ्याची चिंता करण्याची गरजच पडणार नव्हती. "मी, सिद्धार्थशी बोलून मग तुम्हाला कळविते", राजमातेचे उत्तर राणी आश्लेषा ह्यांना फारसे आवडले नाही. त्यांना तत्काळ होकार हवा होता.
सिद्धार्थ आपल्या दालनात विचारमग्न होऊन बसला होता. इतक्या सर्व धावपळीत सीमंतिनीचा सवडीने विचार करण्याची फुरसत त्याला जरी मिळाली नसली तरी तिचा चेहरा कायम त्याच्या नजरेसमोर तरळत असे. आज बऱ्याच दिवसांनी काहीशी सवड मिळाल्याने तो तिच्या आठवणीत मग्न झाला होता. विरहाचे दुःख काय असते हे ज्याला अनुभव येतो त्यालाच समजत. इतक्यात द्वारातून राजमातेला येताना पाहून तो काहीसा दचकला. एका क्षणात त्याने स्वतःला सावरले आणि तो राजमातेजवळ बसला.  महाराज अंशुमत ह्यांच्या मृत्युनंतर मायलेकांना एकांतात एकत्र येण्याची संधी फारच कमी मिळत असे. राजमातेने सिद्धार्थच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. सिद्धार्थला काहीस गहिवरून आले. परंतु आता असे भावनाविवश होऊन  चालणार नव्हते. राज्यकारभाराच्या घडीविषयी राजमातेने काही सल्ले सिद्धार्थला दिले. नंतर शत्रुघ्नचा विषय काढता काढता तिने गाडी हळूच राणी आश्लेषा ह्यांच्या प्रस्तावाकडे वळविली. सिद्धार्थला हे एकदम अनपेक्षित होते. एरव्ही संयमी असणाऱ्या सिद्धार्थची मुद्रा काहीशी रागीट झाली. पण लगेच त्याने स्वतःला सावरले. "मला ह्या विवाहबंधनात पडायचं नाहीय!" सिद्धार्थ म्हणाला.
दुपारच्या भोजनानंतर राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्यांनी आपल्या राज्याकडे प्रस्थान केलं. एकंदरीत त्यांचा पाठींबा सिद्धार्थच्या निर्णयावर अवलंबून होता. वातावरणातील अनिश्चितता राजमातेला असह्य होत होती. त्यांनी पुन्हा एकदा जेष्ठ मंडळींची बैठक बोलावली. सिद्धार्थने ही बैठक टाळण्याची राजमातेकडून परवानगी मिळविली होती. राणी आश्लेषा ह्यांचा प्रस्ताव ह्या बैठकीत सांगावा कि नाही ह्याविषयी राजमातेची द्विधा मनःस्थिती होती. शेवटी त्यांनी न राहवून हा प्रस्ताव मंडळीसमोर मांडला. आणि सिद्धार्थचे उत्तरही! मंडळींना एकंदरीत धक्काच बसला. पंडित न राहवून म्हणाले "क्षमा असावी राजमाता! एकंदरीत सैन्याची जय्यत तयारी करणेच इष्ट होईल!" बैठक मग त्या तयारीला लागली. बैठक संपताच सेनापतींनी राजमातेची एकांतात भेट घेण्याची परवानगी मागितली. त्यांच्या सेनानायकाने आश्रमात ऐकलेला सीमंतिनी आणि सिद्धार्थ ह्यातील संवाद सेनापतींना सांगितला होता. हे रहस्य उघड करण्याची हीच वेळ आहे हे जाणून घेवून सेनापतींनी थोडक्यात हे सारे राजमातेला सांगितले. राजमातेसाठी आजच्या दिवसातील हा अजून एक धक्का होता.
निशेने राजनगरीवर आपला अंमल बसविला होता. राजमहालातील भोजने केव्हाच आटोपली होती. काही वेळाने सर्वजण निद्राधीन झाले. आणि मग एकदम गुप्तपणे राजबिंडा सिद्धार्थ घोड्यावर स्वार होऊन राजमहालाबाहेर पडला. त्याचा मार्ग अगदी ठरला होता. आणि निर्धारही पक्का होता. परंतु आपल्या मागावर घोडेस्वारांचे एक पथक आहे ह्याची मात्र त्याला जाणीव नव्हती. सेनापतींनी सांगितलेल्या बातमीनंतर त्याच्यावर पाळत ठेवण्याची खबरदारी राजमातेने घेतली होती. परंतु त्याचा आजच उपयोग होईल ह्याची मात्र त्यांना कल्पना नव्हती.


