Sunday, July 21, 2019

२०१९ क्रिकेट विश्वचषक !





हा लेख विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पुर्वसंध्येला लिहिला आहे!

पावसाच्या अवकृपेमुळे दोन दिवस चाललेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा एक अनपेक्षित पराभव झाला. ह्या पराभवामुळं अखिल भारतवर्षाचा या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील रस संपुष्टात आला.  खऱ्या क्रिकेटरसिकांनी विजय आणि पराभव यापलीकडं जाऊन खेळाचा आनंद लुटावा,  या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या काही सुखद आठवणी गोळा करता आल्या त्या मनाच्या कप्प्यात घट्ट झाकून आयुष्याच्या पुढील प्रवासास निघावे या उद्देशाने या स्पर्धेतील काही मनोरंजक क्षणांचा घेतलेला हा आढावा ! 


यश मिळवण्यासाठी गुणवत्ता आणि व्यावसायिकता याचं योग्य मिश्रण तुमच्या संघामध्ये असावं लागतं. पुर्वी निव्वळ गुणवत्तेच्या आधारे कमी प्रमाणात असलेल्या तुमच्यातील व्यावसायिकतेला झाकून ठेवून तुम्हाला यश मिळवता येणं शक्य होतं.  यशासाठीचं हल्लीच्या काळातील व्यावसायिकतेचे आवश्‍यक प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.  त्यामुळेच की काय उपांत्य फेरीत व्यावसायिकतेने खेळ करणारे चार  संघ प्रवेश करते झाले. व्यावसायिकचे उदाहरण द्यायचं झालं तर विराट कोहलीच्या मुलाखतीमधील एका विधानाचा इथं संदर्भ देता येईल. त्यानं हल्ली जाणीवपुर्वक एकेरी, दुहेरी धावांवर भर दिल्याचं चित्र दिसुन येतं. आपल्या विकेटला सहजासहजी गमवायचं नाही ह्यावर त्याचा भर दिसुन येतो. 

विश्वचषक स्पर्धेची सुरुवात यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांने झाली. या विश्‍वचषक स्पर्धेच्या दरम्यान डिव्हिलियर्सने आपल्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी अखेरच्या क्षणी केलेल्‍या विनंतीची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचली. जर हा गुणवान खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघात असता तर नक्कीच काहीसं वेगळं चित्र पहावयास मिळालं असतं. या सामन्यातील पहिल्याच षटकात इमरान ताहिरने बेयरस्टोचा बळी घेऊन आपल्या सुप्रसिद्ध अशा जोरदार धावेचा रसिकांना आनंद लुटू दिला.  इंग्लंडने  रचलेलं ३११ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाला न पेलविल्यानं ह्या संघाचा पराभव झाला. 

विश्वचषक स्पर्धेमध्ये तुमचा संघ कशी सुरुवात करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. खरंतर या स्पर्धेच्या साखळी स्वरूपामुळे एखाद्या बलाढ्य संघाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातील पराभवाने खचून जायचं तुम्हाला कारण नसतं. हा संघ साखळी स्पर्धेत केव्हा न केव्हा तरी तुम्हाला भेटणारच असतो. परंतु सुरुवातीच्या दोन किंवा तीन सामन्यात जर तुमचा पराभव झाला तर मग मात्र परिस्थिती  काहीशी गंभीर स्वरूप धारण करते, तुम्ही पॅनिक बटन दाबू शकता. दक्षिण आफ्रिका संघाची परिस्थिती सुद्धा स्पर्धेत काहीशी अशीच झाली. बांगलादेशाच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्या अंगाशी आला.  त्यानंतरच्या भारताविरुद्धच्या पराभवानंतर मग मात्र त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली.  हा खरं तर एक गुणी संघ! परंतु देशातील क्रिडाविषयक काही धोरणांमुळे संघाच्या निवडीमध्ये घातली गेलेली कृत्रिम बंधने या संघाच्या स्वास्थ्यावर परिणाम करतात!

