Sunday, June 30, 2013

तपोवन - भाग ५


सिद्धार्थचे आजवर सीमंतिनीकडे कधी लक्ष गेले नव्हते अगदी तिला सिंहाच्या तावडीतून सोडवून आणताना सुद्धा! पण आज आपल्या पित्याच्या क्रोधाने दुःखित झालेल्या सीमंतिनीला पाहून सिद्धार्थला वाईट वाटले. सिद्धार्थ क्षणभर तिच्याकडे पाहतच राहीला. श्वेतांबरा सीमंतिनीचे पिंगट केस हिवाळ्यातील शीतल वाऱ्यावर भुरभुरत होते. ह्या केसांच्या आडोश्याला आपले अश्रू लपविण्याचा त्या हरिणाक्षीचा प्रयत्न विफल ठरला होता. अचानक त्या दुःखमय डोळ्यांची आणि सिद्धार्थच्या आश्वासक नजरेची भेट झाली.
हळूहळू हिवाळा सरत आला होता. वसंत ऋतूच्या आगमनासाठी आश्रमात संगीत, नृत्य. नाट्य आणि साहित्य ह्यांच्या विविध कार्यक्रमाची तयारी जोमाने सुरु होती. सीमंतिनी आणि तिच्या सख्यांनी मिळून एका नृत्याचा कार्यक्रम बसविला होता. सिद्धार्थ मात्र आपल्या ध्येयावर अढळ निष्ठा ठेवून होता. महर्षी अगस्त्यशी त्याची वारंवार चर्चा होई. आपली आक्रमकता कायम राखून योग्य वेळी आश्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करावा ह्या निष्कर्षापर्यंत तो येऊन पोहोचला होता. त्यामुळे त्याच्या मनातील ह्या बाबतीतील वादळ काहीसे शमत चालले होते. परंतु आता एक नवीनच वादळ त्याच्या मनात निर्माण होत होते. सीमंतिनी! आश्रमात तिचे सिद्धार्थला वारंवार दर्शन होई. तिच्या विविध मुद्रा त्याला भावत होत्या. नृत्यसरावात मुख्य भूमिका अगदी सराईतपणे निभावणारी सीमंतिनी, एकदा - फक्त एकदाच उद्यानाच्या वृक्षवल्लींकडे दुर्लक्ष झालेला ओरडा अगदी मनाला लावून घेतलेली सीमंतिनी!, त्यानंतर उद्यानाचा जणू काही कायापालटच झाला होता, सर्व हरितसंपदा मोठ्या जोमाने बहरली होती. फुलांचा राजा गुलाबाची तर अनेक प्रकारची रोपे मोठ्या रुबाबात सर्वत्र बहरली होती. सीमंतिनीचा आश्रमातील वावर अगदी आत्मविश्वासपूर्व होता. जरी तिला शिष्यगणांबरोबर ज्ञानोपासना करण्याची संधी मिळाली नसली तरी पित्याच्या मुखाद्वारे येणारे ज्ञानाचे बोल ती आपल्या मनात पूर्णपणे साठवून ठेवीत असे.
आज शिष्यगणांची जरा धावपळच सुरु होती. सर्व आश्रम जरी वसंतोत्सवाच्या तयारीत मग्न असला तरी शिष्यगणाची आज तत्वज्ञानावर वादविवाद स्पर्धा होती. सर्व शिष्य अध्ययनकक्षात येऊन भारद्वाजांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत थांबले होते. परंतु भारद्वाजांची तब्येत आज काही ठीक नव्हती. त्यांनी तसा निरोप घेऊन सीमंतिनीस अध्ययनकक्षात पाठविले. ज्येष्ठताक्रमातील द्वितीय क्रमांकाच्या गुरुंनी हा निरोप स्वीकारला. ते परीक्षा तर घेवू शकणार होते, परंतु त्यांना सहायकाची गरज लागणार होती. जाण्यासाठी त्यांच्या परवानगीची वाट पाहत असलेल्या  सीमंतिनीकडे त्याचं लक्ष गेले. 'सीमंतिनी, तू माझी मदत करशील? ते विचारते झाले. द्विधा मनःस्थितीत असलेल्या सीमंतिनीने नजरेच्या एका कोपऱ्यातून सिद्धार्थकडे नजर टाकली. त्याच्या नजरेतील अस्पष्टसा होकार तिला पूर्ण कळला. 'हो, गुरुवर्य', आपले हे उत्तर आपणच दिले का ह्याचा प्रश्न सीमंतिनीला पडला.
मनुष्याचे कर्तव्य आणि त्यापासून त्याला रोखणारा मोह असाच काहीसा चर्चेचा विषय होता. सर्व शिष्य साधारणतः एकाच प्रकारचे विचार मांडीत होते. मनावर नियंत्रण ठेवून कर्तव्य पार पाडावे असा एकंदरीत त्यांच्या विचाराचा कल होता. इतका वेळ शांत असलेला सिद्धार्थ अचानक बोलता झाला, 'कर्तव्याची व्याख्या ठरविली कोणी?, केवळ आपल्या आधीच्या काळात जन्मले म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलेली कर्तव्याची व्याख्या जशीच्या तशी स्वीकारून आपण आपल्या विकासाच्या सीमा संकुचित करीत आहोत!' त्याच्या तोंडून सीमा हा शब्द ऐकताच सीमंतिनी काहीशी सुखावली. जणू काही त्याने तिचेच नाव घेतले होते. गुरु काहीसे बावरले. शिष्यगणाकडून असला काही प्रश्न विचारला जाईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. त्यांची विचारग्रस्त मुद्रा सीमंतिनीच्या लक्षात आली. सहायकाला आता धावून जाणे भाग होते. 'कर्तव्याची व्याख्या काही अखंड कायम राहणार नाही. ह्या भूतलावर जसे विद्वान जन्माला येतील ते आपापल्या मतिनुसर ह्या कर्तव्याच्या व्याख्येत सुधारणा करतील. ज्याचे विचार काळाच्या, जनमानसाच्या परीक्षणाच्या कसोटीवर पारखून निघतील तेच विचार कायम टिकतील!' सीमंतिनीच्या मुखातील हे उद्गार ऐकून तिच्यासकट सर्व अध्ययनकक्ष आश्चर्यचकित झाला. ह्या सौंदर्यवतीला बुद्धीची सुद्धा देणगी लाभली आहे तर! सिद्धार्थ विचार करता झाला.


