Wednesday, November 27, 2013

Corning काच संग्रहालय



मागच्या ब्लॉगमध्ये न्यू जर्सीचा उल्लेख आल्यानं तो काळ आठवला. आणि नायगाराच्या केलेल्या दोन सहली आठवल्या. दुसरी सहल आईवडिलांबरोबरची! त्यात परतीच्या मार्गावर Corning काच संग्रहालयला भेट देण्याचा योग आला. त्या वेळी प्राजक्ताने घेतलेली ही काही छायाचित्रे! खरं तर प्रत्येक छायाचित्राविषयी एखादी ओळ टाकायला हवी पण त्यावेळी काही नोंदी न केल्याने ते आता शक्य नाही. ही चित्रच इतकी सुंदर की ती पाहण्यात पण आनंद आहे!









फोटोसाठी जबरदस्तीने उभा केलेला सोहम! :)









 
अजून किती बाकी आहे असा अचंबा करणारा सोहम!







 
काच संग्रहालयातून बाहेर पडल्यावर कळी खुललेला सोहम! 

 
 
 

Friday, November 22, 2013

मन वढाय वढाय! - भाग ३


आयुष्यात बरेच क्षण येतात ज्यावेळी आपल्याला उपलब्ध पर्यायातील एक पर्याय निवडावा लागतो. आपण आपल्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे, वडिलधाऱ्या माणसांच्या सल्ल्याने आणि कधी काही अज्ञात शक्तीने प्रभावित केलेल्या मनाच्या आधारे त्या वेळी हा निर्णय घेतो.  ह्या बिंदुपासून जाणारे दोन्ही / अनेक मार्ग अगदी वेगवेगळ्या दिशेला जाणारे असतात. मनात विचार येतोच की जर आपण त्यावेळी दुसरा एखादा मार्ग निवडला असता तर आयुष्य कोठे गेलं असतं? मागे वळून पाहता आयुष्यातील असे अनेक बिंदू मला ह्या दिवसात आठवत.
१> बारावीला गणित, रसायन आणि भौतिक विषयात २८१ गुण मिळाल्यावर मुंबईत (VJTI /SPCE) स्थापत्य शाखेत प्रवेश घ्यायचा की खाजगी कॉलेजात संगणक शाखेला प्रवेश घ्यायचा की सांगलीला वालचंद कॉलेजात प्रवेश घ्यायचा.  
२> १९९५ साली स्थापत्य शाखेतील पदवी घेतल्यावर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं की व्यवस्थापन शिक्षण घ्यायचं?
३> १९९७ साली स्थापत्य क्षेत्रात ८ महिन्यात तीन नोकऱ्या बदलल्यावर अचानक एका मित्राने फोन केल्यावर सहज म्हणून सिंटेलमध्ये मुलाखत देऊन निवड झाल्यावर ज्या क्षेत्रात शिकताना  ६-७ वर्षे घालविली त्याला अचानक सोडावे की त्याचाच ध्यास धरावा
४> २००० साली इंग्लंडात तीन महिन्यासाठी म्हणून गेल्यावर आठ महिने झाले तरी परतण्याची लक्षणे नाहीत. कंपनीचा आणि क्लायंटचा तिथेच राहण्याचा आग्रह. अशा वेळी घराची आठवण आली म्हणून परत येण्याचा निर्णय, परत आल्यावर ३ दिवसात कंपनीचा पुन्हा परत येण्याचा आग्रह परंतु त्यावेळात लग्न जमल्याने आणि वाग्दत्त वधूच्या मी परत जाऊ नये ह्या मताचा आदर करून परत न जाण्याचा निर्णय. आणि मग बरोबरीचा मित्र तिथेच अनेक वर्षे राहून स्थिरस्थावर झाला हे आठवून मनात उठणारे भावनांचा कल्लोळ!
५> असेच पुढे परदेशवास्तव्याची संधी आली म्हणून पत्नीचा नोकरी सोडण्याचा निर्णय 
६> केवळ मित्रांकडून माहित पडलं म्हणून बदललेल्या दोन नोकऱ्या!
असे हे काही सांगण्यासारखे मुद्दे आणि तसेच काही इतर! हे सर्व विचार माझ्या मनात अधूनमधून येत राहत.
त्या कालावधीत मी जुने (म्हणजे अगदी जुने नव्हे!) हिंदी चित्रपट आवर्जून पाहत असे! त्यातील उमराव जान च्या गाण्यांनी माझ्यावर त्या दिवसात फार प्रभाव टाकला! "तमाम उम्र का हिसाब माँगती हैं जिंदगी!" हे एकदा मी असेच मित्रमंडळीत बोलून दाखवले तेव्हा "क्या अभी अस्सी साल के बूढे हो गये हो क्या" असे खास मित्र राम म्हणाला!

Thanksgiving च्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीनंतर सुरु होणारी हॉलिडे सीजन ची गाणी माझी आवडती बनून राहिली होती. 'Let it snow', 'Feliz Navidad' 'Rudolph the red nose reindeer' "walking around Christmas tree" आणि अशी अनेक! संगीताचं एक विशेष असतं, ते भाषेच्या पलीकडे मानवी मनांना जोडण्याचं काम करत. ह्या ऐकलेल्या वाक्यावर मुंबई वसईत कधी विश्वास बसला नसता पण तिथे एकट राहताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मात्र पक्का बसला. 

अजून एक विचार यायचा तो म्हणजे पुढच्या आयुष्यात नोकरी कितपर्यंत करायची? बारावीचे भौतिक आणि गणित ह्या विषयांच्या शिकवण्या सुरु करायच्या  असे माझे फार जुने स्वप्न आहे. त्याची मी सतत रंगीत तालीम त्या दिवसात करीत असे.

शालेय कालावधी तर माझ्या आयुष्याचा न विसरण्यासारखा भाग! त्यातील आठवणी मला बऱ्याच वेळा आठवायच्या.

ह्या कालावधीत असंच कधीतरी मार्चमध्ये कायमचं परत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग घर रिकामी करण्याची प्रचंड धावपळ सुरु झाली. बर्फाळ वातावरणात घरातील वस्तू एकतर मित्रांना द्यायच्या किंवा मुख्य कचरा पेटीजवळ नेऊन ठेवायच्या ह्या प्रकारात बरीच धावपळ होत होती. मग हळू हळू माझे मनन कमी होत गेले. राम आणि कंपूशी जास्त मैत्री होऊ लागली. राम चिकन मस्त बनवायचा आणि १५-२० जणांना घरी जेवायला बोलवायचा त्याचा आवडता छंद होता. मी ही ह्या कालावधीत ठीक जेवण बनवायला शिकलो इतके की भारतातून कोणी परत आलं किंवा परतायला लागलं तर त्यांना सहकुटुंब जेवायला बोलवण्याइतका आत्मविश्वास बळावला! आधी कुकरला डाळीच्या शिट्ट्या घेऊन मग मोठ्या पातेल्यात फरसबी, वाटाणे आणि तत्सम भाज्या आणि हाताला लागतील ते मसाले टाकून मी बनवीत असणारा तथाकथित सांबार सर्व कंपूत प्रसिद्ध झाला होता. शेवटी मग एप्रिलच्या २ तारखेला हा एकांतवास संपवून मी भारतात परतलो!

मागे वळून पाहता ह्या कालावधीने मला बरेच काही शिकविले. मुख्य म्हणजे माणसाची किंमत मला अजून जास्त कळली! कोणाशीही आपले अगदी काही परफेक्ट जमत नाही पण जमवून कसे घ्यायचं हे समजलं. आपण बाहेरच्या माणसांशी किती जमवून घेतो पण मग जवळच्या लोकांशी ह्यातील थोड तरी सामंजस्य दाखवायला आपल्याला कठीण का जात? तसच घराच्या जेवणाला आपण बऱ्याच वेळा नावं ठेवतो पण हे साधे जेवण सुद्धा ताटात येण्यासाठी सुद्धा बरीच मेहनत असते हे पुन्हा एकदा जाणवलं! तरी नशीब ब्लॉग लिखाणाच खुळ त्यावेळी माझ्या मनात त्याकाळी नव्हत! नाहीतर तुमच काही खर नव्हत बर का मंडळी!

आता काहीशी पुनरोक्ती चित्रांच्या बाबतीत. खिडकीतून घेतलेल्या त्या रस्त्याची ही तीन वेगवेगळी रूपं !




असो ह्या तीन भागात शीर्षकापासून मी काहीसा भरकटलो! मनातील वादळापेक्षा बाकीचे अनुभवच जास्त ओळी' खाऊन गेले! होत असं कधी कधी!



