Friday, April 15, 2011

असेच काही





राहून राहून मी एकत्र कुटुंब पद्धतीकडे वळतो. एका जवळच्या मित्राच्या टिप्पणीनुसार, एकत्र कुटुंब पद्धतीचा माझ्यावर मोठा पगडा आहे. एकत्र कुटुंब पद्धती आपल्या डोळ्यासमोर बघता बघता नाहीशी झाली. थोडा विचार करता असे जाणवते की एकत्र कुटुंब संस्थेत काळानुसार थोडेच पण योग्य बदल केले असते ती टिकली सुद्धा असती. ह्या संस्थेतील काही व्यक्तींचा त्याग (स्वखुशीने अथवा परिस्थितीमुळे) हा एकत्र कुटुंबसंस्थेचा पाया होता. जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढले तसतसे स्वःत्वाची भावना वाढीस लागली आणि त्यागभावना लोपास गेली. एकत्र कुटुंबसंस्थेचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्या कुटुंबात वाढणार्या मुलांचे जोपासणारे भावनिक संतुलन. आजी आजोबा, काका, काकी, मोठी भावंडे यांच्या सहवासात वाढताना आपण एका मोठ्या संस्थेचा भाग असल्याची एक सुखद भावना जोपासली जाते. आणि मग स्वतःची एक ओळख (identity) निर्माण होते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोष्टी वाटून घेण्याची सवय लागते. विभक्त कुटुंबात वाढलेल्या मुलांना मात्र स्वःताची एक Space लागते. आणि त्यामुळेच लग्नानंतर विवाहसंस्थेत स्थिरावताना ह्या मुलांना थोडा जास्त वेळ लागतो. एकत्र कुटुंबसंस्थेचे पुनर्जीवन करणे शक्य आहे का? ज्या रुपात ती अस्तित्वात होती त्या स्वरुपात तर नाही पण काळानुसार थोडेफार बदल करून ती अजूनही अमलात आणता येईल असे मला वाटते. उदाहरण द्यायचे झाले तर बाजूबाजूला सदनिका घेवून राहणे हा एक उपाय असू शकतो. अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो आणि तो म्हणजे लहान मुलांचे होणारे शाब्दिक कौतुक! आजी, आजोबांच्या नजरेतून नातवंडे सदैव बालकेच असतात. त्यामुळे नोकरीला जाणार्या आपल्या नातवंडाचे एका बालकाप्रमाणे कौतुक करणे केवळ आजी, आजोबाच जाणो! बाहेरून कितीही आपण त्याला विरोध केला तरीही मनातून आपण सुखावत असतो. स्वःताचे कौतुक करून घेण्याची सुप्त इच्छा प्रत्येक प्रौढ माणसाच्या मनात असते. विभक्त कुटुंबात ही इच्छा बर्याच प्रमाणात अतृप्त राहते. आजच्या जीवन प्रत्येकजण विविध पातळ्यांवर विविध प्रमाणात संघर्ष करीत असतो. आजचा हा ब्लॉग विनाकौतुक जीवनसंघर्षाला सामोरे जाणार्या आपण सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी!

No comments:

Post a Comment