Friday, February 18, 2011

आयुष्य



जगाच्या पाठीवर अनेक बहुरंगी बहुढंगी घटना घडत असतात. त्यातील काही आपल्या वाट्याला येतात. आपापल्या स्वभावानुसार आपण या घटनांचे विश्लेषण करतो आणि या अनुभवानुसार पुढे असे झाले तर काय करावे म्हणून उपाययोजना करतो.

आपल्या आयुष्याचे ढोबळमानाने दोन भाग मानता येतील. एक भाग जो आपण नियंत्रित करू शकतो असा आणि दुसरा म्हणजे ज्या भागावर आपले काही नियंत्रण नसते तसा. ह्या भागांची टक्केवारी वगैरे करण्याच्या फंदात पडण्याचा काही उपयोग नाही. नियंत्रण नसणाऱ्या भागांची उदाहरणे म्हणजे आजार, अपघात आणि आजच्या युगात काही प्रमाणात नाती. हाच भाग अगदी टोकाला खेचायचा झाला तर आपल्या घरावर विमान कोसळू शकते, पृथ्वीवर एक मोठी शीला कोसळून पृथ्वी नाश पावू शकते किंवा सर्व पृथ्वी कृष्णविवरात खेचली जाऊ शकते.

आयुष्याच्या बर्याच कालावधीत आपण नियंत्रित करू शकणार्या भागाशी सामना करत असतो. दुसरा भाग प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवावा लागतो. परंतु ह्या भागाची क्षमता मात्र पहिल्या भागाचे आपले विश्व पूर्ण व्यापून टाकण्याची असते.

दैनंदिन जीवनातील आपला संघर्ष पहिल्या भागासाठीचा असतो. अधिकाधिक मेहनत करून बर्या वाईट मार्गाने ह्या भागावर आपण नियंत्रण आणू पाहतो. थोडक्यात म्हणायचे झाले तर आपणाजवळील संपत्ती ह्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपणास मदत करते. समजा अंबानी बंधूचे उदाहरण घेतले तर त्यांचा ह्या भागावर पूर्ण ताबा असतो.

काही जणांना बर्याच वेळा असे वाटते की आपण पहिल्या भागाच्या जोरावर दुसर्या भागावर सुद्धा नियंत्रण करू शकतो. लहानपणी वाचलेली एका राजाची गोष्ट, त्याला ज्योतिष्याने सांगितले की पाच दिवसाच्या आत तुला सर्पदंशाने मृत्यू येणार. तो बिचारा स्वतःला राजवाड्यात कडेकोट बंदोबस्तात ठेवतो. शेवटच्या दिवशी मात्र फळातून एक कीड निघून तिचे सापात रुपांतर होऊन तो राजाला दंश करतो आणि राजा मरतो. आता समजा हीच गोष्ट दररोज शेतात काम करून भाकरी मिळवणाऱ्या शेतकर्याची असती तर? तो बिचारा पाच दिवस स्वतःला बंद करून तर घेवू शकत नाही?

दुसर्या भागाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. काहीजण आस्तिक बनून दैवी शक्तीचा ह्या भागातील हस्तक्षेप अपेक्षितात. काही जण मात्र ह्या भागावर काही केल्या नियंत्रण करता येत नसल्याने आला क्षण मजेत जगावा अशा वृत्तीचे असतात.

लिहिता लिहिता असे जाणवले की काही गोष्टी मात्र ह्या दोन्ही भागांना समाविष्ट करतात. आपली मुलं पुढे काय करणार, कसे नागरिक बनणार? ही बाब म्हटली तर काही प्रमाणात आपल्या हातातली तर काही प्रमाणात आपल्या हाताबाहेरील. अशी अजून काही उदाहरणे असतील

दीपकने ह्या ब्लॉगची स्थापना करून १७ फेब्रुवारीला एक वर्ष झाले. एका वर्षात ७८ ब्लॉग! Not Bad at all!

No comments:

Post a Comment