Thursday, January 31, 2013

सुमेर ग्रह


प्रस्तावना
ह्या कथेचा कालावधी, ठिकाण अज्ञात आहे. ही गोष्ट पृथ्वीवरील नाहीय. अंतराळातील कोण्या एका ग्रहावर अज्ञात कालावधीत मनुष्य सदृश्य प्राण्यांची वसाहत आहे. हा कालावधी भूतकाळातील आहे की भविष्यातील हे मलाही ठावूक नाही. मराठी भाषेतील कथा म्हणून पात्रांची नावे मराठी पण ती अर्थपूर्ण असतील किंवा नसतील आणि ते बोलतातही मराठी. कथा पूर्ण करीन ह्याची शास्वती नाहीय. कथेत सुसंगती लागेल ह्याची खात्री नाहीय. आपली काही मुलभूत गृहीतक असतात जसे निळे आकाश, पारदर्शक पाणी. ह्यातील काही इथे कधीतरी बरोबर असतील तर कधी नाही. कथेचा प्रत्येक भाग कसाही आणि कोठेही संपेल.
भाग १
सुमेर ग्रहावरील एका वसाहतीत सामक एका वृक्षाखाली पहुडला होता. एका अतिउंच पर्वत राजीच्या शिखरावरील भव्य पठारावर सामकाची वसाहत होती. नेहमीप्रमाणे बदलणाऱ्या आकाशाच्या रंगाकडे सामक निर्विकार पणे पाहत होता. पठाराची व्याप्ती फार मोठी होती. दहा हजारच्या आसपास गणकांची इथे वस्ती होती. पठार संपताच पर्वत राजीचा खोल उतार होता. पर्वत राजीचा हा उतार घनदाट जंगलाने व्यापलेला होता. ह्या पठाराच्या पलीकडील भागांविषयी गणकांचे ज्ञान मर्यादित होते. गणकांची स्मृती सुद्धा बदलती असायची. काहींना मागच्या काही दिवसांच्या आठवणी लक्षात असायच्या तर काहींना मागच्या काही जन्माच्या! सुमेर ग्रहाला दोन सूर्य होते. एक एकदम वक्तशीर होता चाळीस तासाच्या दिवसापैकी २४ तास आकाशात असायचा दुसरा मात्र आपल्या मर्जीनुसार आकाशात यायचा.
काही कालावधीनंतर सामक आपल्या वस्तीकडे परतला. गणकांचा एक मोठा समूह नृत्यात गुंतला होता. दुसरा एक समूह संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत गुंतला होता. दुसर्या सूर्याच्या बेभरवशाच्या कारभारामुळे रात्रीची खात्री नसायची.





 

Wednesday, January 30, 2013

मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्ग अपघात


डिसेंबर महिन्यात मराठी कलाजगताने आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे हे गुणी कलाकार मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अपघातात गमावले. त्यानंतरही हे द्रुष्ट चक्र कायम राहिले आहे. कालच एक बातमी वाचली की अक्षयचा भाऊ तन्मय आणि आनंद ह्यांची मुलगी सानिका ह्यांनी पुढे असे अपघात होऊ नयेत ह्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्यांचे हे प्रयत्न सफल होवोत अशी माझी मनापासूनची इच्छा!
ह्या संदर्भातील काही मुद्दे!
१> रस्ता दुभाजक कसे असावेत? - सिमेंट कॉंक्रिटचे दुभाजक उभारल्यास वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत होवू शकते आणि गाडी आदळून परत आल्यावर ती गाडी दुसर्या वाहनावर पुन्हा आपटून अजून एक अपघात होऊ शकतो. त्यामुळे ब्रायफेन रोप्स (हा काय प्रकार आहे हे मी जाणून घेतोय!) तंत्रज्ञान वापरण्याचा विचार केला जात आहे.
२> एक्स्प्रेस महामार्गावर प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या स्थितीची तपासणी करण्याची यंत्रणा आणि त्यासाठी खास परवाना असण्याची तरतूद.
३> एक्स्प्रेस महामार्गावर वाहन चालविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लायसन्सची तरतूद. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लेन कशा वापरायच्या ह्याचे खोल ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्वात उजवी लेन सर्वात जास्त वेगाने जाणार्या वाहनांसाठी आहे ह्याचे भान ह्या चालकास असावे. आपण जर गाडी वेगाने चालवत नसू तर गपचूप मधल्या किंवा डाव्या लेन मध्ये यावे. मागून वेगात येणाऱ्या चालकास वैतागवु नये. मुंबईत उजव्या बाजूने सायकल चालविणाऱ्या अनाडी लोकांना धडा शिकविण्याचा मार्ग अजून मला सापडला नाही. तसेच लेन (मार्गिका) बदलताना घ्यावी लागणारी काळजी (Blind Spot विषयीचे ज्ञान) हे ही आवश्यक आहे.
४> मद्यपी चालक ह्या महामार्गावर शिरूच शकणार नाही ह्याची कडक यंत्रणा!
आता हे सर्व उपाय लागू होण्यास काही काळ जाईल. तोवर ज्यांना बर्याच वेळा ह्या मार्गावरून जावू लागते अशांनी काय करावे?
१> रात्रीचा प्रवास जमेल तितका टाळावा! रात्री माणसांची जागरुकावस्था कमी असते आणि अधिक अनाडी चालक रस्त्यावर असतात. ह्यातील काही चालक संगणकातील गाड्यांच्या खेळांचा रात्री प्रत्यक्ष रस्त्यावर अनुभव घ्यायचा प्रयत्न करीत असतील असा माझा संशय आहे.
२> शक्यतो मोठ्या गाड्यांतून प्रवास करावा.
३> मागून वेगात येणारे वाहन दिसल्यास त्याला शांतपणे पुढे जावून द्यावे. त्याच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करून नये. त्याचप्रमाणे एखादे संथ चालक समोर असल्यास आपण चिडू नये.
बाकी मला ह्या महामार्गावर गाडी चालविण्याचा अनुभव नाही परंतु ज्यांचा आहे त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे असल्यास सर्वांसोबत वाटून घ्यावीत हीच विनंती!
इतके सर्व म्हटले तरी नशीब हा घटक तर असणारच! अजूनही अक्षयच्या दोन वर्षांच्या मुलाचे चित्र मात्र डोळ्यासमोरून जात नाही!