 

Saturday, June 29, 2013

तपोवन - भाग ४


वनराजाने मनुष्यांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ होती. आश्रमातील वातावरणात त्यामुळे थोडी खळबळ माजली होती. सीमंतिनीची चांगलीच हजेरी घेण्यात आली. सिद्धार्थ होता म्हणून वेळ निभावून गेली असे सर्वांचेच म्हणणे पडले.
इथे महाराज अंशुमताना काळजीने घेरून टाकले होते. दक्षिण सीमेवरील राजा शत्रुघ्न ह्याने सैन्याची जमवाजमव चालविली आहे अशा बातम्या हेरांनी आणल्या होत्या. शत्रुघ्न आणि अंशुमत ह्यांचे पूर्वापार वैर होते. काही काळापूर्वी अंशुमत ह्यांनी शत्रुघ्नचा पराभव केला होता. हा पराभव शत्रुघ्नच्या बराच जिव्हारी लागला होता. अंशुमत ह्याचे सामर्थ्य तसे जास्त होते, परंतु सुडाच्या भावनेने पेटलेला शत्रुघ्न आपल्याला बराच त्रासदायक ठरू शकतो ह्याची त्यांना जाणीव होती. आणि त्यातच युद्ध सुरु झाल्यास सिद्धार्थला परत बोलवा अशी भुणभुण शर्मिष्ठा ह्यांनी त्यांच्या मागे लावली होती.
राजा शत्रुघ्नचे हेर सर्वत्र पोहोचले होते. सिद्धार्थला आश्रमात ठेवण्यात आले आहे ही बातमीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. अगस्त्य महर्षींचा आश्रम तसा जंगलाच्या आतल्या भागात होता आणि तिथे जायच्या एकमेव रस्त्यावर अंशुमत राजाचे विश्वासू सैनिक पहारा ठेवून असायचे.
सीमंतिनीचा दिनक्रम ठरलेला असायचा. आपल्या मातेबरोबर पित्याची सर्व तयारी करून द्यावी. आश्रमातील पाकशाळेवर लक्ष ठेवून द्यायचे. आश्रमातील उद्यानाची सुद्धा तिने सुंदर काळजी घेतली होती. सर्व काही गोष्टी जागच्या जागी, वेळीच करण्यात तिची ख्याती होती. परंतु त्या घटनेनंतर तिचे लक्ष विचलित झाले होते. ती अधिकाधिक लक्ष आपल्या सख्यांबरोबर घालवू लागली होती.
भारद्वाज आणि त्यांचा शिष्यगण पठणानंतर अध्ययनकक्षातून बाहेर येत होता. अध्ययनकक्षातील चर्चा अजूनही चालूच होती. अचानक भारद्वाजांची मुद्रा गंभीर झाली. उद्यानातील सुकलेल्या लता पाहून ते गंभीर झाले. 'सीमंतिनी!' त्यांची ही क्रुद्ध स्वरातील हाक ऐकून वातावरण अचानक शांत झाले. सीमंतिनी धावतच बाहेर आली. पित्याची सुकलेल्या उद्यानावरील नजर तिला सर्व काही सांगून गेली. आणि तिथून निघताना शिष्यगणात असलेल्या सिद्धार्थाकडे पाहून तिला धरणीमाता दुभंगून आपल्याला पोटात घेईल  तर बरे होईल असे वाटून गेले.
 