 

Thursday, November 21, 2013

मन वढाय वढाय! - भाग २



संध्याकाळी ४ - ५ वाजता अंधार पडणे  ही गोष्ट भल्या भल्या लोकांना मानवत नाही. त्यानंतर एक भली मोठी रात्र आपल्यासमोर उभी ठाकलेली असते. रात्रीच्या जेवणाखाण्याच्या वेळांचे ताळतंत्र बिघडू शकते. त्यात हे एकटेपण! म्हटलं तर ह्या एकटेपणावर उपाय होता. काही मंडळी माझ्याबरोबर येऊन राहायला तयार होती. आधीच्या परदेशीवारीमध्ये मी असा काहीजणांबरोबर राहिलो होतो. परंतु आता ह्या शेयर करण्याची सवय मोडली होती. त्यामुळे मी एकटे राहण्याचं ठरविले.
शनिवार किंवा रविवारच्या संध्याकाळी सलग असा खूप वेळ मिळे. अशा वेळी जर तुम्ही संगणक, टीव्ही, भ्रमणध्वनी ह्यापासून अलिप्त राहू शकलात तर मोकळ्या वेळात तुम्ही अगदी स्वतःशी मग्न होऊ शकता. ही मग्न होण्याची पातळी वेळेनुसार अधिकाधिक खोल होत जाते. ठरवलं तर तुम्ही अंतर्मनाशी खोलवर संवाद साधू शकता. माझं मन असंच आठवणीच्या हिंदोळ्यात गुरफटल जायचं.
मला घराची, घरच्या लोकांची आठवण यायची का? हो यायची. पण त्या आठवणींनी मी कासावीस व्हायचो का? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नकारार्थी होतं. ह्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं. आपण इतके कसे भावनाशून्य झालोत. अजून जास्त विचार केल्यावर उत्तर सापडलं, महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर जो नोकरीबाबतीत अनिश्चिततेचा काळ मी अनुभवला होता त्याने कोठेतरी माझ्यावर खोलवर परिणाम केला होता. व्यावसायिक जग क्रूर असतं. तिथं एखाद्या जागेसाठी अनेकजण तयार असतात. कष्ट करून मिळविलेलं स्थान सहजासहजी गमवू नये असा माझ्या अंतर्मनात माझ्या नकळत कोठेतरी निर्णय झाला होता. आणि त्यामुळेच मी ठामपणे असा एकटा राहिलो. १९९६ - ९७ च्या आधीचा अभ्यासू मी त्यानंतर व्यावहारिक बनलो होतो. ही तशी न जाणविण्यासारखी गोष्ट, ह्या कालावधीत मला समजली.
परदेशी राहणाऱ्या लोकांच्या भारतात फोन करण्याच्या विविध तऱ्हा असतात. काहीजण शनिवार- रविवारी फुरसतीत फोन करतात. हा फोन तास दीड तास चालतो. मग त्यात कांदे बटाट्याच्या भावापासून, गावच्या वसंतरावांच्या  कुमुदच्या लग्नापर्यंत सर्व गोष्टी चर्चिल्या जातात. माझी पद्धत थोडी वेगळी होती. मी पाचच मिनिट पण दररोज फोन करायचो. वडील जास्त बोलायचे नाहीत, बरा आहेस ना इतके विचारायचे. प्राजक्ता फोनवर बोलण्यात तशी बेताचीच. फक्त घरातील सामानाची चौकशी करायची. पण काही काळानंतर तीही थोडी एकटेपणाला कंटाळू लागली होती. ह्या फोनमध्ये आईला सर्वात जास्त रस असे. आज जेवायला काय केलंस, सालमंड, तिलापिया मासे आणले की नाही वगैरे तिच्या चौकश्या असत. सर्दी खोकला वगैरे तर झाला नाही न हा दररोजचा प्रश्न असे. मी नित्यनेमाने हा सकाळी ऑफिसात जाण्याआधी हा फोन करे.
PMP चा अभ्यास मला नेहमीच्या जगात आणून सोडे. ह्या परीक्षेसाठी मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची तारीख घेतली होती. आधी अभ्यास करून मग तारीख घ्यायची की तारीख घेऊन मग अभ्यास करायचा ह्यात दुसऱ्या पर्यायाचा विजय झाला होता. त्यामुळे परीक्षेचा कसोशीने अभ्यास करणे आवश्यक बनले होते. मेंदू त्यात गुंतला असला तरी मन गुंतलं होत की नाही हे माहित नाही. ह्या अभ्यासाच्या चर्चेसाठी आशिष आणि मी एकमेकांच्या घरी जात असू. डिसेंबरच्या मध्यात आम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात केली. आशिष इतका पद्धतशीर माणूस की तो सराव परीक्षा द्यायला सुद्धा सुट्टीच्या दिवशी ऑफिसात जायचा. एकदा तर त्याने हद्द केली. उणे १० डिग्री तापमानात तो शनिवारी रात्री ९ वाजता सराव परीक्षा देण्यासाठी ८ मैलावरील ऑफिसात जाऊन बसला. पण आशिष एक जिद्दी माणूस. आज TCS मध्ये एका मोठ्या हुद्द्यावर तो जाऊन पोहोचला आहे. डिसेंबरच्या ३० तारखेला एक दुःखद घटना घडली. माझे काका ह्या दिवशी निवर्तले. मी ज्यावेळी घरी फोन केला होता त्याच वेळी नेमकी ही घटना घडली. हा क्षण सर्वात कठीण होता. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता मी तत्काळ भारतात येऊ शकलो नाही. काकांच्या आठवणी पुढे बरेच दिवस तिथे येत राहिल्या.
७ जानेवारीला PMP परीक्षा होती. परीक्षेचे ठिकाण १०-१२ मैलावर होते. शिस्तबद्ध आशिषने आपण हे ठिकाण आदल्या दिवशी बघून येवूयात असे सुचविले. मी चालकाची भूमिका बजावत त्या गावी पोहोचलो. नकाशानुसार ते ठिकाण अगदी जवळ असूनसुद्धा आम्ही त्याच्याभोवती घिरट्या घालत बसलो होतो. शेवटी ते ठिकाण मिळाले. आदल्या दिवशी ठिकाण बघून येण्याचा निर्णय योग्यच होता म्हणायचा! ह्या मागचे तत्व दुसऱ्या दिवशी परीक्षेला जाता जाता आशिष म्हणाला. परीक्षेच्या दिवशीच्या सर्व घटना तुम्हाला आधीपासून डोळ्यासमोर आणता आल्या पाहिजेत. जसे की मी पाचला उठणार, सातला घराबाहेर निघणार हा रस्ता घेणार. ह्या सर्व प्रकारात परीक्षाकेंद्राची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर असली की बराच फायदा होतो. मी ह्या वर्गात बसणार, पाठ केलेली सूत्र कच्च्या कागदावर लिहून काढणार वगैरे वगैरे. आयुष्यात सर्वांनाच सदैव इतकं पद्धतशीर बनता येत नाही पण ज्याची इच्छा असेल त्याने जमेल तितकं बनाव! त्या दिवशी सकाळी सुरु झालेला जोरदार पाऊस आम्ही कल्पिलेल्या चित्रात नव्हता. अमेरिका झाली म्हणून काय झालं, पावसामुळे वाहतूक तिथेही मंदगती होणारच! "ह्यासाठीच आपण अर्धा तास आधी निघालोत", आजूबाजूच्या वाहनावर करडी नजर ठेवणारा आशिष मला म्हणाला.
ही संगणकावर घेतली जाणारी परीक्षा होती. आम्ही वेळेआधी पोहोचलो होतो पण आम्हाला लगेचच परीक्षा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. २०० गुणाच्या चार तासाच्या ह्या बहुपर्यायी उत्तरांच्या परीक्षेत मध्ये सलग ४०-५० प्रश्न मला गोंधळवून टाकणारे होते. ह्यातील प्रत्येक प्रश्नाची दोन दोन उत्तर मला बरोबर वाटत होती. त्यामुळे मी संभ्रमावस्थेत पडलो होतो. चार तासाला वीस मिनटे वगैरे बाकी असताना माझी नजर आशिषकडे गेली. त्याच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. पट्ठ्याने बहुदा परीक्षा पास केली तर! मी कयास बांधला. परीक्षेचा निर्णय तत्काळ मिळत असे. मी पुन्हा सर्व उत्तरं तपासून शेवटी 'सबमिट' कळ दाबली. निर्णय येईपर्यंतची ती दोन मिनिटे अगदी मला अनादी काळासारखी वाटली. शेवटी संगणकराजाने गोड बातमी दिली. मीही उत्तीर्ण झालो होतो. परीक्षा संपल्याचा आणि उत्तीर्ण झाल्याचा आनंद एकदम देणारी ही परीक्षा मग मला खूप आवडून गेली.
आता मात्र वेळ खायला उठला होता. सोहम असताना आम्ही बाजूच्या पार्कात सदैव जात असू.