 

Saturday, July 13, 2013

माझ्या मुलाचा अभ्यास!


दिनांक २०१३ जुलै 

सोहमचा अभ्यास घेताना त्याची एकाग्रता हा माझ्या चिंतेचा मोठा विषय होऊन बनला आहे. त्याच्या एकाग्र होऊन बसण्याचा अवधी तुलनेने कमी आहे. आता तुलना कोणाशी? तर मी ओघाने ही तुलना मला आठवणाऱ्या माझ्या एकाग्रतेच्या पातळीशी करतो. आता ह्यात अनुवंशिकता हा घटक सोडला तर बाकी कोणते घटक येऊ शकतात ह्याचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न !
मी सोहमच्या वयाचा असताना मला अभ्यासाव्यतिरिक्त फार कमी गोष्टी माहित होत्या. ह्या वर्गात अंगणातील खेळ, विशिष्ट महिन्यात खेळले जाणारे भारतीय क्रिकेट संघाचे सामने, संध्याकाळी ३ - ४ तास चालू असणारे दूरदर्शन ह्या प्रामुख्याने गणल्या जाणाऱ्या गोष्टी होत्या. किलबिल सोडला दूरदर्शनवर मुलांचे कार्यक्रम तुलनेने कमी असायचे, कार्टून तर माझ्या आठवणीनुसार फक्त रविवारी सकाळी असायची. अशा प्रकारे बघायला गेलं तर माझ्या मेंदूला अभ्यासाव्यतिरिक्त खुणावणाऱ्या प्रलोभनांची संख्या मोजकी होती.
आता सोहमचा विचार करूयात.
१) २४ तास सुरु असणाऱ्या कार्टून वाहिन्या अनेक आहेत, त्याला अतिवेगवान गाड्यांची खूप आवड आहे आणि त्यामुळे डिस्कवरीवरील त्या प्रकारच्या वाहिन्या तो आवडीने बघत असतो. पत्नी २ मराठी मालिका बघते. घरी त्या वेळात बाकी कोणी नसल्याने सोहमही त्या बघतो.
२) सोहमच्या शाळेत फुटबॉल खेळले जाते. त्यामुळे त्याचा घरी सराव करण्याव्यतिरिक्त त्याचे युरोपिअन लीगचे सामने तो अधूनमधून पाहतो. मे महिन्यात केलेल्या सायकलच्या सरावाचा परिणाम आणि माझी पसंद म्हणून तो टूर द फ्रान्स ही सायकल शर्यत सुद्धा पाहतो. तीच गोष्ट विराट कोहलीमुळे आवडू लागलेल्या क्रिकेटची
३) सोहमच्या शाळेचा बराचसा अभ्यास संगणकावर दिला जातो. तो अभ्यास संपवल्यावर संगणकावरील खेळ त्याला आकर्षित करतात.
४) सोहमच्या शाळेत दर आठवड्याला प्रोजेक्ट करावे लागतात. त्यासाठी सोहमला (आणि त्याही पेक्षा जास्त त्याच्या आईला) मेहनत घ्यावी लागते. ह्यासाठी आठवड्यात एकदा दुकानात फेरी आणून जागतिक प्रदूषणात भर घालणारे रंगीत चकचकीत कागद, गोंद वगैरे प्रकार त्याला / पत्नीला विकत घ्यावे लागतात.
५) सोहम सामाजिक शास्त्र / भूगोल ह्या विषयातील भारताच्या शेजाऱ्यांचा अभ्यास करताना अधिक माहितीसाठी ATLAS उघडतो. आणि मग डोरेमॉनचा देश कोणता म्हणून जपानमध्ये गुरफटून जातो.
