Monday, December 30, 2013

ब्रायटन वास्तव्य - भाग ३


पहिल्या आठवड्यात गुरुवारी वगैरे श्रीकांत आणि माझी रवानगी बाजूला असणाऱ्या नेपियर हाउस मध्ये झाली. आम्हांला ली बार्नेट नेतृत्व करीत असलेल्या अमेरिकन एक्स्प्रेसच्या 'Development Center' संघाचे सदस्य बनविण्यात आले होते. अशा मोठ्या कंपन्यांचा कारभार मजेशीर असतो. युरो प्रोजेक्टचे व्यवस्थापन बघणाऱ्या अमेरिकन एक्स्प्रेसच्या गटाने ह्या बहुउद्देशीय आज्ञावलीच्या विकसनाचे काम 'Development Center' कडे सोपविले होते. त्यासाठी 'Development Center' ने गाय बैमफोर्डला आमचा व्यवस्थापक नेमले होते. युरो प्रोजेक्टचा स्वतःचा एक व्यवस्थापक होता आणि आम्हांला सिंटेलचा एक व्यवस्थापक होता. इकडे तिकडे चहूकडे आनंदी आनंद गडे!
नेपियर हाउस मध्ये स्थलांतर झाल्याचा एक फायदा झाला. आमच्या सिंटेलच्या व्यवस्थापकाची आमच्यावरील करडी नजर हटली. श्रीकांत वाक्चातुर्य वाखाणण्याजोग होत. त्याची अमेरिकेतील काही बिलं त्याला भरावी लागतं. त्यासाठी त्याने आधी एकदा सिंटेलकडे इंटरनेट अकाउंट मिळावे ह्याची विनंती केली होती. परंतु कंपनीच्या धोरणात हे बसत नसल्याने ती विनंती नाकारली गेली होती. त्याने एका आठवड्यात लीशी बोलणी करून इंटरनेट अकाउंट मिळविले सुद्धा! आता त्याला मिळालं म्हणून मलाही मिळालं! आमचे बाकीचे सहकारी आमच्याकडे काहीशा असुयेनेच पाहू लागले होते.
सुरुवातीच्या गरजेनुसार आम्हांला ६ प्रोग्रॅम्स लिहायचे होते. युरो प्रोजेक्टच्या व्यवस्थापक बॅरी गोसडेन बरोबर झालेल्या बैठकीनुसार फक्त २ प्रोग्रॅम लिहिण्यासाठीच्या बजेटला मान्यता मिळाली होती. त्यामुळे आमच्या कामाची व्याप्ती २ प्रोग्रॅम लिहिण्यापर्यंत मर्यादित झाली होती. २ प्रोग्रॅमर, ३ महिन्यांचा प्रोजेक्ट आणि फक्त दोन प्रोग्रॅम! बहुत नाइंसाफी हैं! साधारणतः पहिल्या शुक्रवारी मला ह्या सुखद बातमीचा अंदाज आला होता. त्या खुशीत मी त्या स्वरूपाचे आधी विकसित केले गेलेले प्रोग्रॅम आज्ञावलीच्या लायब्ररीत धुंडाळले. आणि ते काही मिनिटातच सापडले. ही अजून एक आनंद बातमी सांगण्यासाठी मी बाजूलाच बसलेल्या श्रीकांतला सांगण्यासाठी धावतच गेलो. साहेबाने ह्या क्षेत्रातील काही अधिक पावसाळे पाहिले होते. शांतपणे माझे बोलणे त्याने ऐकून घेतले. माझे, माझ्या चौकस बुद्धीचे कौतुकही केले. आणि मग मला त्याने अजून एक दोन प्रश्नही विचारले. त्यांची उत्तरे देऊन मी डेस्कवर आलो. क्षणभर विचार केल्यावर मला कळून चुकलं की साहेबानेही मी केलेला उद्योग केला होता. फक्त माझा उत्साह कायम राहावा म्हणून त्याने त्याची वाच्यता करण्याचं टाळल होतं! इंग्लंडातील पहिल्या शुक्रवारची संध्याकाळ होती. पुढील तीन महिन्याच्या कामाचं सोपं स्वरूप लक्षात येऊन चुकलं होतं. आयुष्य एकंदरीत मजेत चाललं होतं!
ब्रायटनच्या किनाऱ्याला लंब रेषेत धावणाऱ्या अनेक छोट्या गल्ल्या होत्या. ह्यातील एक दोन गल्ल्यांमध्ये बरीच भारतीय उपहारगृहे होती. ऑफिस सुरु झाल्यापासून तसे आमचे खाण्यापिण्याचे  हालच चालू होते. सकाळी आईने दिलेल्या लाडू, ठेपला इत्यादी गोष्टींवर न्याहारी भागवून न्यावी लागत असे. आणि दुपारच्या वेळी ऑफिसातील कॅन्टीनमधील बटाटा, बेक्ड बीन्स, चिकन टिक्का अशा पदार्थांनी बनविलेल्या सैंडविचवर करावी लागत असे. त्यामुळे शुक्रवारी रात्री एखाद्या भारतीय उपहारगृहात चिकन किंवा कोलंबी बिर्याणी (७ ते ८ पौंडात मिळणारी) हादडण्याचा मी मनसुबा आधीपासून मित्रांना सांगितला होता. आणि माझ्या इच्छेनुसार आम्ही हे भोजन केले. तिथल्या बिर्याणीत मसाल्यांचे प्रमाण कमी असल्याचे मला जाणवले. आणि हो शुक्रवारी संकष्टी वगैरे नाहीये ह्याची खातरजमा मी आधीच फोन करून आईकडून करून घेतली होती.
हॉटेलातील खोली अगदी मस्तच होती. सुरुवातीचे एक दोन दिवस (का रात्र) मी जरा एकटा झोपायला घाबरलोच! कारण भूताखेतांचे नव्हतं. ह्या हॉटेलात राहणारे काहीजण मद्यपान करून आपला गमावून बसत. मग ते असेच विमग्न अवस्थेत जिन्यावर बसून राहत. दुसऱ्याच रात्री गप्पा मारून अकरा वाजता पाचव्या मजल्यावरील खोलीत परतत असताना अशाच एका ब्रम्हांडी टाळी लागलेल्या म्हाताऱ्याशी माझी गाठ पडली. साहेब अगदी रस्ता अडवून बसले होते आणि मला जाऊ देण्यास अजिबात तयार नव्हते. मग खाली परत जावून मी उद्वाहक पकडून मी खोलीत परतलो. ह्या खोलीत प्रवेश करण्यासाठी हॉटेलने दिलेल्या कार्डाचा वापर करावा लागत असे. बाकी कडी वगैरे प्रकार नव्हता. आपल्या खोलीला दिलेले कार्ड आपल्याच खोलीसाठी चालावे आणि दुसऱ्या कोणाचे कार्ड आपल्या खोलीसाठी चालू नये ही किमान अपेक्षा! पण माझी दारुड्याची गोष्ट मी सर्वांना  सांगत असतानाच तिथे घाबराघुबरा झालेला वीपलब आला. तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत एका मद्यपी माणसाने त्या रात्री आपलीच खोली समजून प्रवेश केला होता. त्याची समजूत घालता घालता  वीपलबच्या नाकी नऊ आले होते. अ च्या म्हणण्यानुसार ही बनावट कथा होती!
आणि मग नंतर एका रात्री माझ्या  दारापाशी असाच एक मद्यपी कार्ड घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. मी मारुतीस्तोत्राचे स्मरण करीत स्वागतकक्षाला फोन लावण्याची तयारी ठेवली होती. सुदैवाने साहेब थकून निघून गेले. मारुती पावला होता!
बाथरूम मधील भला मोठा बाथटब मला आठवडाभर खुणावत होता. पण वेळ मिळत नव्हता. शनिवारी सकाळी मात्र ही संधी गमवायची नाही हे ठरवून मी त्यात गरमागरम पाणी भरून चांगला एक तासभर डुंबत राहिलो. अंघोळीनंतर आजूबाजूला असलेल्या दुकानातून बटर, चीझ ह्यांनी भरलेल्या सैंडविचवर आम्ही ताव मारला. त्यादिवशी हवामान अगदी मस्त होते. म्हणजे तापमान १७ डिग्री सेल्सिअस वगैरे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश. आम्ही एव्हाना ह्या तापमानाला चांगले सरावलो होतो. ब्रायटन पियर खुणावतच होता.