मग मी तिथे जाण्यास सुरुवात केली. सोहमबरोबर तिथल्या तळ्यात खरेतर परवानगी नसताना आम्ही तिथल्या बदकांना ब्रेड वगैरे खायला देत असू.

मी एकटा गेल्यावर सुद्धा ही बदके मोठ्या आशेने माझ्याकडे येत.

वसईचा होळीवरचा आशय हा ही माझ्या अगदी जवळ राहायचा. आमचे एकमेकांकडे येणेजाणे असे. त्याचाही मोठा मित्र परिवार होता. आशय मोठा दर्दी माणूस, मूडमध्ये असला की भरपूर खाद्यपदार्थ आणून मित्रमंडळींना बोलावयाचा. जेवणानंतर भरपूर चर्चा होई. अशाच एका चर्चेत विषय निघाला, "मोकळ्या वेळात आपण काय करतो?" हे प्रत्येकाने सांगायचं होतं. माझीवेळ येताच मी म्हणालो, "मला आयुष्यातील प्रवासाकडे मागे वळून पाहायला आवडतं. कोणत्या टप्प्यावर कोणते निर्णय घेतले, त्यावेळी दुसरे कोणते पर्याय उपलब्ध होते, त्यातील दुसरा एखादा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं" वगैरे वगैरे! मंडळी क्षणभर स्तब्ध झाली!

असो आज थोडे विषयांतर झाल्याने हा भाग इथे संपू शकला नाही. पुढील भागात शीर्षकाला न्याय देत नक्की हा अध्याय पूर्ण करीन!

Wednesday, November 20, 2013

मन वढाय वढाय! - भाग १


गेल्या आठवड्यात एक मित्र म्हणाला, "हल्ली बऱ्याच वेळा एकटेपणा मिळतो, आणि हल्ली हा एकटेपणा हवाहवासा झाला आहे!" एकटेपणाची कारणे अनेक! "नोकरीधंद्यानिमित्त एकट्यालाच दुसऱ्या शहरात राहायला लागणे हे मुख्य कारण!
माझे मन २००६ च्या नोव्हेंबर महिन्यात गेले. आम्ही न्यू जर्सीला वास्तव्याला होतो. आई वडील सप्टेंबर महिन्यात भेटीस आले. पत्नीने २००५ च्या हिवाळ्याचा धसका घेतला होता. आई वडिलांच्या सहा आठवड्याच्या भेटीचा शेवट जसजसा जवळ येत चालला तसं तिने माझ्या मागे तिचे आणि मुलाचे परतीचे तिकीट आरक्षित करण्याचा आग्रह सुरु केला. आणि मी तो मानलाही. आणि मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वजण भारतात परतले. त्यांना विमानतळावर सोडून घरी आल्यावर दरवाजा उघडल्यानंतरचा क्षण अजूनही लक्षात आहे! चार तासांपूर्वी अगदी भरलेलं ते घर आता भकास वाटू लागलं होतं. माझ्यासाठी अगदी रुचकर जेवण बनवून ठेवलं गेलं होतं. ते स्वतःच्या हातांनी वाढून घेताना जाणवलं की बऱ्याच दिवसांनी स्वतःने वाढून घ्यायची वेळ आली आहे. आणि उद्यापासून तर दोन्ही वेळचं जेवण स्वतःला बनवायला लागणार होतं.
मला अमेरिकेत येऊन दीड वर्षे झाली होती आणि परतायचं कधी हे नक्की ठरलं नव्हतं. व्हिसाचा तसा काही प्रश्न नसल्याने मी अजून काही वर्ष तरी राहीन असा एकंदरीत समज माझा आणि कंपनीचा होता.
हे सर्वजण गुरुवारी परतले. शुक्रवार तसा मी आरामात काढला. संध्याकाळी येऊन चिकन वगैरे बनवलं. रात्री चित्रपट पाहिले. शनिवार सुद्धा तसा कामात गेला. त्यावेळी PMP परीक्षेचे दूरध्वनीवरून शनिवारी क्लास असत. ते दहा वाजता सुरु होतं. आणि २ पर्यंत चालत. त्यावेळी स्पीकरफोन चालू करून मी जेवण वगैरे बनविले. मग जेवता जेवता लक्षात आलं. अरे आठवड्याचे कपडे धुणे बाकी आहे. हिवाळा तसा सुरु झाल्याने, त्या कॉलनीतील सामायिक धुणीघरात कपडे धुवायला जायचे म्हणजे जय्यत तयारीनिशी जावे लागे. माझ्या एका मित्राच्या शब्दात सांगायचं म्हणजे अगदी युद्धाला जावं तशी तयारी करावी लागे. जॅकेट, हातमोजे वगैरे वगैरे. आणि एकदा धुण्याच्या यंत्रात, मग वाळवण्याच्या यंत्रात आणि मग शेवटी परत आणायला अशा तीन फेऱ्या मारायला लागत. एक दोन आठवड्यात मी शनिवारचे वेळापत्रक खास बनविले. कपडे धुणे, शनिवारचा दोन वेळचा स्वयंपाक, आठवड्याची भाजी, चिकन, दुध आणि पाणी आणणे ही सर्व कामे  मी PMP क्लासच्या आजूबाजूला आटपत असे. क्लासचे ज्ञान घेता घेता मग मी जेवणही आटपे.
अशाप्रकारे आठवड्याभराची माझी सर्व कामे शनिवारी दोन वाजता आटोपलेली असत. हिवाळ्यातील सूर्याची अगदी कोवळी किरणे (अगदी आपल्याकडल्या पाच वाजता सारखी) बेडरूम मध्ये आलेली असत आणि त्यात मी सर्व ब्लॅंकेट एकत्र करून दुपारची एक मस्त झोप काढत असे. जर झोप व्यवस्थित लागली तर जेव्हा साडेचारच्या आसपास जाग येई तेव्हा सूर्याने त्या दिवसापुरता निरोप घेतला असे. मग संध्याकाळचा चहा अगदी रात्रीलाच घ्यावा लागे.
समोर एक मस्त रस्ता होता आणि पुढे एक पार्क होता. हे दृश्य ऋतूमनाप्रमाणे अगदी बदलत जाई. त्याच्या ह्या दोन झलकी!




चहा घेतल्यावर आणि सोफ्यावर बसून टीव्ही सुरु केला की मला जाणवे की इथे ह्या क्षणी मी आणि माझी तनहाईच आहे. म्हणायला तसा PMP चा अभ्यास, ऑफिसचे काम आणि नेटफ्लिक्स च्या DVD असत. पण मी बऱ्याच वेळा त्या विचारचक्रात गुंतून जाई. असेच लहानपणापासूनचे क्षण डोळ्यासमोर उभे राहत. पुढे असे पाच महिने आणि त्यातील २० -२२ साप्ताहिक सुट्ट्या मी अशा माझ्या तनहाई बरोबर घालविल्या. त्याचे वर्णन पुढील भागात!

Wednesday, November 13, 2013

सचिनच्या निवृत्तीसोहळ्याचे इतर परिणाम (Side Effects)!