पाकिस्तानचा संघ दोन रुपं बाळगून असतो असं गंमतीने म्हटलं जातं! एक रुप ज्यामध्ये हा संघ अत्यंत गुणवान खेळाडूंचा समूह असतो! उत्तम गोलंदाजी, फलंदाजी यांचं बहारदार प्रदर्शन करून रसिकांची मने जिंकून घेतो.  दुसऱ्या रुपामध्ये मात्र हा संघ विनोदीपणाकडे झुकणाऱ्या अगदी प्राथमिक चुका करतो! त्यांचं हे रूप त्यांना दारुण पराभवाकडे घेऊन जातं.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या रूपाचे प्रदर्शन करीत एक मोठा पराभव स्वीकारला! हा पराभवच आणि त्यातील मोठ्या धावगतीच्या फरकामुळं शेवटी त्यांना बाद फेरीतील प्रवेशापासून वंचित ठेवून गेला. 

तिसऱ्या सामन्यांमध्ये न्युझीलँडने श्रीलंकेला 136 धावांत गुंडाळून दहा गड्यांनी एक मोठा विजय संपादन केला. न्यूझीलंडची गोलंदाजी ही आपलं एक भेदक रुप बाळगून आहे. अनुकूल परिस्थिती मिळताच ते आपलं हे भेदक रुप बाहेर काढतात.  भारतानं ह्या विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यातसुद्धा त्याचा अनुभव घेतला आहे.  त्यामुळे उपांत्य फेरीतील सामन्यात ढगांचा मैदानावरील आवरण आणि खेळपट्टीवरील काहीसा ओलसरपणा याची साथ मिळताच त्यांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची जी काही दाणादाण उडवली ती पूर्णपणे अनपेक्षित होती असे म्हणता येणार नाही! 

चौथ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अपेक्षेनुसार अफगाणिस्तान संघाचा पराभव केला. चेंडू अयोग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल एक वर्षाची बंदी घातले गेलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दोन्ही गुणवान खेळाडूंच्या पुनरागमनाची ही पहिलीच स्पर्धा होती.  डेव्हिडने आपल्या बहारदार फलंदाजीने ही स्पर्धा गाजवली.  या सुंदर फलंदाजीचा श्रीगणेशा त्यानं अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात करत एक बहारदार अशी ८९ धावांची खेळी सजविली. 

पाचव्या आणि सहाव्या सामन्यांमध्ये दोन अनपेक्षित निर्णयांची नोंद झाली अन स्पर्धेत एक अत्यंत चुरसदायक स्थिती निर्माण होण्यास आरंभ झाला. पाचव्या सामन्यामध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ करून सुद्धा त्यांना केवळ 309 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

या स्पर्धेच्या आधी या स्पर्धेमध्ये एका डावात 500 धावांची मजल नक्की मारली जाईल अशा प्रकारची चर्चा जोरात होती. परंतु जाणकार खेळाडूंनी मात्र या चर्चेला जास्त प्रोत्साहन दिले नाही.  द्विपक्षीय मालिकेमध्ये ज्या वेळेस केवळ दोनच संघ सतत पाच-सहा सामने खेळत असतात त्यावेळी हे काही प्रमाणात शक्य असू शकते. परंतु ज्यावेळी एका महिन्याच्या कालावधीत तुम्ही ही वेगवेगळ्या नऊ संघांचा मुकाबला करीत असतात त्यावेळी एकदम ५०० धावांची मजल गाठणे एक जवळपास अशक्यप्राय आहे असे जाणकारांचे आणि माझे सुद्धा मत आहे!  खरं म्हणायला गेलं तर बांगलादेश विरुद्ध ३३० धावांची मजल मारणे हे दक्षिण आफ्रिकेला शक्य व्हायला हवे होते. परंतु विश्वचषक सामन्यातील एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि त्याच्या सोबतीने प्रत्येक षटकामागे वाढत जाणारे दडपण याचा मुकाबला त्यांना करता आला नाही. त्यानंतरच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तान आपलं गुणवान खेळाडूंचं पहिलं रुप बाहेर काढलं. आणि इंग्लंडच्या संघाला वास्तवात आणून सोडले. त्यांनी केलेल्या 348 संख्येचा पाठलाग करताना इंग्लंड संघ 334  धावाच गाठू शकला. काही खेळाडूंना मोठ्या स्पर्धेच्या मंचावर आपली कामगिरी उंचाविण्याची कला अवगत असते. वहाब रियाझने ह्या स्पर्धेत ह्या कलेचा प्रत्यय क्रिकेट रसिकांना आणुन दिला. 

