Saturday, April 14, 2012

अवती भोवती


मध्यंतरी १४- १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या दोन बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. एक आत्महत्येविषयी आणि दुसरी या वयोगटातील मुलांनी अपहरण करून हत्या केलेल्या एका मुलाविषयी. संवेदनशील समाजाला अस्वस्थ करणाऱ्या ह्या बातम्या. त्या हल्ली आपणास अस्वस्थ करीत नाहीत त्याची कारणे वेगळी. माणूस / समाज जसजसा प्रगत होत जातो तसतसे आपल्याभोवती सुरक्षित कुंपणे घालून घेतो. ह्या कुंपणांची सीमा आर्थिक प्रगतीच्या प्रमाणाशी समप्रमाणात धावते. स्वतःच्या सदनिकेत अतिसुंदर सजावट करण्यापासून सुरुवात करून, स्वतःचा बंगला, बाग, कुंपण त्यानंतर अशा देखण्या बंगल्याचे संकुल असे टप्पे गाठत ही वृत्ती कधी कधी एखाद्या देशाच्या मनोवृत्तीत उतरते. जगात काहीही होवो पण माझ्या सुरक्षित कुंपणात जो पर्यंत काही होत नाही तो पर्यंत मला देणेघेणे नाही अशी ही वृत्ती. आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पायऱ्या ओलांडणारे आपण कधी ह्या मनोवृत्तीचे बळी बनतो हे आपणास कळत नाही.

विषयांतर बाजूला ठेवून मूळ मुद्द्याकडे आता वळतो. १४ - १५ वर्षांची मुले म्हणजे वैचारिक परिपक्वतेच्या मार्गावर अर्धा-अधिक प्रवास केलेली मनुषावस्था! वैचारिक परिपक्वता किती गाठली आहे हे मुलाच्या मुळच्या क्षमतेवर आणि त्याचावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. आपल्या अपत्याच्या मनात असणार सर्वात प्रभावी विचार ओळखण्याची इच्छा आणि क्षमता किती पालकांमध्ये असते हा महत्त्वाचा मुद्दा. समजा इच्छा आणि क्षमता दोन्ही असतील तर हा जो विचार आपल्या अपत्याच्या मनात घोळत आहे तो योग्य आहे का आणि नसल्यास त्याला योग्य वळण देण्याची जाणीव पालकांनी दाखवली पाहिजे. आता ही इच्छा असण्यानसण्याची कारणे पालकांचे स्वतःचे बालपण कसे गेले, पालकांना त्यांच्या जीवनसंघर्षाने कितपत व्यापून टाकले आहे आणि पालकांचे परस्परांमधील संबंध कसे आहेत यावर अवलंबून असू शकतात. क्षमतेमध्ये मुख्य मुद्दा येतो तो पालकांनी गाठलेल्या प्रगल्भतेचा! काही व्यक्तींमध्ये आपण आता पालक बनलो; आता आपल्या वागण्यात थोडाफार बदल करायला हवा हे समजण्याची प्रगल्भता कधीच येत नाही. ह्या वरील कारणांमुळे पालक आणि अपत्य ह्यांच्यातील संवाद कधी प्रगतावस्था गाठतच नाही. बदलेल्या काळामुळे एक गोष्ट झाली आहे. जर तुम्ही मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला नाही तर ती केव्हाच तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीत. हाच अनुभव कार्यालयात येतो, व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्यातील नाते हे सुद्धा बदलत्या काळानुसार मित्रत्वाचे झाले तरच यशस्वी होवू शकते. पालक आणि अपत्य हा जर संवाद खुरटला तर मुले बाहेरील व्यक्तीशी आपले मन मोकळे करतात आणि ह्या बाहेरील व्यक्ती मग त्यांची मते प्रभावीत करू शकतात.

इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो. पालकत्वाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या पालकांकडे मुलांच्या सुखी भविष्यासाठी दोन पर्याय असतात.

१> मुलांसाठी गडगंज संपत्ती निर्माण करून ठेवणे.

२> मुलाला एक सुजाण नागरिक बनविणे.

मागील मध्यमवर्गीय पिढीने दुसरा मार्ग स्वीकारला. आजच्या काही पालकांमध्ये पहिला मार्ग स्वीकारण्याची इच्छा दिसून येते. ते जसे चुकीचे तसेच केवळ दुसरा मार्ग स्वीकारणे हे पुरेसे नाही याचे भान असणेही महत्वाचे!

आत्महत्या

ह्या प्रकारचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१> प्रसार माध्यमातील एखाद्या बातमीचे / दृश्याचे त्याच्या परिणामाची जाणीव नसल्याने केलेले अंधानुकरण. ह्या मध्ये स्वतःची उपेक्षा झाल्याने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असू शकतो.

२> जीवनरुपी ग्रंथातील अगाध अनुभवाची जाणीव नसल्याने त्यातील केवळ एक दोन क्लेशदायक पाने समोर आल्याने निराश होवून आत्महत्या. ह्या प्रकारात एकदम सुखवस्तू घरातील मुलेसुद्धा येवू शकतात, ज्यांना जीवनात कधी नकार, अपयश यांचा सामना करावाच लागला नसतो.

खंडणीसाठी अपहरण / हत्या

हा मनुष्यजातीतील निरागसतेचा अंत किती लवकर होवू लागला आहे त्याचे उदाहरण होय. समाजात, मित्रांच्या समूहात प्रतिष्ठा, मान्यता हवी असेल तर कमीत कमी मोबाईल, गाडी असणे आवश्यक आहे असा समज तरुण पिढीने करून घेतला आहे आणि ती काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. योग्य मार्गाने ही तथाकथित प्रतिष्ठेची साधने मिळविण्याची सर्वांची क्षमता नसल्याने अस्वस्थतता निर्माण होवू शकते आणि त्याच्या जोडीला निरागसतेचा अंत आणि पालकांची संवादाचा अभाव असे घटक असल्यास खंडणीसाठी अपहरण/ हत्या अश्या टोकाच्या भूमिका घेतल्या जावू शकतात.

वरील दोन्ही प्रकारात प्रसारमाध्यमांच्या सुजाणतेचा अभाव हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. इंग्रजीतील सध्याचे अग्रगण्य स्थान मिळवलेल्या आणि वैभवशाली इतिहास असलेल्या वृत्तपत्राचे सध्याचे स्वरूप, त्यातील बातम्या ह्या फिल्मी, गुन्हेगारी विश्वाला जास्त लक्ष प्राप्त करून देणाऱ्या अशा आहेत. पूर्वी सुजाण, सुशिक्षित लोकांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनमतावर प्रभाव टाकला. आता काळ बदलला, मते मांडण्याचा अधिकार सर्वांना मिळाला, काहींनी तो आपल्या आर्थिक बळावर मिळविला. पण ह्या अयोग्य लोकांनी आपल्याभोवती अशुद्ध विचाराचा कलकलाट केला. प्रसार माध्यमात काम करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव असणे आवश्यक असते हे समजण्यापलीकडे असणाऱ्या किंवा त्याची पर्वा नसणाऱ्या लोकांच्या हातात आज प्रसारमाध्यमे आहेत ही सत्यस्थिती आहे. आजच्या कलियुगात ह्या अशुद्ध विचारांचा प्रतिकार करू शकणारे समर्थ, परिपक्व विचारांचे चक्र आपल्या आणि समाजातील मुलांभोवती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्या सुरक्षित कुंपणापलीकडे पडण्याची आपली तयारी हवी.


No comments:

Post a Comment