६) माझ्या आणि पत्नीच्या मोबाईल फोन आणि iPAD वर नवीन काय उद्योग करता येतील हा सोहमच्या अंतर्मनात सदैव दडलेला विचार असतो.
एकंदरीत काय ह्या सर्व गोष्टी सोहमच्या मेंदूत प्रमुख विचार बनण्यासाठी धडपडत असतात. त्याला अभ्यासाला बसविले की माझ्या धाकाने तो १० मिनिटापर्यंत ह्या विचारांना ढकलू शकतो. पण मग त्यानंतर त्याचा नाईलाज होतो आणि मग त्याची चुळबुळ सुरु होते. मग एक दोन प्रश्न विचारून गाडी वळणावर आणावी लागते.
ह्यात एक गोष्ट मात्र आहे. सोहमचा / नवीन पिढीचा मेंदू तुलनेने अधिक प्रगतावस्थेत गेलेला आहे. मानवी उत्क्रांतीत ही काही नवीन गोष्ट नव्हे. परंतु ह्यात लक्षात घेण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. काही न करता शांत बसून राहण्याची ह्या नवीन पिढीची क्षमता खलास होत चालली आहे आणि वेळ घालविण्यासाठी तंत्रज्ञानाची त्यांना अधिकाधिक मदत लागत आहे.
जोपर्यंत मुलाला विषय समजत आहेत आणि त्याचे गुण एखाद्या विशिष्ट पातळीच्या खाली घसरत नाहीत तो पर्यंत त्याची एकाग्रता हा चिंतेचा विषय नाही. ह्यात मनन करण्यासारख्या काही गोष्टी अशा!
१) चौथी इयत्तेत सुद्धा मुलांना करावा लागणारा अनेक विषयांचा खोलवर अभ्यास! शेवटी प्रत्येकजण आपले एक विशिष्ट कार्यक्षेत्र निवडणार, असे असताना मुलांना सर्वच विषयात आपली शक्ती पणाला लावण्याची खरोखर गरज आहे काय?
२) संगणकाचे आपण निर्माण केलेलं अवास्तव स्तोम! संगणकासाठी तुम्हाला आज्ञावली लिहिता येणे म्हणजे तुम्ही खरे संगणक साक्षर झालात. बाकी संगणकाचा वापर करता येणे म्हणजे काही मोठा तीर मारला नाही! चौथीत मुलांना संगणकाद्वारे परीक्षा द्यायला भाग पाडून आपण काय साध्य करीत आहोत?
३) आधी मी लिहिले होते ह्या मुद्द्यावर! मुलांना आपण तंत्रज्ञानाशी लहान वयात अधिकाधिक संपर्कात आणून त्यांचा भावनिक बुद्ध्यांक आपण काहीसा कमी करीत आहोत. मुले जितका वेळ GADGET वापरण्यात घालवीत असतात त्याच्या ३ - ४ पट वेळ त्यांनी मैदानी खेळात किंवा प्रत्यक्ष व्यक्तीशी संवाद साधण्यात घालविला तरच ठीक आहे.
४) मुलांचा अधिक विकसित झालेला मेंदू! ह्या विकसित झालेल्या मेंदूला पालक म्हणून आपण कितपर्यंत खाद्य देवू शकणार? हा मला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न!
मी मुलांना शिकवणीला पाठवू नये अशा ठाम मताचा आहे. मुलांचा अभ्यास घेण्यात घालविलेला वेळ 'क्वालिटी टाईम' च्या व्याख्येत बसतो असे अजून एक माझे ठाम मत! तुम्हाला काय वाटत? 