Sunday, January 27, 2013

बुद्धिभेद



हल्ली सर्वसामान्य लोकांचे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्यात माझाही समावेश आहे. विषय बर्याच वेळा भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, प्रदूषण, लग्नातील नातेसंबंध ह्याविषयी फिरताना आढळतात. पण प्रत्यक्ष कृती शून्य! क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!
त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील विषय हे राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीऐवजी ह्या विषयांभोवतीच घुटमळताना दिसतात. वर्तमानपत्र आणि केबल वाहिन्या ह्यांवरील ह्या समस्यांचे चित्रण थोड्या थोड्या कालावधीने फिरत असते. एक महिना भ्रष्टाचार मग प्रदूषण मग स्त्रियांवरील अत्याचार असे हे चक्र फिरत असते. त्यात आपण मध्यमवर्गीय गुरफटून जातो पुन्हा नवीन विषयाकडे आपले लक्ष वेधले जाते. मूळ समस्या तशाच राहतात. कोणीतरी चाणक्य बसला आहे तिथे आपला बुद्धिभेद करायला

 

Sunday, January 20, 2013

होळीबाजार - आनंदठेवा भाग २


विभक्त कुटुंबपद्धतीचा मोठा फटका नवऱ्यांना बसला. एकत्र कुटुंबात सतत उपलब्ध असणाऱ्या आई वडिलांचे संरक्षक कवच काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे नवरे लोकांना उत्क्रांतीमधून जावे लागले. अमेरिकेत जाऊन राहिलेल्या लोकांवर अजून दुर्धर प्रसंग ओढविला. मुलांना सांभाळणे, स्वयंपाक करणे, यंत्राने घर साफ करणे, भाजी आणणे असे कामाचे अनेक पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आले. आपआपल्या आवडीनुसार नवऱ्यांनी त्यातील काही कामांची निवड केली आणि वेळ निभावून नेली. त्यातील काहीजण परत भारतात आले. त्यावेळी अमेरिकेत अंगी लागलेल्या सवयी एकदम झटकून देणे त्यांना कठीण गेले. आता नवऱ्या-बायकोचे घरगुती कामाच्या बाबतीतील संबंध तसे मजेशीर असतात. ह्या बाबतीत बायकांचा शब्द प्रमाण मानण्याची बर्याच घरात पद्धत असते. त्याच प्रमाणे नवरे एकंदरीत कॉमनसेन्सच्या बाबतीत मठ्ठ असतात असा बर्याच घरात समज असतो. तुम्हास आश्चर्य वाटेल पण हा समज निर्माण करण्यात नवर्यांचा मोठा हात असतो. एकदा आपल्या नवर्याला मठ्ठ ठरविले (म्हणजेच आपणास चतुर), की बायकांच्या अंगात विलक्षण उत्साह संचारतो आणि त्या घरकामे हा हा म्हणता उरकून टाकतात. आता भारतात परत आल्यावर मुलांना सांभाळणे आणि घरसफाई ह्या दोन कामांचा धोका थोडा कमी झाला. राहता राहिली ती स्वयंपाक आणि भाजी आणणे. अमेरिकेत बायका नवर्याच्या हातचा स्वयंपाक खातात कारण तिथे सहज पर्याय नसतो. इथे परतल्यावर त्यांच्या अपेक्षा उंचावितात आणि त्याला तडा जाणारी कामगिरी एक दोन वेळा पार पाडली की हा धोका कायमचा नष्ट होतो. थेट नकार देण्यापेक्षा हा शांततामय उपाय केव्हाहि चांगला. राहता राहिले ते भाजी आणण्याचे काम!
वसईचा होळीबाजार हा ताज्या भाजीसाठी एकदम प्रसिद्ध! आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी कुटुंबातील प्रामुख्याने स्त्रिया आपल्या वाडीतील ताजा भाजीपाला घेवून इथे भल्या पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल होतात. ह्यात पालेभाज्या, दुधी, वांगी, गवार, कोबी, फ्लॉवर, पडवळ, शिराळा, गलका अशा नानाविध भाज्यांचा समावेश होतो. आमचे आधीच्या पिढीपर्यंत शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब, त्यातील आई वडील, काका, काकी ही मंडळी सुद्धा केळीचे लोंगर घेऊन अधून मधून येतात. सकाळच्या प्रसन्न वेळी हा बाजार कसा गर्दीने भरून जातो. भाज्यांचे भावही अगदी स्वस्त असतात. पालकाच्या जुड्या कधी पाच रुपयाला दोन, उन्हाळ्यात १० रुपयाला दोन दुधी अशा अगदी स्वस्त दरात भाज्या उपलब्ध असतात. भाजीचे हे भाव बघून ह्या बिचार्या विक्रेत्या स्त्रियांना काय फायदा होत असेल असा विचार मनात डोकावतो. परंतु ह्या स्त्रिया स्वाभिमानी असतात. आपण एखाद्या भाजीचे ५ - १० रुपये जास्त देऊ केले तर 'तुझ्या पाच रुपयाने मी काय श्रीमंत होणार नाही' असे सुनावून त्या ती नोट परत करतात. मी ह्या बाजारात सहसा भाजीचे भाव करीत नाही. घरी आल्यावर मला किती रुपयाला भाजी आणली हे विचारायचे नाही हा आमचा अलिखित नियम. दहा रुपयाला ओल्या कांद्याच्या दोन जुड्या असा भाव मला सांगताच मी थोडी घासाघीस करीन अशी समोरच्या भाजीवालीची अपेक्षा पण मी सरळ दहा रुपये देवून निघून जाताच, लगेच माझ्या मागे धावत येवून पिशवीत अजून एक जुडी टाकणारी भाजीवाली फक्त इथेच मिळू शकते. बाकी मला साठ वर्षांच्या वरील भाजी विक्रेत्या प्रेमाने अंकल हाक मारतात तेव्हा हल्ली मी जास्त राग मानीत नाही. उलट मला अंकल आठवतो.
होळीच्या आसपास राउत, घरत ही मोठी कुटुंबे. त्या कुटुंबातील बरीच माणसे सकाळी बाजारात दिसतात. त्यामुळे आपल्या सामान्यज्ञानात भर पडते. एकंदरीत नात्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत माझी बोंबच! पण सतत इथे लोकांना बघून माझी थोडीसुधारणा झाली आहे. आज भाई (माझ्या वडिलांचे टोपण नाव) नाही आले वाटते, असे सुरुवातीला मला विचारले जायचे परंतु आता त्यांनाही मला आणि बायकोला बाजारात बघण्याची सवय झाली आहे. समाजातील ताज्या बातम्याही इथे मिळतात, कोणाला प्रशीलच्या दवाखान्यात दाखल केले, कोणाच्या नणंदेच्या दिराचे चिंचणीला लग्न जमले ह्या सर्व बातम्या इथेच मिळू शकतात. लोंगर किती रुपयाला द्यायचे ह्याविषयी आई बाकीच्या ओळखीच्या लोकांशी सल्लामसलत करून मगच उत्तर भारतीय घाऊक विक्रेत्याला विकते. तो पर्यंत वडील बाहेर स्कूटर पार्क करून स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटनांवर आपल्या मित्रांसोबत आपली मते नोंदवीत असतात. बाजार संपला की लक्ष्मीविलास, भगवतीविलास मधील गरमागरम वडे आणि जिलब्या ह्यांचा आस्वाद घ्यायला पावले आपसूकच वळतात. आठ वाजता मग हा शेतकऱ्यांचा होळी बाजार आटोपतो आणि मग व्यावसायिक विक्रेते हीच भाजी चढ्या दराने बाजूच्या मार्केट मध्ये विकू लागतात.
मध्येच एकदा वडिलांना शंभर रुपये गड्याला देऊन सकाळच्या थंडीत उठून दीडशे रुपयाचे लोंगर विकण्याचे अर्थशास्त्र समजून देण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले हे अर्थशास्त्राच्या पलीकडचे आहे. मग मला संगत लागली ती ह्या लोंगर किंमतीमागची, पाच रुपयातल्या पालकाच्या २ जुड्यांची. हा असतो इथल्या लोकांचा आनंदठेवा. समाजाशी असलेला त्यांचा संवाद. पैश्याने भले हे लोक श्रीमंत नसतील पण हा बाजार त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो. इथे येणारा माणूस प्रसन्न होऊनच जातो. इथल्या लोकांपैकी कोणी जास्त तणावात असतील असे मला वाटत नाही. असे हे होळीबाजार टिकविणे आपले कर्तव्य आहे.