तिथे आमची पावले वळली. तिथे  प्रकारचे जत्रेतील खेळ खेळून आम्ही मनाचे समाधान करून घेतले. त्यादिवशी आम्ही अगदी जोरात होतो. सकाळी दहा वाजता बाहेर पडलेले आम्ही सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हॉटेलात परतलो.
 दुसरा आठवडा सुरु झाला होता. एकंदरीत कामाचे कमी प्रमाणातील स्वरूप गाय बैमफोर्डच्या ध्यानात आले होते, परंतु त्यानेही जास्त काही टेन्शन घेतलं नाही. तो माझी आणि श्रीकांत ह्यांची 'रूम विथ अ व्यू' असे सार्थक नाव असलेल्या रूम मध्ये दुपारी बैठक ठेवत असे. सुरुवातीच्या पाच दहा मिनिटात कामाची चर्चा आटोपली की चर्चेचा ओघ इंग्लिश प्रीमियर लीग (श्रीकांतचा प्रांत) आणि माझ्यासाठी क्रिकेट कडे वळत असे. ब्रायटनचे जुळे शहर असलेल्या होव शहरात १९९९ सालच्या विश्वचषकाचा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना झाला होता. गाय रात्रीच्या वेळी बारमधून बाहेर पडल्यावर त्याला सामना पाहून बाहेर पडलेले बरेच भारतीय दिसले होते आणि ते आनंदी दिसत होते असे त्याचे म्हणणे होते. परंतु तो सामना तर भारताने हरला होता अशी आठवण  मी त्याला करून दिली होती. त्यामुळे ते आनंदी असण्याची शक्यता कमी होती. बहुदा बारमधून बाहेर पडलेल्या गायला सारे जगच आनंदी दिसत असावे अशी शक्यता मी त्याला बोलून दाखविल्यावर तो मनमुराद हसला. त्या सामन्यात उत्तम फलंदाजी करणाऱ्या कॅलिसने कालसुद्धा (साडे चौदा वर्षानंतर ) भारताची पुन्हा धुलाई करत काही गोष्टी शाश्वत असतात ह्याची जाणीव करून दिली.
साधारणतः दुसऱ्या आठवड्यात माझी आज्ञावली तयार होती. गंमत अशी की इंग्लंडने अजूनही युरो चलन स्वीकारण्यास  संमती दर्शवली नव्हती. ह्या समान चलनाच्या नोटांवर राणीची छबी नसणार  म्हणून हा प्रकार अशी माझ्या सामान्य ज्ञानात भर गायने घातली.
'Development Center' मध्ये अनेकजण होते त्यातील काही नमुने ह्या प्रकारात मोडणारे! बिजू थॉमस हा केरळीय भारतीय, जॉन, स्टेसी, डॉमनिक आणि अजून एक थॉमस हे आडनाव असलेला तरुण ब्रिटीश. तुलनेने शांत असलेला हा गट श्रीकांतच्या आगमनानंतर गप्पांमध्ये अधिकाधिक रमु लागला होता. इंग्लिश लोकांची टर उडविण्याची अमेरिकन लोकांची आवडती सवय पाच सहा वर्षांच्या अमेरिकेच्या वास्तव्यात श्रीकांतने उचलली होती. ह्यातील बरेचजण चालतच ऑफिसला येत जात असत. डॉमनिक हा तसा खमका ब्रिटीश मध्यमवयीन गृहस्थ.  बऱ्याच वेळी शुक्रवारी हे सर्व जण दुपारी ऑफिसच्या जवळच असणाऱ्या पबमध्ये जेवणासाठी म्हणून जात. आपसूकपणे मद्यप्राशनही केले जात असे. मग लीची परवानगी घेऊन बरेचजण घरी पळ काढीत. अशा वेळी डॉमनिक आपले मन मोकळे करीत असे. माझी आज्ञावली दुसऱ्या आठवड्यातच तयार आहे ह्याची गुप्तहेरगिरी त्याने करून ठेवली होती. अशाच एका शुक्रवारी दुपारी त्याने मला आणि श्रीकांतला ही बातमी दिली. आणि ही बातमी स्वतः पाशीच ठेवण्याचे आश्वासनही दिले! डॉमनिक सायंकाळी पाच वाजले रे वाजले की घरी पळ काढी! एके दिवशी तो साडेपाच झाले तरी ऑफिसात रेंगाळत होता. तेव्हा श्रीकांतला न राहवून तो डॉमनिकपाशी गेला. डॉमनिक काही केल्या रहस्य फोडण्यास तयार नव्हता. तितक्यात बिजू आणि स्टेसी तिथे आले आणि डॉमनिकच्या सासूबाई घरी आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. डॉमनिक बिचारा शरमेने चूर झाला! जॉन काहीसा निराशावादी  होता. विम्बल्डन सुरु झालं की बरेच वर्षे इंग्लिश माणसाने ही स्पर्धा न जिंकल्याची खंत तो बोलून दाखवे! "This is that time of year. Delicious Strawberries are here, and no Brit in Wimbledon Quarterfinal" अशी प्रस्तावना करून त्याने आम्हाला सुंदर स्ट्रॉबेरी खाऊ घातल्या. श्रीकांत आपल्या पाककलेविषयी ह्या सर्वांकडे बऱ्याच बढाया मारीत असे. खमक्या डॉमनिकला ही त्याची गडबड सतत खुपत असे. त्यावेळी डॉमनिकचा दुसरा मुलगा अगदी तीन चार महिन्याचा होता. तरीही त्याने आपल्या पत्नीची घरी सर्व टीमला बोलाविण्याची परवानगी घेतली. श्रीकांत भारतीय स्वयंपाक करणार होता. सकाळी घर जसे असेल त्याच स्थितीत परत मिळाले पाहिजे ही अट घालून त्याच्या बायकोने ही परवानगी दिली!
(क्रमशः)
 

Sunday, December 29, 2013

ब्रायटन वास्तव्य - भाग २



दुसरे दिवशी सकाळी लवकरच जाग आली. आदल्या रात्रीच्या झटापटीनंतर ज्यावर तज्ञता मिळविली होती त्या नळातून येणाऱ्या गरम पाण्याने परदेशातील पहिले स्नान आटोपलं. ह्या हॉटेलात सकाळचा नास्ता हॉटेलच्या भाड्यात समाविष्ट असला तरी तो सकाळी एका विशिष्ट वेळेपर्यंतच उपलब्ध असे. त्यामुळे सर्वांना उठवून त्यांना आम्ही नास्त्यासाठी खालच्या मजल्यावरील भोजनकक्षात बोलाविले. हवेतील मस्तपैकी गारवा जाणवत होता. तापमान १३ डिग्री सेल्सिअस मुंबईच्या उन्हाळ्यातून आलेल्या आमच्यासाठी अगदी थंडच होते. नास्त्यासाठी विखुरलेले अंडे (scrambled egg) आणि बेक्ड बीन्स असला काही प्रकार होता. रात्रीचे जेवण न मिळाल्याने आम्ही त्याचा अगदी मनसोक्त आस्वाद घेतला.
आता आम्ही प्रिमियर लॉजमध्ये जाणार होतो. रविवार सकाळचे मस्त वातावरण होते. ब्रायटन हे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांची वर्दळ होती. आकाशात अचानक ढग येत आणि वातावरणात अजून थंडावा येई. धुकं अगदी रस्त्यापर्यंत येई.


प्रिमियर लॉजमध्ये आम्हाला वेगवेगळ्या मजल्यावर खोल्या मिळाल्या. बाकीचे सर्वजण दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर विभागले गेले होते आणि मी एकटाच पाचव्या मजल्यावर होतो. खोली क्रमांक ५२३! पुढील पाच- सहा आठवडे हे खोली माझी साथ देणार होती. बॅग खोलीत ठेवून आम्ही सर्वजण ब्रायटन दर्शनासाठी बाहेर पडलो. आमचा अजून एक सहकारी शिवा करुमाची एक आठवडा आधी आला होता. त्याचे वास्तव्यही ह्याच हॉटेलात होते. आपसूकच तो आमचा वाटाड्या बनला.  फारसा काही विचार न करता आमची पावले प्रथम ब्रायटन किनाऱ्याकडे वळली. ह्या स्वच्छ किनाऱ्याच्या दर्शनाने आम्ही अगदी प्रभावित झालो. ह्या किनाऱ्याचे वैशिष्ट्य असे की इथे वाळू नसून दगडी गोट्यांनी हा किनारा आच्छादिलेला आहे.


आम्ही ह्या सुंदर किनाऱ्याचे सौंदर्य न्याहाळत असतानाच अचानक स्कॉटिश नर्तकांचा एक समूह अचानक तिथे अवतरला. आणि बघता बघता त्यांनी आपआपल्या जागा ग्रहण करून एका सुंदर नाचाला आरंभ केला.