आपण भारतीयांना हल्ली सोहळ्याचं फार वेड लागलं आहे. सोहळ्यासाठी आपण केवळ कारण शोधत असतो. समाजातील अनेकांना आर्थिक स्थैर्य लाभलं की असं होत असावं. रविवारी संध्याकाळी पारितोषक सोहळा, मालिकांचे विशेष भाग, दिवाळीत मुख्य सणाच्या प्रथांना बाजूला सारून गाण्याचे कार्यक्रम वगैरे वगैरे! सोहळ्याची एक मुख्य गरज म्हणजे उत्सवमूर्तीचा सोहळ्यातील सहभाग! नवीन पिढी तशी हुशार, त्यांनी मागच्या पिढीतील नामवंत लोकांना उत्सवमुर्ती बनविण्याचा पायंडा पाडला. मागच्या पिढीतील नामवंतांना खरतरं ह्याची सवय नसावी. परंतु बदलत्या काळानुसार त्यांनी स्वतःला बदलून घेतलं आणि अशा सोहळ्यात सहभागी होण्याचं स्वीकारलं. ह्या नामवंत लोकांना सर वगैरे संबोधित करणे वगैरे प्रकार अगदी डोक्यात जाई पर्यंत पोहोचले. ह्यातील बरेच नामवंत खरोखर त्या त्या क्षेत्रात महान परंतु अति परिचयात अवज्ञा असा प्रकार काही प्रमाणात ह्यांच्या बाबतीत घडला. मराठी कार्यक्रमांनी तर महा ह्या शब्दाचा सर्रास वापर केला. आणि काही उदाहरणाच्या बाबतीत तो अतिशयोक्ती (गुरु) झाला. 
असो, सध्या ज्या निवृत्तीसोहळ्याची धामधूम चालू आहे, त्यात काही ठिकाणी सीमारेषा ओलांडल्या जात आहेत. वर्तमानपत्रांनी बाकीच्या सर्व बातम्या दूर ठेवून नामवंताच्या आयुष्यात जे कोणी काही काळापुरता, क्षणापुरता आले त्या सर्वांच्या नामवंताबरोबरच्या आठवणींना प्रसिद्धी देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्याचा प्रत्येक डाव, त्याच्या प्रत्येक अवयवाला झालेल्या दुखापतीचे वर्णन ह्या सर्वांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरून गेले आहेत. 
रिकी पोंटिंगचे उदाहरण घेऊयात. त्याला अधिकृतपणे ठरवून निवृत्त होण्याची संधी मिळाली नाही. ज्या क्षणी निवडसमितीला वाटलं हा पठ्ठ्या संघात बसत नाही त्यावेळी त्याला संघातून काढण्यात आलं. भावना आणि व्यवहार ह्याची अजिबात गल्लत नाही. आता भावना आणि व्यवहार ह्यांची आपला समाज नेहमी गल्लत करतो. त्याचे काही फायदे तर बरेच तोटे. सध्या होणार्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची विधाने केली जातात आणि आपणास ऐकावी लागतात ते आपल्या मागच्या कित्येक पिढ्यांनी केलेल्या ह्या गल्लतिचे दुष्परिणाम होत. 
१> नामवंताच्या निवृत्तीसाठी खास मालिकेचे आयोजन करणे हे चुकीचे.
२> त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला कात्री लावणे हे ही चुकीचे.
३> नामवंताने ही कसोटी संपल्यावर अचानक निवृत्तीची घोषणा केली असती तर जी काही सध्या आर्थिक उलाढाल होत (त्यातील काळ्या पैशातील किती आणि वैध किती) ती झाली नसती.
४> शमी, कोहली, रोहित ह्यांच्या कामगिरीवर जे काही लक्ष रसिकांनी दिले असते ते टाळले गेले. 
५> सामान्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचा उल्लेख टाळला गेला किंवा कमी प्रमाणात झाला. 
६> ह्या सामन्यात नामवंत किती धावा करणार अथवा त्याला धोनी गोलंदाजीची संधी देणार की नाही ह्यावर नक्कीच बेटिंग होत असणार. हे ही चुकीचे!
मी नामवंताचा मनापासूनचा चाहता. पण हे लिहील्यावाचून राहविले नाही. ह्यात नामवंताचा पूर्ण दोष आहे असे नाही परंतु मला कोठेतरी हे खटकले. 
माझे ऑफिसातील बॉस काही अप्रिय घटना घडली की म्हणतात "Move On Guys". आज आपल्या समाजाला हेच म्हणण्याची वेळ आली आहे. "Move On Guys". ह्या सामन्यातील रोहित, शिखर, विराटच्या फलंदाजीचा आनंद लुटुयात!  

Saturday, November 9, 2013

दोष ना कुणाचा!

मध्यमवर्गीय पती पत्नींच्या नात्यात गेल्या काही वर्षात काही स्तित्यंतरे घडून येताना दिसत आहेत.   
पतीला परमेश्वर मानणाऱ्या पत्नीची पिढी बहुदा काळाच्या पडद्याआड गेली असावी असे मला वाटतंय.
हल्ली जी सासूच्या रुपात वावरणारी पत्नींची पिढी आहे त्यांनी पतींचे आचार, विचार न पटण्याचा अनुभव प्रथम उघडपणे व्यक्त केला असावा. पण हे व्यक्त करणे ह्या पिढीने आई बहिणीजवळ चार भिंतीआड किंवा अगदी जवळच्या मैत्रिणीपर्यंत सीमित ठेवला असावा. अर्थात ह्यालाही अपवाद असतील परंतु त्यांची संख्या ह्या उदाहरणांना अपवाद म्हणण्याइतकी मर्यादित होती. थोडक्यात म्हणजे ह्या पिढीने विचारस्वातंत्र्य अनुभवलं परंतु आचारस्वातंत्र्य व्यक्त करण्यापासून त्यांना तत्कालीन वातावरणाने, प्रचलित असलेल्या एकत्रित कुटुंबपद्धतीने आणि मर्यादित आर्थिक स्वातंत्र्याने रोखले असावे. 
हल्ली जी तीस चाळीशीच्या आसपासच्या वयोगटातील जोडपी आहेत त्यांच्या परिस्थितीचा विचार करूयात. ह्यातील काही नवरे हे त्यांच्या आईने जुन्या पद्धतीने जडणघडण केलेले आहेत. इतर नवऱ्यांना जुन्या पद्धतीच्या बाळकडूचा जोरदार डोस मिळाला नसावा. हीच गोष्ट ह्या पिढीतील पत्नीविषयी म्हणता येईल. अशा प्रकारे जुन्या संस्काराचे जोरदार बाळकडू मिळालेले आणि कमी प्रमाणात मिळालेले पती आणि पत्नी अशा चार शक्यता निर्माण होतात. ह्यातील दोन शक्यतांमध्ये पती पत्नीवर समान संस्कार असल्याने त्यांना ह्या मुद्द्यावर जास्त तडजोड करावी लागत नाही. हा केवळ एक मुद्दा, असे बाकीचे काही मुद्दे पाहूयात!
१> प्रत्येकाने आपल्या करीयरला कितीपत प्राधान्य द्यावे. ह्या करीयरमधल्या चिंता, कटकटी किती प्रमाणात घरी आणाव्यात ह्याचा सारासार विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. 
२> पती पत्नींची मोकळ्या वेळात एकमेकांशी असणारी भावनिक गुंतवणूक. ह्या गुंतवणुकीचे संसारातील वाटचालीनुसार बदलणारे प्रमाण. 
३> कुटुंबातील साथीदाराचा बदलणारा स्वभाव. पती वयोमानानुसार जास्त कटकट करतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. दोन्ही साथीदारांची संवेदनशीलता वेगवेगळी असू शकते किंबहुना असतेच. 
४> मुलांची प्रत्येकाने घेतलेली जबाबदारी  आणि मुलांच्या संगोपनाविषयीच्या दोघांच्या संकल्पना
५> एकमेकांच्या नातेवाईकांबरोबर असलेल्या संबंधाचे स्वरूप आणि प्रमाण 
६> आर्थिक लक्ष्याबाबत असणाऱ्या दोघांच्या संकल्पना 
७> जोडप्याच्या वास्तव्याचे ठिकाण. 
८> आयुष्यातील विविध गोष्टींचे किती दडपण घ्यावे आणि किती आस्वाद घ्यावा ह्या विषयीच्या पती पत्नीच्या संकल्पना. 
९> दोघांच्या स्वभावातील दडलेल्या बालकाचे प्रमाण. हे दडलेलं बालक माझ्याकडे तू लक्ष दे असं सतत सांगत असतं. आपल्यातील बालकाची ही हाक कितपत मर्यादित ठेवावी आणि त्याचप्रमाणे आपल्या साथीदाराची छुपी हाक कशी ओळखावी हा मोठा कौशल्याचा मुद्दा!
असे अजून अनेक मुद्दे निघतील. पूर्वी ह्या मुद्द्यात स्त्रीवर्ग सहनशीलता दाखवायचा. आता ती सहनशीलता संपत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. कसोटी आहे पुरुषवर्गाची. स्त्रीने व्यक्त केलेला विरोध डोक्यात राख न घालता कसा हाताळायचा ही मोठी कौशल्याची गोष्ट आहे. आपण असं म्हणतो की तिशीच्या आसपास प्रत्येकाची मते बऱ्यापैकी ठाम बनलेली असतात. परंतु त्यातही थोडेफार बदल घडवून आणणे समजूतदारपणाने शक्य असते. अशा संघर्षाच्या क्षणात कोणा एकाचे डोके ठिकाणावर आणणारी तिसरी व्यक्ती असावी 
म्हटलं तर आयुष्य फार मोठे आहे, कारण आयुष्यात संघर्ष आहे. सुखाचे क्षण फार कमी येतात आणि तत्काळ निघून जातात. पण संघर्षाला फक्त दोघांनाच तोंड द्यायचं असतं. बाहेरच्या जगात एकदम चांगल्या वागणुकीचा बुरखा घालून वावरणारे लोक सदैव तसेच असतात असे नाही. जोडप्यातील दोघेही एकमेकासोबत सर्वात जास्त वेळ घालवितात त्यामुळे आपण सर्वात जास्त परीक्षण करीत असलेली व्यक्ती म्हणजे आपला जीवन साथीदार. त्याच्याविषयी थोडीतरी सहानुभूती बाळगावी!
शेवटी काय तर एकदा संसारात पडले की संसार आनंदात निभावावा !  

