Sunday, July 22, 2012

हल्लाबोल


मागच्या सायकल शर्यतीच्या लेखात एक मुद्दा मांडायचा राहून गेला. आघाडीचा जथ्था बरेच अंतर एकत्र जात असतो. अंतिम रेषेला २-३ किमी अंतर बाकी असताना त्यातला एखादा स्पर्धक अचानक ह्या समूहातून पुढे निघतो, शेवटचा हल्ला चढवितो. ह्या क्षणाच्या निवडीमागे मोठे गणित असते. ह्या क्षणानंतर असतं ते अंतिम युद्ध! आपण हा शेवटचा निकराचा प्रयत्न किती काळ टिकवू शकतो, शेवटचा मार्ग कसा आहे, आपली आणि प्रतिस्पर्ध्याची शक्तिस्थाने, कमकुवत दुवे कोणते ह्या सर्वच अभ्यास करून ह्या क्षणाची निवड केली जाते. हा हल्लाबोल चढविणारा स्पर्धक नेहमीच शर्यत जिंकतो असे नाही, पण तरीदेखील प्रत्येक दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत असा एक स्पर्धक असावाच लागतो. इथले उदाहरण शर्यतीचे, पण तसेच लागू पडते ते स्पर्धात्मक व्यवसायात, युद्धात असे क्षण येतातच!

परवा ओवल सामन्यात शतक पूर्ण केल्यावर ग्राहम स्मिथ म्हणाला की पहिल्या दिवसानंतर इंग्लंडने सामन्यावर बर्यापैकी पकड बसविली होती. बहुतांशी कसोटी सामने ह्या स्थितीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतात. परंतु दक्षिण आफ्रिकेने दुसर्या दिवसानंतर सामना फिरवला. इंग्लंडला झटपट गुंडाळून धावांचा डोंगर उभा केला. इथे मुद्दा येतो तो मनसामर्थ्याचा, ज्याचे मनोबल जास्त तो आपल्या जवळील साधनांचा, आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेतो आणि यशस्वी बनतो. बारावीला असताना रुपारेल होस्टेलला राहिलो. तिथेही काहीसा असाच प्रकार अनुभवायला मिळाला होता. तिथे बारावीच्या मजल्यावर राहणारे सर्वजण एकदम हुशार, योग्य पात्रतेचे. दहावीपर्यंत अतिशय चमकलेले. फरक इतकाच की बारावीत पालकांचे संरक्षक कवच वसतिगृहात २४ तास उपलब्ध नव्हते, आपल्याहून अधिक क्षमतेची मुले आपल्या डोळ्यासमोर होती. आपल्यातील काही कच्चे दुवे प्रथमच स्वतःला कळत होते. मग १२ वीच्या निकालानंतर दोन वर्ग समोर आले. काही जणांनी ह्या सर्व घटकांना तोंड देत दैदिप्यमान यश मिळविले आणि काहीजण मात्र आपल्या क्षमतेइतके यश मिळवू शकले नाहीत.

अजून एक महत्वाची बाब डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचे झटपट विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता. तुमची परिस्थिती कितीही बिकट असो, त्या परिस्थितीतही तुमच्यासमोर एखादा उत्तम मार्ग उपलब्ध असतो. तो तुम्हाला शोधता आला पाहिजे.

No comments:

Post a Comment