तो नाच पाच दहा मिनिटे चालला. तो सुंदर नाच संपल्यावर आम्ही उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला. परदेशातील पहिलाच दिवस अगदी अविस्मरणीय झाला होता. 'अ' आणि 'ब' ( आमच्यातील होऊ घातलेलं जोडपं) तर अधिकच खुश होतं. ह्यात एक गोष्ट. आमच्या व्हिसाला झालेल्या विलंबामुळे आमच्या आधी आमचे इतर सहकारी अमेरिकेला वगैरे जाऊन आले होते. आमच्यातील काहींच्या मनाला कोठेतरी ही गोष्ट लागून राहिली होती.  फिनिक्स हे त्यावेळचं अमेरिकन एक्स्प्रेसचे मुख्य ठिकाण असल्याने बरेचजण तिथे जावून आले होते. त्यांनी तेथील छायाचित्र वगैरे पाठविली होती. आमच्यातील एकजण उद्गारला, "थोडा विलंब झाला खरा पण चांगल्या ठिकाणी आलो, फिनिक्सपेक्षा तर चांगल्याच ठिकाणी!" वाक्याचा पहिला भाग जितका मनाला पटला तितकाच दुसरा खटकला! आनंद कसा निरपेक्ष असावा, दुसऱ्या कोणाशी तुलना नसावी!
दुपारचं जेवण मैकडोनाल्डमध्ये झालं. तिथे, हॉटेलच्या स्वागतकक्षात सदैव तत्कालीन इंग्लिश गाणी वाजवली जात असत. सुरुवातीच्या काळात ती कुठतरी माझ्या मनात अपुरेपणाची जाणीव निर्माण करीत. नंतर मग मला ब्रिटनी स्पिअर्सचे "उप्स आय डिड इट अगेन!" हे गाणे फार आवडू लागलं ही गोष्ट वेगळी!
शिवाने एका आठवड्यात एका बांगलादेशी माणसाचे टेक अवे शोधून काढलं होतं. म्हणायची गोष्ट अशी की सिंटेलच्या चेन्नई ऑफिसातून आलेले आमचे वीस पंचवीस सहकारी सुद्धा ह्याच हॉटेलात होते. त्यामुळे त्यांच्याकडून शिवाला बऱ्याच कामाच्या गोष्टी कळल्या होत्या. ह्या बांगलादेशीच्या दुकानात भात, दाल तडका, विंदालू वगैरे डिश मिळत. परंतु होम डिलिवरी नसल्याने वीसेक मिनिटाची पाय रपेट करून तिथे जावे लागे. सुरुवातीच्या काळी आम्ही सात आठ लोक मिळून एकत्र मेनू ठरवून ऑर्डर देत असू. त्यामुळे पदार्थांचे वैविध्य मिळे. पण नंतर पहिल्यांदा ज्यावेळी हिशेबाला मंडळी बसली तेव्हा एकेका पेनीच्या पातळीवर हिशेब करण्याची त्यांची खटाटोप मला आणि काही जणांना खटकली आणि मग आम्ही आमचा  एक छोटा गट स्थापन केला.
पहिल्या रात्री बांगलादेशियाच्या हातचं दाल भात आणि विंदालू खाऊन आम्ही गप्पा टप्पा मारीत असताना अ आणि वीपलबला आमच्या व्यवस्थापकाचा फोन आला. ऑफिसातील पहिल्या दिवशी ह्या दोघांनी सूट घालून यावे असे व्यवस्थापक साहेबांचं म्हणणं होतं. मनुष्यस्वभावाचे अनेक पैलू आपल्याला बघावयास मिळतात. हे दोघेही आपल्याला हा फोन आला म्हणून जितके खुश होते तितकेच दुसऱ्यालासुद्धा आला म्हणून नाखूष! पहिल्या दिवशी ज्यांना सूट घालून यायला सांगितलं ते भावी व्यवस्थापक, हा गर्भित संदेश आमचा सद्य व्यवस्थापक देऊ इच्छित होता आणि त्याचवेळी तुम्ही ह्यासाठी एकटेच उमेदवार नाही आहात ही जाणीव सुद्धा! बाकी आम्हांला टाय वगैरे लावण्याचा संदेश ह्या दोघांनी दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन, टायशी झटापट करून आम्ही तयार झालो. अमेरिकन एक्प्रेसची तीन वेगवेगळी ऑफिसे होती. ह्यातील अमेक्स हाउस एका भागात तर नेपियर हाउस आणि लान्चेस्टर हाउस दुसर्यां भागात होती. आम्हांला लान्चेस्टर हाउसमध्ये हजर व्हायचं होते. तिथे आमचा पाच जणांचा हा गट हजर झाल्यावर सर्व नजरा आमच्यावर खिळल्या आहेत असा आम्हांला भास झाला. दोघं सूटमध्ये, बाकी तिघं टाय वगैरे लावून अगदी पांढऱ्या शर्टात वगैरे! आणि बाकी सर्वजण रंगीबेरंगी कपड्यात! आता झालं असं की ऑफिस इंग्लंडात तरी हा गट अमेरिकन कंपनीची संस्कृती पाळण्यावर विश्वास बाळगून होता. प्रश्न असा होता की तरीही माननीय व्यवस्थापकांनी असा आदेश आम्हांस का द्यावा? व्यावसायिक जगतातील एक धडा आम्ही त्यावेळी शिकलो - "बॉस नेहमीच बरोबर असतो!" ह्या धड्यातील खरा अर्थ असा की बॉसच्या निर्णयाशी उघडपणे वाद घालू नये पण जमेल तितकं आपल्या मनाप्रमाणे वागावं. त्यानुसार प्रसाधनगृहाच्या पहिल्या फेरीत टायला रामराम करून मी डेस्कवर परतलो तेव्हा कुठं मला माणसात आल्यासारखं वाटलं.
आता थोडी गडबड झाली होती. इतक्या सगळ्या धावपळीत मला स्वतंत्र डेस्क नेमून द्यायला, त्यावर चालू स्थितीतील संगणक येण्यास आणि माझं स्वतःचा आयडी बनायला एक दोन दिवसाचा विलंब लागणार होता. त्यामुळे मला अमेरिकेतून आलेल्या सिंटेलच्याच श्रीकांत कोंडमबरोबर पहिले दोन दिवस डेस्क शेयर करावा लागला. म्हणजे तो काम करायचा आणि मी ते पाहायचो! साहेब अमेरिकेतून वगैरे आलेले असल्याने त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हा अभूतपूर्व हल्ला असल्याची त्यांना जाणीव होऊ लागली! त्यामुळे मला लवकरात लवकर वेगळी चूल मांडता यावी ह्यासाठी त्यांनी व्यवस्थापकांची पाठ काढली!
पहिल्याच दिवशी श्रीकांतने एका चर्चाखोलीत (कॉन्फरन्स रूम) मध्ये माझ्याशी मीटिंग ठेवली. आम्हां दोघांची युरो रुपांतरणीय कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय आज्ञावली लिहिण्यासाठी नेमणूक झाली होती! वाचून तुम्ही अगदी प्रभावित वगैरे झाला असाल ना! मी ही त्या बैठकीला जाण्याआधी असाच भारावून गेलो होतो. Euro Conversion - Utility Programs असे वाचल्यावर कोण प्रभावित होणार नाही? पण पहिल्याच दहा पंधरा मिनिटात चित्र स्पष्ट झालं होत. ह्यात सर्व युरोपिअन देशांच्या चलनाविषयीची माहिती साठवून येणाऱ्या प्रोग्रॅमच्या विनंतीनुसार  त्यांला ती परत द्यायची होती. श्रीकांत अजून अगदी गंभीर चेहऱ्याने मला ही माहिती देत होता. माझं एक आहे, मी तसा गंभीर असलो तरी ज्यावेळी एखादा गंभीरपणाची गरज नसलेला विषय गंभीरपणे मांडला जातो त्यावेळी मला राहवत नाही! मी सोळाव्या मिनिटाला श्रीकांतला थांबवलं, म्हटलं "साहेबा, हे तर साधे कोबोल प्रोग्रॅम दिसतात! बाहेरच्या दुनियेशी ठीक आहे पण आपल्यात मान्य करण्यात काय हरकत आहे?" श्रीकांत हसला. एका दीर्घकालीन मैत्रीस सुरुवात झाली होती.
तिसऱ्या दिवशी सायंकाळी साडे पाच वाजता ऑफिसातून हॉटेलात परतल्यावर  एक झोप काढण्याची इच्छा झाली. मित्रांना रात्रीच्या  जेवणासाठी मला तुम्ही उठवा असा निरोप ठेवून मी झोपी गेलो. त्यादिवशी सूर्य अगदी प्रखरपणे तळपत होते. एका गाढ झोपेनंतर माझे डोळे उघडले. सूर्यकिरणांनी खोली उजळून टाकली होती आणि घड्याळ सव्वासातची वेळ दाखवत होते. माझी दिशेची जाणीव अजून विकसित झाली नव्हती. मी हे सकाळचेच सव्वासात झाले असा समज करून घेतला आणि माझा पारा चढला. अ च्या खोलीत फोन लावला आणि थेट त्याला मला रात्री न उठविल्याबद्दल त्याची कानउघाडणी करण्यास सुरुवात केली. त्याला काय झालं हे समजण्यास फार वेळ लागला नाही. त्याने माझा हा समज दूर करण्याची काही घाई केली नाही उलट झालं गेलं विसरून ऑफिससाठी लवकर तयार हो असे सुचविलं! काही वेळानं मला काय झालं हे समजल्यावर मात्र माझी अगदी दयनीय अवस्था झाली. पुढे हा किस्सा आमच्या कंपूला बरेच दिवस माझी खेचण्यासाठी पुरला.
ह्या हॉटेलचा फायर अलार्म अगदी संवेदनशील होता. आणि ह्या हॉटेलात येणारे मद्यपी लोक त्याची संवेदनशीलता अगदी तपासून पाहण्यासाठी टपून बसलेले असत. बाथरूमचे दार उघडे ठेवून सचैल स्नान करण्याची त्यांची खासियत होती. पहिल्याच आठवड्यात त्यांनी भल्या पहाटे अडीच वाजता असे परीक्षण करण्याचा मानस केला. कर्कश असा फायर अलार्म बोंबलू लागल्यावर गाढ झोपेत असलेल्या मला काय होतेय हे कळायला एखाद मिनिट गेलं असावं. जाड रजईच्या आत फक्त टी शर्ट आणि शॉर्ट्स असा वेश परिधान केलेल्या मला हॉटेलच्या नियमानुसार घाईघाईत खोली सोडण्याची प्रबळ इच्छा झाली. फक्त पासपोर्ट आणि चलन घेऊन मी त्याच वेशात अशा वेळी एकत्र येण्याच्या ठिकाणी गमन केलं. तिथे वीस पंचवीस लुंगीधारी चेन्नई ऑफिसातील सहकारी हजर होते. ही घटना आजच्या दिवशी घडती तर मी नक्कीच त्यांना 'लुंगी डान्स, लुंगी डान्स' ह्या गीतावर नाच करण्यास भाग पाडले असते. त्या दृश्याचा आनंद एक दोन मिनिटंच टिकला. थंडीने आपला प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आणि माझी बोलती बंद झाली. पुढे अर्धा तासभर सर्वजण हास्यविनोद करीत होते आणि मी मात्र कधी एकदा उबदार खोलीत परतायला मिळेल ह्याची कुडकुडत वाट पाहत होतो.
(क्रमशः )