ही स्पर्धा सुरू होण्याआधी अफगाणिस्तान संघाकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या. हा संघ स्पर्धेच्या कालावधीमध्ये किमान दोन ते तीन धक्कादायक निर्णयांची नोंद करेल. अशी अपेक्षा या गुणवंत खेळाडूंनी भरलेल्या संघाकडून केली जात होती.  परंतु या स्पर्धेआधी संघामध्ये काहीतरी गडबड झाली असावी. कर्णधार असलेल्या अफगाणला बाजूला सारून गुलबदीनची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.  या अंतर्गत अस्थिर वातावरणाचा परिणाम म्हणून की काय हा संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन तीन वेळा विजयाच्या अगदी समीप येऊन सुद्धा विजयरथ सीमारेषेपलीकडे नेऊ शकला नाही.  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला २०१ धावात रोखूनसुद्धा त्यांना ४० षटकात हे आव्हान पार पाडता आले नाही. 

जगातील सर्वाधिक रसिकसंख्येच्या अपेक्षांचे ओझे बाळगणारा भारतीय संघ शेवटी एकदाचा पाच जून रोजी मैदानात उतरला. दक्षिण आफ्रिका या आधीचे दोन सामने हरल्यामुळे इथे दोन शक्यता निर्माण झाल्या होत्या.  पहिली म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून त्यांच्याकडून फारशा संघर्षाची अपेक्षा करता येण्यासारखी नव्हती.  दुसरी शक्यता म्हणजे ते पेटून उठून आपली सर्वोत्तम कामगिरी पेश करतील.  परंतु क्रिकेटच्या दृष्टीने पाहिलं तर दुर्दैवी अशी पहिलीच शक्यताच प्रत्यक्षात उतरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतासमोर फारसे आव्हानात्मक लक्ष्य उभे करता आले नाही.  भारतीय संघाने शेवटी जरी काहीसा मोठा असा भासणारा विजय मिळवला असला तरी साधारण ४० व्या षटकाच्या आसपास आवश्यक असलेल्या धावगतीचे प्रमाण प्रति चेंडू एक धाव इतके झाले होते.  हार्दिक पांड्याने एक छोटीशी अशी चमकदार खेळ करून भारताची नैया पार केली. रोहितने ह्या स्पर्धेचा यशस्वी श्रीगणेशा केला !

त्यानंतर झालेल्या न्युझीलँड बांगलादेश या सामन्यामध्ये न्यूझीलंडने अपेक्षेनुसार बांगलादेशचा पराभव केला.  परंतु बांगलादेशने न्यूझीलंडच्या ८ खेळाडूंना तंबूत धाडून सामन्यांमध्ये काहीशी चुरस निर्माण केली होती.  बांगलादेश संघ तरुण खेळाडूंचा संघ असून त्याचे भवितव्य एकंदरीत उज्वल दिसते.  शकीब हसनने आपल्या फलंदाजीच्या उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर बांगलादेशच्या संघाला एक लक्षात राहण्याजोग्या स्पर्धेचे योगदान दिले. 

ऑस्ट्रेलिया वेस्टइंडीज हा सामना रंगतदार झाला. वेस्ट इंडिज संघामध्ये अत्यंत गुणवत्तापूर्ण अशा तरुण खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे.  या तरुण खेळाडूंच्या सोबतीला गेल, रसेल यांच्यासारखे अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये एकावेळी वेस्ट इंडिज संघ विजयासाठी उत्तम स्थितीमध्ये होता. परंतु शेवटी मोक्याच्या क्षणी गोंधळ केल्यामुळे त्यांनी एक सुवर्ण संधी गमावली.  या गुणवत्तापूर्ण संघाच्या आपल्या गुणवत्तेला न्याय न देण्याच्या वृत्तीचे मला बऱ्याच वेळा वाईट वाटते!

त्यानंतरच्या काही सामन्यांमध्ये पावसानेच आपले वर्चस्व गाजविले. पाकिस्तान श्रीलंका हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. 

इंग्लंडने बांगलादेश विरुद्ध ३८६ धावांचा डोंगर उभा केला.  बांगलादेशने या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु ते खरोखर गंभीर असे आव्हान मात्र निर्माण करु शकले नाहीत. 

