Saturday, May 30, 2015

तन्नू आणि मन्नू - विवाहोत्तर प्रवास!!

 
http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_30.html

चित्रपटाची सुरुवात इंग्लंड मधल्या एका ढगाळ, उदास वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विवाहित जोडप्यांच्या समुपदेशन केंद्रात ! विवाहानंतरच्या चार वर्षात ह्या जोडप्यातील मतभेद पराकोटीला गेले आहेत. हे दोघं आपल्या वैयक्तिक संबंधांची चिरफाड ह्या समुपदेशकासमोर अगदी उघडपणे करताना आढळतात. आपल्या सर्वांना चांगलाच माहित असलेला आणि मी बऱ्याच वेळा मांडलेला मुद्दा! दोन माणसं ती नवरा बायको का असेनात ज्या वेळी सतत एकत्र असतात तेव्हा एकमेकांचे गुण दोष अगदी जवळून दिसतात. पूर्वी पतीला जे परमेश्वराचे रूप दिले जायचे त्यामुळे तो परीक्षणापासून वाचला जायचा. आज असं काही होत नाही, पतीचे थेट परीक्षण होतं अगदी त्याला ८० किलोचं पोतं म्हणेपर्यंत! पती सर्वगुणसंपन्न वा गुणसंपन्न केव्हाच नव्हते. परंतु त्यांना पूर्वी विवाहसंस्थेतील पती ह्या संस्थेचे कवच होते. आज हे कवच नाहीसे झालंय. ह्या प्रसंगात संवाद अगदी उघडपणे, कसलीही भीडभाड न बाळगता बोलले जातात. बहुदा हे आपल्या समाजाने आता पूर्णपणे स्वीकारलं आहे. ह्या पुढे जी आपली नैतिक प्रगती व्हायची ती आजच्या ह्या पातळीला प्रमाण मानून! 

http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_30.html 

Friday, May 29, 2015

वसईतील शेतीउद्योगाचे भवितव्य!

 


http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_26.html

वसईतील शेतीउद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या 
१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण 
२> शेतकी व्यवसाय करणाऱ्या युवकांना / कुटुंबांना मिळणारी कमी प्रमाणातील सामाजिक प्रतिष्ठा
३>  शेतमजुरांची टंचाई 

ह्या तिन्ही समस्यांचा आपण सविस्तरपणे उहापोह करूयात. 

१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण
साधारणतः १९३० - ४० च्या सुमारास वसईतील शेतकऱ्यांकडे दरडोई बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात शेती होती. ह्या शेतीची देखभाल करण्यासाठी म्हणा वा इतर कारणांमुळे ह्या सुमारास कुटुंबाचा आकार सर्वसाधारणपणे मोठा ठेवण्याकडे कल दिसून आला. त्यामुळे त्यावेळी शेतीची देखभाल करण्यास जरी घरचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असले तरी कालांतराने ह्या सर्वांना शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून राहणे कठीण होऊ लागले. आणि त्यामुळे हळूहळू शिक्षणक्षेत्राकडे वळण्याचा कल शेतकरी समाजात दिसून येऊ लागला.
आज बहुतांशी सर्व शेतकरी कुटुंबात तरुण पिढी शेतकी व्यवसायापासून दूर गेली आहे.ह्यातील जे जे लोक आपल्या पर्यायी व्यवसायात यशस्वी झाले त्यांना आपल्या वाट्याच्या शेतीच्या तुकड्यात एक छंद म्हणून काही लागवड करण्याची चैन परवडू शकते. 