Wednesday, December 25, 2013

ब्रायटन वास्तव्य - भाग १


१९९९ सालच्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करून आम्हां सर्वांना दीड ते पावणे दोन वर्षे होत आली होती आणि त्यावेळच्या व्याख्येनुसार आम्ही परदेशप्रवासासाठी पात्र झालो होतो. कंपनीने आमच्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले होते. आम्ही सर्व मेनफ्रेम तंत्रज्ञानातील कलाकार! परंतु अचानक एक VB मधील संधी कंपनीकडे आली. त्या प्रोजेक्टमधील कामाचे स्वरूप पाहता आणि कंपनीचा आमच्या बुद्धिमत्तेवर (?)असलेला अगाध विश्वास पाहता आम्ही हे धनुष्य पेलवू शकू असा विश्वास कंपनीतील निर्णयकर्त्यांना वाटला. आणि एका महिन्यात आम्हाला अमेरिकेला जावे लागेल कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आमचे VB वर प्रशिक्षण सुद्धा सुरु झाले होते. आम्हांला VB शिकविणाऱ्या अनुभवी सहकारीला स्वतःला ह्या प्रोजेक्टवर अमेरिकेत जाण्याची इच्छा होती. त्यामुळे काहीशा नाखुशीनेच ती आम्हाला शिकवीत असे. पुढे क्लायंटने आमच्या एकंदरीत अनुभवाची (वा अननुभवाची) वगैरे छाननी करून आम्ही ह्या प्रोजेक्टसाठी अपात्र असल्याचा निष्कर्ष काढला. बाकी सर्वजण जरी काहीसे निराश  असले तरी मी मात्र सुटकेचा निःश्वास  टाकला.
आम्हां सर्वाना Y2K कामाचा पूर्वानुभव असल्याने कंपनीने मग त्यासारख्या प्रोजेक्टवर आमची तज्ञ म्हणून वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी कंपनीस अमेरिकन एक्प्रेस ह्या कंपनीचे इंग्लंड आणि अमेरिकेत एक मोठे प्रोजेक्ट मिळाले. ह्या प्रोजेक्टची विविध ठिकाणे होती. त्यात इंग्लंडमध्ये  ब्रायटनच्या  युरो चलनाचे मोठे काम सुरु होते. त्यासाठी आमच्या नावाचा विचार सुरु झाला. विचार पक्काही झाला. आणि साधारणतः मार्च महिन्याच्या सुमारास आमचं वर्क परमिट बनविण्याचं काम सुरु झालं. वर्क परमिट बनविण्याची ही प्रक्रिया फार हळुवार चालली होती. आम्ही आमच्या आधीच्या प्रोजेक्टचे (रंजू साहेबाचे प्रोजेक्ट) काम आम्ही आटोपतं घेत होतो. त्याचवेळी नवीन प्रोजेक्टवर IMS माहितीभंडारावर काम करायचे असल्याने प्रकाश गद्रे ह्यांनी आमचे त्यावर प्रशिक्षण सुरु केले.
मधल्या काळात आमची विसासाठी इंग्लंडच्या वकिलातीत भेट आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी वगैरे झाली. हो नाही करता आमचा विसा आला आणि १५ मेला आमची इंग्लंड प्रवासाची तारीख मुक्रर करण्यात आली. आमच्या घरी माझ्या बाहेरगावी राहण्याच्या क्षमतेविषयी दाट शंका व्यक्त करण्यात येत होती. माझा ह्या आधीचा बाहेरगावी राहण्याचा अनुभव शून्य होता. अकरावी, बारावी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात जरी होस्टेलला राहत असलो तरी साप्ताहिक सुट्टीला मी घरी येत असे. घरापासून सतत दूर राहण्याचा माझा विक्रम बारावीच्या परीक्षेत २२ दिवसांचा होता. त्यामुळे मी जाण्याआधी माझे मोठे काका म्हणाले, "**(माझे केवळ खास घरातील टोपणनाव) एखाद महिन्यात परत येईल का काय?"
इंग्लंडला जाताना २० किलोच्या फक्त एकाच बॅगेला परवानगी होती. इंग्लंडमध्ये वास्तव्य असल्याने तेथील ऑफिसात परिधान करण्याच्या वेशाविषयी आमच्या मनात उगाचच दहशत बसविण्यात आली होती. फिक्या रंगांचे शर्ट आणि आणि गडद रंगांच्या पैंट असा ड्रेसकोड आम्हांला सांगण्यात आला होता. मी त्याहून पुढे जाऊन तीन पांढरे आणि दोन फिके निळे शर्ट  आणले. बाकी मे महिना असल्याने जॅकेट आणि ग्लॉवजस् इंग्लंडमध्ये जाऊन विकत घेतले तरी चालेल असा सल्ला आम्हांला  देण्यात आला. ठेपले, घरचे लाडू, घरचा खास मसाला असे जिन्नस २० किलोत घुसविण्यात आले.
आमची तिकिटे गल्फ एयर ह्या कंपनीतर्फे आरक्षित करण्यात आली होती. मुंबई ते बहारीन, मग सहा तासाचा थांबा आणि त्यानंतर बहारीन ते हीथ्रो असा आमचा प्रवास होता. आमचा सहा जणांचा कंपू होता. त्यातील रमेशचा वैद्यकीय परीक्षेतील अहवाल थोडासा प्रतिकूल आल्याने त्याचा प्रवास लांबणीवर पडला. मी, विपलब, शेषासाई, आणि अजून दोघे असे पाचजण राहिलो. हे दोघे (एक मुलगा आणि आणि मुलगी) माझे खास मित्र होते.  ह्यांची एंगेजमेंट झाली होती. परंतु लग्नाच्या निर्णयाला दोघांच्या घरून विरोध असल्याने त्यांचे लग्न लांबणीवर पडलं होतं. ह्यातील मुलगा (त्याला 'अ' संबोधूया) हा परदेशवास्तव्य करून वगैरे आलेला होता. त्याच्या आधारावर इंग्लंडमधील सुरुवातीच्या दिवसात आम्हाला स्थिरस्थावर होण्यास मदत होईल अशी आशा आम्ही बाळगून होतो.
माझ्या आईला माझ्याविषयी फार चिंता असल्याने तू त्याला धरून राहा असा तिने मला सल्ला दिला होता. परंतु निघण्याआधी त्या दोघांच्या कंपूत काहीसे तंग वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रवासाविषयी सुद्धा अनिश्चितता निर्माण झाली. आमचे विमान मुंबईहून सकाळी तीनच्या सुमारास निघणार होतं.  बहिण अंधेरीला राहत असल्याने तिच्या घरी घरचे सर्वजण बॅगेघेऊन पोहोचले होते. सिंटेल परकीय चलन आणि पारपत्र अगदी शेवटच्या दिवशी देत असत. ते घेऊन आणि अगदी शेवटच्या क्षणाची खरेदी आटपून मी बहिणीच्या घरी साडेआठला पोहोचलो. जेवण आटपून दोन तीन तास झोपण्याचा अयशस्वी प्रयंत्न करून आम्ही सर्व विमानतळावर एक वाजेपर्यंत पोहोचलो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अ न आल्याने मी काहीसा आणि माझ्याहून अनेक पटीने आई चिंतेत होती. अगदी विमानतळावर प्रवेश करण्याच्या क्षणी ते दोघे आले आणि आईने सुटकेचा निःश्वास टाकला.
बाकी विमानप्रवासाचा माझा हा पहिला अनुभव. अ आणि विपलब सोडले तर बाकी सर्वांची हीच गत!  त्यामुळे एकमेकासोबत राहून आम्ही विमानाच्या गेटपर्यंत मजल मारली. बाकी विमानाने गेटपासून ते मुख्य धावपट्टीपर्यंत काही काळ TAXIING केले. त्यावेळी हे आता कधीही उड्डाण करेल की काय असे मला सतत वाटत होते. अ मात्र शांत होता. एका क्षणी मात्र विमानाची गती थांबून ते स्थिरस्थावर झाले. अ कडे माझे लक्ष गेले. त्याने दोन्ही हात जोडले होते. मी ही मनातल्या मनात देवाला नमस्कार केला. आणि मग विमानानं उड्डाणासाठी जोरदार धाव घेतली. बहारीनपर्यंत प्रवास तसा शांत झाला. अ मला एकदा म्हणाला होता. तो ज्या ज्या वेळी विमानप्रवास करी त्यावेळी त्याचे वडील पूर्ण प्रवासाच्या दरम्यान टीव्हीवर बातम्यांचे चॅनेल लावून बसत असत. एकदा तो पोहोचल्याचा फोन आला की टीव्ही बंद!
बहारीनला आम्हाला पुन्हा एका सुरक्षातपासणीतून जावे लागले. त्यावेळी शेषासाईच्या बॅगेत अरब सुरक्षा अधिकाऱ्यांना काहीतरी सापडले आणि त्यामुळे त्याची तपासणी सुरु होती. आम्हांला थोडी भीती वाटली पण त्याला मग सोडून देण्यात आले. सहा तासांचा थांबा असल्याने हा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता. शॉपिंग मॉल होते पण आताच खरेदी करण्यात काही अर्थ नव्हता. थोड्या वेळाने भूक लागल्यावर आम्ही सर्वांनी मैकडोनाल्डकड़े मोर्चा वळविला. मी पुढाकार घेऊन २० पौंडांची पहिली नोट मोडली. परकीय चलनातील माझा हा पहिला खर्च. बाकी विमानतळावरून बहारीनच्या रस्त्यावरील रहदारीचे दृश्य दिसत होते. शेवटी एकदा लंडनच्या विमानउड्डाणाची वेळ जवळ आली. तिथे काहीसा गोंधळ झाला होता आणि गेटवर तीन अरब तावातावाने काहीतरी बोलत होते. मला कधीएकदा ह्या अरबांच्या देशातून बाहेर पडतो असे वाटू लागले. शेवटी आम्ही एकदाचे निघालो. आता प्रवाशी बदलले होते. वातावरणात अभावितपणे उच्चभ्रूपणा आला होता.
लंडनला विमान पोहोचल्यावर तेथील ढगाळ वातावरणाने आमचे स्वागत केले. विजाही चमकत होत्या. एव्हाना सायंकाळ झाली होती. लंडनच्या त्या ढगाळ हवामानातील पहिल्या दर्शनाने मी त्याच्या प्रेमात पडलो. सुंदर, पारंपारिक पद्धतीच्या इमारती, आखीव रेखीव रस्ते, ढगांच्या मधून हेलकावे खात जाणारं आमचं विमान, मी एकदम खुश झालो. आम्हांला काही काळ हवेत घिरट्या मारायला लावल्यानंतर शेवटी एकदाची आम्हाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. तिथे आगमनकक्षात विविध अधिकारी येणाऱ्या प्रवाशांच्या कागदपत्राची पाहणी करून त्यांना इंग्लंडमध्ये अधिकृत प्रवेश देत होते. माझा रांगेचा अंदाज चुकला बहुदा! माझ्या सर्व सहकाऱ्यांची तपासणी पूर्ण होवून सुद्धा मी रांगेतच होतो. मग माझ्या आधीच्या कोरिया वगैरे भागातून आलेल्या महिलेच्या कागदपत्रात काहीसा गोंधळ निघाल्याने अजून वेळ झाला. त्यामुळे वैतागलेल्या त्या अधिकारी स्त्रीने माझ्याकडे इंग्लंडमधील वास्तव्याचा कायमचा पत्ता मागितला जो माझ्याकडे नव्हता. मग तिने आठवड्याभरात हा पत्ता पाठविण्याचे माझ्याकडून आश्वासन घेवून मला सोडलं. मी धावतच माझ्या बॅगेकडे गेलो. बिचारी ती एकटीच माझी वाट पाहत होती. ती घेतल्यावर बाहेर माझे सहकारी माझी वाट पाहत थांबले होते. आमच्याकडे दोन पर्याय होते. एक रेल्वेचा आणि दुसरा बसचा! आम्ही बसची निवड केली. सायंकाळचे आठ वाजले तरी आकाशात संधिप्रकाश व्यवस्थित होता. थोड्या वेळात एक अवाढव्य बस आली त्यात आम्ही बसलो. आमच्या बॅगा बसच्या पोटात टाकण्यात आल्या. मी खिडकीजवळची जागा पटकावली. शुक्लपक्षातील अष्टमीचा चंद्र आकाशात आपली प्रभा पसरविण्याचा प्रयत्न करीत होता. हीथ्रोचा पसारा इतका अवाढव्य की तिथून बाहेर पडण्यासच आमच्या बसला पंधरा वीस मिनिटं लागली. एकदा बसने विमानतळ सोडल्यावर तिचा वेगाने प्रवास सुरु झाला. काही वेळात लंडनही सुटलं, अजूनही संधिप्रकाश आणि उजळलेला अष्टमीचा चंद्र ह्यांची जुगलबंदी सुरूच होती. मध्येमध्ये थांबे येऊ लागले आणि प्रवाशी उतरू लागले. मला माझ्या प्रिय बॅगेची काळजी असल्याने मी खिडकीतून प्रत्येकवेळी कोणी माझी बॅग तर नेत नाहीये ना ह्याची शहानिशा करीत होतो. चिंतातूर जंतू  तो चिंतातूर जंतू!
शेवटी एकदा बसने ब्रायटन मध्ये प्रवेश केला. ब्रायटनच्या रात्रीच्या अतिसुंदर दर्शनाने मी भारावून गेलो. शनिवार रात्र होती. नवयौवना आणि नवतरुण ह्यांचा रस्त्यावर उत्साहपूर्ण वावर सुरु होता.
ही लग्नाआधीची भेट असल्याने पुढील प्रत्येक भेटीत फोटो काढणारी प्राजक्ता माझ्यासोबत नव्हती. त्यामुळे ह्या भेटीचे माझ्याकडे फोटोच नाहीत! ही एक खंत ! इंटरनेटवरून काही फोटो मिळवून ते मी इथे टाकतोय!


पहिल्या रात्रीच्या हॉटेलच्या आरक्षणाचा गोंधळ झाला होता. चौघांचे आरक्षण एका हॉटेलात आणि पाचव्याचे दुसऱ्या हॉटेलात असला प्रकार होता. आम्ही चौघे आधीपासूनचे ओळखीचे आणि विपलब दुसऱ्या प्रोजेक्टमधून आलेला आणि तोही तसा अनुभवी. त्यामुळे त्याची इच्छा नसताना आम्ही त्याची त्या दुसऱ्या हॉटेलसाठी निवड केली.
आम्ही बस स्टॅंड ते हॉटेल अशी टॅक्सी केली ती भीतभीतच! पण तीन पौंडांच्या आत बिल आल्यावर आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. त्या हॉटेलात खालच्या मजल्यावर इंग्लिश मंडळी पबमध्ये मद्याचा आस्वाद घेत बसली होती. चेकइन नंतर त्यांच्या नजरांना दाद न देत आम्ही आमच्या बॅगा उद्वाहकात शिरविण्यात यश मिळविले. खोल्या अगदी प्रशस्त होत्या. हा एका रात्रीचाच मुक्काम होता दुसऱ्या दिवशी आम्हांला प्रिमियर लॉज मध्ये जायचं होतं. ह्या हॉटेलातील नळांची योजना काहीशी गडबडीची होती. गरम पाणी, थंड पाणी आणि शॉवर हे समजून घेताना मी थंड पाण्याच्या फवाऱ्याने ओलाचिंब झालो. तितक्यात मला शेषासाईचा फोन आला. "आदित्य, ये पानी का क्या चक्कर है रे?" एकदा ओलाचिंब झाल्यावर मी ज्ञानी झालो अशी समजूत करून घेत मी लगेच त्याच्या खोलीत गेलो. तिथे माझ्या अनुभवाचे बोल त्याला ऐकवले. दुर्दैवाने त्याच्या खोलीतील नळांची योजना थोडी वेगळी होती. त्यामुळे माझ्या मार्गदर्शनानुसार वागताना तोही ओलाचिंब झाला. "आदित्य, क्या रे इतने ठंड में तुमको मस्ती करने को होता? शेषाने आपल्या चेन्नई एक्स्प्रेस हिंदीत मला सुनाविले.
रात्री जेवण मिळण्याची आशा नव्हती. बॅगेतील एक ठेपला काढून आणि त्यावर त्या नळातील पाणी पिऊन मी साधारणतः  साडेअकराच्या सुमारास निद्राधीन झालो!