पावसाच्या  व्यत्ययामध्ये न्यूझीलंडने मात्र आपल्या विजयाचा मेरू पुढे नेणं सुरु ठेवलं.  त्यांनी अफगाणिस्तानचा एका एकतर्फी लढतीमध्ये सात गडी राखून पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशातील क्रिकेटच्या मैदानावरील वैमनस्य आता रंग पकडू लागले आहे. भारतानं शिखर धवनच्या शतकाच्या आणि विराट कोहली, रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर ३५२ धावांचे एक मोठाले आव्हान ऑस्ट्रेलिया पुढे उभे केले.  ऑस्ट्रेलिया संघ एव्हाना भरात आला होता.  त्यांनी स्मिथ आणि करी यांच्या मदतीने या धावसंख्येचा जोरदार पाठलाग केला. परंतु भुवनेश्वर कुमारने एका षटकामध्ये दोन बळी मिळवून त्यांच्या पाठलागाची गाडी रुळावरून घसरवुन टाकली. ह्या सामन्यात शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळं त्याला दुर्दैवानं स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. मागं वळुन पाहता भारतासाठी हा एक मोठा दुर्दैवी क्षण ठरला! 

सुरुवातीच्या चमकदार सामन्यानंतर विंडीजचा संघ एव्हाना खराब कामगिरी करू लागला होता. इंग्लंडने पुढील सामन्यात त्यांचा आठ गडी राखून पराभव केला.  आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या रसेलकडून विंडीजने फार मोठ्या अपेक्षा केल्या असणार.  परंतु दुर्दैवानं रसेल सुरुवातीच्या सामन्यांमध्ये या अपेक्षांना साजेशी अशी कामगिरी करू शकला नाही.  त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्याला विश्वचषक स्पर्धेला रामराम करावा लागला. 

श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात ऍरोन फिंचने कप्तानाला साजेशी अशी कामगिरी करत दीडशतक ठोकले.  ३३४ धावांचे आव्हान श्रीलंकेला अजिबात पेलवले नाही, त्यांना एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  सतत तीन पराभवाला सामोरे जावे लागल्याने या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भीती असलेल्या दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मात्र एका मोठ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तान संघासाठी हा विश्वचषक निराशाजनक होत असल्याची ही ग्वाही होती.  संपुर्ण आशिया खंडाचे लक्ष लागुन राहिलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी मोठा पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाच्या सरफराजच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.  भारत आणि पाकिस्तान सामन्यात या दोन संघातील कामगिरीत, गुणवत्तेत आणि व्यावसायिकतेत बरीच मोठी तफावत दिसून आली. 

नंतरच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने  या पराभवामुळे आलेले नैराश्य दूर सारून उत्तम कामगिरीची नोंद केली. निराशाजनक होत चाललेल्या विश्वचषक स्पर्धेत ३२१ धावा उभारूनसुद्धा वेस्ट इंडिजला बांगलादेशने नमवले.  इथं शकीब हसन आणि लिटन दास या जोडीने चौथ्या विकेटसाठी १८९ धावांची नाबाद भागीदारी रचून विंडीजला पराभूत करण्यात मोलाचा वाटा बजावला.  स्पर्धेच्या या टप्प्यावर फलंदाजांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्मिती झाली होती. 

त्यानंतरच्या सामन्यात कप्तान इओन मॉर्गन याच्या विक्रमी १७ षटकाराच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेतील सर्वाधिक ३९७ धावांची नोंद केली. त्यानंतर अफगाणिस्तानला २४७ धावांमध्ये रोखून एका मोठ्या विजयाची प्राप्ती केली.  स्पर्धेच्या या टप्प्यावर आघाडीवर असणारे ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ आणि इतर संघ अशी स्पष्ट विभागणी दिसत होती.  त्यामुळे ही विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामने एका विशिष्ट मार्गाने होतील अशी भिती वाटू लागली होती.  

उपांत्य फेरीतील प्रवेशाचे आपले आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचा आपला सामना जिंकणे दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यावश्यक बनले होते.  परंतु पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात त्यांना न्यूझीलंड समोर फारसे मोठे लक्ष ठेवता आले नाही.  त्यानंतर विल्यम्सनने कप्तानाला साजेसी अशी १०६ धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला एका कमी धावसंख्येच्या सामन्यात चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून दिला. 