Thursday, June 27, 2013

तपोवन - भाग ३



महर्षीबरोबर झालेल्या चर्चेनंतर सुद्धा सिद्धार्थच्या मनातील विचारांचे वादळ काही शमले नव्हते. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे आपले कर्तव्य परिपूर्णपणे पार पाडण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. कालचक्र तर पुढेच चालले होते. मनात कितीही इच्छा असली तरी ते आतापर्यंत कोणीही थांबवू शकले नव्हते. काही कालावधीनंतर अध्ययनात सिद्धार्थला गोडी वाटू लागली होती. वेद, श्लोक ह्यांचे पठण करताना तो मग्न होत होता. परंतु रात्रीच्या शांत वेळी मनातील शौर्याची खुमखुमी बाहेर येत असे.
महर्षीबरोबर सिद्धार्थ आणि शिष्यगणाचा थेट संवाद क्वचितच होत असे. प्रशिक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ गुरुवर्गाकडे सोपविण्यात आली होती. गुरुवर्य आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आश्रमाच्या परिसरात राहत असत.
हिवाळ्याने एव्हाना आपला जम बसविला होता. महाकाय वृक्षांनी आपला पर्णसंभार गाळून टाकला होता. सिद्धार्थला हे वातावरण चांगलेच आवडले होते. महर्षीची परवानगी घेऊन संध्याकाळच्या मोकळ्या वेळात जंगलात जवळपास फेरफटका मारण्यास त्याने सुरुवात केली होती. त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना जंगलात जास्त आत जाण्यास परवानगी नव्हती. त्या भागात हिंस्त्र पशूंचा वावर असे.
अशाच एका संध्याकाळी सिद्धार्थ आपल्या मित्रांबरोबर सायंकाळच्या फेरफटक्याला निघण्याच्या तयारीत होता. अचानक जंगलातून एका तरुण स्त्रीचा 'वाचवा, वाचवा!' असा आक्रोश आश्रमापर्यंत ऐकू आला. क्षणभर काय करावे हे कोणालाच कळेना. तपाला बसलेल्या महर्षीना उठविण्याची कोणामध्ये हिम्मत नव्हती. इतक्यात धनुष्यबाण घेऊन बाहेर येणाऱ्या महर्षीना पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. 'सिद्धार्थ, हे धनुष्यबाण घे आणि त्या अबलेची सुटका कर!' महर्षीनी आज्ञा केली. क्षणाचाही विलंब न करता सिद्धार्थने  धनुष्यबाणासहित जंगलाच्या दिशेने सुसाट धाव घेतली.
जंगलात थोडे अंतर कापून जाताच सिद्धार्थला ते दृश्य दिसले. जेष्ठ गुरु भारद्वाज ह्यांची कन्या सीमंतिनी  एका वृक्षावर थरथर कापत बसली होती. आणि संतप्त वनराज सिंह त्या वृक्षाखाली फेऱ्या घालीत बसले होते. सिंहाची क्रुद्ध नजर सीमंतिनीवर रोखून होती. सिद्धार्थने आपला बाण धनुष्याला लावला आणि सिंहाच्या मस्तकाचा वेध घेतला. नेम अचूक होता आणि लक्ष्याच्या दिशेने वेगाने चालला होता. शेवटच्या क्षणी सिंहाने हालचाल केली व बाण त्याच्या बरगड्यात घुसला. अतिक्रुद्ध झालेल्या सिंहाचे लक्ष सिद्धार्थकडे गेले. त्या महाकाय वनराजाने सिद्धार्थ्च्या अंगावर झेप घेतली. अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने सिद्धार्थ थोडा गांगरला. परंतु राजघराण्यातील रक्त होते ते! आपल्या बलदंड बाहूंनी त्याने सिंहाचा जबडा घट्ट पकडून ठेवला. तोवर महर्षी आणि आश्रमवासी येउन पोहोचले होते. अचानक आलेल्या ह्या माणसाच्या गर्दीने वनराज विचलित झाले. सिद्धार्थच्या हातातील आपला जबडा सोडवून घेवून त्यांनी जंगलात प्रयाण केले.
सर्व आश्रमवासी सिद्धार्थाच्या चौकशीत / कौतुकात गुंतले. आपल्या पित्याच्या आश्वासक मिठीत विसावलेल्या  सतत सिद्धार्थवर खिळलेली सीमंतिनीची नजर पाहून महर्षी मात्र काहीसे चिंतीत झाले होते.   


 