http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_26.html 

Saturday, May 23, 2015

अघटित - भाग २

 
http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_24.html 

"ह्या सर्व देशांच्या क्षमतेची बेरीज करून सुद्धा आपली ह्या उल्केचा नाश करण्याची शक्यता १० टक्क्याच्या वर जाणार नाही!" गिल्बर्ट ह्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच घोषणा केली. त्यांच्या ह्या वाक्याने विल्यम्स ह्यांच्या चर्चेवर भयाची स्पष्ट छटा उमटून गेली. जॉन्सनच्या चेहऱ्यावर मात्र ह्या वाक्याने फारसा काही फरक पडला नाही कारण आधीपासूनच अगदी गंभीर चेहऱ्याने ते ह्या बैठकीत आले होते. अभियान चंदन सक्रिय करण्याचा निर्णय त्यांनी बैठकीपूर्वीच्या काही मिनिटात मनातल्या मनात जवळपास घेतलाच होता. गिल्बर्ट ह्यांच्या ह्या वाक्याने त्यावर केवळ शिक्कामोर्तब झाले होतं. सर्वसाधारण परिस्थितीत अभियान चंदन सक्रिय करण्यासाठी नासा, अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि गुंतवणूकदार ह्यांची संमती घेण्याची एक प्रक्रिया ठरवून देण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया सद्यस्थितीत पाळणे शक्य नव्हते म्हणजे दीडशे लोकांच्या यादीवर एकमत होणे शक्य नव्हते. आणि मग सगळाच गदारोळ माजला असता. मग आता ही यादी ठरवायची तरी कशी हा मोठा गहन प्रश्न होता. नैतिकदृष्ट्या विचार केला तर हा मनुष्यजातीच्या पुढील प्रवासाचा प्रश्न असल्याने सर्व राष्ट्रांतील सर्व वंशाच्या लोकांना ह्या यादीत प्रतिनिधित्व देणे योग्य होते. परंतु पुढील आठवड्याच्या कालावधीत ह्या सर्व लोकांची गुप्तरित्या निवड करून त्यांना उड्डाण स्थळापर्यंत आणणे केवळ अशक्य काम होते. त्यामुळे जॉन्सन ह्यांनी मनातल्या मनात हा पर्याय रद्द करून टाकला. आता त्यांचा मेंदू अतिशय वेगाने काम करू लागला. आपण अभियान चंदन सक्रिय करत आहोत हे ज्यांच्याशिवाय हे अभियान तडीस नेणे शक्य नाही त्या लोकांव्यतिरिक्त कोणालाच कळून न देण्याचं त्यांनी ठरविले. त्याचवेळी ही माहिती ज्या लोकांपर्यंत पोहोचली आहे त्यांना कोणत्या तरी पर्यायी मार्गाच्या तयारीत गुंतवून ठेवणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी जॉन्सन ह्यांना उल्काविनाश मार्गाशिवाय दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. हा मार्ग अगदी गांभीर्याने आपण घेत आहोत असे भासवायचे आणि त्याचवेळी चंदन अभियानामार्फत आपले कुटुंबीय, विश्वासू मित्रमंडळी आणि खासे अमेरिकन ह्यांना त्या ग्रहापर्यंत पोहोचवायची तयारी पूर्ण करायची अशी त्यांची योजना तयारसुद्धा झाली होती.  

http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_24.html 

(क्रमशः)

अघटित - भाग १

 

"सभ्य गृहस्थहो!" राष्ट्राध्यक्षांनी आपल्या धीरगंभीर स्वरात बोलण्यास सुरुवात केली. "ही महाकाय उल्का जर आपण संशोधित केलेल्या मार्गाने आणि अंदाजित वेगाने प्रवास करीत राहिली तर बरोबर १६५ व्या तासाला पृथ्वीवर आदळेल. तिच्या आकाराच्या आणि द्रव्याच्या घनतेचा विचार करता आपली भूमाता ह्या धक्क्यातून वाचण्याची शक्यता शून्य आहे." त्यांचे हे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्यासमोर नेहमीप्रमाणे शेकडो लोकांचा जमाव नसून केवळ नासाचे अध्यक्ष विल्यम्स आणि अमेरिका सेनाप्रमुख गिल्बर्ट हे दोघेच होते. 