Saturday, January 19, 2013

फ्लोरिडातील आक्रमक पक्षी ते बोरिवलीतील चिमणी घरटे

 



२००३ सालची गोष्ट. कंपनीने माझी फ्लोरिडात कामानिमित्त नेमणूक केली होती. मी सहकुटुंब गेलो होतो. अमेरिका हा देश तसा राहण्यासाठी उत्तम परंतु नव्याने जाऊन राहणाऱ्या माणसांना सुरवातीच्या कालावधीत काही कठीण गोष्टींचा मुकाबला करावा लागतो. जसे की क्रेडीट हिस्टरी नसल्याने क्रेडीट कार्ड न मिळणे, स्वतःचे घर लगेच मिळते परंतु ते पूर्णपणे रिकामी असणे वगैरे वगैरे. त्यात अजून एका बाबीचा समावेश करता येईल आणि ती म्हणजे स्वतःचे वाहन आणि लायसन्स मिळण्यास वेळ लागणे.



थोडे विषयांतर, अमेरिकेत एकोणीसशे साठ - सत्तरीच्या आसपास स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या जीवनावर अपर्णा वेलणकर ह्यांचे एक सुंदर पुस्तक 'फोर हिअर ओर टू गो' हे मी माझ्या मित्राच्या शिफारसीमुळे वाचले. मध्यमवर्गातून आर्थिक अडचणीचा मुकाबला करणारी मराठी पिढी हिम्मत करून अमेरिकेत पोहोचते. कष्ट करण्यास बिलकुल मागे न पाहणाऱ्या ह्या पिढीच्या विविध यशोगाथा लेखिकेने समर्थपणे रेखाटल्या आहेत. ह्यात जसे नोकरीत यशस्वी झालेले लोक आहेत तसे व्यवसायातील सुद्धा. नियमाला अपवाद म्हणून अमेरिकेत व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी झालेल्या कुटुंबाची कथाही लेखिकेने वर्णिली आहे. मुले मोठी होतानाची ह्या पिढीचा मानसिक संघर्षही आपल्याला वाचायला मिळतो. लक्षात राहिली ती एका अत्यंत यशस्वी व्यावसायिकाच्या पत्नीने लेखिकेकडे व्यक्त केलेली खंत! सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात नवरा एकदम साधा, रसिक होता. परसदारी मोगरीचे रोप लावून पहिल्या घरात गृहप्रवेश करण्याइतका रसिक. पुढे मात्र तो हरवतच गेला तो त्याच्या स्वप्नात, आणि त्याच्या महत्वाकांक्षेत! हे सारे यश तर मिळाले परंतु माझ्यासाठी त्याला कधी वेळच मिळाला नाही. माझ्या मर्यादित वेगात मी मात्र तशीच राहिले. फरफटल्यासारखी त्याच्यामागे ओढली गेले. आता तो थोडा स्लो डाउन करतोय, घरात वेळ काढतोय परंतु आता आमच्या तारा का कोणास ठाऊक जुळतच नाहीयेत! बघा जमले तर पुस्तक मिळवून वाचा!



असो तर माझ्या अशा सुरुवातीच्या दिवसात मी बसने ऑफीसला जायचो. अमेरिकत बसने प्रवास करणारे लोक फार कमी. तर बस थांबा आणि ओफीस ह्यामध्ये काही अंतर होते. वेस्टन इथल्या ह्या ऑफीसच्या आसपास दाट झाडी होती. दुसर्याच दिवशी डोक्याच्या जवळून एक मोठा पक्षी (कावळ्याच्या दुप्पट आकाराचा) गेल्याचा भास झाला. योगायोगाने तो उडत गेला असेल अशी मी समजूत करून घेतली. दुसर्या दिवशीही तोच प्रकार. मग मी हळूच नव्याने ओळख होत असलेल्या सहकार्यांकडे हा विषय काढला. त्यावेळी एक आश्चर्यकारक सत्य पुढे आले हे पक्षी आपल्या विणीच्या मोसमात आपल्या लहान पिल्लांविषयी अत्यंत जागरूक असतात. रस्त्याने मनुष्य क्वचितच जात असल्याने त्यांना मनुष्यांची सवय नसते. त्यामुळे हे कधीतरी जाणारी माणसे आपल्या घरट्यावर हल्ला तर करणार नाहीत ना ह्या भीतीने ते माणसांवर हल्ला करतात. त्यानंतरचे अजून एक दोन आठवडे मी बसने प्रवास केला तेव्हा कधी लांबचे वळण घेवून तर कधी डोक्यावर छत्री घेवून मी दिवस काढले.



ह्यावर्षी बायको आणि मुलाने चिमणीघरटे आणून बोरिवलीच्या घरी बसवायचा हट्ट धरला. घरटे आणून बसविणार्या माणसाने आम्हास व्यवस्थित समजाविले. पावसाळ्यात चिमण्या काही ह्यात येणार नाहीत. पावसाळा संपल्यानंतर त्या बहुदा येतील. मुलगा बराच अधीर झाला. चिमण्या बर्याच वेळा घरट्यात डोकावून जायच्या पण नंतर काही दिवस गायब व्हायच्या. नाताळच्या सुट्टीत आम्ही बोरिवलीला नव्हतो आणि परत आल्यावर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. चिमण्यांचे एक पूर्ण कुटुंब (मुलाच्या भाषेत टकलू पिल्लांसाहित) वास्तव्यास आले होते. ह्या आठवड्यात मुंबईत पडलेल्या मस्त थंडीच्या अशाच एका प्रसन्न सकाळी आई बाबा चिमणीचा काढलेला हा फोटो.