Tuesday, June 25, 2013

तपोवन - भाग २


सिद्धार्थ आणि अंशुमत ह्यांच्या रथाचे आश्रमात यथोचित स्वागत झाले. महर्षी अगस्त्य आणि शिष्यपरिवाराने महाराज अंशुमताना पुष्पमाला दिल्या. स्वागत स्वीकारून आणि घटकाभर आश्रमात थांबून महाराज परतीच्या प्रवासासाठी निघाले. एकदा रथात बसल्यावर त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही. त्यामुळे दुःखी झालेली सिद्धार्थची मुद्रा महर्षींच्या नजरेतून सुटली नाही.
एका मोठ्या पर्वतराजीच्या पायथ्याशी आश्रम वसविला होता. पर्वतातून खळखळत वाहत येणारी नदी आश्रमाचे सौदर्य खुलवीत होती. आजूबाजूच्या दाट वन्य वृक्ष आणि जीवसृष्टीमध्ये हा आश्रम अगदी कसा चपलखपणे बसला होता.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सिद्धार्थचा दिनक्रम सुरु झाला. थंडगार पाण्याने स्नान करणे त्याला जरा कठीणच गेले. त्यानंतर अगस्त्य महर्षींच्या जेष्ठ शिष्यगणांपैकी एकाने नवशिष्यांना अध्ययनकक्षात नेले. दिवसभर बऱ्यापैकी असाच क्रम सुरु राहिला. अध्ययन, आश्रमातील कामात हातभार लावणे, प्रार्थना, बौद्धिक चर्चा ह्यात दिवस कसा गेला हे सिद्धार्थला कळले सुद्धा नाही. सायंकाळी सर्वांना मोकळ्या मैदानात सोडण्यात आले तेव्हा कुठे सिद्धार्थ जरा खुश झाला.
तरुण सिद्धार्थ समंजस होता. ही दिनचर्या त्याच्या आवडीची नव्हती तरीही त्याने कधीच कुरबुर केली नाही. महालातील सुखदायी जीवनातून आश्रमातील खडतर जीवनाचा प्रवास स्वीकारण्याचा त्याने मनापासून प्रयत्न चालू ठेवला. परंतु मनातील वादळांना काही तो थोपवू शकत नव्हता. ही मनातील खळबळ कोणास बोलून दाखवावी हे त्याला समजत नव्हते.
मग एक दिवशी त्याला अचानक ही संधी मिळाली. सायंकाळी सिद्धार्थ शांतपणे एका डेरेदार वृक्षाखाली बसून समोरच खेळणाऱ्या सशांच्या पिल्लांच्या जोडीकडे पाहत बसला होता. महर्षी अचानक कधी मागे उभे राहिले हे त्याला कळलेच नाही. 'कसा आहे बाळ सिद्धार्थ!' महर्षी विचारते झाले. 'सर्व काही ठीक आहे, महर्षी' सिद्धार्थ उत्तरला. 'परंतु तुझ्या मुद्रेवरून तुझ्या मनात काही विचार चालू आहेत असे जाणवते' महर्षी म्हणाले. सिद्धार्थने क्षणभर विचार केला. 'काही चुकीचे बोललो तर माफ करा महर्षी' सिद्धार्थ म्हणाला. महर्षींच्या नजरेच्या संमतीने तो बोलता झाला 'एका बलवान साम्राज्याच्या भावी सम्राटाने आश्रमात राहून हे वेद, कला, शास्त्र ह्यातील प्रशिक्षण घेण्याचे प्रयोजन काय हे मला अजूनही पूर्णपणे समजत नाहीय' महर्षींच्या चेहऱ्यावरील काहीशी खुश झालेली मुद्रा पाहून सिद्धार्थने आपले बोलणे पुढे चालू ठेवलं. 'सम्राटाने कसे आक्रमक असावे, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याची मनीषा सदैव त्याच्या मनात असावी. बाकी कोणत्याही क्षेत्रात त्याला सल्ला लागला तर दरबारातील मंडळी आहेतच! ह्या प्रशिक्षणाने जर सम्राटाने आपली आक्रमक मानसिकता गमावली तर मात्र मोठे नुकसान होईल' सिद्धार्थने आपल्या मनातील खळबळ एका दमात बोलून दाखविली आणि त्याला काहीसं बर वाटल.
महर्षी प्रसन्न झाले. 'सिद्धार्थ, खर आहे तुझे म्हणणे. सम्राट कसा आक्रमकच असावा! पण हे राज्य निर्माण करणार ते कोणासाठी? प्रजेसाठी ना? सम्राटाला प्रजेच्या  भावनांची जाणीव असावी. त्याला आपल्या दरबारी मंडळींची पारख करता यावी. त्याला स्वतःच्या मनातील भावनांना सांभाळता यावे. मनात येणाऱ्या भावना, विचार ह्यावर कोणाचेच नियंत्रण नसत, तसे ते सम्राटाचेही नसणार. परंतु सम्राटाला मनात आलेल्या भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही. प्रत्यक्ष कृती करताना त्याला आपल्या कृतीवर लाखो लोकांचे लक्ष असणार आहे, त्यातील बरेच लोक आपल्या कृतीचे अनुकरण करणार आहेत ह्याची जाणीव असावी. एका अर्थाने पुढील एक दोन पिढीचा मार्ग तू आखून देणार आहेस. मी कोणी विद्वान नव्हे. मी आहे केवळ एक साधन, परंपरेने चालत आलेलं ज्ञान, प्रजेपर्यंत पोहोचावे ह्यासाठी आखून दिलेल्या साखळीतील मी आहे एक दुवा! जोवर ही साखळी जमेल तोवर टिकवावी, त्यानंतर पुढे कसे काय घडेल ते प्रत्येक माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीवर अवलंबून राहील! इतके बोलून महर्षी आपल्या कुटीच्या दिशेने चालू लागले. महर्षींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि त्यामागे दिसणाऱ्या मावळत्या सूर्यबिंबाकडे सिद्धार्थ बराच वेळ टक लावून पाहत होता.
 

Monday, June 24, 2013

तपोवन - भाग १


महर्षींचे राजदरबारी अचानक आगमन होताच सर्वांचीच धांदल उडाली. प्रधान प्रसंगावधान दाखवून पुढे सरसावले आणि त्यांनी महर्षींना सन्मानपूर्व त्यांच्या आसनाकडे नेले. महर्षींचा क्रोध काही शांत झाला नव्हता. नजरेनेच त्यांनी प्रधानांना महाराज कोठे आहेत अशी विचारणा केली. 'महाराजांचे आगमन आता होईलच', आपल्या स्वरात जमेल तितकी आश्वासकता आणण्याचा प्रयत्न करीत प्रधान उत्तरले. प्रधानांचे नशीब बलवत्तर होते. महर्षींचा क्रोध वाढण्याच्या आतच महाराज राजदरबारी प्रवेशते झाले. महाराजांनी महर्षींना विनम्र होवून प्रणाम केला. तोवर दासींनी थंडगार पेयाचा चषक महर्षींना आणून दिलाच होता. त्यामुळे महर्षीचा राग काहीसा निवळला होता.