Thursday, November 7, 2013

फेसबुक, Whatsapp आणि एकाग्रता



सकाळी फेसबुकवर मित्राचे स्टेटस वाचलं. "शेवटी आई म्हणालीच, मुला बायको कमी शिकलेली असली तरी चालेल, पण फेसबुक, Whatsapp वापरणारी नको. घरी काम सुद्धा असतात!" आता ह्यात स्त्री मुक्तीवाले खवळून उठणार. "तुम्ही वापरायचं फेसबुक आणि Whatsapp, आणि आम्ही नको काय?" वगैरे वगैरे.

असो आजचा विषय प्रामुख्याने ह्या दोन गोष्टींचा मुलांच्या अभ्यास करण्याच्या आणि एकंदरीतच एकाग्रतेवर होणाऱ्या परिणामावर आहे. दहावी, बारावी आणि पुढे व्यावसायिक परीक्षांचे एकंदरीत स्वरूप पाहता लक्षात येईल की प्रश्नपत्रिकेचा काही टक्के भाग (काही वेळचे अपवाद वगळता) हा सर्वांना सोडविता येईल असा असतो जेणेकरून पोटापाण्यापुरता अभ्यास करणारे उत्तीर्ण होवू शकतात. त्यानंतरच्या प्रश्नांची काठीण्य पातळी मग वाढत जाते. त्यांची उत्तरे देण्यासाठी विषयाचे खोलवर ज्ञान असणे आवश्यक असते. विषयाचे खोलवर ज्ञान एका दिवसात विकसित होत नाही. त्याला बरीच साधना लागते. प्रत्येक विषयात काही कठीण धडे असतात. ते धडे पूर्ण समजण्यासाठी त्यांचे खोलवर वाचन करावे लागतं. हे खोलवर वाचन करताना किमान ३ - ४ तास पूर्ण एकाग्रतेने, मनात बाकी कोणतेही विचार न आणता तो धडा वाचला पाहिजे. मागे म्हटल्याप्रमाणे काही धड्यात 'दोन ओळींच्या मध्ये सुद्धा गर्भितार्थ दडलेला असतो" हा गर्भितार्थ समजण्यासाठी विद्यार्थ्याला "ब्रह्मानंदी टाळी" लागलेली असणे आवश्यक असते. ह्यात अजून एक मुद्दा. असे अनेक विषयातील अनेक गर्भितार्थ आपल्याला त्या त्या वेळी समजलेले असतात परंतु त्याची योग्य प्रकारे नोंद ठेवून परीक्षेआधी त्याची उजळणी करणे आणि आपला मेंदू परीक्षेत हे व्यवस्थित आठवू शकेल ह्याची तयारी करणे हे ही एक कठीण तंत्र विकसित करणे आवश्यक असते.
सकाळची वेळ अभ्यासासाठी उत्तम मानली जाते कारण मनात त्यावेळी दुसरे कोणते विचार नसतात. पण आजची बहुतांशी विद्यार्थी पिढी रात्री जागून अभ्यास करते ज्यावेळी इंटरनेटचे आकर्षण सर्वात जास्त असते. भ्रमणध्वनीवर विद्यार्थ्यांनी इंटरनेट घेणे हे अभ्यासासाठी अगदी घातक आहे हे माझे कर्मठ मत. मी इतका कर्मठ की मी माझ्या भ्रमणध्वनीवर सुद्धा इंटरनेट घेतलं नाही.

सारांश असा की जर तुम्हाला अभ्यासात परिपूर्णता हवी तर विनाव्यत्यय पूर्ण एकाग्रतेने दररोज किमान ३-४ तास अभ्यास करणे आवश्यक आहे. फेसबुक, Whatsapp ह्या गोष्टी ह्या एकाग्रतेने अभ्यास करण्याच्या तुमच्या क्षमतेला बाधा पोहचवू शकतात किंबहुना पोहोचवतातच. आपली ९५ टक्क्याची आणि त्यापुढची सुद्धा क्षमता असते परंतु ही विनाव्यत्यय एकाग्रतेची अभ्यासाची सत्रे आपण जमवू न शकल्याने आपणास कमी टक्क्यावर (म्हणजे ९० वगैरे) समाधान मानावे लागू शकते. ह्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने मनन करणे आवश्यक आहे.

बाकी जीवनात प्रत्येकजण विद्यार्थीच असतो. हे इंटरनेट आपल्या जीवनाच्या परीक्षेवर कोणता परिणाम करीत आहे ह्याचा सुज्ञांनी विचार करून पाहावा!