 

Friday, May 15, 2015

Generic Medicine - चर्चासत्र

 

वसईतील जागरूक नागरिक संस्था आणि सुविचार मंच ह्यांच्या विद्यमाने वसईतील बंगली येथील लोकसेवा मंडळ हॉल इथे रविवार दिनांक १० मे रोजी सकाळी १० वाजता जेनेरिक मेडिसिन ह्या विषयावर एक परिसंवाद योजण्यात आला होता. ह्या परिसंवादात डॉक्टर, केमिस्ट आणि शासन ह्या तीन महत्वाच्या संस्थांच्या प्रतिनिधींना आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. डॉक्टर वर्गाचे प्रतिनिधित्व वसईतील सुप्रसिद्ध डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी, केमिस्ट वर्गाचे प्रतिनिधित्व पालघर जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री. अनीस शेख ह्यांनी तर शासनाचे प्रतिनिधित्व श्री. गिरीश हुकरे ह्यांनी केलं. ह्या परिसंवादात चर्चिल्या गेलेल्या काही महत्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना ह्या परिसंवादाच्या आरंभी आपले विचार मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सक्रियपणे औषध क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध, पाडल्या जाणाऱ्या चुकीच्या रूढीविषयी आवाज उठविण्याचे आव्हान केले. जर आपण संघटितपणे ह्या विषयी आवाज उठवला तर नक्कीच परिस्थिती बदलू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

त्यानंतर डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी आपले विचार मांडले. 
डॉक्टर संयोगिता तवकर
आपल्या डॉक्टरच्या कंपाउंडरने कधीकाळी आपणास जर पुड्यांमध्ये बांधून औषध दिली असतील तर ती आपली जेनेरिक औषधांशी पहिली ओळख. प्रत्येक औषधास तीन प्रकारची नावे असतात असे आपण म्हणू शकतो. 

  • त्या औषधाच्या molecular structure वरून त्याचे पडलेले रासायनिक नाव. 
  • ज्या वेळी एखादे औषध एका विशिष्ट देशातील मानद संस्थेच्या प्रमाणास पात्र ठरते तेव्हा ती संस्था त्या औषधास जे नाव देते त्यास जेनेरिक नाव म्हटले जाते.  
  • ज्या वेळी एखादी कंपनी ह्या औषधाचे पेटंट मिळविते त्यावेळी त्या कंपनीने उत्पादित केलेल्या नावास BRANDED नावाने ओळखले जाते. 
उदाहरण द्यायचे झाले तर क्रोसिन हे एक branded नाव असून PARACETAMOL हे त्याचे जेनेरिक नाव आहे. ह्याचे रासायनिक सूत्र C44H64O24 हे आहे. 
 
ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीत बरीच तफावत आपणास आढळून येते. ह्या मागील कारण -
कंपनीला अचूक रासायनिक सूत्र शोधून काढण्यासाठी बऱ्याच वर्षाचे संशोधन करावे लागते. ह्या संशोधनामध्ये लक्षावधी डॉलर्स खर्च होतात. इतक्या अथक परिश्रमानंतर त्या ब्रैंडेड औषधाच्या जाहिरातीवर सुद्धा बराच पैसा खर्च करावा लागतो. ह्या मुळे ही कंपनी ज्या वेळी आपले उत्पादन विक्रीस काढते त्यावेळी त्याची किंमत बरीच जास्त असते. ह्या सर्व बाबी लक्षात घेता पेटंट मिळालेल्या कंपनीला पुढील काही वर्षे ह्या औषधाच्या उत्पादनाचा अनिभिषिक्त हक्क दिला जातो. 
पेटंटचा कालावधी संपल्यानंतर बाकीच्या कंपन्या ह्या औषधाचे उत्पादन करू शकतात त्यावेळी ती जेनेरिक ह्या नावाने ओळखली जातात. त्यांना संशोधनावर पैसा खर्च करावा न लागल्याने ह्या औषधांच्या किंमती तुलनेने कमी असतात. 
त्यानंतर डॉक्टर संयोगिता ह्यांनी जेनेरिक औषधाची व्याख्या सांगितली. ह्या औषधाचे गुणधर्म हे मूळ औषधाच्या गुणधर्मासारखेच असायला हवेत. FDA चा प्रमाणित करण्याचा निकष हा ब्रैंडेड आणि जेनेरिक ह्या दोन्हीसाठी सारखाच असतो. 
गोरेगाव येथील प्रबोधन औषधपेढी ही जेनेरिक औषधांची विक्री करते. जेनेरिक औषधांचा वापर केल्यास वयस्क माणसांच्या उपचाराचा खर्च जवळजवळ २० टक्क्यावर आल्याचे (८० टक्क्यांनी कमी) आढळून आले आहे.
सध्या अमेरिका जेनेरिक औषधांवर जवळपास ३०० बिलियन डॉलर्स खर्च करते. अमेरिकेच्या FDA ह्या मानद संस्थेने २९० जेनेरिक औषधांचा वापर प्रमाणित केला आहे; त्यातील ११० औषधे नामांकित भारतीय औषध कंपन्या उत्पादित करतात आणि ती मग अमेरिकेत जेनेरिक म्हणून विकली जातात. 
Narrow Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मात्र जेनेरिक औषधांचा वापर करताना दक्षता घ्यावी लागते. अशा प्रकारच्या औषधात अगदी तीव्र संहितेचा कमी मात्रेतील डोस दिला जातो. त्यामुळे ह्या औषधांच्या रासायनिक संरचनेत १००% अचूकता अपेक्षित असते. जेनेरिक औषधांना ह्या बाबतीत काही टक्क्यांमध्ये फरक असल्याची मुभा असल्याने हा फरक Narrow Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मान्य केला जात नाही. 
 