'आम्ही अजूनही राजपुत्र सिद्धार्थच्या आश्रमातील आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत, ही प्रतीक्षा किती काळ चालू राहणार हाच प्रश्न विचारण्यासाठी आम्ही येथवर इतका दीर्घ प्रवास करून आलो आहोत' महर्षीनी थेट विषयाला हात घातला. महाराजांना एकंदरीत अंदाज आलाच होता. त्यांची स्थिती बिकट झाली होती. महाराज्ञी शर्मिष्ठा सिद्धार्थच्या आश्रमातील वास्तव्याच्या एकदम विरोधात होत्या. सिद्धार्थसारख्या तारुण्य ओतप्रोत भरलेल्या शूर राजकुमारास आश्रमात पाठवून त्याच्या मनात संभ्रम निर्माण होण्याच्या आपल्या मनातील शंकेस प्रत्यक्षात उतरलेले पाहण्यास त्या अजिबात तयार नव्हत्या. कधी एकदा विशीत पोहोचलेला सिद्धार्थ आपली मर्दुमकी रणांगणात दाखवून आपल्या साम्राज्याचा विस्तार करतो हे पाहण्यासाठी त्यांचे डोळे आसुसलेले होते.
महाराजांच्या मनातील हे विचारचक्र महर्षींच्या तीक्ष्ण नजरेने भेदले. 'विलंबाबद्दल क्षमस्व, महर्षी - येत्या पौर्णिमेला आम्ही स्वतः राजपुत्र सिद्धार्थला घेवून आपल्या आश्रमात दाखल होऊ' महाराज उत्तरले. आपण हे उत्तर कसल्या आधारावर देत आहोत हे त्यांचेच त्यांना माहित नव्हते. अगस्त्य महर्षी अंशुमत महाराजांच्या ह्या उत्तरावर एकदम खुश झाले. मग महर्षी आणि महाराजांची  राजकक्षातील चर्चा बराच काळ सुरु होती.

आश्रमात भावी राजास काही काळ प्रशिक्षणासाठी पाठविण्याची महाराज ह्यांच्या राजघराण्याची अनेक पिढ्या चालत आलेली परंपरा होती. सिद्धार्थनेसुद्धा ह्या परंपरेने जावे अशी अपेक्षा महाराजांनी करावी ह्यात वावगे असे काहीच नव्हते. पुढील सात आठ दिवस महाराज्ञी शर्मिष्ठा ह्यांना मनविण्यात महाराजांनी घालविले. सिद्धार्थ आश्रमात राहून परत आला की साम्राज्यविस्ताराची एक जंगी मोहीम काढायची असे आश्वासन घेवूनच महाराज्ञी शर्मिष्ठेने आपली परवानगी दिली.

सिद्धार्थने युद्धकलेत बरेच नैपुण्य संपादन केले होते. त्याचे हे कौशल्य अलौकिक आहे ह्याची ग्वाही जाणकार देत होते. सिद्धार्थ बराच समंजस होता. आश्रमात जाण्याची आपल्या पित्याची आज्ञा त्याने तत्काळ स्वीकारली.

मग तो दिवस उजाडला. समारंभपूर्वक अंशुमत महाराज आणि राजपुत्र सिद्धार्थ एका सजविलेल्या रथातून महर्षींच्या आश्रमाकडे निघाले. सर्व प्रजाजन आपल्या सद्य आणि भावी सम्राटाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते आणि ह्या रथावर पुष्पवृष्टी करीत होते.

रथाने आता नगर सोडले होते आणि घनदाट वनराईत प्रवेश केला होता. सूर्याच्या किरणांना भूमीवर पोहोचण्याची क्वचितच संधी मिळत होती. वन्य प्राण्यांचेही दर्शन अधून मधून होत होते. एकंदरीत सिद्धार्थला हे वातावरण खूपच भावले होते. 