Tuesday, December 24, 2013

मुंबईचा संभ्रम

marathiblogs
Marathi
 
 
कार्यालयात गेले एक दोन महिने अगदी व्यग्र गेले. मेंदूला म्हणावी तशी विश्रांती मिळाली नाही. त्यामुळे ह्या नाताळच्या सुट्टीची डोळे लावून वाट पाहत होतो. सुट्टीच्या पहिल्या दोन दिवसात सुद्धा कामाने घुसखोरी केली. आता मात्र थोडी शांतता! पण अजून मनातील कार्यालयातील कामाचे विचार पूर्ण निघाले नाहीत. ह्याच विचारांचा थोडा दैनंदिन दिवसात वापर करायचा म्हटला की मग काहीतरी भन्नाट सुचतं. आता ते भन्नाट असं मला वाटतं, तुम्हांला काय वाटत ते माहित नाही. पण हो सतत लेखन चालू ठेवायचं म्हणजे आत्मविश्वास कसा दांडगा पाहिजे! :)
कार्यालयात कर्मचाऱ्याच्या कारकिर्दीतील पुढील वाटचालीची चर्चा appraisal च्या काळात केली जाते. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला एखाद्या विषयात खोलवर जाण्यात रस आहेत की एकमेकांशी संबंधित असलेल्या अनेक विषयांचे जुजबी (अगदीच जुजबी नव्हे!) ज्ञान घेऊन  व्यवस्थापक वगैरे बनण्यात रस आहे ह्याविषयी चर्चा होते. म्हणजे Deep की wide! मराठीत म्हणायचं झालं तर सखोल की विस्तृत!
हा विचार सुट्टीच्या चौथ्या आणि खऱ्याखुऱ्या पहिल्या दिवशी असाच मनात डोकावत राहिला होता. मग असंच मन मुंबईसारख्या महानगरात जीवन जगणाऱ्या (की ओढत नेणाऱ्या) मध्यमवर्गीय माणसाकडे वळलं. ह्या माणसाच्या मनात अशाच अनेक भावना असतात, त्याला अनेक कर्तव्य पार पाडायची असतात मग तो एखाद्या भावनेत खोल जातो की असाच अनेक भावना आणि कर्तव्य ह्यांच्या गर्दीत हरवून जातो?
माणसाचे कार्यालय आणि प्रवास हे सोडून बाकी मिळणारा वेळ म्हणजे त्याचा फुरसतीचा वेळ. ह्या वेळेवर हक्क मागणाऱ्या अनेक गोष्टी. ह्यातील काही कर्तव्य म्हणून पार पाडाव्या लागतात तर काही मनाला पुन्हा नव्या जोमाने जीवनसंघर्षाला तोंड देण्याचा उत्साह देतात. पहिल्या प्रकाराला केवळ कर्तव्य आणि दुसऱ्याला स्फूर्तीदायक असे म्हणूयात. 
१> सांसारिक जबाबदाऱ्या - ह्यात घरातील बिले भरणे, किराणा माल भरणे, मुलांचा अभ्यास घेणे अथवा त्यांना शिकवणीला किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरु असलेल्या उपक्रमांना आणणे - सोडणे ह्यांचा समावेश होतो. हल्ली त्यात मॉल भेट ह्या गोष्टीचा समावेश झाला आहे. मॉल भेट हा महिलावर्गाचा छंद असला तरी ते  पुरुषमंडळींचं कर्तव्य बनू पाहत. 
२> नातेवाईक भेट, समारंभाला उपस्थिती - ह्या गोष्टी  कर्तव्य आणि स्फूर्तीदायक ह्यांच्या सीमारेषेवर रेंगाळत असतात. 
३> मित्रमंडळी भेट - ही नक्कीच स्फूर्तीदायक प्रकारात मोडते. 
४> सामाजिक कार्य - हे आपल्या मनाला बरेच समाधान मिळवून देतात. 
५> छंद - हे फार महत्वाचे असतात. कार्यालयातील, वैयक्तिक जीवनातील संघर्षापासून आपणास हे काही अलौकिक क्षण मिळवून देतात. ह्यात आपल्याला आपल्या मनाशी खोलवर संवाद साधता येतो. 
 
माझ्या मतीनुसार केलेल्या ह्या वर्गवारीकडे पाहता असे जाणवते की मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या बहुतांशी मध्यमवर्गीयांचा ९० टक्के मोकळा वेळ हा पहिल्या दोन प्रकारात मोडतो. सुदैवी लोकांना मित्रमंडळीचा सहवास मिळतो. पण त्यात मदिराप्राशनाने प्रवेश केल्याने मी नाराज आहे!
 
लेखाचा खरा मुद्दा! मुंबईसारखं महानगर सामान्य माणसाला सामाजिक कार्य आणि छंद ह्या मनाला नवी उभारी देणाऱ्या गोष्टी करू देण्याची संधी देत का? किती लोक गायन, वाचन, लिखाण, भटकंती ह्या गोष्टी शहरात राहून जोपासू शकतात? आणि गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट अशी की ही परिस्थिती गेल्या काही वर्षात निर्माण झालेली आहे. एकतर शहर भयानक प्रमाणात गर्दीचं बनलंय आणि लोकांच्या नोकऱ्या अधिकाधिक तणावाच्या होत चालल्यात. हे सर्व नोकरीला सर्वस्व मानणारे आणि चित्रपट पाहणारे , महागड्या हॉटेलात चवीचे पदार्थ हादडणारे लोक पाहिले की त्यांना एकच जाणीव करून द्यावीशी वाटते की बाबांनो साठीनंतर ह्यातील एकही गोष्ट तुमच्या साथीला नसणार! तुमचा मोकळा वेळ तुम्हांला खायला उठणार!
आता शहराच्या वाढीमध्ये शहरातील नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांना असा फुरसतीचा वेळ मिळवून देण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सांस्कृतिक वातावरण कायम ठेवण्याची जबाबदारी शासनकर्त्यांनी पार पाडावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे काय?
 
असो त्यामानाने वसईतील परिस्थिती थोडीफार बरी. आठवडाभर लोकल प्रवासाने दमलेला वसईकर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मात्र राजा असतो! त्याच्या मनाला उभारी देणारे नातेवाईक, मित्र ह्यांना कोणत्याही रहदारीत न सापडता भेटण्याची मुबलक संधी अजूनही त्याला उपलब्ध आहे. एकंदरीत काय तर महानगरातील मानसिक  स्वास्थ्य  ही एक दुर्मिळ बाब बनत चालली आहे.
 
 
 

Sunday, December 22, 2013

वार्षिक कामगिरीचा आढावा - Appraisal

Marathi
 
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा घेतला जाणारा वार्षिक आढावा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.  चर्चेदरम्यान होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनानुसार त्यांची बढती, बोनस  आणि पगारवाढ इत्यादी इत्यादी गोष्टी अवलंबून असल्याने ह्या चर्चेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. 
वर्षाच्या प्रारंभी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडून कंपनीची उद्दिष्टे ठरवली जातात. त्यानंतर ही ध्येये कंपनीच्या विविध पातळीवर, विविध विभागात ज्येष्ठतेनुसार, त्या विभागाच्या कामाच्या स्वरूपानुसार विभागली जातात. ही विभागणी करताना ह्या उद्दिष्टमधील संदिग्धता जाऊन तिथे अधिकाधिक पारदर्शकता येणे अपेक्षित असते. जसे की कंपनीने आर्थिक बचतीचे वार्षिक ध्येय १५ टक्के ठरविल्यास एका विशिष्ट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याला उपलब्ध असणाऱ्या प्रक्रियांतील कोणत्या प्रक्रियात ही बचत करण्याची संधी उपलब्ध आहे ह्याचे मार्गदर्शन व्यवस्थापकाने करणे अपेक्षित आहे. 
हे मुल्यमापन जरी वर्षाच्या शेवटी होत असले तरी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यास वेळोवेळी त्याच्या कामगिरीविषयी आपली मते ( Feedback) देणे आवश्यक आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची कामगिरी अपेक्षेनुसार होत नसल्यास त्याला तो संदेश देण्याची चर्चा सोपी नसते. त्यामुळे ही चर्चा वर्षअखेरीपर्यंत टाळण्याकडे व्यवस्थापकाचा कल होऊ शकतो. परंतु ते चुकीचे आहे. अशा चर्चेत व्यवस्थापकाने केवळ आपली मते मांडण्याचे टाळावे. ही मते मांडताना त्याला सुसंगत अशी उदाहरणे देणे आवश्यक असते. ह्यालाच अनुसरून गेल्याच आठवड्यात अजून एक सुंदर मुद्दा वाचला. एखाद्या कर्मचाऱ्याकडून चूक घडल्यास त्याच्याबरोबर नक्की काय चुकले ह्याचे सखोल विश्लेषण २४-४८ तासाच्या आत करावे. ह्या कालावधीत त्या चुकीच्या गांभीर्याचा, परिणामाचा प्रभाव कर्मचाऱ्याचा मनावर कायम असतो. त्यानंतर मात्र त्याला ह्या चुकीचे गांभीर्य कमी प्रमाणात वाटू लागते. ही चर्चा चुकीचे परिणाम निस्तरून झाल्यानंतरच करण्याची काळजी घ्यावी. जसे की चूक त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याच्या चांगल्या कामगिरीचे, त्याने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक त्याचवेळी करावे. 
व्यवस्थापकाने एखाद्या टीमचे काही काळ व्यवस्थापन केल्यावर त्याचा वैयक्तिक स्वभाव, कर्मचाऱ्यांचे स्वभाव आणि त्या कालावधीत झालेली आणि व्यवस्थापकाने नोंदलेली संघातील कर्मचार्यांची कामगिरी ह्या घटकांवर अवलंबून काही गोष्टी घडतात. व्यवस्थापकाचा ह्या कालावधीत काही कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर खास विश्वास बसतो. कठीण काळी हेच कर्मचारी आपल्या मदतीला धावून येतील असे त्यास वाटू लागते. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आव्हानात्मक संधी मिळू शकतात. आणि त्यात त्यांनी चांगली कामगिरी केल्यास वर्षअखेरीस त्यांना चांगले मुल्यमापन मिळू शकते. हे लक्षात घेता व्यवस्थापकाने वेळोवेळी आपल्या मनात काही पूर्वग्रह निर्माण झाले आहेत काय ह्याचे परीक्षण करावे. 
कधीकधी ही चर्चा तणावपूर्व होते. कर्मचारी आपले संतुलन घालवू शकतो आणि मग व्यवस्थापकाच्या कार्यशैलीविषयी प्रश्न उपस्थित करतो. वातावरण अजून बिघडल्यास व्यवस्थापकाच्या पात्रतेविषयी सुद्धा प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. अशा वेळी व्यवस्थापकाने आपले संतुलन कायम राखणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याची प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत जरी योग्य नसली तरी त्यातील मुद्दा कितपत योग्य आहे ह्याची शहानिशा करावी. कधी कधी व्यवस्थापकाला आपली चूक उमजते. अशावेळी ही चूक कर्मचाऱ्यासमोर कबूल करावी की ती मनातल्या मनात मान्य करून त्यानुसार योग्य सुधारणा करावी ह्याचा निर्णय त्याला घेता आला पाहिजे. 
अर्थात काही वेळा व्यवस्थापकाची गोची झालेली असते. तो मांडत असलेली भूमिका त्याला १०० % मान्य असते असेही नाही. त्या भूमिकेविषयी त्याने योग्य ठिकाणी वाद घालून झालेला असतो. परंतु ह्या चर्चेच्या दरम्यान त्याला ते सर्व विसरून व्यवस्थापनाची भूमिका मांडावी लागत असते. 
काही कर्मचारी अशा चर्चेत अतिशय समजूतदारपणा दाखवून व्यवस्थापकाला सुखद धक्का देतात. दरवर्षी एकाच कर्मचाऱ्याला क्रमवारीत उच्च स्थान मिळणे शक्य नाही, एखादी वर्षी कमी आर्थिक लाभ मिळाला तरी आकाशपाताळ एक करण्याची गरज नाही. आयुष्य फार मोठे आहे त्यात ही एक तुलनेने छोटी गोष्ट आहे असे व्यवस्थापकाचे नेहमीचे बोल ते मनापासून कबूल करतात. 
काही कर्मचारी आपली निराशा मनातच ठेवतात. ह्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळणे शक्य नाही अशी स्वतःची त्याने ठाम समजूत करून घेतलेली असते. त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी योग्य संधी मिळेल काय ह्याच्या शोधात असतात. व्यवस्थापकास चर्चेद्वारे असे कर्मचारी ओळखता आले पाहिजेत. त्यांना बोलतं करून मुख्य प्रवाहात सामील करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. 
चर्चेचा हा कालावधी बऱ्याच संवेदनशील व्यवस्थापकांसाठी कसोटीचा ठरतो. अशा चर्चा संपल्यावर सुटकेचा निश्वास टाकला जातो. ह्या वेळातच ह्या व्यवस्थापकांचा व्यवस्थापक त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करतो. तेव्हा आपलीच तत्वे, आपल्याच हुशाऱ्या आपल्यावर वापरल्या जाण्याचा अनुभव व्यवस्थापकाला येतो. त्यामुळे बहुदा अशा चर्चा थोडक्यात आटोपतात. 
शेवटी एक मुद्दा!  वार्षिक मूल्यमापन हे काही १०० टक्के शास्त्र नाही. त्यात आपला व्यवस्थापक त्याची सद्सदविवेकबुद्धी वापरून हे मूल्यमापन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे जाणवत असल्यास, कर्मचाऱ्याने आपल्या व्यवस्थापकाविषयी १ टक्का तरी सहानुभूती बाळगावी! शेवटी एक हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आठवा! हे मूल्यमापन आपल्या वर्षातील पूर्ण कामगिरीचे होत आहे; त्यातील एखाद्या मुद्द्याचेच होत नाही ह्याची  काळजी घेणे  ही दोन्ही बाजूंची जबाबदारी आहे. 
 