अनिस शेख (केमिस्ट संघटना अध्यक्ष)
 
अमीर खान ह्यांच्या सत्यमेव जयते ह्या कार्यक्रमाने जेनेरिक औषधाविषयी जागृती निर्माण केली. आपल्या ग्राहकांना कमी किमतीमध्ये औषधे मिळावी असाच केमिस्ट लोकांचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. भारतातील औषध कायद्यानुसार डॉक्टरांनी लिहून दिलेलेच औषध देणे केमिस्टवर बंधनकारक असते. त्यामुळे आम्हांवर सुद्धा मर्यादा येतात. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचा आता फॅमिली फार्मासिस्ट (Pharmacist) असायला हवा जो आपणास योग्य जेनेरिक औषध सुचित करू शकेल. जेनेरिक औषधांच्या वापराने सामान्य नागरिकाचा उपचारांवरील खर्च नक्कीच कमी होईल. 
 
गिरीष हुकरे 
 
आपणांपैकी कितीजणांस अन्न आणि औषध प्रशासनाविषयी माहित आहे असा प्रश्न विचारून त्यांनी आपल्या भाषणांची सुरुवात केली. दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टींच्या दर्जाची जबाबदारी माझी / माझ्या गटाची आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे उलटून गेली तरी दुसऱ्यास दोष देण्याचा खेळ आपण खेळत आहोत. आपण आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा ताबा घेतला पाहिजे. त्यासाठी सम्यक विचारांचा आपणास आधार घ्यावा लागेल. भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखलं जात. जगातील १० टक्के औषधे भारतात उत्पादित होतात. IT क्षेत्रानंतर परकीय चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमाकांचे क्षेत्र आहे. ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीतील तफावतीबाबत बोलताना डॉक्टर संयोगिता ह्यांनी सांगितलेल्या कारणांबरोबरच मेडिकल प्रतिनिधी, डॉक्टरांना पुरस्कृत केल्या जाणाऱ्या विविध सवलती ह्या खर्चाचा सुद्धा ब्रैंडेडऔषधांच्या किमती वाढीस लागण्यास हातभार लागतो. ६५% भारतीय औषधांच्या उच्च किंमतींमुळे उपचारांपासून वंचित राहतात. औषधउपचारांवरील खर्च हे भारतीय लोक कर्जबाजारी होण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतीय लोक भावनिक असतात, उपचारासाठी सोने, शेतजमीन वगैरे गहाण टाकण्याची आपली मनोवृत्ती असते. भारतात आरोग्यविमा ही संकल्पना अजूनही फारशी प्रचलित नाही त्यामुळे ७९% टक्के भारतीय हे उपचारांचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात. केमिस्ट लोक ब्रैंडेडऔषधांच्या विक्रीतून जो फायदा कमावतात त्यातील काही हिस्सा त्यांनी सामान्य लोकांसोबत विभागून घ्यायला हवा. कोणत्याही उपचारपद्धतीत तीन D महत्त्वाचे आहेत ते म्हणजे Doctor, Diagnostic and Drug. त्यांनी डॉक्टरांना रुग्णांची जेनेरिक औषधांविषयीची जाणीव वाढविण्याचे आव्हान केले. केवळ जेनेरिक औषधे कमी किंमतीत मिळतात म्हणून ती कमी दर्जाची आहेत असे समजू नकात. बऱ्याच वेळा ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधे एकाच ठिकाणी उत्पादित होतात पण ती रुग्णांपर्यंत दोन वेगळ्या मार्गांनी पोहोचतात. केवळ केमिस्टने डॉक्टरने सूचित केलेल्या औषधापेक्षा दुसरे औषध दिले म्हणून त्यावर कारवाई केली जात नाही; बऱ्याच वेळा रुग्णास चुकीच्या औषधामुळे झालेला त्रास हा ह्या कारवाईमागचा मुख्य घटक असतो. काही चुकीचं घडलं म्हणून रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी  डॉक्टरांविरुद्ध प्रक्षोभक प्रतिक्रिया देण्याचे टाळावे असे आव्हान त्यांनी केलं. 
 