Monday, November 4, 2013

एकवीरा देवी, महड गणपती दर्शन - भाग ३


दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास जाग आली. वाफाळलेल्या चहाने सुस्ती घालविली. आता सहलीतील मुख्य कार्यभागाची म्हणजेच देविदर्शनाची वेळ होती. १४ जणांना झोपेतून उठवून तयार करून टेम्पो ट्रेवलरमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडणे ही कठीण बाब होती. सोहम चिनुला साथीला घेवून दुपारच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी जोरदार सराव करत होता.
तरुण महिलावर्गाने तयारीसाठी बराच वेळ घेतला. तोवर आकाशात पश्चिम दिशेला काळ्या ढगांनी बरीच गर्दी केली होती. सूर्याची किरणे त्या काळ्या ढगांवर चंदेरी कडांचे विलोभनीय दृश्य निर्माण करीत होती. ह्या काळ्या ढगांचे अनेक थर आकाशात दिसत होते. मला हे ढग नेहमीच आकर्षित करतात. मी ह्या ढगांची  ब्लॅकबेरीवर अनेक सुंदर (माझ्या म्हणण्यानुसार) छायाचित्रे काढली. वेळ मिळाल्यावर मी ती ह्या पोस्टला जोडीन. आकाशात पूर्वेला अगदी विरळ इंद्रधनुष्य दिसू लागले होते. माझ्या नजरेस ते पडले मग ते मी बाकीच्या सर्वांना दाखविले. मग अधिक क्षमतेच्या कॅमेरांच्या साथीने मंडळींनी ह्या इंद्रधनुष्याला छबिबंद केले. तरुण महिलावर्गाची तयारी एव्हाना आटपत आली होती. परंतु आजूबाजूच्या नयनरम्य परिसराच्या साथीने आपली छायाचित्रे काढून घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही. हे फोटोसेशन काही काळ चालले. मग वडिलधाऱ्या मंडळीनी गडबड केल्यावर सर्वजण वाहनात शिरले.
बहुदा जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून आम्ही निघालो. ह्या भागात काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता. आणि आता सूर्याची पिवळी किरणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या तयार होत आलेल्या भाताच्या पिकांवर पडून सुंदर दृश्य निर्माण झाले होते. महामार्गाच्या डाव्या बाजूला किनारा विलेज आणि इतर काही ढाबे दिसत होते. रात्रीचे जेवण ह्यातील कोणत्या ढाब्यात घ्यावे ह्याविषयी मंडळीत चर्चा सुरु झाली. थोड्या वेळाने आम्ही कार्ला लेण्याच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. अचानक १६ जणांचा समूह आलेला पाहून रिक्षावाले खुश झाले. आमच्या गटात महिलावर्ग आणि त्यातही सर्वच तरुण नसल्याने आम्हांला रिक्षांची गरज भासणार हे स्वाभाविक होते. प्रश्न इतकाच होता की सर्वांनी रिक्षा करायची की काही जणांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तपणाची परीक्षा  घेत पायीच टेकडीवर कूच करायचे हा प्रश्न होता. एकंदरीत संपूर्ण गटाची द्विधा मनःस्थिती पाहता सौरभने पुढाकार घेत चार रिक्षा ठरविल्या आणि आम्ही टेकडीवर निघालो. तीव्र चढ कूच करण्यासाठी रिक्षाला धाप लागत होती. आमच्यासमोर एका जोडप्यातील पत्नी चालकाची भूमिका बजावीत होती. चढणीच्या रस्त्यावर क्लच, ब्रेक आणि वेगसंवर्धक ह्यांचा ताळमेळ जुळून न आल्याने तिची गाडी अधूनमधून बंद पडत होती. आणि त्यामुळे मागची रहदारीची कोंडी होत होती. एकदाचं तिला ओवरटेक करून आमची रिक्षा टेकडीच्या मध्यभागी असलेल्या रिक्षातळावर जाऊन पोहोचली. ह्यापुढील मार्ग पायी कूच करायचा होता. एकंदरीत रिक्षावाल्यांच्या ह्या अनुभवाने माझी निराशा झाली. त्यांनी ५ मिनिटाच्या ह्या प्रवासाचे एका रिक्षामागे १२० रुपये घेतले. श्रद्धास्थानी येणाऱ्या भाविकांची अशी अडवणूक करणे योग्य नव्हे.
पुढील चढणीच्या रस्त्यात सोहमने आघाडीचे स्थान राखण्याचा हट्ट धरला. आणि बाकी सर्वांनी त्याला बरं वाटावं म्हणून  त्याला आघाडीस राहून दिलं. ह्या चढणीच्या रस्त्यावरून खालच्या भागातील वस्तीचे दिसणारं दृश्य नयनरम्य होते.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला हार. पूजेचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने होती. साधारणतः दहा मिनिटाच्या चढणीनंतर आम्ही देवळाच्या ठिकाणी पोहोचलो. कारण काही असेना पण आज गर्दी एकदम तुरळक होती. बहुदा दिवाळीचा आधीचा सप्ताह असल्याने लोक दिवाळीच्या तयारीत असतील आणि सर्वांच्याच परीक्षा अजून आटोपल्या नसतील अशी अटकळ आम्ही बांधली. सर्वजण वर येईपर्यंत आम्ही थांबलो. प्राजक्ताच्या आजीनेही जवळजवळ अर्धी चढण पार केली होती. परंतु त्यानंतर तिथल्या ओल्या रस्त्यामुळे तिने परत फिरण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ताचे काका प्रदीप हे तिच्यासोबत खाली थांबले.
ओटी, फुले अशी सर्व तयारी झाल्यावर महिलावर्गाने आम्हास मंदिरात प्रवेश करण्याची संमती दिली. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक हसतमुख माणूस ढोलक्यावर लयबद्ध नाद निर्माण करून येणाऱ्यांचे स्वागत करीत होता. अशी हसतमुख माणसे भेटली कि खूप बरं वाटतं.
दर्शनासाठी अजिबात रांग नव्हती. त्यामुळे शांतपणे डोळेभरून, मनभरून एकविरा देवीचे दर्शन घेता आलं. प्राजक्ताने ओटी भरली. देवीला साडीही भेट दिली. अशा देवळांत शांतपणे देवीचे दर्शन घेणे हा एक खास अनुभव असतो. एका अलौकिक शक्तीच्या अस्तित्वाची तिथलं शांत वातावरण आपणास जाणीव करून देतं. मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ अशी शक्ती ह्या  विश्वात आहे हे नक्की, ह्या शक्तीच्या कोणत्या रूपावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. मला जिथे जिथे ह्या शक्तीच्या अस्तित्वाची अनुभूती होते तिथे मी नतमस्तक होतो. असाच अनुभव मला वसईतील बेण्यावरील आमच्या कुलदेवता आनंदीभवानी हिच्या दर्शनाने होतो. मंदिरातून पाय निघत नसला तरीही मागे जमू लागलेल्या गर्दीचे भान राखणे आवश्यक होते. आम्ही मंदिराबाहेर आलो. त्या समाधानी माणसास आम्ही थोडी रक्कम स्वखुशीने दिली. त्याने एकदम खुशीने ती स्वीकारली. माणसाने कसं असावं तर ह्या माणसासारखं!
पुन्हा एक फोटोसेशन झालं. उतरणीचा मार्ग सोपा होता. आजीसोबत थांबलेल्या प्रदीपकाकांनी आम्ही परतताच वरती दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सोबतीला स्वप्नील होताच. तोवर बाकी सर्वांनी रिक्षा करून परतीचा मार्ग पत्करला. बसमध्ये डासांनी धुमाकूळ घातला होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी समोरच्या दुकानातून कॉईल घेण्यात आली. बाकी रिक्षातून उतरल्यावर बाहेर उभ्या असलेल्या सासूबाईच्या पायाच्या कडेवरून सुरु झालेल्या रिक्षाचे चाक गेले होते त्यामुळे त्या वेदनेत होत्या. १४ जण आता डोंगरावरून परतीच्या रस्त्याकडे वाट पाहत बसले होते. काही वेळातच काका आणि स्वप्निल ह्यांच्या परिचित आकृत्या उतरणीच्या मार्गावरून येताना दिसल्या आणि बसमध्ये थोडा कलकलाट झाला. आपल्याकडे सर्वांचे लक्ष असणार ह्याची त्या दोघांना जाणीव होतीच. त्यामुळे त्या संधीचा फायदा उठवीत त्यांनी त्या उतरणीच्या रस्त्यावर आपल्या नृत्यकौशल्याची थोडी झलक दाखविली. बसमधील सर्वांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली आणि "पुन्हा एकदा" अशी मागणी केली. शेवटीच्या टप्प्यात आल्यावर त्या दोघांनी पुन्हा एकदा त्या पदलालित्याची झलक दाखविली.
आता पोटोबाची सोय करणे भाग होते. बसमध्ये दोन गट होते. एक गट किनाराच्या बाजूने होता तर दुसरा दुसऱ्या एका हॉटेलच्या बाजूने! शेवटी किनाऱ्याचा विजय झाला आणि टेम्पो ट्रेवलर किनाऱ्याच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश करता झाला. प्रवेशद्वारापाशी उंट, घोडे होते. थोडं आत गेल्यावर गीरच्या प्रसिद्ध गाईचे दुध मिळेल असा बोर्ड लावण्यात आला होता. त्या गाईचा गोठा थोडा पुढे होता. मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त भाग राखून ठेवण्यात आला होता. इतक्या विस्तृत परिसराच्या मध्यभागी एक गझल गायक आपल्या साथीदारांसमवेत आपल्या सुरेल आवाजात दर्दभऱ्या गझल गात होता. सर्व परिसरात मंद प्रकाशयोजना करण्यात आली होती. एकंदरीत वातावरण सुंदर होते. लहान मुले उंट, घोड्यावरून रपेट घेत होती. आम्ही आधी जी बसण्याची जागा स्वीकारली होती तिथे सोहमला काहीसा वेगळा दर्प आल्याने आम्हांला जागबदल करावा लागला. शनिवार असल्याने मी शाकाहारी पर्याय स्वीकारला, बहुमत मांसाहारी पर्याय स्वीकारलेल्या गटाचे होते. त्यातसुद्धा चिकनचे स्टार्टर आल्यावर शाकाहारी गटातील दोघांनी न राहवून पक्षांतर केले. त्यामुळे आम्ही अगदीच अल्पमतात आलो. जेवण चांगले होते. मी शाकाहारी असलो तरी त्यावर आडवा हात मारला. बच्चेमंडळी एव्हाना पेंगुळायला लागली होती.
मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतल्यावर बाकीच्या दोन बंगल्यात पाहुणेमंडळींचे आगमन झाल्याचे आढळून आले आणि त्यामुळे आमची थोडी निराशा झाली. नाहीतर त्या बंगल्यावर कब्जा करण्याची सुप्त इच्छा आम्ही मनी बाळगून होतो. पुढील पंधरा वीस मिनिटात मंडळी घरच्या कपड्यात स्थिरस्थावर झाली. एव्हाना रात्रीचे दहा सव्वादहा झाले होते. विश्रामस्थानी परतताच बच्चेमंडळीची झोप उडाली होती आणि ती पूर्ण सक्रिय झाली होती. सोहमची सौरभला उनो ह्या पत्त्यांच्या खेळात हरविण्याची सुप्त इच्छा सायंकाळपासून जागृत झाली होती. त्या दोघांच्या एकमेकाला पराभूत करण्याच्या ललकारी बराच वेळ सुरु होत्या. त्यांना आता प्रत्यक्ष खेळाचे रूप लाभले. बाजूला श्राव्या आणि स्वप्निल पत्त्यांचा नियम नसलेला मुक्त खेळ खेळत होते. थोड्याच वेळात श्राव्याचे लक्ष दुसरीकडे खेचण्यात आम्ही यश मिळविले आणि पत्त्यांवर आणि बसण्याच्या जागेवर कब्जा मिळविला. आणि मग माझा आवडता खेळ मेंढीकोट सुरु झाला. सुरुवातीला मी आणि स्वप्निल विरुद्ध प्राजक्ता आणि प्रांजली असे संघरचना होती. कट हुकुम ह्या पद्धतीने हुकुम ठरविण्यात येणार होता. मेंढीकोट ह्या खेळात आपल्या साथीदाराला खाणाखुणा करणे, पकडले  न जाता लबाडी करणे ह्यावर तुमचा विजय अवलंबून असतो. ह्यातील काही तंत्रे अशी.