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरच्या १६६ धावांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर त्यांनी ३८१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.  बांगलादेशने पुन्हा एकदा लढत देत ३३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतरचा श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामना एकतर्फी होईल असाच सर्वांनी अंदाज बांधला होता.  परंतु लसित मलिंगाने ४३ धावात ४ बळी घेत आपल्या संघाला एक अविस्मरणीय विजय मिळवुन दिला आणि श्रीलंकेच्या विश्वचषक स्पर्धेतील आव्हानात नवीन जान आणली.  बेन स्टोक्सने एक अप्रतिम खेळी करत नाबाद ८२ धावा केल्या.  ४७ व्या शतकाच्या पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेतल्याने मार्क वूडला शेवटचा एक चेंडू खेळावा लागला.  दुर्दैवानं तो तेथे बाद झाला.  जर हा त्यावेळी बाद झाला नसता तर पुढील तीन षटकात काय घडले असते याचा अंदाज बांधणे मनोरंजक ठरु शकते!

भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म बघता भारत अफगाणिस्तान ही लढत एकतर्फी होण्याची अटकळ सर्वांनी बांधली होती. परंतु ह्या सामन्यामध्ये खेळपट्टीवर मंदगतीने चेंडू येत होता असे असे म्हटले गेले. कारण काहीही असो,  भारताला अफगाणिस्तानसारख्या संघासमोर फक्त २२४ धावसंख्या उभारता आली. भारताच्या पराभवाची स्पष्ट चिन्हे मध्यंतराच्या वेळी दिसत होती.  परंतु या स्पर्धेत वेळोवेळी भारतीय गोलंदाजांनी कठीण परिस्थितीतून भारतीय संघाला बाहेर काढले आहे.  या सामन्यातसुद्धा या कमी धावसंख्येला या गोलंदाजांनी विजयी धाव धावसंख्येत परिवर्तित केले. इथं शमीने एका हॅट्ट्रिकची सुद्धा नोंद केली. हा एक गुणी गोलंदाज सातत्याने भारतीय संघात या स्पर्धेत स्थान मिळवू शकला नाही यातच भारतीय गोलंदाजांची श्रेष्ठत्वाची कल्पना येते. 

त्याच दिवशी दुपारी सुरू झालेल्या दिवसरात्र सामन्यात न्यूझीलंडने कप्तान विल्यम्सन याच्या मोठ्या १४८ धावांच्या खेळीच्या जोरावर २९१ धावा उभारल्या.  विंडीजचा डाव गडगडला असता ब्रेथव्हाईटच्या एका अभूतपूर्व खेळीने विंडीजला एका अशक्यप्राय विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते.  ब्रेथव्हाईट ज्यावेळी सीमारेषेवर झेलबाद झाला तो फटका जर सीमारेषेबाहेर गेला असता तर विंडीज हा सामना जिंकला असता! तुम्ही विजयाच्या इतक्या समीप जाऊन सुद्धा त्या पासून वंचित राहू शकता याचं हे अत्यंत दुर्दैवी असे उदाहरण होते!  मागं वळून पाहता जर हा षटकार गेला असता तर न्यूझीलंड कदाचित उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश करु शकले नसते!  भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला असता! 

उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला यापुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक होते. त्या दृष्टीने खेळ करीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ३०८ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेला या धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही त्यांना केवळ २५९ धावांपर्यंत मजल मारता आली. 1992 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान संघाची साखळी फेरीतील कामगिरी ही या स्पर्धेतील कामगिरीशी मिळतीजुळती होती.  त्यामुळे हा संघ आता उपांत्य फेरीत मजल मारून विश्वचषक सुद्धा पटकावेल अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर एव्हाना पसरू लागले होते!

बांगलादेशने आपल्या श्रेष्ठ कामगिरीचे प्रदर्शन करीत अफगाणिस्तानवर ६२ धावांनी विजय मिळवला.  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते.  आरोन फिंचच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८५ धावांचे लक्ष्य उभारले.  बॅरेनडॉफ आणि स्टार्क जोडगोळीने इंग्लंड ला इंग्लंडच्या फलंदाजांना आपला जम बसवू दिला नाही. पुन्हा एकदा स्ट्रोकने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करत ८९ धावांची झुंजार खेळी उभारली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आपल्या उत्तम खेळाची पुनरावृत्ती करत पाकिस्तानने न्यूझीलंडवर सुद्धा सहा गडी राखून एका दिमाखदार विजयाची नोंद केली.  आता त्यांचे केवळ अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सामने शिल्लक असल्याने आणि न्यूझीलंडचा खेळ एव्हाना काहीसा ढेपाळल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा उंचावल्या होत्या. 