 
 
प्रश्नोत्तरे 
 
१> मी तुम्हांला ब्रैंडेड औषध लिहून दिलं आहे. जर तुम्हांला जेनेरिक औषध घ्यायचं असेल तर ते तुमच्या जोखमीवर घ्या असे डॉक्टरनी सांगितल्यास काय करावे?

उत्तर - ह्या मागे बऱ्याच वेळा डॉक्टरचे अज्ञान असू शकते. आजच्या परिसंवादासारखा परिसंवाद डॉक्टर वर्गासाठी सुद्धा आयोजित केला जावा असे आव्हान डॉक्टर संयोगिता ह्यांनी केले. 
 
२> ब्रैंडेडऔषधाचा पुरस्कार करण्यामागे डॉक्टरांचा आर्थिक फायदा हे कारण असू शकते काय? (काहीसा नाजूक प्रश्न)
 
उत्तर - ही शक्यता कमी असते. जेनेरिक औषधाच्या उपलब्धतेविषयी डॉक्टरचे अज्ञान हा बराच वेळा मुख्य घटक असतो. 
 
डॉक्टर आणि रुग्ण ह्यांच्यातील सुसंवाद, विश्वास हा मुख्य घटक आहे जो जेनेरिक औषधांच्या वापरास चालना देऊ शकेल. आपले prescription स्वतःहून नुतनीकरण करण्याची जी वृत्ती असते तिचा जनतेने त्याग करावा. मेडिकल दुकानात prescription  शिवाय जाऊन केवळ आपल्या ज्ञानाच्या जोरावर औषधे घेणे टाळावे. ह्या सर्व गोष्टीवर अन्न आणि प्रशासन विभाग लक्ष ठेऊ शकत नाही. 
 
काही वेळा रुग्ण डॉक्टरची फी द्यायच्या परिस्थितीत नसतो. अशा वेळी त्यांना आम्ही Over The Counter  औषधे देतो असे शेख म्हणाले.  
 
खरेतर औषधे ही फार्मासिस्टच्या उपस्थितीतच विकली जावीत. जनतेने इन्स्पेक्टरची भूमिका बजावत दुकानात फार्मासिस्ट कोठे आहे असा प्रश्न विचारावा. ज्याचा फोटो दुकानात फार्मासिस्टलावला आहे तो आणि विक्री करणारा हे दोघेही सारखे असल्याची पडताळणी करून घ्यावी. आपणास प्रश्न विचारायला शिकायला हवे असे श्री. हुकरे म्हणाले. 
 
३> सध्या भ्रमणध्वनीवर एक नवीन अँप विकसित करण्यात आले आहे. अन्न आणि प्रशासन विभागाची त्यास मान्यता आहे काय?
उत्तर - ह्याला कायदेशीर मान्यता द्यायचा सध्यातरी विचार नाही. स्पेलिंग लिहिण्यात रुग्णाने केलेली चूक जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून औषध घेऊ नये. 
 
