Saturday, June 14, 2014

सामाजिक जीवनातील मध्यमवर्गीयांचा सहभाग!


आपण काही काळ मागे जाऊयात. स्वातंत्र्यापूर्वी बहुतांशी लोक आर्थिकदृष्ट्या गरिबीत होते. आपल्या घरचा कारभार सांभाळणे हीच मोठी कसरत असे. त्यामुळे समाजकारणात त्यांनी जरी भाग घेतला नसला तरी आपल्या गावातील, परिसरातील लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. ही मदत करणे हे आपले कर्तव्य आहे ही भावना होती आणि त्यामुळे ह्या बदल्यात प्रसिद्धी वगैरे मिळावी अशी अजिबात अपेक्षा नसे.
पुढे स्वातंत्र्य वगैरे मिळाले. लोकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या, मध्यमवर्ग मोठ्या संख्येने शिक्षकी पेशात उतरला. अपत्यसंख्या २-३ वर मर्यादित झाली. वर्तमानपत्र वाचण्याचे, समाजात वावरण्याचे प्रमाण वाढले आणि एक सामाजिक जाणीव बऱ्याच जणांमध्ये निर्माण झाली. आपल्या परीने मध्यमवर्ग समाजकारणात भाग घेऊ लागला. महिलावर्गाला सांसारिक जबाबदारीमुळे हे फारसे शक्य झाले नाही. मध्यमवर्गीयांच्या ह्या समाजकारणाला एकदम मोठी व्यापक दिशा वगैरे नव्हती. स्थानिक भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हेच बऱ्याच वेळा लक्ष असे.
ह्या कालावधीत समाजाच्या मानसिकेत हळूहळू बदल होत चालला होता. समाजातील वैयक्तिक स्थान ही महत्वाची गोष्ट बनत चालली होती. उद्योगाची मानसिकता नसलेल्या काही वर्गांनी समाजातील आपले स्थान उंचाविण्यासाठी शिक्षणाची कास धरली. स्वानंदासाठी, कर्तव्यपूर्तीसाठी समाजकारण ही भावना एव्हाना कमी होऊ लागली होऊ लागली होती. ह्या वातावरणात वाढणाऱ्या पिढीचा एकंदरीत समाजकारणाविषयी भ्रमनिरासच झाला होता. आपण आपला स्वार्थ पाहावा आणि गप्प राहावे ही भावना मूळ धरू लागली होती.
ही मानसिकता काही काळ टिकली. आणि मग पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाचा काळ आला. केवळ शिक्षणाने समाजात मान मिळण्याचे दिवस सरले होते. शैक्षणिक यशाला नोकरीधंद्यातील यशाची जोड देणे आवश्यक बनले होते. ते ही ह्या वर्गाने प्रयत्नपूर्वक साध्य केले. मग आता आजूबाजूला समाजाकडे पाहण्याची वेळ आली. अरेच्चा हे काय झालं? कमी शिकलेल्या लोकांनी सामाजिक जीवनावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. शिक्षित वर्गाला आता शैक्षणिक जीवनातील यशाची किल्ली मिळाली असल्याचा ग्रह झाला असल्याने आता आपण काही वेळ समाजकारणासाठी देऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला होता. परंतु समाजकारणात पूर्ण झोकून देण्यासाठी एकतर वेळ नव्हता किंवा त्या क्षेत्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेण्याची जी क्षमता असावी लागते ती सर्वांकडे नव्हती. त्यामुळे बऱ्याच जणांसाठी समाजकारणातील हा सहभाग सोशल मिडियापुरता मर्यादित राहिला. काही खरोखर बुद्धिमान लोकांनी व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांशी जुळवून घेण्याची तयारी आणि क्षमता दाखविली. सध्यातरी अशा लोकांचा समाजकारणात वावर सुरु झालेला दिसत आहे.
पुढे नक्की काय होणार हे आजच सांगणे काहीसे कठीण आहे. सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वावर असलेला सुशिक्षित वर्ग नक्कीच ह्या निवडणुकीतील एकाच पक्षाला मिळालेल्या बहुमताला कारणीभूत ठरला असे मानण्यास वाव आहे. पुढेसुद्धा हा वर्ग निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव दाखवेल असे मला वाटतं. परंतु ह्या वर्गातील लोक सक्रिय समाजकारण आणि पुढे सक्रिय राजकारण असा टप्पा गाठतील का? केवळ सुशिक्षित आणि जमलं असेल तितकं समाजकारण ह्या मुद्द्यावर एखाद्या उमेदवारास निवडणुकीत यश मिळू शकेल काय?  भारतीय राजकारण पुढे कोणती दिशा घेईल हे बरेचसे ह्या मुद्द्यावर अवलंबून असणार आहे!


(तळटीप - कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलण्याचा हक्क आपल्याला ह्या देशात आहे. लिहिताना सुद्धा बऱ्यापैकी हा हक्क असतो परंतु सार्वजनिक माध्यमात लिहिताना कोणत्या विषयावर कोणत्या मर्यादेत लिहायचे ह्याचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. नाहीतर अनिष्ट परिणाम उद्भवू शकतात. ही प्रस्तावना अशासाठी की आजचा जो विषय आहे त्यावर खरेतर अधिकारवाणीने बोलण्याचा माझी पात्रता बहुदा नाही. तरी सुद्धा!!!


आणि हो असाच थोडा ह्याच विषयावरील लेख मी आधी लिहिला होता! )

No comments:

Post a Comment