Thursday, January 17, 2013

जिद्दी लढवय्या सौमिक चटर्जी



बहुतांशी भारतीय लोक क्रिकेटचे चाहते असतात. त्यातील बरेचजण कडवे चाहते असतात. लोकांचा क्रिकेटमधला रस विविध कारणांसाठी असतो. काहीजण विशिष्ट संघाचे चाहते असतात, IPL नंतर चाहत्यांचा हा वर्ग थोडा गोंधळून गेला आहे. काहीजण विशिष्ट खेळाडूंच्या खेळाचे चाहते असतात. तर काही महिला चाहत्या विशिष्ट खेळाडूंच्या चाहत्या असतात. माझ्या माहितीतला असा सद्यकालीन खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. असे खेळाडू सामान्य पुरुषवर्गाच्या मनात असूया निर्माण करतात. काही चाहत्यांना क्रिकेटच्या आकडेवारीत बराच रस असतो. अमोल मुझुमदार हा रणजी मधला सर्वकालीन अधिक धावा जमविणारा खेळाडू आहे कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर हे चाहते छातीठोकपणे देऊ शकतात.
मी १९८५ च्या अझहरच्या खेळाचा, १९९६ मधील विश्वचषक स्पर्धेतील सचिनच्या खेळाचा चाहता होतो. ipl येण्याआधी मी भारतीय संघाचा जबरदस्त चाहता होतो. परंतु माझा मुख्य प्रकार क्रिकेटच्या आकडेवारीचा! १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत विन्स्टन डेविसने ५१ धावात ७ बळी घेतले किंवा पाकिस्तानच्या जलालुद्दीनने एक दिवसीय सामन्यात पहिली HATTRIK घेतली हे मला लहानपणापासून लक्षात ठेवायला आवडते. बाकी HATTRIK ला मराठी प्रतिशब्द शोधायला हवा. पूर्वी क्रिकेट जरा कमी खेळले जायचे तेव्हा ही आकडेवारी लक्षात ठेवायला सोपे जायचे. आता कसं, जवळजवळ दर वर्षी ऑस्ट्रेलिया संघ भारतात येतो आणि भारतीय संघ लंकेत जातो. त्यामुळे २००७ च्या भारताच्या लंका दौऱ्यात काय झाले आणि २००९ मध्ये काय झाले हे लक्षात ठेवायला बराच गोंधळ उडतो.
क्रिकेटच्या चाहत्यांचा अजून एक प्रकार म्हणजे ते रणजी सामने भक्तिभावाने FOLLOW करतात. FOLLOW ला सुद्धा मराठी शब्द हवा. अशा चाहत्यांसाठी क्रिकइन्फो हे संकेतस्थळ म्हणजे देवघर आहे. भारतीय घरगुती हंगामातील १९०० सालापासूनच्या सामन्यांची आकडेवारी त्यांनी उपलब्ध ठेवली आहे. त्यामुळे गावस्कर रणजीमध्ये सुद्धा कसा दादा होता हे आपण तिथे जाऊन पाहू शकतो. मुंबई दिल्ली ह्यांच्यातील अंतिम सामना म्हणजे पूर्वी पर्वणी असायची. दोन्ही संघाचे पहिले डाव सुद्धा पाच दिवसात पूर्ण व्हायचे नाहीत. एकदा बहुदा त्यांनी सहा दिवसांचा अंतिम सामना ठेवला होता. एकदा संदीप पाटील खेळत असताना संध्याकाळी सात वाजेपर्यंत अंधार पडेपर्यंत सामना चालू राहिला आणि मुंबईने तो अगदी जरया करता सामना हरला. ९० च्या आसपास कपिलच्या हरयाणाने मुंबईला अंतिम सामन्यात एका धावेने हरविले ह्याचे अजूनही मला वाईट वाटते. पूर्वी मुंबई ब वर मुंबईच्या रणजी सामन्यांचे धावते वर्णन असायचे आणि पुणे केंद्रावर महाराष्ट्राच्या सामन्यांचे! राजू भालेकर आणि मिलिंद गुंजाळ हे फार मोठे खेळाडू आहेत असा हे धावते वर्णन ऐकून झालेला समज अजूनही कायम आहे. बाकी मराठी समालोचना मुळे झालेला एक विनोद मी लहानपणी ऐकला होता. तो खरा की काल्पनिक हे माहित नाही. 'यष्टीरक्षकाने गलथान पणा दाखविला आणि त्यामुळे जिथे प्रतिस्पर्धी संघाला एकही बाय मिळाली नसती तिथे चार बाया मिळाल्या!
असो स्टार क्रिकेट रणजी सामन्याचे हल्ली थेट प्रक्षेपण करते. मी ते घरी शांतताभंग होणार नाही ह्याची काळजी घेत बघतो. तसा माझा मित्र चारुहास खामकरहि पाहतो. मुंबईने मध्य प्रदेशला गेल्या महिन्यात ६ धावेने हरविले त्यावेळी आमच्या दोघांचा आनंदाने कंठ दाटून आला. बाकी आर्थिक सुबत्तेने भारतीय मैदाने आता हिरवीगार झाली आहेत त्यामुळे सामना बघण्यास खूप मजा येते. मध्य प्रदेशचा पांडे हा गोलंदाज पुढे चमकेल ह्याचा मी आणि चारू ह्यांच्यासारख्या स्वयंघोषित जाणकार लोकांना आत्मविश्वास आहे. काल मुंबईच्या आदित्य तरे आणि पूर्वीचा होतकरू खेळाडू अजित आगरकर ह्यांनी सेनादलाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद शतके झळकविली. क्रिकेट कसा खेळ आहे पहा ना, आगरकरचे ह्या पूर्वीचे एकमेव प्रथम श्रेणीतील शतक क्रिकेटच्या मक्केवर लॉर्डसवर होते. आणि मुंबईच्या संघातील दुसरा महान खेळाडू सचिन ह्याला मात्र लॉर्डसवर शतक नोंदविता आले नाही.
रणजीच्या उपांत्यपूर्व एका सामन्यात सेनादलाने उत्तर प्रदेशचा अनपेक्षितरित्या पराभव केला. उत्तर प्रदेश संघाने साखळी सामन्यात निर्विवादपणे वर्चस्व गाजविले होते आणि ते ह्या उपांत्य सामन्याचे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. परंतु सेनादलच्या गोलंदाजांनी कमाल करून उत्तर प्रदेशला रोखले. तरीही चौथ्या डावात शंभरच्या आसपासचे लक्ष्य गाठताना सेनादलाची ५ बाद ५४ अशी नाजूक स्थिती झाली होती. त्यावेळी त्यांचा लढवय्या कप्तान सौमिक चटर्जी ह्याने जखमी अवस्थेतही उत्तर प्रदेशच्या संघाच्या गोलंदाजांना रोखून धरले. रनर बहुदा मिळाला नसावा त्याला, हल्लीच्या बदलेल्या नियमांमुळे. परंतु तो धावला, त्यांच्यावर गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा मारा केला तर त्याने त्या चेंडूंना सीमापार भिरकावून दिले. अशा जखमी अवस्थेत त्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. अशा ह्या सेनादलाच्या जिद्दी खेळाडूला माझा सलाम.
आजचा हा ब्लॉग एकूणच भारतीय सेनादलाच्या जिद्दी जवानांना समर्पित. देशाने आदर्श ठेवायचे असतील, तर ह्या जिद्दी जवानांचे ठेवावेत!

 

Monday, January 14, 2013

आनंदठेवा!



