Friday, August 16, 2019

आजच्या युवकवर्गासमोरील आव्हानं !


वसई येथील सोमवंशीय क्षत्रिय समाज महामंडळ गेले कित्येक वर्षे स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधुन बालक पालक मेळावा आयोजित करत असतं. ह्या वर्षीच्या बालक पालक मेळाव्यात त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे !

आज इथं मी सद्यकालीन नोकऱ्यांची अशाश्वतता या विषयावर बोलणार आहे.  आज नोकरी करणारा तरुण वर्ग आपल्या नोकरीच्या शाश्वततेविषयी जी काही गृहितके बाळगून आहे त्याविषयी त्यांच्या वैधतेविषयी आपण चर्चा करुयात. काही काळापूर्वी नोकऱ्यांमध्ये वयाच्या ५८- ६० वर्षांपर्यंत शाश्वती असायची, त्यानंतर निवृत्तीवेतन मिळायचं! एकंदरीत नोकरवर्गाचं जीवन शाश्वत असायचं! आज परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे.  नोकरीमध्ये तुम्ही ज्या पदावर असता त्या पदासाठी आवश्यक कौशल्यं सतत बदलती असतात. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या तरुणवर्गाचे उदाहरण  आपण विचारात घेऊयात. त्यांनी समजा माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन  क्षेत्रात नोकरी घेतली असेल तर प्रत्येक वर्षी त्यांचा पगार वाढत जातो. आपण त्यांना मिळणारा पगार आणि कंपनीच्या दृष्टीने त्यांच्याकडे असणारी आवश्यक कौशल्ये यांचा आलेख काढला असता त्यांच्या कारकिर्दीमध्ये असा एक क्षण येतो की त्यांना त्या पदावर ठेवणे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे ठरत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हा  क्षण येतोच असे नाही. काहीजण काळाची पावले ओळखून आपली कौशल्ये सतत विकसित करत राहतात. त्यामुळे ते यशाच्या पायऱ्या चढत जातात.  आपली कौशल्ये कशी  विकसित करत जावी हा एका  वेगळ्या संवादाचा विषय आहे. 

परत एकदा मूळ मुद्द्याकडे वळुयात! काळानुसार आपण आपली कौशल्यं विकसित न केल्यास आपलं करिअर हे साधारणतः ४० ते ४५ वयाच्या आसपास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकू शकते याची जाण तरुण वर्गाने ठेवावी. या अनुषंगाने येणारा पुढील मुद्दा म्हणजे आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे नियोजन! हल्ली चांगल्या कंपन्यात नोकरीला लागलेल्या तरुणवर्गाच्या मागे कर्ज देणाऱ्या कंपन्या हात धुऊन पाठी लागलेल्या असतात. त्यांनी जाहिरात केलेल्या मालमत्तेचे अथवा कारचे वर्णन आपल्याला भुरळ पाडू शकते.  मग त्याचा परिणाम म्हणून आपण मोठाली कर्जे घेऊन बसतो. काही काळानंतर वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीमधील उच्च पदावरील तणाव आणि मासिक हप्ते वेळेवर भरण्याचा तणाव अशा विविध तणावांच्या गर्तेत तरुण वर्ग अडकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर अंथरुण पाहून पाय पसरावेत या म्हणीची आठवण तरुण वर्गाने ठेवावी. आलिशान जीवनपद्धतीचा मोह नको असं मला म्हणायचं नाही परंतु व्यावसायिक जीवनात आपण नक्की कुठं आहोत ह्याचं भान ठेऊन मगच आर्थिक निर्णय घ्या! आपल्या Financial Liabilities आणि आपल्या व्यावसायिक जीवनावरील आपली पकड ह्याची व्यवस्थित सांगड बसवा !

आता या विषयाशी काहीसा संबंधित परंतु वेगळा विचार! तरुण वर्ग आज या स्पर्धेमध्ये का उतरतो? एक समाज म्हणून आपण या तरुणवर्गावर किती दबाव अप्रत्यक्षपणे टाकत आहोत याचीदेखील जाणीव आपणास असणे आवश्यक आहे.  आजही भोवताली कमी तणावाच्या नोकऱ्या अस्तित्वात आहेत, त्या नोकऱ्यासुद्धा तुम्हांला तुमच्या उपजीविकेसाठी योग्य असतात. परंतु आपण समाजात अशा वलयांकित नसलेल्या नोकऱ्या करणाऱ्या तरुण वर्गाला काहीसे दुय्यम स्थान अप्रत्यक्षपणे देत असतो.  साधी नोकरी करणाऱ्या किंवा शेतीवाडी करणाऱ्या तरुणाला मुलगी देण्यासाठी समाज तात्काळ तयार होत नाही हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रशस्त घर, मोठाल्या गाड्या ही प्रतिष्ठेची प्रतिमा आपण निर्माण करत चाललो आहोत;  त्यामध्ये आपण सर्वजण अडकत आहोत. परंतु ह्या या प्रतिष्ठेच्या प्रतिमेमागे असणारी मेहनतीची पार्श्वभूमी आणि अनिश्चिततेचे सावट लक्षात असुद्यात. त्यामुळे भविष्याचे नियोजन करताना काहीशी सावधानतेची पावलं उचला अशीच माझी विनंती राहील!

(P.S. पोस्टच्या सुरुवातीचा फोटो आणि पोस्टचा विषय ह्याचा दुरान्वये संबंध नाही!)

No comments:

Post a Comment