Wednesday, July 10, 2013

तपोवन - भाग ८



राज्याभिषेकाच्या धावपळीत हे नवीनच प्रकरण उद्भवले होते. राजा प्रद्द्युतला कसे आपल्या बाजूला वळवावे ह्यासाठी सुकाणू (हा आधुनिक मराठी राजकारणातील शब्द इथे चपलख बसत नाही हे मान्य!) समितीची लगोलग बैठक बोलावण्यात आली. राजा प्रद्द्युत आणि महाराज अंशुमत ह्यांचे काही काळापूर्वी घनिष्ट संबंध होते. परंतु मधल्या काळात काही गैरसमजामुळे ह्या संबंधात थोडा तणाव आला होता. आता हे गैरसमज दूर करणे आवश्यक होते. राजा प्रद्द्युत ह्यांना सिद्धार्थच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्याचे ठरविण्यात आले. राजा प्रद्द्युत राजनगरीत आल्यावर त्यांच्याशी विस्तृत चर्चा करून त्यांना आपल्या बाजूने वळवावे असा निर्णय घेण्यात आला. लगेचच मध्यान्हीच्या सुमारास शाही नजराणा घेवून एक खास पथक राजा प्रद्द्युतच्या राजधानीकडे निघाले सुद्धा!
राजा प्रद्द्युत भोवती शत्रुघ्न आणि कंपूने आपले जाळे विणण्यास सुरुवात केलीच होती. परंतु राजा प्रद्द्युत काही फारसा अनुकूल प्रतिसाद देत नव्हता. शेवटी शत्रुघ्नने आपला हुकुमी एक्का बाहेर काढला होता. अंशुमतच्या साम्राज्याचा पाडाव करण्यात यश आल्यास त्यातील तीन चतुर्थांश साम्राज्य राजा प्रद्द्युतच्या राज्यात सामील करण्यात येईल असा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव अगदीच फलदायी होता आणि राजा प्रद्द्युतला तो नाकारणे कठीण वाटू लागले होते. आपल्या राज्याचा इतका विस्तार झाल्यास आपल्यास महाराज ही उपाधी मिळण्यास काहीच विलंब लागणार नाही ह्याची त्यांना खात्री वाटू लागली. मनीची सुप्त इच्छा पूर्ण होण्याची संधी अशी अचानक उभी ठाकल्यामुळे ती स्वीकारावी असेच त्यांना मनोमन वाटू लागले होते.
'राजे, महाराज अंशुमतच्या नगरीतून एका पथकाचे आगमन झाले आहे.', दासीच्या ह्या उद्गाराने राजा प्रद्द्युत ह्यांचे विचारचक्र खंडित झाले. पथकाचे यथोचित स्वागत करण्यात आले. काही वेळाने राजा प्रद्द्युत आणि आणि पथकाची भेट झाली. पंडित मंदार ह्यांनी राजा प्रद्द्युत आणि महाराज अंशुमत ह्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यातील काही भेटींच्या वेळी पंडितही हजर होते. त्यामुळे त्यांनी वर्णन केलेल्या आठवणींनी राजा प्रद्द्युत जुन्या काळात पोहोचले. त्यानंतर भेट देण्यात आलेला एक मौल्यवान हिरेजडीत हार राजांच्या कलाकार मन सुखावून गेला. इतक्या सर्व आनंदी वातावरणात राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे  निमंत्रण स्वीकारणे ही केवळ औपचारिकता राहिली होती. ती राजा प्रद्द्युत ह्यांनी लगेचच पार पाडली.
काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरे! महिन्यापूर्वी शोकाकुल झालेल्या राजनगरीत आज अगदी उत्साहाचे वातावरण होते. महाराज्ञी शर्मिष्ठा ह्यांनी सर्व भावना बाजूला ठेवून ह्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात कुठलीच कमतरता राहणार नाही ह्याची जातीने दखल घेतली होती. राजमहालावर सुगंधी फुलांची तोरणे लावण्यात आली होती. रात्रीच्या वेळी सर्व राजमहाल सुरेख दिव्यांनी उजळून निघाला होता. नगरीतील सर्व रस्ते सुशोभित करण्यात आले होते. संगीत, नृत्याचे कार्यक्रम दोन दिवस आधीच सुरु झाले होते. सर्व प्रजेने सुद्धा नववस्त्रे परिधान केली होती. घरांवर तोरणे लावली होती. ह्या समारंभाचे मुख्य आकर्षणबिंदू असलेला सिद्धार्थ मात्र काहीसा निर्मोह वृत्तीने ह्या सर्व धावपळीकडे पाहत होता. राजा प्रद्द्युत आपल्या राणी आणि खास मंडळीसमवेत राजनगरीत आगमन करिता झाला. त्याच्या स्वागतात कोणतीही कसूर ठेवण्यात आली नव्हती.
राज्याभिषेकाचा सोहळा अगदी दृष्ट लागण्याजोगा झाला. राजबिंड्या सिद्धार्थला राज्याभिषेक होताना पाहून महाराज्ञी शर्मिष्ठाच नव्हे तर सर्व प्रजेच्याच डोळ्यात एकाच वेळी आनंदाश्रू आणि दुःखाश्रू उभे राहिले. साम्राज्याला अधिपती मिळाला होता. महर्षी अगस्त्यसुद्धा ह्या सोहळ्यास हजर होते. अजून एक मन राजनगरीत होते आणि बऱ्याच अंतरावर अडकलेल्या कायेतून ते सिद्धार्थच्या सुखी भवितव्याची प्रार्थना करीत होते. राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्या समारंभात अगदी गुंगून गेले होते. दोघांच्या मनात एकच विचार घोळत होता आणि तो बोलून दाखविण्याच्या संधीची ते दोघे वाट पाहत होते. शेवटी एकदाची संधी मिळताच राणी आश्लेषा बोलत्या झाल्या, " राजकुमारी कालिंदी ह्या साम्राज्याची राणी बनावी अशी मनोमन इच्छा माझ्या मनी उत्पन्न झाली आहे!"