हल्ली वसईत दोन तीन लग्नाला हजर राहिलो. पूर्वी मी लग्नाला जायला उत्सुक नसायचो. परंतु मग मला बऱ्याच गोष्टी समजावण्यात आल्या. जसे की प्रत्येक घराचा एक प्रतिनिधी गावातील लग्नाला उपस्थित असला पाहिजे. ही झाली आपली कौटुंबिक जबाबदारी. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे मांडवाला शोभा आणण्यासाठी पुरुष उपस्थित हवेत. पुरुषांनी फक्त मांडवात जाऊन बसायचे. मग जे गावात चर्चा करणारे लोक असतात ते म्हणतात 'लग्नाला एवढा लोक आलेला, एवढा लोक जेवला' वगैरे वगैरे..तर ही झाली सामाजिक जबाबदारी. आपली सामाजिक जबाबदारी कोणती आणि ती आपणास पार पाडावयास हवी ह्याचे भान प्रत्येकास वेगवेगळ्या वेळी येते. मला ते थोडे उशिराने आले असो. तर असे मुद्दे ऐकल्यावर मी सुधारलो आणि आता लग्नाला जमेल तसे जातो. तरी जिच्या मुलाच्या लग्नाला मला उपस्थित राहता आले नाही अशा एका आत्याने मला शनिवारच्या लग्नात जोरदार ओरडा दिला. हल्ली कोणी हक्काने ओरडले की बरे वाटते, त्यामुळे मी दोन तीनदा तिच्यासमोर गेलो. तिसऱ्या वेळी मात्र ती शांत झाल्याने मी थोडा निराश झालो.
एकंदरीत शनिवारच्या लग्नात मस्त वातावरण होते. वसईची थंडी एकदम जोरात नसली तरी वातावरणात सुंदर गारवा होता. वाडीच्या भागात मोठा प्रशस्त मंडप उभारण्यात आला होता. शनिवारीची रात्र असल्याने सर्वजण फुरसतीत होते. प्रशस्त मंडपामुळे गर्दी विभागली गेली होती. पाटील कुटुंबियातील बरीच मंडळी ह्यावेळी भेटली. गावातील लोकांचे (आणि हल्ली माझेही) बरे असते त्यांना जीवनात आनंदी होण्यास फारसे काही लागत नाही. ओळखीची चार माणसे भेटली आणि त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या की बरेच दिवस पुरणारा आनंदठेवा मिळतो. आणि ह्या गप्पांमध्ये बढाईचा लवलेशही नसल्याने आपण मोकळ्या मनाने गप्पा मारू शकतो.

एकंदरीत काय वयानुसार माणसाच्या आनंदाच्या संकल्पना बदलू लागतात. हळू हळू मी ही सामाजिक प्राणी बनू लागलो आहे. परंतु वयानुसार बदलण्यातच खरी मजा असते हे हल्ली मला हळू हळू जाणवू लागले आहे.
 

Sunday, January 13, 2013

अर्जुनाची निवड.


महाभारतातील एक गोष्ट. अर्जुन आणि एकलव्य दोन्ही निष्णात धनुर्धर. त्यावेळचे नावाजलेले गुरु द्रोणाचार्य एकलव्याचे धनुर्धारी क्षेत्रातील नैपुण्य पाहून चिंतीत होतात आणि त्यानंतरची गोष्ट आपल्या सर्वांना माहितच आहे. शेवट असा होतो की अर्जुन हा पुढील स्पर्धांसाठी निवडला जातो तो त्याच्या घराणेशाही मुळे. त्याचे एकलव्यासारखे त्याच्या इतकेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी केवळ राजघराण्यातील नसल्याने डावलले जातात.

निरीक्षण असे की एकलव्य आजही आहेत. मुंबई रणजी संघाच्या १४ वर्षे खालील संघाच्या निवडीने प्रभावित अनामिक एकलव्या, तुझ्यासाठी हे सहानभूतीचे दोन शब्द!
 

Thursday, January 10, 2013

दिल्लीतील दुर्देवी घटना



गेल्या महिन्यात दिल्लीतील घडलेल्या दुर्देवी घटनेबद्दल बऱ्याच जणांनी लिहिले. त्यातील काही मुद्दे मला वेगळे वाटले. त्यांचा हा संक्षिप्त आढावा.
१> दिल्ली शहराची संरचना - लेखकाच्या म्हणण्यानुसार दिल्लीची जी गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे त्यात लांबलचक पसरलेले रस्त्यांचे जाळे आहे. ह्या रस्त्यांच्या आजूबाजूचा बराचसा भाग अजूनही मोकळा आणि निर्जन आहे. रस्त्याच्या नाक्यावरील किराण्याचे दुकान, रस्त्यावरील वर्दळ हा प्रकार तिथे अस्तित्वात नाही. रस्त्यावरील कान आणि डोळे उपस्थित नसल्यामुळे रात्री एकट्या स्त्रियांसाठी असा भाग धोक्याचा ठरू शकतो. अमेरिकतही अशी स्थिती आहे पण तिथे बहुतांशी लोकांकडे स्वतःची वाहने असल्याने तुम्ही सामान्य परिस्थितीत बर्यापैकी सुरक्षित असू शकता. माझे म्हणणे - थोडक्यात काय तर भारतातील शहरे हळू हळू फक्त श्रीमंत लोकांसाठी राहण्यायोग्य बनू लागली आहेत. अशा शहरात राहण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक ताकद असणे आवश्यक असते. अन्यथा तुम्हाला दुष्कर जीवनाचा मुकाबला करावा लागतो. जर तुमच्याकडे आर्थिक ताकद नसेल तर तुम्हाला खूप सतर्क राहावे लागते. एखाद्या शहरातील सुरक्षित ठिकाणे, वेळा ह्याची प्रथम माहिती करून मगच तिथे जाण्याचे धाडस करावे.
२> उत्तर भारतीय पुरुषांची मानसिकता - उत्तर भारतातीलच एका कवी / लेखकाने हा काहीसा चाकोरीबाहेरचा विचार मांडला. तो म्हणतो की उत्तर भारतीय पुरुषांनी बरीच वर्षे परकीयांचे आक्रमण सहन केले, फाळणीचा मोठा फटकाही त्यांना बसला. ह्या दोन्ही प्रकारात त्यांनी आपल्या नातलग स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचा विदारक अनुभव घेतला. ह्या अनुभवांमुळे त्यांच्या मनात एक प्रकारची कटुता निर्माण झाली. आपल्या कुटुंबावर ओढविलेल्या दुर्धर प्रसंगाला स्त्रिया जबाबदार आहेत अशी काहीशी मानसिकता त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या मनातील स्त्रियांविषयीची आदरभावना नष्ट झाली आहे. त्यांची ही मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशाची गरज आहे असे त्याचे म्हणणे होते. प्रथम दर्शनी मी हे म्हणणे अजिबात स्वीकारले नाही. परंतु नंतर मात्र ह्या विचाराचा थोडा खोलवर जाऊन विचार करावा असे मला वाटले. त्यावर पुन्हा कधीतरी.
आता माझे काही म्हणणे. स्त्रियावर अत्याचार करणाऱ्या भारतातील लोकांचे मानसिकदृष्ट्या आधुनिकता स्वीकारलेले आणि न स्वीकारलेले असे दोन प्रकार आहेत. मानसिक आधुनिकता स्वीकारलेले लोक प्रथम आपल्या लक्ष्याला वश करून घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यात यश न आल्यास मग ते निषिद्ध मार्ग अवलंबितात. शहरातील स्त्रियांचा मुख्य प्रश्न म्हणजे त्यांना सार्वजनिक जीवनात मानसिक दृष्ट्या मागासलेल्या पुरुषवर्गाचा बऱ्याच वेळा सामना करावा लागतो. स्त्रियांच्या आधुनिक पेहरावाचा, बोलण्या चालण्याचा ते वेगळा अर्थ घेतात. त्यांच्याशी सामना करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहावे लागेल.
एकंदरीत काय तर एक तर आर्थिक दृष्ट्या खूप सबळ बना आणि तसे जमत नसेल तर मग सार्वजनिक जीवनात खूप सतर्क राहा. एखाद्या समाजातील सर्वात दुर्बल घटकाच्या स्थितीवरून त्या समाजाच्या परिस्थितीचा अंदाज बांधायचा झाल्यास आपली स्थिती झपाट्याने ढासळत चालली आहे हे मात्र नक्की.