Thursday, June 20, 2013

क्रिकेट आणि मी (भाग ३) - सरदार पटेल कॉलेज


आधीचे दोन भाग
http://nes1988.blogspot.in/2010/07/blog-post_31.html
http://nes1988.blogspot.in/2010/08/blog-post.html
सचिन कन्नडकर निर्विवादपणे उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. जलद गोलंदाजी करायचा आणि  जबाबदारीने फलंदाजी सुद्धा करायचा. एकंदरीत त्याची क्रिकेटची जाण उत्तम होती. चौथ्या वर्षी मी खेळलो नाही पण बाकीच्या तिन्ही वर्षात मी दर वर्षी आमच्या वर्गाच्या संघातर्फे सलामीला खेळलो. गुण्या (श्रीनिवास खरे) हा गुणी डावखुरा फलंदाज माझा सलामीचा साथीदार होता. हे सामने फेब्रुवारीमध्ये खेळले जात. आमच्या संघांची निवडप्रक्रिया जानेवारीत सुरु होई. मी ह्या निवड सामन्यात उत्तम फलंदाजी करीत असे. त्यामुळे सचिन मला नेहमी संघात घेई. आमच्या संघाच्या बर्याचशा जागा सहजपणे निवडल्या जात. पण यष्टीरक्षकाच्या जागेसाठी थोडी कुरबुर होई. सुगंध आफळे हा आमचा क्रमांक १ चा यष्टीरक्षक होता. आणि सतीश भाटवडेकरचा ही जागा पटकाविण्याचा फार मानस होता. त्यामुळे सुगंध यष्टिरक्षण करताना सतीशबरोबर सीमारेषेवरून सामने बघण्यात मजा येई. सतीश पार्ले टिळकचा विद्यार्थी असल्याने शुद्ध मराठीतील त्याची टिप्पणी धमाल असे. सीमारेषेवरून आलेला थ्रो सुगंध हमखास चुकवीत असे आणि मग सतीश 'असे चेंडू मी हमखास अडविले असते' असे बोलत असे.
मला एकंदरीत दोघा तिघांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. गिरीश गरोडिया जो आमचा तिसर्या क्रमाकांचा फलंदाज असे तो एकदा म्हणाला होता की आदित्याची बॅट कशी सरळ रेषेतून येते. तसेच एकदा एक सीजन चेंडूचा सामना चालू होता त्यावेळी एक फलंदाज बऱ्याच वेळ बचावात्मक फलंदाजी करीत होता, त्यावेळी नितीन अम्बुरे म्हणाला 'अरे जर फक्त चेंडू अडवायचेच असतील तर आदित्य काय वाईट आहे'. ह्या माझ्या फलंदाजीवरील स्तुतीपर प्रतिक्रिया वीस वर्षापलीकडे काळ लोटला तरी मी लक्षात ठेवल्या आहेत.
सचिनला नाणेफेक जिकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्यास आवडे. मला का कोणास ठावूक लेगअम्पायर च्या मागे क्षेत्ररक्षण करण्यास ठेवले जाई. सचिन आम्हाला सुरुवात चांगली करून देई पण नंतरचे आमचे गोलंदाज त्यावर पाणी फिरवीत. केतन बेलसरे हा नो बॉल टाकण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यानंतर समित वर्तक, संतोष पाटील, अक्षय सूर्यवंशी हे गोलंदाज गोलंदाजी करीत.  तर प्रतिस्पर्धी संघ १२ षटकात ७५ - ८० च्या आसपास मजल मारे. मग आम्ही पटकन सरदार पटेल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जावून पाणी पिवून येत असू आणि फलंदाजीला उतरत असू. गुण्या चेंडू तटवून एकेरी दुहेरी धावा काढण्यात पटाईत होता. मी ही तसे फारसे चेंडू वाया जावून देत नसे. परंतु अशा १० - १२ धावून काढल्यावर माझी दमछाक होई. मग मी धावा धावून काढण्याऐवजी एखादा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होई. मग नंतर समित, केतन, इम्रान आणि कप्तान सचिन मिळून आम्हाला धावसंख्येपर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. पहिल्या वर्षी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात तृतीय वर्षाच्या वर्गाशी आमचा सामना होता. त्यात निर्मल अरोरा हा प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज अगदी वेगवान गोलंदाजी करीत होता. ७६ धावांचा पाठलाग करताना ६ षटकात आम्ही १९ धावांचीच सलामी देवू शकलो. पाचव्या आणि सहाव्या षटकात बाद होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होतो. सहाव्या षटकाच्या शेवटी बाद झाल्यावर मी आणि संघाने सुटकेचा निश्वास टाकला.
मंगेश केळकर हा लॉंग ऑनला उभा असे. त्याने तिथे एकदा अगदी सीमारेषेच्या टोकाला सुंदर झेल घेतला होता. पहिल्या वर्षी फिरोज शेख आमच्या संघात होता. त्याने आमचा पहिलाच सामना जो दुसऱ्या का तिसऱ्या वर्षीच्या विद्युत शाखेच्या संघाशी होता तो एकदम बिकट परिस्थितीतून जिकून दिला होता. हा फिरोज तसा एकदम मन का राजा होता. पहिल्या वर्षीच्या सुट्टीत त्याला चित्रपट सृष्टीत शिरण्याचे वेध लागले. तो रणजीत स्टुडीओत जावून आला. त्यानंतर मला आणि संजेशला भेटून त्याने त्याची आगामी चित्रपटासाठी नायक म्हणून निवड झाल्याची खुशखबरी सुद्धा दिली. त्याच्या म्हणण्यानुसार आयेशा झुल्का त्याची नायिका असणार होती. त्यानंतर ना त्याचा चित्रपट आला ना तो कधी आम्हाला भेटला.