 

Sunday, July 7, 2013

लिंबलोण उतरू कशी - सुमन कल्याणपूर



संगीतातील तज्ञ नसल्याने त्या विषयातील काही गोष्टींचे गूढ उकलत नाही. परंतु संगीतातील आनंदच इतका अवर्णननीय असतो की ह्या गोष्टींचे गूढ उकलले नाही तरी काही फरक पडत नाही. सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर ह्यांच्या सुरेल गायनाची तुलना कशी करायची हा मला अधूनमधून पडणारा प्रश्न! परंतु एखाद्या गाण्याचा आनंद घेताना मग हा प्रश्न विसरायला होते. सुमन कल्याणपूर ह्यांनी गायलेली काही गीते मनाला एकदम भावूक बनवितात. लिंबलोण उतरू कशी हे गाणे अचानक कानी पडले. त्याचा शोध घेतला. एकटी चित्रपटातील ग. दि. माडगुळकर ह्यांनी रचिलेले आणि सुधीर फडके ह्यांनी संगीत दिलेले हे अविस्मरणीय गीत! आजच हे गाणे पहिल्यांदा ऐकले आणि अगदी मनाला भिडले. १९६८ सालचा हा चित्रपट. ४३ वर्षांनी सुद्धा आईचे आपल्या मुलावरील प्रेम, त्याच्याविषयीचा अभिमान ज्यात ओतप्रोत भरले आहे असे हे गीत आपली गोडी टिकवून आहे! आणि त्यात सुलोचना ह्यांचा अभिनय म्हणजे लाजबाब! हा चित्रपट संधी मिळाला तर मी आवर्जून पाहणार. पण बघा ना, चित्रपट पाहिला नाही तरी गीत मात्र पूर्ण आनंद देवून जाते!

एकंदरीत गीताचा मला समजलेला अर्थ असा!
आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणात दिवस काढणाऱ्या आईला  साता समुद्रापलीकडे असणाऱ्या आपल्या कर्तृत्ववान मुलाची आठवण येते. त्याच्या ह्या यशाला, कर्तृत्वाला कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून त्याची दृष्ट काढावी अशी तिला इच्छा होते. परंतु इतके अंतर पार करता येत नसल्याने ती इथूनच दृष्ट काढू इच्छिते आणि त्यासाठी त्याला एक क्षणभर थांबण्यास सांगते. 
आता माझ्या जीवनात केवळ तूच एक लाडका आहेस. सर्व जीवन दुःखाने भरले असता तूच तुझ्या कर्तृत्वाने, यशाने तू माझ्यासाठी सुखाची द्वारका उभारली आहेस. जगातल्या सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे ज्याने आपल्या खांद्यावर घेतले आहे असा तू एक समर्थ खांब आहेस. 
जिने तुझ्यासारख्या यशस्वी मुलास जन्म दिला ती आईची कूस धन्य होय, ज्यांनी तुझ्या यशोगाथा पाहिल्या, ऐकल्या ते आईचे कान आणि डोळे धन्य होय! माझा जन्म कृतार्थ झाला आणि माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. मी जे काही आयुष्यभर कष्ट सोसले त्याचे तू पांग फेडलेस!
माझा सर्व काही थकवा आता निघून गेला आहे! जे काही आयुष्य बाकी राहिले आहे ते मी ईशस्मरणात घालविन! हे माझ्या मुला, जगात कोणास लाभले नसेल असे सुख तुला लाभो हीच आता एक इच्छा!

आणि आता हे प्रत्यक्ष गीत!

लिंबलोण उतरू कशी असशि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला असा समर्थ खांब तू

धन्य कूस आईची, धन्य कान, लोचने
कृतार्थ जन्म जाहला फिटुन जाय पारणे
अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू

शीणभाग संपला तृप्‍त माय जीवनी
आयु उर्वरीत ते सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू

 
काळ किती झपाट्याने बदलला हेच खरे! पुढील वीस - तीस वर्षात पूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी निस्वार्थपणे वेचण्याचे भाग्य कोणत्या मातेला असेल हे देवच जाणो!
 