 
 
 


Thursday, December 19, 2013

मेड (Maid) इन अमेरिका ते मेड (Maid) इन बोरीवली!


देवयानी प्रकरणावर मतप्रदर्शन करावे असे ठरवून बसलो तर 'Random Thoughts' वर ह्याच विषयावर लिहिलेला अतिशय सुंदर लेख वाचनात आला. त्यात ह्या विषयावर अगदी सखोल विश्लेषण दिले गेले आहे. त्यामुळे त्यावर मी मोजके लिहीन असे म्हणतो.
मुद्दा असा की अमेरिकेत कोणत्याही क्षेत्रात प्राथमिक पातळीवर काम करणारे लोक अगदी यंत्रमानवाप्रमाणे दिलेल्या नियमानुसार काम करीत असतात. फारसं डोक लढविण्याचा प्रयत्न करीत नाहीत आणि बरेचसे जण थोडीजरी वेगळी परिस्थिती निर्माण झाली तरी गांगरतात. आता देवयानीची ज्या महिला अधिकाऱ्याने झडती घेतली तिला सामान्य गुन्हेगाराची अशा पद्धतीने झडती घेण्याचे आदेश असतील. त्यानुसार तिने ही झडती घेतली असावी. आपण जिची झडती घेत आहोत ती कोणी राजनैतिक अधिकारी आहे आणि तिच्यासाठी आपण वेगळे नियम वापरावेत इतकी तसदी घेण्याचा तिने त्रास घेतला नसावा. ही झाली एक शक्यता. किंवा मग 'Random Thoughts' मध्ये म्हटल्याप्रमाणे दोन मोठ्या राष्ट्रांच्या बुद्धिबळाच्या खेळातील ही अमेरिकेने विचारपूर्वक केलेली खेळी असावी. आता अमेरिकेने ह्या विषयावर वक्तव्य देण्यासाठी भारतात जन्मलेल्या अमेरिकन अटर्नी पद भूषविणाऱ्या प्रीत भरारा ह्यांचीच निवड करावी ही अजून एक लक्षात घेण्यासारखी बाब! असो आधी म्हटल्याप्रमाणे मी इथे ह्या विषयावर आटोपते घेतो!
अमेरिकेत ही घडामोड होत असताना बोरिवलीत सुद्धा एक मेड (maid) नाट्य घडत होते. झालं असं की गेल्या आठवड्यात ३ दिवसाची दीर्घ साप्ताहिक सुट्टी घेऊन आम्ही बोरिवलीला परतलो, त्यावेळी चपाती, भाजी करायला येणाऱ्या कामवालीवर (ह्या पुढे तिला तारणहर्ती संबोधूया!)  भिस्त ठेवून प्राजक्ताने बरेच बेत आखले. अगदी गाजरहलव्यापर्यंत! त्यात घरी दोन दिवस पाहुणे सुद्धा येणार होते. रविवार संध्याकाळपासून तारणहर्तीने फोन उचलणे बंद केले तेव्हाच संशयाची पाल चुकचुकली. "हिला मी हजार वेळा सांगितलं, यायचं नसेल तर आधीच सांगायचं, म्हणजे मग मला तसं आधीपासून तयारीत राहता येत!" "आता मी दहा वेळा फोन केला पण उचलायला होत नाही तिला!" " आता बघ मी ह्या महिन्यात ह्या सर्व सुट्ट्यांचे पैसे कापते की नाही"
मला ह्या सर्व संवादाची सवय असल्याने मी शांतपणे हे ऐकत होतो. सोमवारी जमेल तशी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, जसे की एक महाकाय सुरण अगदी बायकोच्या सूचना तंतोतंत पाळून कापून दिला! बायको धन्य आणि मी ही धन्य!
तारणहर्ती तशी मनाची राणी! पैसे कापणे वगैरे धमक्यांना दाद न देणारी! साडेआठची वेळ ठरली असताना नऊच्या आत कधी न उगविणारी! एकंदरीत बायको आणि तिचे नाते 'तुझ्याशी जमेना पण तुझ्यावाचून चालेना!" ह्या प्रकारात मोडणारे! बायको पण तशी हुशार, तारणहर्ती वर इतकी मेहनत घेतल्यावर आणि तिला आपल्या घरच्या पद्धतीने स्वयंपाक करायला शिकवल्यावर तिची सर्व अनियमितता सहन करण्याची तिने मानसिक तयारी केली असते. मध्येच वाचलेल्या एका विनोदाची आठवण झाली. "भारतीय स्त्रिया सात जन्मासाठी एकच नवरा का मागतात? - अरे वा इतक्या मेहनतीने त्याला पहिल्या जन्मात  format केल्यावर पुन्हा प्रत्येक जन्मात कोण पुन्हा पुन्हा मेहनत करणार!"
अमेरिकेतील मेड नाट्य अजून चालू आहे. आमचे काल थोड्या नाटकीय घटनानंतर संपले. म्हणजे आमच्याकडे येण्याआधी तारणहर्ती अजून एका घरी जाते. तिथेही तिने तीन दिवस सुट्टी मारल्याने तिच्याकडून काल तिथे नेहमीच्या एका तासाऐवजी दीड - पावणे दोन तास काम करून घेण्यात आलं. ह्या कालावधीत तारणहर्तीने बायकोचे फोन घेणे बंद केले. वातावरण पुन्हा अधिक विस्फोटक होण्याच्या मार्गावर होते. पण सुदैवाने तितक्यात तारणहर्तीचे आगमन झाले. मग आमच्याकडे सुद्धा सव्वा तासाचे दोन तास काम निघाले. बहुदा तारणहर्तीने तिसऱ्या कामाला कालसुद्धा दांडी मारली असावी. आपत्कालीन व्यवस्थापन काय फक्त मोठ्या लोकांनाच करावं लागत असं थोडंच आहे? बाकी आज सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहेत! ह्या नाट्याचा पुढील अंक बहुदा नाताळ सुट्टीनंतर!
गेल्या आठवड्यात मोठ्याकाकीने  (मोठीआई) बोलता बोलता तिच्या वडिलांची (नानांची) आठवण काढली. ते आंघोळीनंतर स्वतःचे कपडे टाकीवर जाऊन स्वतः धुवीत. त्यांचा वक्तशीरपणा इतका होता की शेजारी त्यांच्या कपडे धुण्याचा आवाज आला की इतके वाजले असावे अशी अटकळ बांधीत! मोठीआईने नानांचे एक वाक्य सांगितलं "स्वतः कपडे धुण्याने, दोघांचंही आयुष्य वाढत - आपलं आणि कपड्याचंही!"
ह्या दोन्ही मेडने व्यापलेल्या ह्या आठवड्यात हे वाक्य किती खरं आहे ह्याचाच विचार मनात राहून राहून डोकावत होता!
 

Monday, December 16, 2013

साहेब ऊवाच!