१> लपवून हुकुम करण्याची पद्धत अवलंबली असल्यास, ज्याने हुकुम लपविला आहे तो हळूच पायाच्या हालचालीने आपल्या साथीदारास पत्ता दाखवितो. मग तो समोरचा साथीदार कान, नाक, जीभ ह्यांच्या मदतीने हुकुम लपविलेल्या व्यक्तीस हुकुम सांगतो.
२> समजा तुमच्याकडे एका प्रकारचे (किल, बदाम, इस्पिक किंवा चौकट) ह्यातील एकच पान आणि तेही मेंढी असल्यास तिचे भवितव्य साथीदाराकडे असलेल्या एक्क्यावर किंवा त्याने हुकुम फोडण्यावर अवलंबून असते. अशा ते सुद्धा तुम्हांला खुणेने त्याला सांगता आले पाहिजे. बऱ्याच वेळा मेंढी जाऊ नये म्हणून आपण कट नसताना सुद्धा कट असल्याचा भाव आणून हुकुम फोडावा किंवा नवीन हुकुम करावा. पुढे प्रतिस्पर्धी जर आपल्यावर खास लक्ष ठेवून असेल तर शेवटचे एक दोन हात बाकी असताना आता सर्व मेंढ्या संपल्या असे म्हणून तो डाव संपवावा.
प्रांजली आता पूर्ण फॉर्ममध्ये आली होती. किलवर हुकुम प्राजक्ताला सांगण्यासाठी तिने अचानक 'फुलाफुलांच्या घालून माळा' हे गाणे म्हणण्यास प्रारंभ केला. नियमाचे उल्लंघन होतेय हे सांगून आम्ही हा डाव फोक्स (ह्या शब्दाची  व्युत्पत्ति कशी झाली  असावी हा संशोधनाचा विषय!) केला. तिने अजून एक गाणे किलवर ह्या हुकुमासाठी वापरले ते आता आठवत नाही. त्यानंतर सौरभ आणि अर्पिता सहभागी झाले. आता तीन महिला विरुध्द तीन पुरुष अशी संघरचना  झाल्याने शाब्दिक चकमकींना जोर चढला होता. मध्येच सौरभनेही 'मी असा कसा, मी असा कसा' असे गीत गात चौकट हुकुमाचा संकेत करण्याचा  अयशस्वी प्रयत्न  करीत डाव फोक्स करून घेतला. मध्यंतरीच्या काळात महिला वर्गावर दोन कोट चढविण्यात आले होते आणि बराच वेळाने त्यांनी आमच्यावर कसाबसा एक कोट चढविला. बाजूला झोपलेले अरुण काका आपल्या अधूनमधून घोरण्याच्या आवाजाने ह्या शाब्दिक चकमकींना  उत्तम पार्श्वसंगीत देत होते. शेवटी साडेबाराच्या सुमारास दोन्ही संघांनी एकमेकांच्या फसवणुकीला कंटाळून हा खेळ संपविण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे पुरुषवर्गाने हा सामना २ -१ असा जिंकला. महिला संघातील कोणी हा ब्लॉग वाचून २-१ ह्या गुणसंख्येविषयी शंका उत्पन्न करणारी कॉमेंट टाकल्यास वाचकांनी त्या कडे दुर्लक्ष करावे!
(क्रमशः)