Friday, July 5, 2013

तपोवन - भाग ७


महर्षी अगस्त्य ह्यांनी सिद्धार्थला कुटीत बोलावले. 'बाळ, तुला एक दुःखद बातमी सांगायची आहे मला! महाराज अंशुमत ह्यांना रणांगणावर वीरगती प्राप्त झाली, तुला तत्काळ राजधानीसाठी प्रयाण करावे लागणार आहे.' अगस्त्य ह्यांनी मोजक्या शब्दात ही बातमी सिद्धार्थला सांगून टाकली. सिद्धार्थच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. पित्याच्या अकस्मात वियोगाचे मणांमणाचे ओझे त्याच्या मनावर दाटले. त्याच वेळी आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीवही त्याला झाली. डोळ्यांत येऊ पाहणाऱ्या अश्रूंना त्याने मोकळी वाट करून दिली. आता भूतलावर फार कमी लोक होते ज्यांच्यासमोर आपले अश्रू बाहेर येऊ देण्याची मुभा त्याला होती.
आश्रमावर दुःखाची छाया पसरली होती. आपल्या लाडक्या राजाच्या मृत्यूचे दुःख तर होतेच आणि त्याचबरोबर सर्वांचा लाडका सिद्धार्थ आश्रम सोडून जाणार त्याचेही दुःख होते. सीमंतिनीची भिरभिरती नजर सिद्धार्थचा शोध घेत होती. सिद्धार्थला घेवून जाण्यासाठी खास रथ आणि सैनिकाचे एक खासे पथक आले होते.
काही केले तरी सिद्धार्थ भावी राजा होता. अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता त्याच्यात कोठेतरी दडली होती ती आता प्रकट झाली होती. त्याने काही क्षणातच आपले अश्रू आवरले आणि महर्षींचा आशीर्वाद घेतला. 'तुझ्यासमोर उभा असलेला आव्हानांचा पर्वत पार करण्याची क्षमता तू बाळगून आहेस, स्वतःवर विश्वास ठेव, यशस्वी भव!' महर्षी उद्गारले. महर्षी आणि सिद्धार्थ बाहेर आले तोवर सिद्धार्थचा रथ तयार होता. सर्व आश्रमवासी निरोप देण्यासाठी रांगेने उभे होते. एका क्षणात सर्व नाती बदलली होती. आता आपल्या भावी राजाला निरोप देणारी ही प्रजा असे चित्र होते. सर्वांचा निरोप घेत घेत सिद्धार्थ सीमंतिनीपाशी आला. एका नुकत्याच उमलू लागलेल्या नात्यात मोठे वादळ आले होते. 'मी तुमची वाट पाहीन' केवळ सिद्धार्थला ऐकू जाईल असा आटोकाट प्रयत्न करीत सीमंतिनी पुटपुटली. त्या दोघांतील शब्दाद्वारे झालेला हा पहिलाच संवाद होता. आणि अशा ह्या पहिल्याच संवादात आयुष्यभराची साथ निभावण्याचे आश्वासन देणारे हे शब्द उद्गारण्याचे धारिष्ट्य आपल्यात कोठून आले हे सीमंतिनीला काही कळले नाही. सिद्धार्थ आश्चर्यचकित झाला. परंतु आपल्या मनीचा भाव बोलून दाखविण्याची हे वेळ नव्हती. केवळ नजरेतून आश्वासन देण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. सीमंतिनीचे वाक्य आणि सिद्धार्थची आश्वासक नजर केवळ त्या दोघातच राहिली नव्हती. सिद्धार्थच्या मागून येणाऱ्या, एका सेनानायकाने हे एक मोठे गुपित टिपले होते.
