Thursday, August 23, 2012

कीर्तनकार


कंपनीत अधूनमधून प्रशिक्षण वर्गासाठी तुमची नेमणूक केली जाते. प्रशिक्षण वर्ग म्हणजे हे जग आदर्शवादी आहे असे समजून प्रशिक्षकाने दिलेले ग्यान! अशाच एका वर्गात प्रशिक्षक ग्यान देता झाला, एखाद्या माणसाला कठोर उपदेश द्यायचा असेल तर एकदम त्याकडे वळू नका, प्रथम त्याने केलेल्या चांगल्या कामाचा आढावा घ्या आणि हळूहळू कोठे चूक झाली, चुकीला कारणीभूत असलेले घटक कोणते याकडे वळा. आम्ही सर्वांनी माना डोलावल्या. नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही कधी उपदेश देणारे असता तर कधी घेणारे. थोडे विषयांतर, हल्ली एकंदरीत आपली झणझणीत बोलणे ऐकण्याची, खाणे खाण्याची क्षमता कमी झाली आहे हे मात्र खरे. पांढरपेशे बनण्याचा हा दुष्परिणाम!
माझ्या मनात मात्र संशयाचे भूत शिरले. कोणी बोलताना माझ्याविषयी चांगले बोलू लागले की मी हल्ली एकदम सावध होऊन जातो. त्या प्रशिक्षकाची आठवण येते आणि हा चांगले बोलण्याचा भाग खऱ्या उपदेशाची प्रस्तावना तर नव्हे असा संशय येतो. मध्येच एका जवळच्या मित्राने फोन केला. अरे आदित्य तू एकदम चांगले ब्लॉग लिहतो. झाले, मी सावध स्थितीत गेलो. प्रस्तावना झाल्यावर तो म्हणाला, तुझे ब्लॉग वाचून मला मंदिरातील कीर्तनकाराची आठवण येते. मी धन्य झालो. फोनच्या पलीकडील त्याचे अदृश्य हास्य मी पूर्णपणे पाहू शकत होतो.
बोलणे संपल्यावर काही वेळाने मात्र मी खुश झालो. मध्येच मी फेसबुकावर ग्यान पाजळले होते, दोन पिढ्यांमधील संघर्ष हा कायम राहणार. नवीन पिढीला जुनी पिढी सदैव पुराणमतवादी वाटणार आणि जुन्या पिढीला नवीन पिढी सदैव बंडखोर वाटणार. सध्याच्या युगातील तंत्रज्ञानाच्या झपाट्यामुळे जुनी पिढी काहीशी हबकली आहे. त्यांचा ज्ञान देण्याचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही, ही तंत्रज्ञानाचे दिंडोरे पिटणारी नवीन पिढी काही वर्षात आपली भूमिका बदलेल आणि मग मजा येईल असा माझ्या ज्ञानाचा सूर होता. तर मी माझी समजूत करून घेतली की मी जुन्या पिढीचा प्रतिनिधी आहे आणि त्या पिढीतर्फे कीर्तनकाराची भूमिका मी बजावतो आहे.
एखाद्या पिढीचे प्रतिनिधित्व करून ज्ञान देण्यासाठी कशाची गरज असते? मध्येच माझ्या पत्नीने चांगला मुद्दा मांडला identity चा. एखाद्या गावात, एकत्र कुटुंबात वाढलेल्या मुलास आपण त्या गावाचे, कुटुंबाचे प्रतिनिधी आहोत याचे बाळकडू लहानपणापासून अप्रत्यक्षरीत्या मिळत असते आणि मग तो आयुष्यभर त्या संस्कृतीचा पुरस्कर्ता बनतो. आजूबाजूच्या जगातील थिल्लर गोष्टींचा अशा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता थोडी कमी असते. जेव्हा आजच्या युगात तुम्ही आपल्या मुलांस मुंबईत, अमेरिकेत वाढवता तेव्हा ह्या घटकांची उणीव भासते असा एकंदरीत तिच्या बोलण्याचा सूर होता. बायकोचे बोलणे निर्विवादपणे मान्य करण्याचे जे दुर्मिळ क्षण येतात त्यातला हा एक क्षण!
देवळातील कीर्तनकार हा उपदेश देणारा अधिकृत माणूस. पण गावात जवळजवळ सर्वचजण स्वखुशीने ही भूमिका बजावत असतात. शहरात मात्र लोक काहीसे अलिप्त बनतात. पूर्ण वाक्यातील संवाद मग तो सार्वजनिक जीवनातील असो की वैयक्तिक, झपाट्याने कमी होताना दिसतो. नक्कीच सध्या जगाला कीर्तनकाराची आवश्यकता आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!

No comments:

Post a Comment