समस्त भारतदेशाच्या ज्ञात इतिहासातील राजकारण्यांचा धुर्ततेच्या बाबतीत क्रम लावायचा म्हटला तर साहेबांचा नंबर बराच वर लागेल. साहेब प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतात ते केवळ वेळ मारून न्यावी म्हणून नव्हे तर त्यात काही अल्पकालीन आणि काही दीर्घकालीन हेतू असतात. काही विधानातील त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आपल्याला समजला असे जरी वाटले तरी तसे असते असेच नाही.
हल्ली साहेब कांदे, साखर ह्यांच्या बाजारभावाविषयी बोलतात आणि दुसऱ्या दिवशी भाव त्याप्रमाणे हलतात. हा निव्वळ योगायोग असावा असं समजण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो! रविवारी लोकसत्तेत साहेबांचं विधान वाचलं - "शेतीवर अवलंबून राहू नका, विकसित देशात अवघी १० - १२ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून असते तर भारतात हेच प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे त्यामुळे इथे गरिबी बेकारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे". साहेबांची अभ्यासवृत्ती आणि आकडेवारीचे सखोल ज्ञान इथेही प्रतिबिंबित होतं. ते पुढे म्हणतात की भारतात ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. आणि ४९ टक्के शेतीला नियमित पाणीपुरवठा नाही त्यामुळे शेती किफायतशीर ठरत नाही.
देशाच्या सन्माननीय कृषीमंत्र्याकडून असा निराशावाद ऐकून माझी घोर निराशा झाली. ह्या निमित्ताने हे काही विचार!
१>  आपल्या देशात अजूनही बहुसंख्य भूभाग ग्रामीण आहे. एक लवासा आणि नवी मुंबई असे काही अपवाद वगळता नवीन शहर निर्मितीचा इतिहास आपणाकडे नाही. म्हणजे अधिकाधिक लोकसंख्येला आपण शहरात कोंडी करून बकाल अवस्थेत राहण्यास भाग पाडणार!
२> शेतीतील छोटा शेतकरी अस्तंगत झाला की मोठे शेतकरी किंवा उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात ह्या शेत्या विकत घेऊन तिथे बटाटे, मका, गहू ह्यासारख्या आधुनिक खाद्यपदार्थासाठी  (जसे की बर्गर, पिझ्झा) कच्चा माल पुरविणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणार! मला न राहवून गेल्या वर्षीच्या http://nes1988.blogspot.in/2012/12/stolen-harvest.html ह्या ब्लॉगची आठवण झाली.
३> छोटा शेतकरी हा छोट्या मोठ्या फुलझाडांचा , फळझाडांचा , कीटकांचा संरक्षक आहे. तो आपली परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे नेतो. त्याचे अस्तित्व नाहीसं झालं तर आपण आपला हा संस्कृतीचा अमुल्य ठेवा हरवून बसू.
४> छोटा शेतकरी गरीब असला तरी समाधानाच्या बाबतीत बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असतो. त्याची तब्येतही  चांगली असते. एकदा का तो शहरात आला की तो अगदी घुसमटल्या स्थितीत राहतो. निमित्त काढून गावाला पळतो.
लेखात आपण पुढे म्हटल्याप्रमाणे पर्यटन, फळलागवड आणि मस्त्यव्यवसाय ह्याकडे लक्ष केंद्रित करावे असे म्हटलं आहे ते अगदी योग्य आहे.
साहेब, आपल्याकडील दूरदृष्टीचा आणि द्रष्टेपणाचा गावातील छोट्या शेतकऱ्यांना लाभ होऊ द्यात. पुढील काही वर्षे आपण गावाच्या आणि तेथील शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य द्या! त्याचे शहरात विस्थापन होण्यापासून थांबवा! आपणच हे करू शकता, सर्वजण आपणास दुवा देतील!

Saturday, December 14, 2013

कलम ३७७


भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने  'समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हाच असून त्यासाठी जन्मठेपेची तरतूद कायम आहे' असा निर्णय बुधवारी दिला. आणि त्यावर देशभर गदारोळ माजला. त्याबाबतीत माझी ही मते!
१> मनुष्यजातीने आदर्श कुटुंबाचे  जे चित्र वर्णिले आहे त्यात पती, पत्नी आणि मुले ह्यांचा समावेश होतो. मुलांच्या निकोप वाढीसाठी हे चित्र आवश्यक असतं.
२> आजच वाचले की समलिंगी संबंध ठेवणारे लोकांची ही वृत्ती एकतर निसर्गतःच असते किंवा ती काही अनुभवांनी विकसित होते. दोन निसर्गतः ही वृत्ती असलेल्या लोकांनी शांतपणे चार भिंतीच्या आत एकत्र राहण्यास कोणाचा आक्षेप नसावा. माझा आक्षेप आहे तो ह्या वृत्तीचे समाजात खुलेआम प्रदर्शन करण्यास! आधीच समाजात इंटरनेटच्या प्रभावाने वाईट गोष्टींचेच प्रदर्शन सर्वांसमोर होत आहे. आपल्या पुढील पिढीचे ह्यापासून संरक्षण करणे अत्यावश्यक आहे! इंग्लिश भाषेत हे संबंध सर्वांसमोर मान्य करण्याच्या तथाकथित धाडसाला 'कमिंग आउट ऑफ क्लोसेट' असे म्हणतात कारण हे संबंध असल्यास ते चार भिंतीच्या आतच ठेवावेत अशीच अपेक्षा असते.
३> एकंदरीत पूर्वी आणि आता एक मुख्य फरक दिसतो. पूर्वी वाईट गोष्टी जशा की अंमली पदार्थ वगैरेची व्यसने १००% टक्के वाईट ठरविली जात. त्यामागील व्यसनी माणसाची मानसिकता वगैरे समजून घेण्याचा फारसा प्रयत्न  केला जात नसावा. अरे आज साध्या माणसाला सर्व नियमाच्या चौकटीत राहून आयुष्य घालवायला किती कष्ट पडत आहेत आणि आपल्या समाजाची वैचारिक शक्ती मनुष्यजातीतील वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या मोजक्या लोकांच्या वैयक्तिक अधिकारांविषयी चर्चा करण्यात खर्च पडत आहे.
४> पारंपारिक प्रेमात मुलगा मुलगी प्रेमात पडतात, ते काही एकाच वेळी नव्हे! ह्यात एका बाजूने प्रणयाराधन सुरु होते आणि कधी यशस्वी होते तर कधी अपयशी. समलिंगी संबंधाला मिळणाऱ्या वाढत्या प्रसिद्धीने ज्या कोणाची इच्छा नसेल त्याचा / तिचा पाठलाग करण्याचे धाडस ज्यामध्ये ही वृत्ती निसर्गतःच असेल त्याला होऊ शकते आणि माझा तिलाच आक्षेप आहे.
५> अजून मला खटकणारा मुद्दा! अशा जोडप्यांना मुले दत्तक घ्यायला परवानगी आहे. ह्या मुलांचे लहानपण अशा परिस्थितीत घालवून देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?
व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार चांगला असला तरी विविध मनोवृत्तीची माणसे समाजात राहत असताना समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने त्यातील कोणत्या लोकांची मते किती प्रमाणात समाजापुढे येऊ द्यावीत ह्यावर एका केंद्रीय शक्तीचे नियंत्रण असणे आवश्यक असते. आज त्याचीच कमतरता आहे! ह्या सर्व गोष्टींचा समाजाच्या पुढच्या पिढीवर जो परिणाम होत आहे त्याची जबाबदारी आजचे पुरोगामी / मुक्त विचारवंत घ्यायला तयार आहेत काय?
 

Wednesday, December 11, 2013

२०११ मार्च केरळ सहल पुनर्लेखन


२०११ साली मार्च महिन्यात एक सहकुटुंब केरळ सहल करण्याची संधी मिळाली. मुन्नार, ठेकडी आणि अल्लेपी अश्या तीन ठिकाणांना आम्ही भेट दिली. त्यावेळी मी ह्यावर दोन ब्लॉग लिहिले होते. परंतु आता छायाचित्रासहीत ह्या ब्लॉगचे पुनर्लेखन करायचा हा प्रयत्न!

१९ मार्च रोजी सकाळी विमानाने आम्ही कोचीन विमानतळावर पोहोचलो. प्रथमदर्शनीच कोचीन विमानतळाच्या मी प्रेमात पडलो. इन मीन तीन विमाने होती तिथे. विरार पलीकडील रेलवे स्टेशनवर कशी एखादी गाडी येवून गेल्यावर पाच दहा मिनिटं वर्दळ असते आणि मग सर्व काही शांत होत. तसंच काहीसं इथं झालं. विमान उतरल्यावर दहा मिनिटात विमानतळ सामसूम झाला. फुरसतीत सामान ताब्यात घेतल्यावर बाहेर येताच आमचा चालक तयारच होता.

तेथून प्रथम आम्ही मुन्नार येथे प्रयाण केले. मुन्नारच्या वाटेवरील नागमोडी रस्ते, एका बाजूला दिसणाऱ्या दऱ्या  आणि दुसर्या बाजूला हिरवाईने नटलेले विस्तीर्ण डोंगर असे अप्रतिम निसर्गसौदर्य डोळ्यात साठवत आम्ही जवळपास पाच तासांचा रस्ता कसा पार केला हे आम्हाला कळले सुद्धा नाही. ह्या रस्त्यावरील शांतता कानात साठवण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. आमचे हॉटेल सिएंना विलेज, हे मुन्नारच्या पलीकडे अधिक उंचीवर होते. तेथे पोहोचताच त्या हॉटेलच्या रमणीय परिसराने आम्ही भारावून गेलो.


 

प्रत्येक व्यक्तीची पर्यटनाची एक विशिष्ट पद्धत असते. आपण कधीकाळी फिरत असल्यास ही शैली ओळखण्यास आपणास संधी मिळत नाही. परंतु आम्हाला मात्र फारसे न फिरता ही पद्धत अचानक गवसली. मोजक्या दिवसात अधिकाधिक स्थळे पाहणे आम्हाला कधीच जमत नाही. मोजकी स्थळे आपल्या कलाने पाहणे आम्हाला जास्त रुचते. मुन्नारच्या रस्त्यावरील एखादी मनुष्यस्पर्शापासून मुक्त अशी जागा अनुभवण्यासाठी गाडी थांबविणे आम्हाला आवडते. मुन्नारच्या आसपास दोन तीन धरणे, Tea Factory अशी ठिकाणे आम्ही आटोपली. बाकी हॉटेलचा नास्ता मात्र भरपेट आणि अमर्यादित. थंड हवा आणि रुचकर अन्न याचा परिणाम शरीरावर दिसू लागला नाही तरच नवल.
त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार होता म्हणून चंद्राच्या दर्शनासाठी प्राजक्ता कॅमेरा घेऊन बाहेर सज्ज राहिली.



मध्येच आम्ही मट्टूपट्टी आणि अनाईरंगन धरणांना भेटी दिल्या.





तिसऱ्या दिवशी अजून वर जावून तेथील टी factory पाहण्याचे आम्ही ठरवले. हा रस्ता अधिक बिकट, साधी इंडिका तेथे तग धरणार नाही म्हणून खास जीप भाड्याने केलेली. थोड्याच वेळात रस्त्याची अवस्था पाहून आम्ही जीप एका कडेला थांबवली. बाजूलाच एक छोटी ठेकडी आणि त्यावर चहाची पाने खुडणाऱ्या कामगार. अचानक आम्ही त्या टेकडीवर कूच करण्याचा निर्णय घेतला. चहाची रोपे लांबून कितीही नाजूक दिसत असली तरीही असतात तशी खमकी. त्यांचा आधार घेत आणि प्रसंगी त्यांचे बोचकारे खात आम्ही त्या कामगारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. आमच्या चालकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा थोडासा आमचा प्रयत्न. तेथील एका वयस्क स्त्रीने सोहमला एका नातवाच्या मायेने जवळ ओढून घेतले. कधी नव्हे ते सोहमने सुद्धा ते लाड आनंदाने स्वीकारले.