Tuesday, January 8, 2013

पट मांडला - अंतिम भाग



निवेदन
ही कथा अचानक आटोपती घेतोय. मागचे काही भाग मनासारखे झाले नाहीत. कथानकातील रंगत काही वाढली नाही. वाचकसंख्या कमी होऊ लागली. एकंदरीत संदेश लक्षात घेऊन ही कथा / किंवा हे पर्व आज संपवतोय. पूर्ण कथा काही लिहित नाहीये. पण पुढील प्रमुख घटना अशा!
  1. आश्लेषा आणि संपत ह्यांची जुनी मैत्री भाऊरावांना समजते. तिला विपर्यस्त रूप देण्याचा ते आणि त्यांचे हस्तक प्रयत्न करतात. त्यामुळे संपतरावांच्या संसारात थोडे वादळ निर्माण होते. आपल्या मुलीच्या संसाराला वाचवायला विश्वासराव पुढे सरसावतात. भाऊरावांना ते वेळीच आवरतात.
  2. जाधवांचे फासे हळू हळू भाऊरावाभोवती पडतात. शेवटचा प्रयत्न म्हणून भाऊराव विश्वासरावांना त्यात अडकवायचा निष्फळ प्रयत्न करतो. त्यात यश न आल्याने भाऊरावास तुरुंगात जावे लागते.
  3. संपतराव अपेक्षेनुसार निवडणूक जिंकतो.
  4. निवडणुकीत कोणत्याही पक्षास निर्णायक बहुमत मिळत नाही. तरुण संपतरावांना आणि १० आमदारांच्या एका गटास फोडण्यास अण्णासाहेबास यश येते. ह्याचे पारितोषिक म्हणून संपतरावाचा मंत्रिमंडळात आश्चर्यकारकरित्या समावेश होतो. आणि अशा प्रकारे ह्या पर्वाचा गोड शेवट होतो.
lessons learned (ह्या प्रयत्नातून शिकलेले धडे)
  1. कथेचा मुख्य बिंदू जिथे भाऊरावांच्या हस्तकांकरवी विजयरावांचा अपघाती खून होतो हे फारसे काही पटण्याजोगे नव्हते.
  2. कथेत रहस्य निर्माण करण्यात अपयश आले. सर्व काही कथेत आधीच अप्रत्यक्षपणे सांगून टाकण्यात आले.
  3. राजकीय वातावरणाची खोलवर निर्मिती करण्यात अपयश आले.
दुसरे पर्व (पुढील वर्षी ह्याचा प्रयत्न करीन)
  1. पक्षाचे युवा नेते मुकुल ह्यांच्या आशीर्वादाने संपतराव पुढे येतात. १० वर्षात मुख्यमंत्री आणि अजून ५ वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होतो. दुसर्या पर्वात ह्याचे वर्णन असू शकते.
 

Monday, January 7, 2013

व्यावसायिक दुष्परिणाम आणि मराठी मालिकेतील कलाकार



प्रत्येक व्यवसायाची चांगली तशी वाईट बाजूही असते. आपण ज्या व्यवसायात असतो तिची वाईट बाजू आपल्यास सतत दुःख देत असते आणि दुसर्यांच्या व्यवसायातील चांगल्या बाबींचा आणि त्या दुसऱ्याचा आपण हेवा करीत राहतो. उदाहरण द्यायची झाली तर माहिती आणि तंत्रज्ञान व्यवसायातील लोक बक्कळ पैसा कमवितात असे बाकीच्यांना वाटते परंतु त्या व्यवसायातील लोकांनी अकाली पिकेलेले केस, पडलेले टक्कल, सुट्टीच्या दिवशी संगणकावर बसल्यावर बायकोने केलेली कटकट ह्यांचा सामना करावा लागतो. डॉक्टर लोकांना बाकीचे लोक, नातेवाईक वेळी अवेळी फोन करून सतावतात. क्रिकेटर लोकांना आपल्या कुटुंबियांसमवेत कमी वेळ मिळतो, ते आपल्या मुलांच्या बालपणाला मुकतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना दोन पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो, तर फक्त गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना समाजमान्यता कमी प्रमाणात मिळते आणि त्यांना लवकर वैफ़ल्य येवू शकते. नवलेखकांची बाकीचे लोक टर उडवितात तरीही त्यांना आपला दांडगा आत्मविश्वास कायम ठेवावा लागतो वगैरे वगैरे..ही यादी न संपणारी आहे.
आज हा विषय सुचायचे कारण म्हणजे त्या दिवशी झी मराठी वाहिनीवर बघितलेला वार्षिक गौरव समारंभ! रविवारी संध्याकाळी असे गौरव समारंभ मी आवर्जून पाहतो. सगळे कसे चकचकीत आणि सुंदर असते. सेट, निवेदक, मंचावर येवून आपल्या कला सादर करणारे कलाकार आणि प्रेक्षक वर्गही. आयुष्यातील सर्व समस्या माझ्याभोवती रविवारी संध्याकाळी पिंगा घालायच्या. तशा अजूनही घालतात, पण असे गौरव समारंभ बघितल्यावर मात्र माझे मन गोंधळून जाते. बघ जग कसे सुंदर आहे, जगात कसा आनंद आहे आणि तू वेडा समस्यांचा विचार करीत बसला आहेस. असे मनाला गोंधळून टाकल्यावर रविवार संध्याकाळ निघून जाते.
असो लेखाचा विषय थोडा बाजूला पडला. त्या वार्षिक गौरव समारंभात होणाऱ्या अनेक नृत्यांमधील काही नृत्यांत मला कुलवधुची नायिका पूर्वा गोखले, कळत नकळत ची नायिका ऋजुता देशमुख दिसल्या. गेल्या वर्षी एकदम प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या ह्या नायिका आज फारशा कोठे दिसत नाहीत. मग आठवला तो आपली डॉक्टरकी सोडून पूर्णवेळ अभिनयात शिरलेला निलेश साबळे आणि त्यानंतर कुंकुची गुणी नायिका मृण्मयी देशपांडे. ही सर्व गुणी कलाकार मंडळी, पण सतत नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या मराठी वाहिन्यांच्या धोरणामुळे ही कलाकार मंडळी आज थोडी मागे सारली गेली आहेत. आता नवीन कलाकार खरोखर गुणी आहेत की नाही हा वादाचा मुद्दा. असो बिचारे हे गुणी कलाकार आपले सर्वस्व ह्या अभिनयाच्या क्षेत्राला वाहून देतात आणि एक वर्ष दोन वर्षात नजरेआड जातात. बाकीच्या व्यवसायात तुमची साथ देण्यासाठी HR खाते तरी असते. इथे ह्या कलाकारांना तसे कोणी नाही असला तर वार्षिक गौरव समारंभ!

