Saturday, February 26, 2011

भावना आणि व्यवहार



मनुष्यजातीचा भावना आणि व्यवहार यातील संघर्ष पुरातन कालापासून चालू असावा अशी माझी समजूत आहे. हल्लीच्या काळात मात्र हा संघर्ष थोडा तीव्र झाला इतकेच. प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या दोघांत समन्वय साधायचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या भावना त्याचे जन्मस्थळ, जवळचे नातेवाईक, मित्र यांच्याशी निगडीत तर व्यवहार हा पैसा, नोकरी आणि जीवनाच्या संघर्षाशी संबंधित! काही उदाहरणे तात्कालिक पातळीवरची तर काही उदाहरणे आयुष्यातील मोठमोठे निर्णय घेतानाची!

उदाहरणे द्यायची तर कित्येक, आपल्या मातापित्यांना सोडून नोकरीनिमित्त परदेशी निघालेलं अपत्य, वार्षिक APPRAISAL च्या वेळी होणारी संवेदनशील व्यवस्थापकाची स्थिती. काही भोळीभाबडी माणसे हा संघर्ष सुप्रसिद्ध लोकांपर्यंत नेवून ठेवतात. पहिल्या IPL च्या वेळी मुंबई इंडिअन संघात सचिनने विनोद कांबळीला संघात घेण्यासाठी वजन टाकावे, बोरिस बेकार आणि स्टेफी ग्राफ यांचा विवाह व्हावा ही मराठी माणसाची भावनात्मक होऊन पाहिलेली स्वप्ने.

ह्या संघर्षाला सामोरे जाण्याची तंत्रेसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी. व्यवहाराच्या बाजूने निर्णय घेताना परिस्थितीला दोष देणे हे एक नेहमीचे तंत्र. या जागी मी नसतो आणि दुसरा कोणी जरी असता तरी त्याला सुद्धा हाच निर्णय घ्यावा लागला असता असे स्पष्टीकरण देणे हा सर्वात सोपा उपाय. काही माणसांना मात्र आयुष्यात कधी व्यवहार जमत नाही आणि व्यवहार न जमल्याची त्यांना खंतही नसते. 'दिल का राजा' असलेली अशी लोकं आपल्या मर्जीने आयुष्य जगात असतात. 3 Idiot मधला आमीर खान हे त्याचे उदाहरण. काही उच्च पदावरील माणसांचा एक गुण मात्र वाखाणण्याजोगा आणि तो म्हणजे 'switching technique'. एक काम झाल्यावर त्यातील आपल्या भावना, विचार तत्काळ बंद करून लगेच नवीन कामाच्या भावना, विचार मनात आणायचे हे ते तंत्र. त्या विषयी पुढे कधी तरी!

No comments:

Post a Comment