Friday, February 4, 2011

संघर्ष


हल्ली बरेचजण भ्रष्ट्राचाराविरुद्ध बोलत असतात, राजकारणी लोक कसे देशाचे नुकसान करीत आहेत याविषयी तळमळीने बोलत असतात. अर्थात याला मीही अपवाद नाही. प्रश्न अशा आहे की हा संघर्ष लढायचा तर आपला शत्रू कोण आहे हे प्रथम ओळखणे आवश्यक आहे. नाहीतर मूळ कारण सोडून आपण फक्त त्या कारणाच्या परिणामांशी (outputs) लढत बसू आणि मूळ कारण मात्र तसेच राहील.

राजकारणी लोक किंवा भ्रष्ट लोक आले कोठून? ते तर आले आपल्यातून. ते आपले प्रतिनिधी. भ्रष्ट वृत्ती ही आपल्यातील प्रातिनिधिक लोकांची वृत्ती. मग अर्थात ती आपल्यात सुद्धा असणार. या भ्रष्ट वृत्तीचे कारण काय? तर समाजात मानाचे स्थान मिळविण्याचा अट्टाहास. येन केन प्रकारे मी समाजात प्रतिष्ठित बनणार ही प्रत्येकाच्या मनातील इच्छा! आता यासाठी मी प्रत्येक व्यक्तीला सुद्धा दोष देणार नाही. समाजात दोन प्रकारचे लोक. एक आधीच प्रतिष्ठित घरातून आलेले आणि दुसर्यांच्या घराणे आता पर्यंत प्रतिष्ठा न पाहिलेली. प्रतिष्ठित घरातून आलेल्या माणसांच्या गुणसूत्रात आपली प्रतिष्ठा टिकविण्याची सुप्त इच्छा तर अप्रतिष्ठित घरातून आलेल्या व्यक्ती मध्ये आतापर्यंत राहून गेलेला मान मिळविण्याची तीव्र धडपड! हा संघर्ष तर पूर्वीपासून असणार. परंतु पूर्वी सामान्य लोकांच्यात प्रारब्ध स्वीकारण्याची प्रवृत्ती होती, आज त्यांनी प्रारब्धाला झुगारून दिले आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे प्रयत्नवादी बनणे ही, परंतु त्यात आपला मार्ग कोणता याचे सारासार भान असणे आवश्यक आहे.

थोडक्यात भान ठेवा की भ्रष्ट्राचाराचा लढा आहे तो आपल्यातील वृत्तीशी, कोण्या एका व्यक्तीशी नव्हे! आणि म्हणूनच हा संघर्ष मोठा कठीण आहे. बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूशी संघर्ष केव्हाही कठीणच असतो!

No comments:

Post a Comment