मध्यरात्रीच्या आसपास सिद्धार्थचे राजमहालात आगमन झाले. महाराज अंशुमत ह्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रजेचा महापूर लोटला होता. सिद्धार्थचे आगमन होताच त्याला थेट तिथेच नेण्यात आले. सिद्धार्थची धीरगंभीर मुद्रा पाहून प्रजेला धीर आला. पित्याच्या निष्प्राण देहाजवळ उभ्या असलेल्या सिद्धार्थने मनोमनी हा सर्व भार सांभाळण्याचे बळ देण्याचा आशीर्वाद मागितला. आपल्या बालपणापासून आपल्याला जपणाऱ्या आणि आपले सर्व हट्ट पुरविणाऱ्या आपल्या लाडक्या पित्याची असंख्य रूपे सिद्धार्थच्या डोळ्यासमोर तरळून गेली. आपला पिता जरी शरीराने आपल्याला ह्यापुढे दिसणार नसला तरी अदृश्यपणे आपल्या आसपासच असेल अशी समजूत करून सिद्धार्थ आपल्या शोकव्याकूळ मातेची भेट घेण्यासाठी निघाला.
दुसऱ्या दिवशी महाराज अंशुमत ह्यांना अंतिम निरोप देण्यात आला. प्रजेला दुःख अनावर झाले होते. त्यानंतर शोकाचा पंधरवडा आला. सेनापतीना शोक करण्याची सुद्धा संधी नव्हती. आता कुठेच काही उणीव ठेवून चालणार नव्हते. त्यांनी सर्व सीमेवर सेनेचा चोख बंदोबस्त ठेवण्याची तजवीज केली होती. प्रधानांनी राज्यकारभार सुरळीत चालेल ह्याची तजवीज केली होती.
शोकाचा कालावधी संपल्यावर राजपुरोहित, प्रधान, सेनापती, महर्षी आणि शर्मिष्ठा ह्यांची एक बैठक झाली. राज्याला जास्त काळ राजाशिवाय ठेवून चालणार नव्हते. येणाऱ्या शुक्लपक्षातील एक शुभमुहूर्त सिद्धार्थच्या राज्याभिषेकासाठी निवडण्यात आला. बैठकीत ह्या राज्याभिषेकाच्या सर्व तयारीची आखणी करण्यात आली. सिद्धार्थला अजून काही प्रशिक्षणाची गरज असल्यास तेही देण्याची तजवीज करण्यात आली.
एकंदरीत दुःखाचे वातावरण आधी कर्तव्यभावनेकडे आणि त्यानंतर काहीशा उत्सुकतेच्या दिशेने बदलू लागले होते. राजमहालातील वर्दळ आता वेगाने वाढू लागली होती. अशा वातावरणात एके दिवशी सकाळी मुख्य हेरांचे राजमहालात आगमन झाले. शत्रुघ्नच्या नवीन कटाची त्यांनी बातमी आणली होती. महाराज अंशुमत ह्यांनी आतापर्यंत सर्व शत्रूंना आपल्या धाकात ठेवले होते. अशा सर्व पराभूत राजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न शत्रुघ्नने चालविला होता. आणि दुर्दैवाने त्यात त्याला यशही मिळत चालले होते. आतापर्यंत पाच राजे ह्या कुटील आघाडीत सामील झाले होते आणि आता शत्रुघ्न राजा प्रद्युतला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता. आतापर्यंतच्या पाच राजांविषयी काही काळजी करण्याचे कारण नव्हते परंतु प्रद्युत सामर्थ्यवान राजा होता. त्याला ह्या कुटील कारस्थानात सामील होवून देण्याआधी हालचाल करणे आवश्यक होते आणि त्यामुळेच मुख्य हेर तातडीने राजधानीत हजर झाले होते.  

