Tuesday, June 30, 2020

अनुपमा १९६६


शनिवारी रात्री ९ वाजता जेव्हा मन साप्ताहिक सुट्टीमुळं निर्माण झालेल्या आनंदाच्या परमोच्च क्षणी असतं त्यावेळी लोकसभा वाहिनी सुरु करुन त्यावर कोणता चित्रपट दाखविला जात आहे हे मी बऱ्याच वेळा तपासुन पाहतो. काही अनमोल रत्नं ह्यावेळी प्रदर्शित केली जातात. काल रात्री प्रदर्शित केला गेलेला आणि आज दुपारी पुनर्प्रसारित केला गेलेला अनुपमा हे एक असंच अनमोल रत्न ! 

पत्नीवर अपार प्रेम असणारा पती तरुण बोस ! बाळंतपणात आपल्या पत्नीला गमावुन बसल्यावर आपल्या पत्नीच्या मृत्यूला आपली नवजात मुलगीच जबाबदार आहे असा ग्रह करुन घेतो; आणि आयुष्यभर बाळगत बसतो. तरीही आपल्या मुलीला योग्य शिक्षण मिळावं, तिचं लग्न एखाद्या सुस्थितीतल्या घरात व्हावं असं प्रेमळ पित्याला वाटणाऱ्या सर्व भावना त्याच्या मनात असतात. 

चित्रपटातील संगीत श्रवणीय ! 

धीरे धीरे मचल ये दिले बेकरार 
कुछ दिल ने कहा 
या दिल की सुनो दुनियावालो 

ही ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी !  सुंदर शर्मिला टागोर, देखणा धर्मेंद्र आणि बाह्यदर्शनी अल्लड रुप धारण करणारी शशिकला! शर्मिलेचे सौंदर्य मोहक ! भुमिकेतील शालीनता कायम ठेवत आयुष्यात धर्मेंद्र आल्यानंतरचा होणारा बदल तिनं सुरेख साकारलाय ! धर्मेंद्र एका क्षणी तिला म्हणतो सुद्धा - तु हसताना कधी आरशात पाहिलं आहेस स्वतःला ? तु किती सुंदर दिसतेस ते तुला जाणवेल! देवेन वर्माला जास्त वाव मिळत नसला तरी तो आणि डेविड ह्या चित्रपटातील विनोदी भूमिकांची गरज पार पाडतात ! डेविडची माहिती मायाजालावर शोधली असता तो बेणे इस्त्राईल वंशातील असुन मराठी भाषिक होता हा रंजक इतिहास सामोरा आला ! शशिकला पुर्वीच्या काळात खलनायिकेची भूमिका बजावणारी अभिनेत्री, पण इथं तिनं आधी अल्लड आणि मग नायक - नायिकेला मदतगार अशी सकारात्मक भुमिका बजावली आहे! चित्रपटातील सुरुवातीच्या काही प्रसंगांत दोन तीन वाक्य बोलुन धावत जातानाच ती दिसते! त्यामुळं हिला बहुदा चालता येत नसावं असा काही काळ माझा ग्रह झाला होता ! 

चित्रपटाची पातळी अभिजात. अर्थपुर्ण संवांदांची रेलचेल!  प्रत्येक प्रसंगांचा चित्रपट पुढं सरकण्यासाठी हातभार लावतानाच बऱ्याच वेळा चित्रपटांतील पात्रांच्या स्वभावांच्या छटा उलगडुन दाखवणारा ! आपल्या मालकाकडं आयुष्यभर  नजर वर करुन बघण्याची हिंमत नसलेली घरातील आया अगदी मोक्याच्या क्षणी शर्मिलाच्या आयुष्याविषयी त्याला दोन शब्द सुनावते. तिच्यापासुन स्फुर्ती घेऊन शर्मिला आपलं मनोगत पित्याला सांगते. त्यात आपल्या पित्याची मानसिकता तिनं ज्याप्रकारे समजावुन घेतली आहे ते केवळ अप्रतिम ! आपल्या पदरी ज्यानं केवळ उपेक्षा आणि रागाचं माप टाकलं त्याच्याविषयी तिरस्कारसदृश्य भावना असणं स्वाभाविक होतं आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांनी माफसुद्धा केलं असतं. पण ती त्याची मानसिकता समजावुन घेते. आईनं तुमच्या हृदयात जे स्थान प्राप्त केलं होतं तसंच स्थान मला कोणाच्या तरी हृदयात निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. हे ती एका दमात सांगुन टाकते. पिताही तिच्या टोक्यावर हात ठेऊन निःशब्द आशिर्वाद देतो. तुमचं एकाकीपण मी जवळुन पाहिलं आहे त्यामुळं तुम्ही केवळ एका शब्दानं हाक द्या, मी धावत येईन! जाता जाता ती सांगते! 

धर्मेंद्र कथानकाची गरज म्हणुन कथालेखक असतो असं जरी बराच काळ वाटत राहिलं तरी आपलं प्रेम प्रेयसींपुढं व्यक्त करण्यासाठी त्याला त्यानं लिहिलेल्या कादंबरीची बरीच मदत होते. भावना थेट व्यक्त करण्यात जास्त धोका वाटत असल्यास अशा अप्रत्यक्ष मार्गाचा प्रथम वापर करणे  ह्याला धोरणात्मक चाल असं म्हटलं जातं !

जाता जाता चित्रपटातील बंगला सुद्धा मला आवडुन गेला ! चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण महाबळेश्वर इथं झालं. त्यामुळं १९६६ च्या आसपास महाबळेश्वर किती सुंदर होतं हे पाहुन जीव हळहळला.  हे सारं आपण का गमावलं ?  ५४ वर्षांआधीचा चित्रपट रविवारी दुपारी पाहुन तो इतका परिणाम करु शकतो की पुढे ठाकलेल्या भरगच्च आठवड्याची चिंता करायचं सोडुन एक चिंतातुर जंतु रात्री अकरा वाजेपर्यंत जागुन ही पोस्ट लिहितो ! May be Sharmila effect! 

एक गोष्ट नमूद करायची राहुन गेली. हिंदी चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटांत परगावी एकट्याच निघालेल्या नायक - नायिकेचं चित्रीकरण असलेला हा अजुन एक चित्रपट. भारतीय रेल्वेने कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात अशी अनमोल भुमिका बजावलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची नावे सांगा! जा सिमरन जी ले अपनी जिंदगी !