मी पहिल्या वर्षी सरदार पटेल कॉलेजच्या वसतिगृहात राहत असे. तिथे संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर शैलेश सापळे, संजय फडके, संजेश चौधरी (वसई), फिरोज आणि आमचा कंपू क्रिकेट खेळत असू. तिथेसुद्धा माझी होस्टेलच्या संघात निवड झाली. त्यावर्षी माझ्या बहिणीचे लग्न होते. विवाह सोहळा घरीच असल्याने धावपळ सुरु होति. होळीचा सण होता आणि मला अभ्यास करायचा असल्याने मी हॉस्टेलवरच थांबण्याचे ठरविले. होस्टेलवर होळी साजऱ्या करण्याच्या पद्धतीविषयी मी बर्याच गोष्टी ऐकून असल्याने मी सकाळीच माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तळमजल्यावर असलेल्या माझ्या खोलीच्या बाल्कनीतून उडी मारून गुपचूप येवून खोलीत बसलो. हद्द म्हणजे मी आंघोळ सुद्धा केली होती. सकाळी सात वाजता टोळी  सर्व खोल्यातील जनतेला उठविण्यास निघाली.झोपलेल्या अथवा झोपेचे सोंग घेतलेल्या मुलास खोलीबाहेर आणून त्याच्या अंगावरून थंड पाण्याची बादली ओतून त्याची झोप उडविली जात होती. प्रथम आलेल्या संतापाची मग खुन्नसने घेवून हा मुलगा तत्काळ बाथरूमकडे बादली भरण्यास धावे. अशा प्रकारे टोळीची संख्या फुगत चालली होती. कुलुपबंद खोलीतून मी हा सर्व प्रकार ऐकत होतो. काहीवेळाने टोळी माझ्या खोलीबाहेर आली. माझ्या खोलीला कुलूप पाहून अचंबा व्यक्त करण्यात आला. अरे आदित्य तर रात्री मेसमध्ये जेवायला होता, शैलेश बोलता झाला. अनुभवी टोळी होती ती! एका मिनिटात त्यातील दोघेजण गॅलरीतून डोकावते झाले. मग मला कुलूप फोडण्याची धमकी देण्यात आली. होळीचा दिवस असल्याने आणि त्यातील एकेकाचा इतिहास माहित असल्याने ह्या धमकीच्या खरेपणाविषयी संशय घेण्याचे काहीच कारण नव्हते. मी दरवाजा उघडल्यावर मला सन्मानपूर्वक होस्टेलच्या प्रवेशद्वाराशी नेण्यात आले. तिथे तीन चार बादल्या पाणी समोरील मातीत ओतून मला त्या चिखलात झोपविण्यात आले. त्यानंतरचे दोन तास मीही टोळीचा अग्रगण्य सदस्य बनून दंगा केला. हे थोडे विषयांतर झाले!
अशाच अजून सुट्टीच्या दिवशी मी अभ्यासाचा प्रयत्न करीत असताना शैलेश धावत आला. मागच्या D. N. नगरातील संघाने आम्हाला सामन्याचे आव्हान दिले होते. शैलेशसारख्याला हे आव्हान स्वीकारल्याशिवाय कसे राहणार? भवन्सच्या मैदानावर सामना सुरु झाला. मी आणि अमित माटी सलामीस गेलो. त्यादिवशी माझी फलंदाजी सुंदर होत होती. सरळ बॅटने सुरुवातीला एकेरी दुहेरी धावा काढल्यावर मी एक पॉईंटच्या डोक्यावरून चौकार मारला. त्याने आत्मविश्वास बळावल्यावर मी गोलंदाजाच्या डोक्यावरून दोन चौकार ठोकले. समोरून अमितही सुंदर फलंदाजी करीत होता. आम्ही सहा षटकाच्या आतच पन्नासची मजल मारली. मग मी वाहवत गेलो आणि लॉंग लेगला झेल देवून बाद झालो. आम्ही एकूण शंभरच्या आसपास मजल मारली . प्रतिस्पर्धी संघाला हे आव्हान काही झेपले नाही आणि आम्ही आरामात सामना जिंकला. सामन्याच्या गप्पा मारता मारता दुपारी अभ्यास केला पाहिजे हे मी ठरवीत होतो. साडे तीन वाजता स्वराज पुन्हा धावत आला. अरे वो लोग वापस आ गये हैं! नकार देण्याची सोय नव्हती. परंतु शत्रू मोठ्या तयारीनिशी आला होता. त्यांनी त्यांच्या संघात दोन तीन व्यावसायिक आणले होते. दुर्दैवाने नाणेफेक त्यांनी जिंकली. सुस्तावलेल्या आम्हाला त्यांनी ठोक ठोक ठोकले. त्यांनी सुद्धा शंभरच्या आसपास मजल मारली. तरीही सकाळच्या कामगिरीमुळे आम्ही आशावादी होतो. परंतु एक खतरनाक गोलंदाज सलामीला आला. त्याने पहिल्याच षटकात प्रथम माझी आणि मग अमितची यष्टी वाकवली. तंबूत सन्नाटा पसरला. परंतू शैलेश, स्वराजने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही लक्ष्य मोठे होते आणि हा सामना आम्ही वीसेक धावांनी हरलो. सुट्टीच्या दिवशी हॉस्टेलवर अभ्यासासाठी थांबण्यात काही अर्थ नाही हा धडा मी वरील दोन घटनांवरून शिकलो.
  