Sunday, January 6, 2013

मॉल, पिझ्झा, IPL आणि उंचावलेली जीवनशैली



मागे अशाच एका चर्चेच्या वेळी एक मुद्दा बोलण्यात आला. कोणत्याही कालावधीत जुनी आणि नवीन पिढी यांत संघर्ष सुरूच असतो. ही इतिहासापासून परंपरा आहे. जुन्या पिढीला नवी पिढी बंडखोर आणि परंपरांचे पालन न करणारी वाटते तर नव्या पिढीला जुनी पिढी बुरसटलेल्या विचाराची वाटते. प्रत्येक कालावधीत जी पिढी जिंकते ती त्या कालावधीचे भवितव्य ठरविते . सध्याच्या कालावधीत हा संघर्ष थोडा असमान शक्तींचा सुरु आहे, कारण सध्याची जुनी पिढी नवीन तंत्रज्ञानाने हबकून गेली आहे. तिने आपला आत्मविश्वास गमाविलेला आहे आणि त्यामुळे नव्या पिढीला निर्बंध घालणारे जुन्या पिढीतील फारशी लोक नाही आहेत. परंतु चित्र वाटते तितके निराशावादी नाही आहे. तंत्रज्ञानाने शिकली सवरलेली पिढी आता चाळीशी ओलांडून गेली आहे. वयामुळे येणारी परिपक्वता ह्या पिढीत आली आहे आणि त्याच वेळी तंत्रज्ञानाची भीतीही ह्या लोकांना नाही, त्यामुळे जुन्या आणि नवी पिढीतील संघर्षात ही चाळीशीच्या आसपासची लोक मोलाची कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे.
जर आपण १९९० साल, हे भारतातील आर्थिक बदल सुरु होण्याचे प्रमाणभूत वर्ष मानले तर त्यानंतर गेल्या २० वर्षात आलेल्या नवीन गोष्टी कोणत्या? मॉल, पिझ्झा, IPL , विभक्त कुटुंबे, मैदानी खेळाकडून संगणकीय खेळांकडे संक्रमण, उंचावलेली जीवनशैली अशी अनेक उदाहरणे देता येतील. भारतीयांचा एकंदरीत समाज म्हणून विचार केला तर ह्या सर्व गोष्टी पिढ्यानपिढ्या भारतीयांनी अनुभवल्या नव्हत्या त्यामुळे एक समाज म्हणून ह्या गोष्टींचे आकर्षण आपणास वाटणे स्वाभाविक होते. परंतु आता वीस वर्षांचा कालावधी ओलांडून गेल्यावर एक समाज म्हणून ह्या गोष्टींकडे एका प्रगल्भतेने बघण्याची आवश्यकता आहे. ह्यातील कोणत्या गोष्टी किती प्रमाणात स्वीकारणे सामाजिक आणि वैयक्तिक स्वास्थाच्या दृष्टीने योग्य आहे याचा वैयक्तिक पातळीवर विचार करणे आवश्यक आहे. आता वैयक्तिक पातळीवर का तर आज कोणीही दुसऱ्याचे सहजासहजी ऐकत नाही. काळ कितीही बदलो, तुमचे तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी संबंध जर एकदम सुदृढ असतील तर बाकीच्या अन्य घटकांची प्रतिकूलता सहज सहन करू शकता. गेल्या काही वर्षात आपण आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित केल्यावर आता पुन्हा काही काळ वैयक्तिक नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करायला हवे. सध्याच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने प्रगती करण्याची गरज नाही आहे ती कायम ठेवली म्हणजे झाले.

Friday, January 4, 2013

पट मांडला - भाग दहावा


दिवेपुरच्या मतदारसंघाचे विस्तृत विश्लेषण देण्याची बातमी आश्लेषासाठी तशी अनपेक्षितच होती. मग तिला आठवला तो तिचा महाविद्यालयीन कालावधी. नगर जिल्ह्याच्याच दुसऱ्या टोकाला असणाऱ्या गावात वाढलेली आश्लेषा गावात चांगले महाविद्यालय नाही म्हणून दिवेपुरला शिकण्यासाठी आली. कला शाखेत शिकणाऱ्या आश्लेषाला मराठीत फार रस होता, मराठीतील लिखाण, वक्तृत्व अशा दोन्ही पातळीत तिने लगेचच प्रसिद्धी मिळविली. कॉलेजातील स्पर्धांमध्ये तिने चांगलेच नाव कमावले होते. अशाच एका स्पर्धेत तिची ओळख बुजऱ्या संपतशी झाली होती. वाणिज्य शाखेतील संपत त्या स्पर्धेत स्वयंसेवकाचे काम करीत होता. ही ओळख हळूहळू मैत्रीत रुपांतरीत झाली. परंतु त्या पुढच्या पातळीवर हे नाते नेण्यासाठी ना बुजऱ्या संपतने पुढाकार घेतला ना आश्लेषाने धीटपणा दाखविला. आणि मग बघता बघता कॉलेजचे दिवस संपले आणि आश्लेषा लग्न करून मुंबईला निघून गेली. आणि आता दहा वर्षानंतर एका वळणावर आता हे दोघे परत भेटणार होते. हा बुजरा संपत अचानक इतका बंडखोर बनण्याइतपत धीट कसा झाला ह्याचेच आश्लेषाला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
जाधवांचा तपास जोरात चालू होता. रमाकांतनेच विजयरावांच्या जीपचे काम केले होते. त्या आधीच दोन दिवस विजयरावांनी जीपचे सर्विसिंग केले होते, आणि त्यात सर्व काही ठीकठाक असल्याचे कागदही जाधवांनी तपासून पाहिले. जीपच्या विश्लेषणानुसार तिचे ब्रेक फेल झाले होते. रमाकांतने हे कोणाच्या सांगण्यावरून केले आणि रमाकांतला अन्नातून विषबाधा कोणी केली ह्याकडे आता जाधवांनी लक्ष केंद्रित केले. जाधवांची बाईक गराजमध्ये पोहचली. त्या दिवशी रमाकांत जीपवर काम करीत असताना त्याने जेवण कोठून घेतले ह्याचा त्यांनी तपास सुरु केला. रमाकांत घरूनच डबा आणायचा अशी माहिती त्यांना देण्यात आली. रमाकांतच्या घरी अजून शोकाकुल वातावरणच होते. परंतु जाधवांना आपले कर्तव्य बजावायचे होते, त्यांनी हळू हळू रमाकांतच्या बायकोकडे त्यादिवशीच्या घटनांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी रमाकांतच्या मुलानेच डबा नेवून दिला होता. मुलगा कोपऱ्यात पुस्तक घेवून बसला होता. जाधवांनी आपला मोर्चा त्याच्याकडे वळविला. 'डबा नेवून देताना वाटेत कोठे थांबला होतास का?' जाधवांनी त्याला विचारले. मुलाने आठविण्याचा प्रयत्न केला. 'हो हो, मध्येच एक काका भेटले होते आणि त्यांनी मला बोलावून चॉकलेट दिले आणि एक लिफाफा समोरच्या दुकानदाराला द्यायला सांगितला'. तो म्हणाला. तू काय कोणीही सांगितले की ऐकतोयस का? जाधवांनी थोड्या रागाने विचारले. ' असं कसं, मी त्यांना नेहमी सभेला वगैरे बघतो आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते', मुलगा म्हणाला. 'लिफाफा दुकानदाराला देईपर्यंत तू डबा त्यांच्या हाती दिला असशील ना?' जाधवांच्या ह्या प्रश्नाला मुलाने होकारार्थी उत्तर दिले. जाधवांच्या ह्या भेटीची बातमी योग्य (अयोग्य) ठिकाणी पोहचली होती.
राज्यातील स्थिती एकदम दोलायमान होती. सत्ताधारी पक्षाला बहुमताची खात्री वाटत नव्हती आणि विरोधी पक्षांच्या युतीचे कडबोळे काही चांगल्या स्थितीत नव्हते. जितेंद्ररावांचा पक्ष युतीतील मुख्य घटक असला तरी जागावाटपात त्यांच्या पक्षाला मनासारख्या जागा मिळाल्या नव्हत्या. निवडणुकीनंतर समीकरण कसे असणार ह्याचेच आडाखे बांधण्याचा जितेंद्रराव विचार करीत होते. इथे अण्णासाहेब आणि सुजितकुमारांची स्थिती काही वेगळी नव्हती. आपआपल्या गटाला कमीच जागा मिळाल्या असे दोघांनाही वाटत होते. युवाशक्तीला पुढे आणण्याचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते आणि युवाशक्ती कितपत यशस्वी होणार ह्या बाबतीत शंका व्यक्त करणाऱ्या बुजुर्ग नेत्यांना संपतरावांच्या निमित्ताने आयतेच कोलीत मिळाले होते.
संपतरावांच्या प्रचाराने हळूहळू वेग घेतला होता. विरोधी पक्षाची यंत्रणा तर त्यांच्या साथीला होतीच वर त्यांनी ज्यांच्याबरोबर इतकी वर्षे काम केले त्या कार्यकर्त्यांनीही पक्षांची बंधने झुगारून त्यांच्या प्रचारात भाग घेतला होता. राहता राहिला प्रश्न तो निधीचा. थोड्या तंगीत सापडलेल्या संपतरावांना एके रात्री माहेरी जावून आलेल्या सगुणाबाईंनी एक सूटकेस दिली. ती उघडल्यावर त्यातील नोटांची पुडक्यांकडे संपतराव आ वासून बघतच राहिले!