Saturday, November 2, 2013

एकवीरा देवी, महड गणपती दर्शन - भाग २


थोड्याच वेळात टेम्पो ट्रेवलर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावू लागला.  सीप्झ, पवई भागात कार्यालये आहेत त्यांना हा लिंक रोड हा शब्द उच्चारला की वाहतूककोंडीची दुःस्वप्ने पडू लागतात. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने वाहतूककोंडी नव्हती. मुंबईचे हेच वैशिष्ट्य आहे, तुम्हांला चांगला प्रवास हवा असेल तर तुम्हांला सकाळी लवकर निघावयास हवे. ह्या लिंक रोडवर टेम्पो ट्रेवलरमध्ये इंधन भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पवई मागे टाकून टेम्पो ट्रेवलर पूर्व द्रुतगती मार्गाला लागला. ह्या मार्गावर काही उपनगरे, वस्त्या (त्यांची नावे घेत नाही, तेथील रहिवाश्यांच्या भावना दुखावायला नकोत!) अस्वछ आहेत आणि तिथे असह्य दुर्गंधी पसरलेली असते. आपणास केवळ ह्या भागातून जाताना इतका त्रास होतो मग तिथे राहणारे हे कसे काय २४ तास सहन करीत असतील हे समजत नाही. एकंदरीत हे आपले अपयश समजायला हवे. बाकीचा इतका मोठा सुंदर देश मोकळा असताना तिथे केवळ आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकत नाही म्हणून शहरात येऊन लोकांना अशा दयनीय अवस्थेत राहावे लागते.
पुढे वाशी आणि नवीन मुंबईचा परिसर सुरु झाला. इथील रस्ते रुंद आणि त्यामुळे वाहनेही वेगात प्रवास करीत होती. त्यामुळे आपल्या टेम्पो ट्रेवलरचा वेग जास्त असायला हवा होता अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. थोड्या वेळातच यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आमच्या वाहनाने प्रवेश केला. इथील वाहनांचा वेग भन्नाट, त्यामुळे मला कसेसेच वाटू लागलं. आमचा चालक सुद्धा आपल्या वाहनाची मर्यादा ओळखून टेम्पो चालवत होता. आमच्याहून हळू वाहने चालविणारे चालक अधूनमधून दिसत होते. त्यांनी खरेतर सर्वात डाव्या मार्गिकेत राहायला हवे, पण त्यातील काही नमुने मधल्या मार्गिकेत वाहने चालवीत होते. त्यांना मागे टाकण्यासाठी आमच्या चालकास बरीच मेहनत करावी लागत होती. तो अगदी शेवटपर्यंत त्यांच्या मागे जाई आणि मग उजव्या बाजून पुढे जाई. अजून काही वाहनचालक आपल्या मोटारगाडीत सामान खचोखच भरून जाताना दिसले. सोय म्हणून एकाच वेळी इतके सामान भरून ठीक आहे पण आपली मागून येणाऱ्या वाहनांचे दृश्य ह्या खचाखच भरलेल्या वाहनांमुळे अडले जात आहे ह्याचे भान त्यांनी ठेवावयास हवे होते. मध्ये दोन बोगदे लागले. त्यातील अंधारात मागील पार्किंग लाईट सुरु ठेवून वेगात जाणाऱ्या गाड्यांचे दृश्य सुंदर होते.
थोड्या वेळाने सौरभ आणि चालकाची परमिट ह्या विषयावर चर्चा सुरु झाली. ह्या प्रवासासाठी सर्व प्रवाश्यांच्या नावाची यादी देऊन परवाना घेणे आवश्यक होते. परंतु घाईगडबडीत हे राहून गेले होते. हे कळल्यावर रस्त्याबाजूच्या वाहतूकपोलिसाकडे आमची नजर उगाचच जास्त वळू लागली आणि थोड्या वेळातच त्यातील एकाने आम्हांला  बाजूला थांबण्याचा इशारा केला. चालकाने व्यवस्थित गणवेष परिधान केला होता. त्याचे आणि वाहतूक पोलिसाचे बोलणे आम्ही टेम्पोतून पाहत होतो. अशा वेळी प्रवाशांनी चर्चेत भाग घेऊ असे म्हणत इच्छुक सौरभला त्याच्या वडिलांनी रोखले. त्यांच्या म्हणण्यात तथ्य होते. पाच मिनिटातच दोनशे रुपयाचा दंड आणि पावती घेऊन आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात लोणावळ्याला बाहेर पडण्याचा गच्छंतीमार्ग आला. लोणावळ्यातील हवेत थंडावा जाणवत असल्याचे लक्षात येताच काकांनी टेम्पोत वातानुकुलीत यंत्रणा सुरु केल्याची टिपण्णी केली.
लोणावळ्याच्या मुख्य नाक्यावर पुन्हा एकदा वाहतूकपोलिसांची मेहेरनजर आमच्यावर पडली. चालकाने मोठ्या आत्मविश्वासाने त्याला दोनशे रुपयाची दंडपावती दाखविली. "ही चालणार नाही, कारण ती लोणावळ्याच्या बाहेरील आहे" साहेब उद्गारले. चालकाने कार्यालयात बसून हा सर्व प्रकार पाहणाऱ्या मोठ्या साहेबाकडे "जावू द्याना आता" अशी विनवणीच्या नजरेत विनंती केली. त्याचा फायदा होऊन त्याने साहेबास आम्हांस जाऊ देण्यास सांगितले. "बाकी सर्व कागदपत्रे तर आहेत ना?" जाऊ देता देता साहेब विचारते झाले. इतका वेळ फक्त परमिटची चर्चा सुरु होती म्हणजे बाकीची कागदपत्र तर व्यवस्थित असणार अशा भोळ्या समजुतीने १६ मुखावर हो असे उत्तर आले. परंतु जे सर्वात महत्वाचे होते त्या सतराव्या (चालकाच्या) चेहऱ्यावरील अनिश्चिततेचे भाव अनुभवी साहेबांनी लगेचच जाणले. पुन्हा एकदा गाडी बाजूला लावण्याचा आदेश देण्यात आला. काकांनी गाडीच्या मालकांना फोन लावला. गाडीत असणारी कागदपत्रे पुरेशी नव्हती. आताची साहेब, मोठे साहेब आणि चालक ह्यांची बोलणी बराच वेळ रंगली. टेम्पोतील सर्वाचे लक्ष आता सौरभकडे वळले. सौरभच पोलिसांचे लक्ष वेधून घेत असावा असे सर्वांचे म्हणणे पडले. सौरभ टेम्पो चालवू शकत असल्याने त्याने तसाच टेम्पो घेवून विश्रामधामाकडे कूच करावे असेही काहींचे म्हणणे पडले. सौरभ बिचारा हे सर्व शांतपणे ऐकून घेत होता. काहीवेळाने अजून एक फोडणी देऊन आमचे चालक टेम्पोत परतला. "नऊशे रुपयाचे परमिट मी काढायला सांगत होतो. ते जर काढले असते तर ही सर्व कटकट झाली नसती" टेम्पो सुरु करता करता तो उद्गारला.
त्यानंतर मात्र आम्ही विश्रामधामापर्यंत व्यवस्थित पोहोचलो. तिथे निवासासाठी चार बंगले होते. त्यातील दोन आम्ही आरक्षित केले होते. बाकीच्या दोन बंगल्यात कोणी राहण्यास आले नव्हते. त्यामुळे एकंदरीत शांतता होती. महिलावर्गास आणि पुरुषवर्गास प्रत्येकी एक बंगला अशी निवासव्यवस्था होती. फक्त साडेदहाच झाले होते. महिलावर्गाने ब्रेडचे बरेच पुडे काढले. त्यानंतर काकड्या, उकडलेली बटाटी, सॉस असे रुचकर सँडविचला आवश्यक असणारे जिन्नससुद्धा बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुरुषवर्गात अचानक खुशीचे वातावरण पसरले. सँडविच होण्यास अजून बराच वेळ लागेल हे लक्षात घेऊन मी पुरुषवर्गाच्या बंगल्यात परत गेलो. सुदैवाने तेथील दूरदर्शन संच चालू अवस्थेत होता आणि त्याहून नशिबाची गोष्ट म्हणजे केबलही सुरु होते. केबलवर क्रिकेटवाहिनीवर २००७ साली भारताने इंग्लंडला हरविलेल्या एका सामन्याची क्षणचित्रे दाखविली जात होती. ज्यादिवशी आपला सामना नसतो अशा वेळी क्रीडा वाहिन्या जुन्या जिंकलेल्या सामन्यांची क्षणचित्रे दाखवितात. ती आपले क्रिकेटपटू पाहत असावेत आणि त्यांचे मनोधैर्य वाढत असावे असा माझा अंदाज आहे. सँडविच तयार झाल्याची हाक येताच मी त्वरित समोरच्या बंगल्यात पोहोचलो. सँडविच खरोखर रुचकर होते. ते फस्त करून मंडळी ताजीतवानी झाली. श्राव्याला एका विशिष्ट प्रकारे सँडविच बनवून हवे होते ते कोणाला समजत नसल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ह्यात ब्रेडच्या स्लाईसच्या बाजूला सॉस हा महत्वाचा घटक असल्याचे ध्यानात येताच प्रश्न मिटला.
संयोजकांनी फावल्या वेळातील उद्योगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसावे. नशिबाने प्लास्टिकची छोटी बॅट आणि तत्सम पदार्थाचा मऊ चेंडू ह्यांनी प्रश्न मिटविला. सुरुवातीला सराव करण्यात मंडळींनी धन्यता मानली. सोहम आणि श्राव्या ह्यांना वयोमानामुळे फलंदाजीचा हक्क प्राप्त झाला होता. त्यांना गोलंदाजी करण्यात स्वप्नील आणि प्रांजली ह्यांनी पुढाकार घेतला होता. ह्या दोघांची गोलंदाजी भन्नाट होती. भारतीय गोलंदाज स्वैर मारा करतात परंतु त्यांची स्वैरता केवळ यष्ट्याच्या डाव्या उजव्या बाजूला मर्यादित असते. पण स्वप्निल आणि प्रांजली ह्यांनी त्यावरही कळस केला. त्यांचा मारा यष्ट्यापासून डावी उजवीकडे  १०-१० फुट जाऊ लागला. आणि मग त्यांनी गगनभेदी मारा सुरु केला. चेंडू पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत, किंवा दुसऱ्या मजल्याच्या पातळीवर असलेल्या पत्र्यांना भेदून जाऊ लागला. हा मारा पाहून बच्चेमंडळी सोहम आणि श्राव्या ह्यांचा फलंदाजीतील रस कमी होऊ लागला. उत्कृष्ट खेळाडू सौरभ आणि स्वयंघोषित उत्कृष्ट खेळाडू जावईबापू ह्यांचाही मारा काही खास पडत नव्हता. त्यामुळे सुज्ञपणे सर्वांनी बॉक्स क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. सौरभ, सोहम, प्राजक्ता आणि सुप्रिया (स्वप्निलची पत्नी) विरुद्ध प्रांजली, चिन्मय, स्वप्निल आणि जावईबापू अशी संघाची निवड करण्यात आली. बसमधून उतरल्यानंतर सौरभ आणि त्याची पत्नी अर्पिता ह्यांचे काहीसे बिनसले असावे त्यामुळे ती प्रेक्षकवर्गासाठी असलेल्या वऱ्हांड्यातून सौरभला "चीटर चीटर" असे सतत संबोधित होती. पहिल्या सामन्यात स्वप्नीलच्या संघाची कामगिरी बेताचीच झाली. सासुरवाडीच्या समस्त वर्गाला प्रभावित करण्यासाठी जावईबापूंनी मारलेला फटका थेट सीमारेषेबाहेर गेल्याने ते बाद झाले. घोषित केलेल्या १, २ धावांच्या सीमारेषेवरून दोन्ही संघात वाद होत होते. अर्पिता थेटसौरभच्या विरुद्ध पक्षात होती आणि तीन सासूबाई, एक आजेसासू आणि दोन सासरे ह्यांना जावईबापूंच्या उघडपणे विरोधात जाणे योग्य वाटत नसावे त्यामुळे बरेचसे विवादास्पद निर्णय जावईबापू असलेल्या स्वप्नीलच्या संघाच्या बाजूने घोषित करण्यात येत होते. इतके करून सुद्धा पहिला सामना सौरभच्या संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात मात्र चिनुने चांगली फलंदाजी करून ४ षटकात २९ धावा बनवून देण्यास हातभार लावला. त्यानंतर स्वप्निल, चिनु  आणि प्रांजलीने उत्तम गोलंदाजी करून सामना जिंकून दिला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक सामन्यात जावईबापूंना सूर गवसला. त्यांनी गेल्या ५ वर्षातील सुरुच्या बागेतील आणि शाळेतील बॉक्स क्रिकेटचा अनुभव पणाला लावला आणि ३ षटकात २९ पर्यंत धावसंख्या पोहोचवली. ह्यात त्यांनी  फटक्याचा पहिला टप्पा जमिनीवर आपटून दुसरा टप्पा सीमारेषेबाहेर चौकारासाठी पोहोचविण्याच्या गनिमी काव्याचा वापर केला. चिनुने शेवटच्या षटकात १० धावा फटकावून४ षटकात ३९ अशी मजबूत धावसंख्या उभारली. सौरभचा संघ अगदी दडपण घेऊन खेळला आणि सर्वजण ४ षटकात केवळ ५ धावा काढून बाद झाले. ह्यात सुप्रियाने दोन निर्धाव षटके खेळून बराच हातभार लावला!
एव्हाना जेवणाची वेळ झाली होती. सकाळी चार वाजता उठून सौरभच्या आईने बनविलेल्या स्वादिष्ट पुलावाचा स्वाद घेण्याची वेळ झाली होती. ह्या पुलावातील समाविष्ट असलेल्या सर्व भाज्यांची नावे सौरभने आधीच अचूक सांगितली होती ह्याचे मला बरेच आश्चर्य वाटले. तेव्हा सकाळी उठून मीच ह्या भाज्या कापल्या असा दावा त्याने केला. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे मला समजले नाही. नंतर त्या भाज्या अर्पिताने कापल्या होत्या असा खुलासा खात्रीलायक गोटातून करण्यात आला तेव्हा अर्पिता सौरभच्या मागे चीटर म्हणून का लागली असावी ह्याचा थोडा अंदाज आला. पुलाव खरोखर रुचकर होता आणि गरमागरम पापड त्याच्या चवीत भर घालीत होते. समोर पराभूत संघ बसला असल्याने त्यांची चेष्टा करताना दोन घास अधिकच गेले.
दुपारचे दोन वाजले होते. सकाळी लवकर उठलेले डोळे केबल टीव्हीवर धन्य मराठी मालिका  लागताच निद्राधीन झाले!