Tuesday, June 18, 2013

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार / फेररचना



सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना झाली आणि त्याबरोबर विस्तारही झाला.  ज्यावेळी अनेक पक्षांच्या पाठींब्यावर सरकार टिकून असते त्यावेळी सर्वांची मर्जी राखावी लागते. त्यामुळे असे बदल घडत असतात. ह्यातील काही मुख्य मुद्दे
१> एकूण मंत्र्यांची संख्या ७७ झाली असे वाचनात आले. खरोखर इतक्या मंत्र्यांची देशाला गरज आहे का? हा वादाचा मुद्दा
२> ही बातमी इंटरनेटवर वाचताना मंत्र्याची वये नजरेत भरली. ७१, ८६, ६९, ७८ ही काही प्रातिनिधिक वये. ह्या 'अनुभवी' मंत्र्यांना शपथ देणारे आपले ८० वर्षे वयाचे माननीय राष्ट्रपती 'प्रणवदा'. ह्या वयात हे मंत्री किती कार्यक्षम असणार हे आपण सर्व जाणतोच. बदलत्या काळानुसार मंत्रिपद भूषविण्यासाठी कमाल वयोमर्यादा ( ६५ ते ७०) ठरवून देणे आवश्यक करावे असे माझे मत आहे.
३> जातीचे राजकारणही पाहण्यात आले आहे. आणि मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत माघार घ्यावी लागलेले, आधीच्या विस्तारात नाराज झालेले अशा सर्वांची वर्णी आता लावण्यात आलेली आहे.
एकंदरीत काय तर युतीतील साथीदार पक्षांना, पक्षातील उपद्रवमूल्य जास्त असणाऱ्या मंत्र्यांना खुश ठेवण्यात हा विस्तार खर्ची पडला आहे. आता हा विस्तार झाला की त्याच्या अनुषंगाने मंत्र्यांना नवीन निवासस्थाने, गाड्या द्याव्या लागणार. ह्यावर लाखो रुपये खर्ची पडणार. पाच वर्षाच्या कालावधीत किती मंत्रिमंडळ विस्तार होवू शकतात ह्यावर कायद्याने काही मार्गदर्शक तत्वे तरी घालून द्यावीत.
हा पुढील सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा विस्तार ठरण्याची जास्त शक्यता असल्याने, भ्रष्टाचार, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्यांना कटाक्षाने दूर ठेवण्यात आले असावे. एकंदरीत काय आपण सर्वचजण शेवटच्या क्षणी जागे होतो, मग ती परीक्षा असो, कार्यालयातील काम असो वा तब्येतीची कुरबुर असो!
अजून एक मुद्दा, गेल्या काही दशकात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य खूप वाढले आहेत. प्रादेशिक विकासाच्या मुद्द्याला, प्रादेशिक भावनांना हे पक्ष प्राधान्य देतात. हे ठीक आहे परंतु त्याचबरोबर राष्ट्रीय हितासाठी प्रादेशिक पक्षांनी कोणती आचारसंहिता पाळली पाहिजे ह्यावर व्यापक स्वरुपात चर्चा होणे गरजेचे आहे.
भारत सध्या प्रगतीपथावर असल्याचे भासत असले तरी सर्वत्र तात्पुरत्या, कामचलावू उपायांचा वापर केला जात आहे. दूरदृष्टीचा जबरदस्त अभाव आहे. त्यामुळे जर का एखादी गंभीर समस्यांची मालिका अचानक उभी ठाकली तर आपली विकासाची सर्व गृहीतके कोलमडून पडू शकतात!

 

Friday, June 14, 2013

वसई एक चित्रमय प्रवास!



वसई एक सुंदर गाव होते. होते म्हणायचे कारण म्हणजे आता वसई शहर बनले आहे. महानगरपालिका आली आहे आमच्या वसईत. इमारती वाढल्या आहेत. आणि लोक आधुनिक बनायचा प्रयत्न करू लागले आहेत. असे असले तरी मुळचे आम्ही वसईकर जसे पूर्वी आहोत तसेच मनापासून आहोत. आणि वसईचा निसर्ग आपली हिरव्यागार अदाकारीने आम्हाला मोहवून टाकत असतो. अशाच आमच्या वसईतील निसर्गाची टिपलेली ही काही चित्रे!

सुरुवात करूया वसईच्या पावसाने! हा मुसळधार कोसळणारा पाऊस घरातून बघायला अगदी मस्त वाटतो.







 
पक्क्या वसईकराला अशा पावसात मावर (मासे) लागणारच. मासे नाही मिळाले तर सुक्क्याचे तर हवेच. अशा वेळी दारी कोळीण आली तर कोण आनंद!





पावसाळ्याच्या चार महिन्यात हा धो धो कोसळतो. पूर्वी शेतकरी असलेल्या कुटुंबात हे चार महिने एकदम गडबडीचे असायचे. आता उरल्या त्या आठवणी.

मग सप्टेंबर उजाडतो. पावसाने सर्व काही स्वच्छ धुवून काढलेले असते. बावखल कसे भरून गेले असते



पावसाळा स्थिरावला की तेरडा दिसू लागतो. ह्या तेरड्याचे वेगवेगळे प्रकार अहेत. त्यातील हा आपसूक उगवणारा गावठी तेरडा. ह्याचीच गौरी करून आमच्या घरी मांडतात.










गणपती गौरी येतात. वसईकर आपले घरगुती गणपती मोठ्या उत्साहाने साजरे करतात. म्हणता म्हणता सप्टेंबरही सरतो. ऑक्टोबर, नोवेंबर मध्ये हिरव्यागार वसईवर आपली किरणे फैलावणारा सूर्य आणि पावसाने धुवून निघालेल्या आकाशात रेंगाळणारे पांढरे ढग आणि आजूबाजूची हिरवी वृक्षवल्ली आपल्या मनाला  काही मनमोहक रूपांनी आनंदून टाकतात.



 

 

 

 


 

 


 


 

 





 

 



 
अशा आनंददायी वातावरणाने आनंदलेले हे बाल फुलपाखरू आपल्याच नादात अंगणात बागडत असते.




माझे आवडते झाड सुबाभूळ कसे चैतन्याने भरून गेले असते
 


मग प्राजक्ताचे झाड कसे मागे राहणार!


 
अशाच एका सूर्यप्रकाशाने न्हाउन निघालेल्या संध्याकाळी वसई किल्ल्याचा परिसर आपल्याला सुंदर रूपे दाखवितो




डिसेंबर - जानेवारीत आंब्याचा पहिला मोहोर मनाला सुखावून टाकतो.












माझ्या काकीला (मोठीआई) बागेतला कचरा पेटवून द्यायची खुमखुमी येते.




पोरांची मग ही धमाल होते!



 
नंतर मार्च - एप्रिल मध्ये मोठीआईने लागवड केलेले दुधी एकदम बहरतात







मग पुन्हा मे येतो आणि मग हे फुलांनी बहरलेले झाड



 

आणि हे एक मनोहर अननस




अशी ही एका वसईकराने टिपलेली वसईची काही मनमोहक रूपे! अजून कितीतरी नयनरम्य रूपांचा खजाना वसईत दडला आहे!