भारताने आपली विजयी वाटचाल सुरू ठेवत वेस्टइंडीज वर १२५ धावांनी दिमाखदार विजय मिळविला. पार्टी स्पॉयलर नावाची एक इंग्रजी भाषेत संज्ञा आहे.  दक्षिण आफ्रिका आपलं उपांत्य फेरीतील प्रवेश करण्याचे आव्हान जरी संपुष्टात आलं असलं तरी पार्टी स्पॉयलरची भूमिका बजावण्यासाठी एव्हाना सज्ज झाले होते.  त्यांच्या भूमिकेचा पहिला फटका बसला तो श्रीलंकेला!  श्रीलंकेवर त्यांनी एका दणदणीत विजयाची नोंद केली. या पराभवामुळे मात्र श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चुरशीचा होईल अशी अटकळ बऱ्याच जणांनी बांधली होती. सराव सामन्यात सुद्धा अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला होता.  227 धावांचे माफक लक्ष्य अफगाणिस्तानने उभारले होते. पाकिस्तान या धावसंख्येचा सहज पाठलाग करील असे चित्र डावाच्या सुरुवातीला होते.  परंतु डावाच्या मधल्या वेळी त्यांनी अचानक विकेट गमावून हे आव्हान खूप कठीण बनवून टाकले होते.  एका वेळी तर त्यांना चार षटकात जवळपास ५० धावांची गरज होती. अशावेळी स्पिनर चांगली गोलंदाजी करत असताना देखील कप्तान गुलबदिन  याने स्वतः गोलंदाजीला येण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला. हाच निर्णय अफगाणिस्तानसाठी अत्यंत घातक ठरला. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना माफक धावसंख्येत बाद करुन सामन्यात चुरस निर्माण केली होती.  परंतु उस्मान ख्वाजा आणि कॅरी या दोघांनीही उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन करीत २४३ ही एक चांगली धावसंख्या उभारण्यात आपल्या संघाला मदत केली.  नंतर स्टार्कने आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करीत पाच बळी देत न्यूझीलंडचा संघ १५७ धावांमध्ये गुंडाळला.  अशाप्रकारे स्टार्क हा स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या वेळी फॉर्ममध्ये येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. ह्या अंतिम  टप्प्याला हल्ली Business End असे संबोधिलं जातं. यावेळी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने आघाडीचे स्थान पटकाविले होते.  भारतीय आणि इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत कसे भेटू नये यासाठी उत्सुक असावेत असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती. 

गुणतक्त्यात आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भारत आणि इंग्लंड या सामन्याकडे पाकिस्तान बांगलादेश या देशांचे लक्ष लागून राहिले होते.  भारताने जर इंग्लंडला हरविले असते हे तर या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असती.  त्यामुळे उपखंडातील सर्वच देश भारताला या सामन्यात पाठिंबा देत आहेत असे चित्र निर्माण झाले होते. परंतु इंग्लिश संघाच्या बलवान फलंदाजीच्या जोरावर त्यांनी ३३७ एक मोठी धावसंख्या उभारली.  राहुल सुरुवातीला अगदी कमी धावसंख्येवर बाद झाल्यावर सुद्धा रोहित आणि विराट यांनी संथ गतीने का होईना परंतु विकेट्स न गमावता एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. परंतु शेवटी ३३७ ही धावसंख्या भारतासाठी थोडी अधिकच डोईजड ठरली.  पांड्या जोपर्यंत मैदानावर होता तोपर्यंत हीच धावसंख्या पार करण्याच्या आशा काही प्रमाणात शाबूत होत्या.  परंतु त्यानंतर मात्र भारतीय फलंदाजांना हवा तेवढा धावसंख्येचा वेग राखता न आल्यानं भारत पराभूत झाला.  भारत पराभूत झाल्याचे दुःख भारतीय संघ आणि चाहत्यांपेक्षा आपल्या शेजाऱ्यांना जास्त झाले. 

श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा २३ धावांनी पराभव केला.  या सामन्यात फर्नांडोने शतक झळकावले.  उपांत्य फेरीतील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला बांगलादेशवर विजय मिळवणे आवश्यक होते.  बांगलादेश संघ हा भारतीय संघाला हल्ली नेहमीच अटीतटीचा सामना लढा देत असतो.  इथं सुद्धा नियमित विकेट जात असताना देखील भारताला शेवटपर्यंत तणावात ठेवण्यात बांगलादेशने यश मिळवले होते.  शेवटी बुमराहनेच आपल्या शेवटच्या षटकामध्ये लागोपाठ दोन बळी मिळवत भारताला विजय मिळवून दिला.  भारतीय चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.  या पराभवामुळे बांगलादेशचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. 