Thursday, January 3, 2013

पट मांडला - भाग नववा



मुंबईत पक्षाचे प्रवक्ते चिंतामण जोशी ह्यांनी पत्रकार परिषद बोलावली. विश्वासराव ह्यांच्या शेतात सापडलेला जखमी कार्यकर्ता हे विरोधी पक्षाचे कारस्थान आहे आणि विश्वासराव हे निर्दोषी आहेत अशी ग्वाही ते देत होते.
गावात मात्र घडामोडींना जोरदार वेग आला. संपतरावांनी विरोधी पक्षातर्फे आपला अर्ज दाखल केला. वसंतराव आणि नगर जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्या अर्ज भरण्याच्या वेळी जातीने उपस्थित होते. ह्या बातमीने सत्ताधारी पक्षाला जोरदार धक्का बसला. गावातही चर्चेला उधाण आले. चिंतामण जोशी ह्याची परिषद चालू असताना तिथेही संपतरावांच्या बंडखोरीची बातमी कळली. आधी ही अफवा आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा त्यांनाही फोन आला त्यावेळी मात्र मी अधिक माहिती मिळवून मगच बोलीन असे ते म्हणाले. पक्षातील बंडखोरांची गय केली जाणार नाही असा इशाराही जाता जाता देण्यास ते विसरले नाहीत.
इन्स्पेक्टर जाधवांना परत ह्या केसवर बोलविण्यात आले. हणम्याला अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले. सुजितकुमारांच्या डोक्यात मात्र वेगळेच चक्र फिरत होते. भाऊरावांना अडकवायचे हे तर नक्की ठरविले होते, पण त्यासाठी योग्य मुहूर्त कोणता हे त्यांना कळत नव्हते.
विरोधी पक्षनेते जितेंद्रराव मांडलेली युतीची गणिते तपासून पाहत होते. नगर जिल्ह्यातील दिवेपुरची जागा मिळण्याची शक्यता आता अधिक दाट झाली होती. ह्या निमित्ताने संपत रावासारखा होतकरू युवा नेता पक्षाला मिळाला आणि आता त्यांना मोठ्या समीकरणात कसे गुंतवता येईल ह्याची जितेंद्रराव स्वप्ने पाहत होते.
ह्या निमित्ताने दिवेपूर गाव खाजगी प्रादेशिक वाहिनींच्या बातमीपत्रातही झळकले. 'सासऱ्या - जावयाचा जंगी मुकाबला' ह्या ठळक मथळ्यावर ह्या वाहिन्यांच्या निवेदिका गळ्याच्या शिरा ताणून आपल्या परीने बातमी रंगवून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु मुंबईत बसून अशी सनसनाटी लढत कव्हर करायची हे मायदेश वाहिनीच्या प्रमुखाला पटत नव्हते. त्याने आपली खास वार्ताहर आश्लेषा हिला थेट दिवेपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. अजून एक वाहिनीचा प्रमुख ह्या घटनेवर मराठी मालिका बनविता येईल का ह्याची चाचपणी करीत होता.
भाऊराव आता विश्वासरावांच्या प्रचारात पूर्ण गुंग झाले होते. मतदारसंघात त्यांनी विश्वासरावांना घेवून प्रचारसभांचा जोरदार बार उडवून दिला होता. पक्षाने (आणि संपतरावांनी केलेल्या) कार्याची त्यांनी विस्तृत पत्रके बनविले होती आणि ती सर्वत्र वाटली होती. अण्णासाहेब ह्यांची प्रचारसभा तर त्यांनी नक्की ठरविली होती त्यावर मुकुल ह्यांचे जर राज्यात प्रचारासाठी येणे झाले तर त्यांनाही मतदारसंघात बोलाविण्याचा त्यांचा मनसुबा होता. प्रचाराच्या दोन दिवसानंतर मात्र चहा पिता पिता भाऊरावांना जाणविले की आपणच इथे जास्त मेहनत करतोय. जे उमेदवार आहेत ते विश्वासराव मात्र अलिप्तपणे ह्या सर्व कार्यक्रमांत केवळ एक कर्तव्य म्हणून भाग घेत आहेत. भाऊरावांच्या मते रमेश तसा कमी अकलेचा पण तोही चहाचे घोट घेत घेत म्हणाला 'पट मांडला खरा, पण पांढरी सोंगटी कोणती आणि काळी कोणती हे ही कळेनासे झालया!' त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून भाऊराव चमकलेच. पण नंतर ते ही म्हणाले 'सोंगट्याचे जाऊद्यात, पांढरा वजिराचाच इरादा काय आहे हेच कळेनासे झाले आहे!'