Saturday, June 25, 2011

अभ्यास पद्धती भाग २





अभियांत्रिकी अभ्यासक्रम एकंदरीत वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो. प्रत्येक सत्रात SUBMISSION नावाचा बागुलबुवा आपली पाठ पुरवीत असतो. प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक असते. आणि ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी अध्यापकांच्या सर्व वर्गांना उपस्थित राहणे, विषयाचे नियमित वाचन करणे हे जरूर असते. ह्या पुस्तकांचे एक वैशिष्ट असते आणि ते म्हणजे reading between the lines. पुस्तकातील ओळींमध्ये गर्भितार्थ भरलेला असू शकतो आणि त्याचा आपापल्या मतीनुसार अर्थ लावण्याची आपणास मुभा असते! सबमिशन आटोपल्यानंतर मिळणाऱ्या अभ्यास सुट्टीवर आपण भिस्त ठेवल्यास हा गर्भितार्थ उमजून घेण्याची आपणास कमी संधी मिळते.

यात एक महत्त्वाची बाब म्हणजे आपणास योग्य अशा अभ्यासनोंदी (नोटस) मिळणे आवश्यक असते. ह्या नोटस मिळविण्यासाठी योग्य कंपूत आपण असणे आवश्यक असते. हा कंपू आपणास विषयाच्या चर्चेसाठी उपयोगी पडतो. त्याच प्रमाणे गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रीकेंचे योग्य विश्लेषण करण्यासाठी ह्या अभ्यासकंपूचा आपणास उपयोग होतो.

अभियांत्रिकीच्या परीक्षा हा एक अजून सखोल विषय. चार तासांचे पेपर आणि त्या वेळात आपणास अवगत असणारे बरेचसे ज्ञान आपणास उत्तरपत्रिकेत योग्य प्रमाणात उतरावे लागते. ह्या वेळात आपल्याला काही निर्णय पटापट घ्यावे लागतात. प्रश्नपत्रिका हाती आली की पहिल्या पाच मिनिटात तिचे विश्लेषण करून आपण सोडवणार असलेले प्रश्न आणि त्यांचा क्रम ठरवावे लागतात. एखाद्या प्रश्नाच्या जास्त प्रेमात पडून सुद्धा चालत नाही. २० गुणाचा एक प्रश्न परीक्षकास तो विद्यार्थी असल्याच्या आविर्भावात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी २० गुणांचे २ प्रश्न योग्य प्रकारे सोडविणे आवश्यक असते. ह्या चार तासात आपला आत्मविश्वास टिकविणे आवश्यक असते. त्यासाठी खात्रीचे प्रश्न प्रथम सोडविणे आवश्यक असते. एखाद्या विषयात बरीच सूत्र असल्यास उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आणि प्रश्नपत्रिका मिळण्याआधी ही सूत्रे मागच्या पानावर पेन्सिलीने लिहून ठेवण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक विषयाचे काही भाग आपणास पूर्ण उमजलेले असतात आणि त्यांची आपण योग्य तयारी सुद्धा केलेली असते. अशा भागाशी संबंधित प्रश्न प्रथम सोडवावेत. ज्या भागांची आपली तयारी कमी झालेली असते आणि त्या भागाशी संबंधित ज्ञान आपल्या मेंदूच्या कप्प्यातून खेचून घेण्यास (retrieve करण्यास कष्ट करावे लागणार असतात, असे प्रश्न शेवटी ठेवावेत. ह्या भागातील आपली कामगिरी त्यावेळच्या आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते. अशा वेळी मध्येच छताकडे एक मिनिट पाहत आपल्या विविध उल्लेखनीय कामगिऱ्या (आपल्या म्हणण्यानुसार!) आठवून स्वतःला प्रफुल्लित करावे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही वर्षे तशी हा हा म्हणता संपून जातात. महाविद्यालयातील सांस्कृतिक दिवस, वेगवेगळे 'Days' साजरे करता करता अंतिम वर्ष समोर येवून ठेपते. पुढे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे (ते ही देशात की परदेशात), की प्रथम थोडा नोकरीचा अनुभव घ्यायचा हा निर्णय घ्यावा लागतो. अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निमित्त आपली बाहेरील व्यावसायिक जगाशी तोंडओळख होते. व्यावसायिक जगात प्रवेश करता करता आपल्या वैयक्तिक जीवनातही बदल होत राहतात आणि अधिकाधिक जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतात. इथे मात्र कोणतेही पुस्तक आपल्यासोबत नसते. सोबत असतात नातेवाईक, मित्र, आपला स्वभाव आणि आयुष्य कशा पद्धतीने घालावावयाचे आहे याविषयीचे आपले विचार! यातील शेवटच्या दोन गोष्टी वयपरत्वे काही प्रमाणात बदलत जातात. आवश्यक असते ते आयुष्यातील विविध टप्प्यांवर घेतलेल्या निर्णयांशी प्रामाणिक राहणे!

