Sunday, February 8, 2015

लेक लाडकी ह्या घरची…

 

http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_8.html 

पूर्वी वाक्य कानावर पडायचं, "पोरीला त्या घरी दिली!" कधी कधी "पोरीला त्या गावात दिली" असंही बोललं जायचं. जणू काही ज्याच्याशी लग्न लागणार तो नवरा मुलगा अगदी नगण्यच असायचा, निर्णयप्रक्रियेत त्याला फारसं महत्त्व नसायचं. बहुदा त्यावेळची परिस्थिती सुद्धा काही प्रमाणात ह्याला कारणीभूत असेल. शेतकरी कुटुंब असेल तर मुलीचं संपूर्ण आयुष्य कसं जाणार हे त्या कुटुंबाच्या जमीनजुमल्यावर अवलंबून असायचं. 
हल्ली असं ऐकायला मिळत नाही. कारणं अनेक! हल्ली लग्न जमविण्याची संधी आईवडिलांना कमी प्रमाणात मिळते. आणि मिळाली तर लग्न मुलाकडे, त्याच्या कर्तुत्वाकडे पाहून मग लग्न जमवलं जातं. फार तर फार त्याच्या आईवडिलांची चौकशी केली जाते. ह्याला कारणीभूत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली "पोरीला त्या घरी दिली!" ह्या वाक्यात जे घर अभिप्रेत होतं, अशी घर फार दुर्मिळ झाली आहेत. 
हे घर म्हणजे एक संस्था होती; हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर एक पॅकेज होती. त्यात असायचं घराचं अंगण, घराभोवतीची बाग, घरामागचं तुळशीवृंदावन, विहीर, रहाट, मायेच्या गायी, उन्हापासूनच नव्हे तर संसारातील तापत्या क्षणापासून विसावा देणारा वटवृक्ष! आणि ह्यात सासरची असली म्हणून काय झालं पण प्रेमाची सावली देणारी माणसं असायची. सासू जरी अगदी कडक असली तरी कळत नकळत मायेच्या क्षणाचा शिडकावा करायची! सासरेबुवा शिस्त कधीकधी आपल्या सुनेसाठी थोडी हळवी व्हायची. घरात जर मोठी सून म्हणून प्रवेश केला असेल तर घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडायची. धाकटे दीर अगदी मुलासारखे नसले तरी त्यांची काळजी घेण्याइतपत लहानच असायचे. धाकट्या नणंदा लग्नाच्या असायच्या. त्यांची आणि ह्या मोठ्या वहिनीची छोटी मोठी गुपिते असायची. घरी कामाला असणारे गडी माया लावून जायचे. आता हे सगळं वर्णन काहीसं आदर्श चित्र निर्माण करत आहे हे मान्य! 
ह्यात एक महत्वाचा मुद्दा यायचा. लग्नानंतर नवऱ्याबायकोच्या प्रेमाच्या नात्याला त्या काळात मुक्तपणाचा फारसा वाव लाभला नाही.  ह्या नात्याविषयी ना जास्त बोललं जात असावं ना एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला वाव असायचा. एकंदरीत घरात आलेल्या सुनेच्या आयुष्याचा बहुतांशी भाग हा तिने त्या घरासाठी आणि घरातील कुटुंबियासाठी व्यतीत करावा अशीच अपेक्षा असायची. आणि ह्याच कारणासाठी घराकडे पाहून मुलगी दिली जायची. नवऱ्याशी जुळो वा ना जुळो, तो तर महत्वाचा घटक नाही. पण बाकीचे सर्व घटक जे तिचं बहुतांशी आयुष्य कसं जाणार हे ठरवणार ते चांगले असले म्हणजे झालं अशी विचारसरणी असायची. बाकी मुलीची स्वतःची अशी ठाम मते बनायच्या आधीच अल्पवयात लग्न लावून द्यायचा ह्या मंडळींचा अट्टाहास असायचा.
हल्ली हे घर नाहीसं झालं, फ्लॅट आले. नवऱ्याव्यतिरिक्त ज्यांच्याशी संवाद साधला जायचा अशी दीर, जाऊ, नणंद ही समवयस्क आणि पुतणे, पुतणी, भाचेमंडळी ह्या सर्वांशी संपर्क कमी झाला. जोवर राजाराणीच्या संसारात सगळं काही सुरळीत चाललं असतं त्यावेळी ह्या मंडळींची उणीव सुद्धा भासत नाही; पण जर कुठं काही बिनसलं तर ही सारी मंडळी, आणि आधी वर्णिलेले सर्व घटक मामला एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे न जाऊ द्यायला सहायभूत ठरायचे. आणि हो आधी वर्णिलेल्या गावात अशी किती चांगल्या संस्था म्हणून बनलेली घर आहेत हा घटक सुद्धा टोकाची भूमिका घेण्यापासून मंडळींना थांबवायचा.  म्हणूनच मुलगी कोणत्या गावात दिली हे महत्वाचे!


अजून एक वाक्य आठवलं - सून आणावी ती गरिबाघरची आणि पोरगी द्यावी ती श्रीमंताघरी! हे वाक्याकडे मी आधी फारसं लक्ष दिलं नव्हतं. आज थोडा विचार केल्यावर असं वाटायला लागलं की गरिबाघरची मुलगी संस्काराचे बाळकडू अगदी कोळून प्याली असेल आणि ती आपल्या घरचं संस्कारमय वातावरण कायम ठेवेल ह्याची शाश्वती! आणि आपली मुलगी संस्कारमय घरातील श्रीमंताघरी जाऊन तिथे संस्कारांची पेरणी करेल! तिला लक्ष्मीची काळजी करायला नको! 
गेले ते दिन गेले! ना ती घरे राहिली ना त्या घरांची संस्कृती! ही घरं सोडून आपण प्रगती गाठली. पण प्रगती केवळ एका पिढीत आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच गाठून चालत नसतं. वयाच्या तिशीच्या आसपास प्रगतीची शिखरे गाठलेली पण मग पुढे काय करायचं हे न कळलेली अनेक उदाहरणं पाहायला मिळतात; प्रगतीचा आलेख कमी वेगाने वर गेला तरी चालेल पण आपण गाठलेल्या प्रगतीचा पाया त्या पातळीवर दुसऱ्या पिढीला देता आला पाहिजे! आणि नेमक्या ह्या मुद्द्यावर ह्या घरांची उणीव अधिकाधिक जाणवते!! प्रगती गाठलेला माणूस कदाचित चुकू शकतो पण उंचावलेलं एक घर मात्र पुढची पिढी घडवायला कधीच चुकणार नाही! http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_8.html 

No comments:

Post a Comment