४> Bio availability and Bio equivalence - ह्या विषयीचे भारतातील स्थिती काय आहे?
उत्तर - भारतात ह्या विषयावर संशोधन सुरु आहे. 
 
५>  ब्रैंडेडऔषधे MRP लाच का विकली जातात? त्यावर सूट का मिळत नाही?
 
उत्तर - केमिस्ट वर्गाला ब्रैंडेडऔषधाच्या विक्रीतून भरमसाट फायदा मिळतो हा गैरसमज आहे. केमिस्ट वर्गाला १६ - २०% टक्के फायदा मिळतो. बाकीचा खर्च वगळल्यास हे प्रमाण अगदी नगण्य राहते. फायद्याचा मोठा हिस्सा उत्पादन करणारी कंपनी घेते आणि म्हणून सूट देणे केमिस्टला परवडत नाही 
 
चिन्मयने वसईतील एका इंग्लंडहून शिकून आलेल्या आणि तिथे सराव केलेल्या डॉक्टरचा अनुभव सांगितला. १९६० - ७० च्या सुमारास अगदी प्रभावी असलेल्या औषधाचे कालांतराने जेनेरिक रूप बाजारात आले आणि मग ह्या औषधाची प्रभावितता इतकी कमी झाली की हल्ली ते बाजारात कोणास ठाऊक सुद्धा नाही. ह्या अनुभवावर आपली प्रतिक्रिया देताना तज्ञांनी अनेक औषध कंपन्याचे फुटलेले पेव हे ह्या मागचं कारण असू शकतं असं प्रतिपादन केले. नामांकित औषध कंपन्या अजूनही चांगली उत्पादने निर्मित करीत असल्याचा अनुभव आहे. 
 
६> Anti Biotics (बहुदा प्रतिजैविक हा मराठी शब्द) औषधांचा प्रभावीपणा कालांतराने कमी होत असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांना २० वर्षाचे वगैरे पेटंट देणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न करण्यात आला. 
 
बाकी शेवटी मग तज्ञांनी काही साध्या पण महत्वाच्या सूचना केल्या. आपले आजार डॉक्टरपासून लपून ठेवू नयेत. चुकीचे औषध स्वतःहून घेतल्यास त्याचे भयंकर दुष्परिणाम होतात त्यामुळे ते टाळावे. आपल्याला ताप वगैरे आल्यास त्याच्या वेळेनुसार नोंदी ठेवाव्यात; योग्य औषध लिहून द्यायला डॉक्टरला मदत होते. औषधांची वैधता कितीपर्यंत आहे हे नक्की पाहावे. चिन्मयने वसईतील डॉक्टरना prescription कसे द्यावे ह्यासाठी एक standard form तयार केला गेला असल्याची घोषणा करून डॉक्टरांना तो वापरण्याची विनंती केली. 
 
शेवटी आभारप्रदर्शन आणि राष्ट्रगीतानंतर एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
 

Sunday, May 10, 2015

Generic Medicine - चर्चासत्र

 

वसईतील जागरूक नागरिक संस्था आणि सुविचार मंच ह्यांच्या विद्यमाने वसईतील बंगली येथील लोकसेवा मंडळ हॉल इथे रविवार दिनांक १० मे रोजी सकाळी १० वाजता जेनेरिक मेडिसिन ह्या विषयावर एक परिसंवाद योजण्यात आला होता. ह्या परिसंवादात डॉक्टर, केमिस्ट आणि शासन ह्या तीन महत्वाच्या संस्थांच्या प्रतिनिधींना आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. डॉक्टर वर्गाचे प्रतिनिधित्व वसईतील सुप्रसिद्ध डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी, केमिस्ट वर्गाचे प्रतिनिधित्व पालघर जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री. अनीस शेख ह्यांनी तर शासनाचे प्रतिनिधित्व श्री. गिरीश हुकरे ह्यांनी केलं. ह्या परिसंवादात चर्चिल्या गेलेल्या काही महत्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा. 

http://patil2011.blogspot.in/2015/05/generic-medicine.html