आता पाकिस्तानचे लक्ष इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघात होणार्‍या सामन्याकडे लागले होते.  जर या सामन्यात न्युझीलँड जिंकलं असतं तर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा केवळ त्यांच्या बांगलादेशवरील विजयावर अवलंबून राहिल्या असत्या.  परंतु इंग्लंडने आपल्या पुढील सामन्यात न्यूझीलंडचा ११९ धावांनी दणदणीत पराभव केला. आता उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी पाकिस्तानसाठी पुढे एक केवळ अशक्यप्राय असे गणिती शक्यता उपलब्ध राहिली होती. त्यांना बांगलादेश विरुद्ध प्रथम फलंदाजी करत किमान तीनशे पंधरा/ सोळा धावांनी विजय मिळविणे आवश्यक बनले होते.  याचाच अर्थ असा की प्रथम फलंदाजी करून चारशे-पाचशे अशी मोठी धावसंख्या उभारून मोजक्या धावसंख्येत संपूर्ण बांगलादेश संघ बाद करणे त्यांना आवश्यक होते.  या सामन्याआधी इतिहासात क्रिकेट मैदानात असलेले झाड आणि त्यावर अडकलेला चेंडू यामुळे फलंदाजांनी कशा बऱ्याच धावा पळून काढल्या याविषयीची मनोरंजक माहिती ती क्रिकेट रसिकांपुढे ठेवण्यात आली. 

वेस्टइंडीजने आपल्या पुढील सामन्यात अफगाणिस्तानचा 23 धावांनी पराभव केला.  एक महान खेळाडू असलेल्या क्रिस गेलचा हा शेवटचा विश्वचषक सामना असल्याची शक्यता होती.  गणिती शक्यतांवर  अवलंबून असलेल्या पाकिस्तानला बांगलादेश विश्वर हवा तितका मोठा विजय मिळवता आला नाही.  त्या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले.  या क्षणी स्पर्धेतील केवळ दोन सामने साखळी सामने बाकी राहिले होते.  या दोन सामन्यातील निर्णयावर उपांत्य फेरीतील लढती कोणत्या संघांमध्ये दरम्यान होणार हे अवलंबून होते. भारताने तर अपेक्षेनुसार श्रीलंकेवर विजय मिळविला. याच सामन्यादरम्यान रोहित शर्माने एकाच विश्वचषक स्पर्धेत विक्रमी असे पाचवे शतक झळकाविले.  पार्टी स्पॉईलर बनलेल्या दक्षिण आफ्रिकेने एका चुरशीच्या लढ्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दहा धावांनी पराभव करुन उपांत्य फेरीतील लढतीत फेरफार करून टाकला. आता उपांत्य फेरीतील लढती भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा होणार होत्या. न्यूझीलंडविरुद्ध आपला उपांत्य फेरीचा सामना होणार म्हणून एकंदरीत भारतीय रसिकांमध्ये आणि संघांमध्ये काहीसं आनंदाचे वातावरण होते. न्यूझीलंड विरुद्धचा सामना भारतासाठी खरोखर सोपा जाणार की काय हे केवळ आपल्याला भविष्यकाळ सांगू शकणार होता! 

२०१९ च्या विश्वचषक साखळी स्पर्धेतील सामन्यांचा हा थोडक्यात गोषवारा! आज ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची पुर्वसंध्या ! कोट्यवधी क्रिकेट रसिकांनी ह्या पुर्वसंध्येविषयी बरीच काही स्वप्नं रंगवली होती, त्यांचा स्वप्नभंग करणारी ही पुर्वसंध्या ! पण रसिकांनो माझं एकच सांगणं - उद्या क्रिकेटच्या ह्या चार वर्षातुन रंगणाऱ्या महोत्सवाचा समारोप होणार आहे. स्पर्धेतील अनेक टप्पे  केलेले दोन संघ एकमेकांशी झुंजणार आहेत! निखळ मनाने त्याचा आनंद लुटा ! Tomorrow, let Cricket be the winner!



No comments:

Post a Comment