Friday, June 10, 2011

माझा आवडता देश न्यूझीलंड






न्यूझीलंडचा आणि माझा संबंध फक्त क्रिकेट सामन्यापुरता! न्यूझीलंडमध्ये कोणताही सामना असो मी तो हमखास TV वर पाहतो. कारणे दोन, पहिले म्हणजे न्यूझीलंडची हिरवीगार मैदाने आणि दुसरे म्हणजे तिथले प्रेक्षक. न्यूझीलंडच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता बर्याच वेळा पाहुणा संघ त्यांची धूळधाण उडवत असतो. परंतु मैदानावरील कामगिरीचा तेथील प्रेक्षक स्वतःवर फारसा परिणाम होऊन देत नाहीत. बर्याच ठिकाणी प्रेक्षक सुद्धा हिरव्या कुरणावरच बसलेले असतात. लहान मुलांचा आपला एक स्वतंत्र सामना ह्या कुरणावर चालू असतो. मोठी माणसे बियरचे घुटके घेत घेत वेळ मिळाल्यास मैदानावरील घडामोडींकडे नजर टाकत असतात. मैदानावरील न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही वृत्ती काही फारशी वेगळी नसते. दोन तीन चांगले फटके मारून ते परत तंबूच्या सुखकारक वातावरणात परततात. मालीकांमागून मालिका हरून सुद्धा तेथील कर्णधाराची हकालपट्टी होत नाही.

ह्या एकंदरीत परिस्थितीची कारणीमिमांसा करायची झाली तर न्यूझीलंडची विरळ लोकसंख्या आणि तेथील लोकांना जीवनासाठी करावा लागणारा कमीतकमी संघर्ष हे होय. आपल्या जीवनात संतुष्ट असणारे हे लोक क्रिकेटकडे एक खेळ आणि केवळ विरंगुळ्याचे साधन म्हणून पाहतात. क्रिकेटची गोष्ट सोडा एकंदरीत जीवनातही हे लोक समाधानाने जगत असतात. सतत प्रगती करायला हवी, निव्वळ नफ्यात वाढ हवी अशा ध्येयाने तेथील बहुतांशी जनतेस पछाडलेले नसते. अमेरिकेत असताना एका सहलीदरम्यान दादरहून न्यूझीलंडला स्थायिक झालेल्या मराठी माणसाची भेट झाली. त्याचे एक वाक्य माझ्या अजून लक्षात आहे, तो म्हणाला की न्यूझीलंडचा एखादा तरुण मुलगा अमेरिकत शिक्षण अथवा नोकरीनिमित्त चालला की त्याचे आईवडील काळजीत पडतात की पोरग आता बिघडणार! एकंदरीत काय तर अमेरिकेच्या स्वच्छंदी वातावरणाची भीती जगभर पसरलेली.

अमेरिकेचे स्वच्छंदी वातावरण केवळ आपण ऐकून असतो, चित्रपटातून पाहत असतो आणि मुंबईसारख्या भारतातील शहरांतून जगत असतो. परंतु तसे बघायला गेले तर बहुतांशी अमेरिकन लोक सुद्धा कुटुंबवत्सल असतात आणि भारतात सुद्धा ७०-८० टक्के लोक अजूनही परंपरागत जीवन जगणे पसंत करतात. प्रश्न आहे तो प्रसारमाध्यमांचा! प्रसारमाध्यमांना हाती घेवून भारतीय जनतेला चंगळवादी बनविण्याचा पद्धतशीर प्रयत्न गेले काही वर्ष चालू आहे. न्यूझीलंडला असे काही होत नाही आणि म्हणूनच माझा आवडता देश न्यूझीलंड! देव करो आणि न्यूझीलंडची उद्योग धंद्यात फारशी प्रगती न हो! नाही तर न्यूझीलंडला गर्दीचे ठिकाण बनवायला आपण भारतीय तयारच आहोत!

Wednesday, June 8, 2011

पुढे काय ?





मनुष्यजातीच्या उत्क्रांतींच्या प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी मनुष्याने संघर्ष केला. हा संघर्ष दैनंदिन पातळीवरचा होता.
उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेत हा संघर्ष दैनंदिन पातळीवर राहिला नाही. साठवणूक करून ह्या गरजा भागविण्यासाठी दीर्घकाळासाठी तरतूद करून ठेवण्याचे शहाणपण माणसाला सुचले. ही प्रगती सर्व मनुष्याजातीची न झाल्यामुळे काही समूहांचा प्राथमिक गरजांसाठी संघर्ष अजूनही कायम आहे. आज आपण बोलूया उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेतील पुढील टप्प्यावरील समूहाविषयी!

मनुष्यजातीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपणास जास्त काळ शांत बसता येत नाही. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर आपण नवीन गरजा निर्माण केल्या. क्रीडा, करमणुकीची साधने निर्माण केली. तंत्रज्ञानाने प्रगती करताच मात्र ह्या गरजांनी आपल्यावर ताबा मिळविण्यास सुरवात केली. गाडी हवी, वातांकुलीत घरे हवीत, बिले भरण्यासाठी इंटरनेट हवे, बोलण्यासाठी भ्रमणध्वनी हवा इथून सुरुवात झाली. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून बिले भरता येण्याची सोय झाली.

माणसाचे तंत्रज्ञानांच्या बाबतीत अंतिम ध्येय काय असू शकते? माझ्या घरी एक संगणक सदृश्य उपकरण असणार, माझ्या मनातील विचार ते ओळखू शकणार आणि दूरदर्शन संच, संगणक, दृश दूरध्वनी यापैकी कोणत्याही एका MODE मध्ये सुरु होवू शकणार. त्यापुढील प्रत्येक पर्याय मी केवळ माझ्या मनातील विचारावर नियंत्रित करणार. Teleportation ने मी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणार. अन्नासाठी मी सलाईन लावणार...आणि असेच पुढे काही.. आज ही थोडी अतिशोयक्ती वाटत आहे पण मनुष्याच्या स्वस्थ न बसता येण्याच्या गुणधर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि एक दिवशी आपण ही अवस्था गाठणार याची मला खात्री आहे. आणि मग ह्या अवस्थेच्या शेवटी आपण एक तर यंत्र बनून जगणार किंवा तंत्रज्ञान आपल्यावर ताबा मिळवणार!