Wednesday, July 3, 2013

तपोवन - भाग ६


पहाटेची प्रसन्न वेळ होती. महाराज अंशुमत ह्यांची निद्रा पक्षांच्या मधुर किलबिलाटाने खंडित झाली. शयनगृहातील गवाक्षातून बाहेर दिसणाऱ्या ह्या प्रसन्न वातावरणाचा महाराज आनंद घेत असताना अचानक त्यांना बाहेर काहीशी गडबड ऐकू आली. महाराज तात्काळ बाहेर आले. अमात्य, सेनापती आणि खाशी मंडळी एकत्र जमली होती  काही वेळापूर्वीच खबर आली होती. शत्रुघ्न राजाने दक्षिण सीमेवरून हल्ला केला होता आणि तो राज्यात बराच खोलवर घुसला होता.
महाराजांनी सेनापतीबरोबर विचारविनिमय तत्काळ आटपला. आणि लगेचच खुद्द महाराज अंशुमत, सेनापती आणि सेना दक्षिण दिशेने कूच करू लागली. सेनापतींनी पाठविलेले निरोप एव्हाना राज्याच्या दुसऱ्या भागात असलेल्या सैन्यापर्यंत सुद्धा पोहोचले होते. इतर भागातील वीरसैनिक सुद्धा दक्षिण सीमेवर येवू लागले होते. खासे अश्वदल वाऱ्याशी स्पर्धा करीत पुढे चालले होते. महाराजांच्या डोळ्यातून युद्धज्वर ओतप्रोत भरला होता. मार्गातील प्रजा आपल्या पराक्रमी राजाचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवीत होती.
मध्यान्हीपर्यंत सेनेने बरीच मजल मारली होती. मनात शत्रूचा तत्काळ विनाश करण्याची तीव्र इच्छा असली तरी पोटातील भुकेकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. मार्गातील वनात मिळणाऱ्या फळांवर भूक भागवून आणि दाट जंगलात वाहणाऱ्या सरितेचे मधुर पाणी प्राशन करून सेना पुढे निघाली. तोवर नैऋत्य दिशेने आलेले गजदल सेनेला येवून मिळाले त्यामुळे सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले.
थोडे अंतर पुढे गेल्यावर धुळीचा मोठा लोळ आणि अश्व, गज ह्यांच्या चीत्काराचे आवाज ऐकू येवू लागले. महाराजाच्या अंगात नवीन स्फुरण शिरले. आपला रथ थेट त्या दिशेने घुसविण्याची त्यांनी आज्ञा दिली. सेनापतींनी त्यांना रोखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. रणांगणावरील परिस्थिती माहित नसताना महाराजांनी स्वतः थेट शिरू नये असे त्यांचे म्हणणे होते. परंतु महाराजांच्या अंगी समरज्वर पुरेपूर उतरला होता. सेनापतींचे म्हणणे धुडकावून लावून ते रणांगणात प्रवेश करते झाले. सेनापतींनी सद्य परिस्थितीत उपलब्ध उत्तम पर्याय म्हणून स्वतः आणि निष्णात योद्ध्यांचे कडे महाराजांभोवती निर्माण केले.
महाराजांची आधीची तुटपुंजी सेना शत्रूशी लढता लढता मेटाकुटीस आली होती. संख्येने शत्रू बराच प्रबळ होता. परंतु दस्तुरखुद्द महाराजांचे रणांगणात आगमन होताच सर्वांनाच नवा जोश आला. महाराजांनी शत्रूच्या आघाडीच्या फळीवर बाणांचा जोरदार वर्षाव केला. महाराजांच्या भात्यातील बाणांचे वैविध्य आणि वेगाचा मुकाबला करणे शत्रूला कठीण जावू लागले. महाराजांची सेना कौतुकाने आपल्या राजाचा हा पराक्रम पाहत होती. महाराजांच्या ह्या मर्दुमकीने शत्रूची आघाडीची फळी विस्कळीत झाली. त्यात निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा उठवीत महाराज आणि खासे दल आत शिरले.
अचानक झालेल्या ह्या करारी हल्ल्याने शत्रुघ्न राजा अवाक झाला होता. अंगी कुटिलता असली तरी उसने शौर्य तो आणू शकत नव्हता. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेवून पलायन करण्याची तयारी त्याने केली आणि रथ मागे घेण्याचा आदेश दिला. शत्रुघ्नाचा परतीच्या दिशेने निघालेला ध्वजधारी रथ पाहून महाराज अंशुमत खवळले. त्यांनी भर रणांगणातून रथ शत्रुघ्नच्या दिशेने घुसविला. महाराजांचे बाण शत्रुघ्नच्या रथाला भेदून जाऊ लागले. ह्या सर्व गोंधळात महाराजांभोवतीचे सरंक्षक कवच काहीसे विभागले गेले. शत्रुघ्नचा सेनापतीने ही संधी साधली आणि त्या कपटी माणसाने युद्धातील सर्व नियम धुडकावून महाराजांच्या मस्तकाच्या दिशेने बाण सोडला. सर्व लक्ष शत्रुघ्नकडे एकवटलेल्या महाराजांच्या नजरेने आपल्या दिशेने येणाऱ्या बाणाला टिपले तोवर  खूप उशीर झाला होता. आणि …. एक महान योद्धा कपटी सेनापतीच्या बाणाने धारातीर्थी पडला!!
अचानक युद्धाचे फासे पलटले. महाराज धारातीर्थी पडले हे पाहताच त्यांची सेना एकदम बावरली. सेनापतींना सुद्धा हा मोठा धक्का होता. परंतु अशा परिस्थितीत आपल्यालाच धीराने वागले पाहिजे हे ते चांगले जाणून होते. आपल्या भावनांचा लगेचच ताबा घेवून त्यांनी आक्रमण चालूच ठेवले. 'महाराजांचा जय असो' अशी जोराने गर्जना करून ते शत्रुघ्नाच्या दिशेने चालून गेले. आता मात्र सेना मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडली. आता मात्र शत्रुघ्न आणि सेनेचे उरलेसुरले अवसान गळून पडले. ज्यांना जमेल त्यांनी आपला जीव वाचवत काढता पाय घेतला. शत्रू दिसेनासा झाल्यावर मात्र सेनापतींनी आपल्या भावनांचे बंध मोकळे केले आणि मोठ्याने हंबरडा फोडला.
महाराजाच्या वीरगतीची बातमी एका कधी न भरून येणाऱ्या आघातासारखी राजवाड्यात पोहोचली. आणि ही बातमी घेवून ज्यावेळी दूत आश्रमात पोहोचला तेव्हा महर्षी अगस्त्यसारखा स्थितप्रज्ञ योगीसुद्धा सुन्न होवून बसला.