अजून पुढचा रस्ता आम्ही स्वखुशीने टाळला आणि परतीच्या वाटेवर आलो. चार तासाची ही फेरी २ तासात आटपून सुद्धा जीपवाला मात्र नेहमीच्या भाड्यावर अडून बसला. व्यावसायिकता माणुसकीला टाळे लावते अशी आमची समजूत काढत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.

वाटेत एक फुलांचे उद्यान लागले. तेथील ही नयनरम्य फुले!






 
प्रवासात आपण निसर्गरम्य ठिकाणे पाहतो, चांगल्या हॉटेलात राहतो, व्यवस्थित खातो पितो. पण याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचे समृद्ध होणारे भावविश्व. नेहमीपेक्षा येणारे वेगळे असे अनुभव तो आपल्या पालकांबरोबर राहून अनुभवत असतो. प्रवास करणारे कुटुंब एक संघ म्हणून सर्व गोष्टींचे नियोजन करीत असते, मजा अनुभवत असते आणि कठीण परिस्थितींचा सामना देत असते. दैनंदिन जीवनात सुद्धा ह्या गोष्टी होत असतात परंतु त्यातील सांघिकपणाची भावना मुलास जाणविण्याइतपत नसते. एका सहलीत हे एका कुटुंबाचे बंध बळकट होत असतात. एरव्ही थंड पाणी पिऊ न देणारे बाबा प्रत्येक जेवणात आईसक्रीम खावून देतात हे कळल्यानंतरचा त्याचा आनंद शब्दात पकडण्यापलीकडचा असतो. तो त्याला धडा देवून जातो की जीवनात प्रत्येक गोष्टीला तर्काची कसोटी लावायचा प्रयत्न करू नये. आयुष्यात काही गोष्टी तर्कापलीकडे घडतात आणि त्या आपणास आनंदही देवू शकतात.
तिसऱ्या दिवशी आम्ही ठेकडीला प्रस्थान केले. हा रस्ता अगदी डोळ्याचं पारणं फिटवणारा होता.


 



 



ठेकडी येथील हॉटेलचा परिसर पाहून आम्ही बेहद्द खुश झालो. तेथून पेरियार येथील तलाव आणि त्या सभोवतालचे वन्य जीवन पाहण्यासाठी आम्ही निघालो. पेरियार जलाशयातील बोट दुपारी ३:३० वाजता निघणार होती. योग्य माहितीच्या अभावी आम्ही तेथे २ वाजताच जावून पोहचलो. तिकीटे घेतल्यावर आम्ही बोटींच्या धक्क्यावर जावून पोहोचलो. तेथे आजूबाजूंच्या झाडांवर माकडांनी वास्तव्य केले होते. जसजशी लोकांची गर्दी वाढू लागली तसतसे माकडांनी झाडांवरून खाली उतरण्यास प्रारंभ केला. लोकांजवळील खाद्यपदार्थ हिसकावण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे काही वेळ तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळाने काळ्या माकडांच्या दुसर्या एका टोळीने ह्या आधीच्या समूहावर हल्ला करून त्यांना हिसकावून लावले. शेवटी एकदा तिथे बोटींचे आगमन झाले. जलतरींगिनी (चुकलो जलथरींगिनी) ह्या बोटीत आम्ही बराचश्या विदेशी पर्यटकांबरोबर बसलो. ह्या बोटीबरोबर अजून तीन बोटी होत्या. आम्हाला जबरदस्तीने संरक्षक jacket घालावी लागली. ही jacket म्हणा किंवा विमानातील प्राणवायूचे मास्क म्हणा, हे आपल्या किंवा त्या कंपनीच्या समजुतीसाठी! पुढील दोन तास आम्ही एका अवर्णनीय अनुभवाचे साक्षीदार होतो. जलाशयाभोवती घनदाट जंगल आणि ठिकठीकाणी जलाशयाच्या काठावरील विस्तीर्ण कुरणांमध्ये चरणारे, शहरीकरणाचा स्पर्श न झालेले वन्य प्राणी! हरणे, कोल्हे आणि हत्ती ह्या प्राण्यांचे आम्हाला दर्शन झाले.







 

 



वाघाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या आम्हां सर्वांची मात्र थोडी निराशाच झाली. जंगलाचे वातावरण मात्र मला बरेच गूढ वाटले आणि मला त्याने मोहवून टाकले. शतकोशतके न बदललेली ही भूमी आणि त्यात फक्त अन्न ही मुलभूत गरज भागविण्यासाठी जीवन मरणाचा खेळ दररोज खेळणारे वन्यजीव आपल्याला आपल्या दररोजच्या संघर्षाच्या निरर्थकतेची जाणीव करून देतात. ह्या जलाशयात बरेच वठलेले वृक्ष आणि त्यावर वास्तव्य करणारे पक्षी आढळतात. हे पक्षी आपल्याला मासे पकडण्याची कसरत सुद्धा करून दाखवतात. बाकी मध्येच एका हत्तींचा समूह जवळून बघण्याच्या नादात आमच्या बोटीला बाकीच्या बोटींनी मागे टाकले. त्यामुळे सोहमची बैचैनी वाढली. आपण बाकीच्या बोटींना कधी एकदा मागे टाकतो असे त्याला झाले. त्या जलाशयाच्या दुसर्या टोकाला पोहचून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आता बोटीचे सारथ्य दुसर्या माणसाने हाती घेतले, आता हा तरी दुसर्या बोटींना मागे टाकेल ही सोहमची अपेक्षा मात्र काही सार्थ झाली नाही. शेवटी मात्र फक्त आमच्याच बोटीला एका हत्तीणीने आणि तिच्या पिल्लाने जवळून दर्शन दिले आणि फोटोसाठी पोझही दिली.



हत्तीणीच्या पिल्लाने पोझ दिली मग सोहमने सुद्धा दिली!


मसाल्याची थोडीफार खरेदी करण्याच्या नादात थोडा वेळ झाला आणि रात्र उजाडली. परतीचा प्रवास २० किलोमीटर होता. अंधारातील निर्मनुष्य रस्ते पाहून सोहमने रात्रीचा प्रवास करणे कसे चुकीचे आहे हे आम्हाला समजावले आणि खरेदी वेळीच आटोपणे आवश्यक आहे असा सल्लाही दिला. बर्याच वेळा आपले गुण मुलामध्ये उतरलेले दिसतात आणि त्यावेळी मन कुठेतरी सुखावते. वयानुसार आपण भावना मनातच ठेवून द्यायला सरावतो परंतु लहान मुलांचे मात्र तसे नसते. मनातील विचार ते बिनधास्त बोलून दाखवितात. बर्याच दिवसांनी विमानात बसल्यावर ज्यावेळी उड्डाणाची वेळ आली तेव्हा मनात थोडी धाकधूक असताना 'बाबा आपले विमान पडणार तर नाही ना? असा प्रश्न ऐकल्यावर मन धन्य होते. आमचा ड्रायव्हर दररात्री कारमध्येच झोपायचा. ही गोष्ट आपल्याला जशी खुपते तशी सोहमला ती पटली नाही. काही गोष्टी आपल्याला पटत नसतात, पण त्या बदलणे शक्य असूनही आपण त्या बदलत नाही.
हॉटेल कारमेलियाचा परिसर स्वर्गीय! ह्या परिसराचा आनंद लुटण्यासाठी किमान १ दिवस इथे थांबायला हवे होते असे राहून राहून वाटून गेले!

 



 

 



 







प्रवासाचा पाचवा दिवस उजाडला. आजचे आकर्षण अल्लेपी येथील नावेतील प्रवास आणि रात्रीचे वास्तव्य हे होते. आतापर्यंत अतिशय शांतपणे कार चालविणारा आमचा ड्रायव्हर आज मात्र सुसाट सुटला होता. मल्याळम भाषेतील शेलके शब्द ऐकायची संधीही आम्हाला या निमित्ताने मिळाली. संधी मिळताच त्याला मी विचारले, काय रे बाबा आज काय झाले? तो तोडक्या मोडक्या हिंदीत उत्तरला की आज तो त्याच्या अल्लेपी येथील घरी जाणार होता आणि पाच दिवसाने बाबा येणार म्हणून त्याच्या मुलाने शाळेला सुट्टी घेतली होती! बर्याच जणांकडून ऐकलेल्या केरळच्या backwater चा प्रवास सुरु झाला. नावेत सारथ्याने, त्याच्या मदतनीसाने आणि आचार्याने शहाळ्याचे पाणी देवून आमचे स्वागत केले. ही हाउसबोट तशी भव्य पण मस्त्यगंधाने सुगंधीत! दिवसाचा प्रवास तसा मजेचा! सर्वत्र जलाशय आणि काठावर झाडांमध्ये वसलेली केरळची गावे हे पाहण्यास मजा आली. संध्याकाळी साडेपाचनंतर ह्या बोटींना जलसंचार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे एका गावाच्या काठी ही बोट वास्तव्याला आली.
 

 





 






गावात एक फेरफटका मारण्याचा आमचा उत्साह थोड्याच वेळात मावळला! जलाशयाच्या काठी दात घासणारे, भांडी धुवणारे गावकरी पाहण्यास आम्ही सरावत होतो तितक्यात आमच्या समोरच आमच्या आचार्याने त्याच पाण्यात डुबकी मारून त्यांचे संध्याकाळचे स्नान आटोपले. ते पाहून आम्ही याची देही डोळा धन्य झालो! बाजूला अशा अनेक बोटी वास्तव्याला आल्या होत्या! त्यातील कुटुंबेही फेरफटका मारण्यासाठी निघत आणि मग थोडा वेळ आमच्याशी गप्पा मारून जात. ही रात्र आता अशा ठिकाणी काढायची अशा विचाराने कंटाळलो असताना 'बाबा येथे रात्री डाकू तर येणार नाहीत, या सोहमच्या प्रश्नाने आमची करमणूक झाली. नावाड्याने विचारले हा काय विचारतो आहे? डाकू हा शब्द त्याला हिंदीत समजावू न शकल्याने मी शेवटी त्याला फुलनदेवी हा शब्द सांगितल्यावर त्याची हसताहसता पुरेवाट झाली. बाकी ह्या हाउसबोटीवर जेवण मात्र अगदी रुचकर होते. रात्री डासांचा मुकाबला करावा लागला. शेवटी एकदा बेडरूम मधला AC सुरु केल्यावर आम्ही सुखावलो. शेवटच्या दिवशी कोचीनच्या दिशेने आम्ही प्रस्थान केले. तिथे थोडीफार खरेदी करून भारताचा विश्वचषक स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बघण्यासाठी आम्ही विमानतळावर येवून दाखल झालो.
परतीच्या प्रवासातील एक विमानातून घेतलेले छायाचित्र!



रात्री बोरीवलीला परतल्यावर भारताने सामना जिंकला आणि एका छान सुट्टीची सांगता झाली.