Saturday, June 23, 2012

विवाह संस्था !





२३ जूनच्या चतुरंग पुरवणीत दोन लेख वाचले, एक 'एकाकी नसलेले एकटेपण' आणि दुसरा 'विवाह संस्थेतील ढोंग!' व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर दोन्ही लेखातील मुद्दे योग्य! आयुष्यात एकटेपण बर्याच जणांना अनुभवावे लागते. काहींनी ते ठरवून स्वीकारले असते तर काहींना परिस्थिती ते स्वीकारण्यास भाग पाडते. पूर्वी एकटेपण म्हटले की मनुष्य दुःखी असणार असेच अभिप्रेत असायचे. परंतु आजच्या काळात एकाकी असूनसुद्धा आनंदी असलेले बरेचजण आहेत असा पहिल्या लेखाचा सारांश. दुसर्या लेखात एकंदरीत विवाहसंस्थेची चिरफाड केलेली! आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधात अजूनही बहुतांशी स्त्रिया नवर्यांचा दांभिकपणा कसा सहन करतात यावर या लेखाचा भर. दोन्ही लेख स्त्रियांनी लिहलेले. अतिशय संतुलित विचारसरणीने लिहिलेले. आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही लेखातील विचार एकदम योग्य.
दोन्ही लेखात सध्याच्या जगात प्रकर्षाने जाणवणारे एक समान सूत्र आढळते. ते म्हणजे आजच्या पिढीत वाढलेली स्वत्वाची भावना. हा जो स्व असतो तो सदैव स्वतःसाठी अनुकूल वातावरण शोधत असतो. हवी ती शाळा, हवे तसे घर, हवी ती नोकरी, हवे तसे मित्र अशी ह्या स्व ची मानसिकता असते. ह्या सर्व गोष्टींमध्ये नाही पटले तर त्वरित दुसरा पर्याय शोधला जातो. तसेच जीवन साथीदाराच्या बाबतीत होण्याची शक्यता असते. म्हणून काही जण लग्नाचा मार्ग स्वीकारायचे नाकारतात तर काही जण लग्नानंतर हा मार्ग तत्काळ बदलायचे धाडसही दाखवू शकतात. आपल्या भारतातील किंवा जगभरातील ज्या काही विवाहसंस्था आजच्या काळापर्यंत टिकल्या त्यासाठी व्यक्तिगत त्यागाचा मोठा हातभार लागला. प्रेमविवाह असो की जमविलेले लग्न असो, लग्नानंतर संसार करताना दोघा साथीदारांचे सूर सदोदित जुळणे हे बरेचसे कठीण. परंतु ह्या प्रवासात जेव्हा कधी हे सूर जुळतात तेव्हा त्या क्षणाच्या जोरावर बाकीचे मतभेद पचविण्याची प्रगल्भता दोघांकडे हवी. नाहीतर न पटणार्या गोष्टींचाच सदैव विचार केल्यास उरतो तो केवळ दोन समांतर रेषांचा प्रवास.
इथे आपण आपल्या पूर्वजांच्या मानसिकतेचा थोडा विचार करूया. त्यांनी विवाहसंस्थेच्या दुषपरिणामांविषयी विचार केला नसावा असे मला वाटत नाही. त्यांना नक्कीच माहित असणार की तत्कालीन विवाहपद्धतीत (त्यातही एकत्र कुटुंबपद्धतीत) कोणत्या तरी एका बाजूची (९९.९९ टक्के स्त्रियांची) परवड होणारच! त्यांनी त्यांच्यासमोरील दोन पर्यायांचा विचार केला असावा. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! त्यावेळी त्यांनी दुसर्या पर्यायाचा स्वीकार केला. हे हस्तांतरण योग्यरित्या व्हावे यासाठी त्यांना कुटुंबसंस्थेची गरज भासली. त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले असावे की या कामासाठी स्त्रियांचा त्यावेळचा स्वभाव योग्य! म्हणून त्यांनी विविध रीतीभाती निर्माण करून स्त्रियांना त्यात समाविष्ट करून घेतले. खरोखर परखड परीक्षण केले तर असे जाणविते की भारतीय संस्कृतीने, समाजाने स्त्रियांची मेंदूधुलाई केली. स्त्री ही एक क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते अशी भव्य दिव्य विधाने करून त्यानी स्त्रियांना भावनिक पाशात अडकविले. संसार टिकले ते स्त्रियांच्या अपत्यप्रेमापोटी, पतीप्रेमापायी नव्हेत!
आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या समोर दोन पर्याय आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! बदलत्या काळानुसार ह्या दोन पर्यायांतील कोणता स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण त्यातील एक पर्यायच आहे मुळी व्यक्तिस्वातंत्र्याचा! हा स्वीकारताना आपण समाज म्हणून काय गमावतो आहे हा प्रश्न फक्त एकदा स्वतःला विचारून पहावा! विवाह संस्था पूर्णपणे नष्ट होणे सुद्धा कोणालाही आवडणार नाही. आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधापायी, अपत्यप्रेमापोटी, किंवा विवाह संस्थेचा पूर्ण लोप होवून न देण्यासाठी माझा वैयक्तिक हातभार असावा ह्या भावनेपायी बरेचसे विवाह टिकून राहणार. राहिली गोष्ट आदर्श संसाराच्या शोधाची. मृगजळाच्या शोधाप्रमाणे त्याचा शोधही चालूच राहणार.

No comments:

Post a Comment