Sunday, June 29, 2014

निरंजन - एक मन उधाण वाऱ्याचे!


निरंजन मुंबईत एका बहुदेशीय (मल्टीनॅशनल) कंपनीत काम करतो. पैसे कमविण्याच्या स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या सर्व अपेक्षा त्याने पूर्ण केल्या आहेत किंबहुना बऱ्याच प्रमाणात ओलांडल्या आहेत. निरंजनचे मन मात्र सतत त्याच्याशी संवाद साधत असते. कधी ते त्याला तू हे जे काही सर्व करीत आहे ते कसे निरर्थक आहे हे जाणवून देतं तर कधी कोलमडण्याच्या मार्गावर असलेल्या निरंजनला ते दिलासा देत. तर ही ब्लॉगपोस्ट निरंजन आणि त्याच्या मनातील संवादाची!
१) कार्यालयात निरंजनकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ह्या सर्वच काही लिखित स्वरुपात नसतात. लिखित स्वरूपातील जबाबदाऱ्या सुद्धा नक्की कशा पूर्ण करायच्या ह्या विषयी कोणी नक्की सखोल मार्गदर्शन केलेलं नसतं. ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी निरंजनकडे अगदी परिपूर्णपणे त्या आटोपणे किंवा कशाबशा आटपणे हे दोन पर्याय असतात. एकंदरीत परिस्थितीचा अभ्यास करून निरंजन ह्यातील एक पर्याय निवडतो.
लिखित स्वरुपात नसलेल्या जबाबदाऱ्या बऱ्याच वेळा दीर्घ मुदतीच्या लक्ष्यावर केंद्रित करून बनविलेल्या असतात. त्या एका दिवसातील कामाने संपविणे शक्य नसते. 'थेंबे थेंबे तळे साचे' ह्या उक्तीप्रमाणे ह्या दीर्घ मुदतीच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असते. ह्या वाटचालीसाठी मार्ग निरंजनला स्वतःच शोधायचा असतो. लिखित स्वरूपातील जबाबदाऱ्या आटोपल्या की काही काळ विसावू पाहणाऱ्या मनाला तत्काळ समजावून ह्या दीर्घ वाटचालीचा त्या दिवसात जमेल तितक मार्गक्रमण करणे आवश्यक असते.
२) निरंजन जेव्हा कार्यालयाच्या सुरु होण्याच्या वेळी तिथं येतो त्यावेळी तो आपली ई- मेल चेक करतो. घर ते कार्यालय ह्या प्रवासातील बऱ्यावाईट अनुभवांनी निरंजनचं मन काहीसं भरकटलेल असतं. त्याला समजावून निरंजन त्याचे लक्ष ई-मेल वर आणतो. दररोज शेकडोंच्या संख्येत येणाऱ्या ई मेल मधून महत्वाच्या ई मेलना शोधण्याचे काम मग त्याचा मेंदू करू लागतो. दीर्घकालीन लक्ष्यांना गाठण्यासाठी दिवसातील कार्यालयाचा हा  सुरुवातीचा काळ महत्वाचा आहे हे मन त्याला बजावत असतंच. त्यामुळे महत्वाच्या ई मेलवर कृती करून किंवा कृती करण्यासाठी टीम मधील लोकांची निवड करून निरंजन दीर्घकालीन लक्ष्याकडे वळतो. दिवसभरातील आपल्यासमोरील कामाची यादी लिखित स्वरुपात समोर ठेवण्याचा निरंजन आटोकाट प्रयत्न करीत असतो. परंतु ते नेहमीच जमतं असे नाही.
३) कार्यालयातील सर्वजण स्थिरावले की मग मीटिंगचा, दूरध्वनीवरील कॉल ह्यांचा खेळ चालू होतो. ह्या खेळात आपल्या मेंदूतील  माहिती दुसऱ्याला समजेल अशा भाषेत मांडणे, दुसऱ्यांनी मांडलेली माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचविणे, ह्या सर्व प्रकारात निर्माण होणाऱ्या मनातील भावनांना सांभाळणे, काही वेळा गरज असल्यास भावनांना अतिरंजित रूप देऊन समोरच्याला योग्य संदेश देणे हे सर्व प्रकार निरंजन करत असतो.
४) मध्येच निरंजन त्याच्या बॉसला भेटतो. वर्षभरात ९९ टक्के वेळा निरंजन बॉसचे म्हणणे ऐकतो. आजचा दिवस बाकीच्या १ टक्क्यातला आहे का हा निर्णय निरंजन प्रत्येक मीटिंग मध्ये घेत असतो. दररोज जरी त्याला आजची ही बॉसबरोबरची मीटिंग त्या १ टक्क्यांतली आहे असे वाटत असले तरी त्याचे मन त्याला आणि तो मनाला समजावतो आणि खरोखर त्या टक्क्याला १ च्या वर जाऊ देत नाही.
५) असाच दिवस पुढे जात असतो. वेळ मिळताच निरंजन घरची खबरबात घेतो. साप्ताहिक सुट्टीत मुलांचा अभ्यास आपण अजून जास्त घ्यायला हवा होता असे त्याला राहून राहून वाटत राहते. पत्नीने घरात न चालणाऱ्या गोष्टींची फोनवरून दिलेली यादी त्याचा मेंदू ग्रहण करीत असतो. त्यातील एखादी धोक्याच्या पातळीच्या वर जाणारी बाब बायकोच्या स्वरातील फरकावरून तात्काळ ओळखण्याचे तंत्र एव्हाना निरंजनच्या मेंदूला अवगत झाले आहे आणि त्यामुळे असा धोका दिसताच तो निरंजनला सावध करतो आणि मग ऑफिसचे काम करीत असलेला निरंजन तत्काळ बायकोला उत्तर देतो. हा कॉल संपला की ह्या आठवड्यात आईवडिलांशी एकदा बोललंच पाहिजे असा निर्धार निरंजन करतो.
६) मग अशीच जेवणाची / नास्त्याची वेळ येते. वयानुसार निरंजन घरून डबा नेतो किंवा अगदी आरोग्यदायी आहार घेतो. आपल्या भोवताली अगदी चवदार पदार्थ खाणाऱ्या इतरांना पाहून निरंजन आपल्या गतआयुष्याची आठवण काढतो. आपल्या अजूनही न जमणाऱ्या व्यायामाच्या लक्ष्याविषयी मनातल्या मनात तो खंत व्यक्त करतो.
७) निरंजन सोशल मिडियामध्ये  सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या समवयस्क लोकांचे अपडेट वाचून स्वतःला अपराधी वाटून घेतो. निवृत्तीनंतर आपणही असेच कार्य करायचंच असा मनातल्या मनात निर्धार तो करतो.
८) दिवस संपत आलेला असतो. शेवटची पंधरा वीस मिनिटं बाकी असतात. निरंजन पुन्हा एकदा आपल्या अल्पमुदतीच्या कामाच्या यादीकडे पाहतो आणि त्यातील एक दोन कामे आटपायचा एक शेवटचा प्रयत्न करतो.
९) मग बाकी असतो तो घराचा परतीचा प्रवास! हा प्रवास किती खडतर असेल हे निरंजनच्या नशिबावर अवलंबून असतं! थकल्याभागल्या शरीरातील तितक्याच थकलेल्या मनाला सांभाळत निरंजन कसाबसा घरी पोहोचतो. मुलंतर केव्हाच झोपी गेलेली असतात. बायकोला निरंजनविषयी सहानभूती वाटत असते की तिला तिच्या समस्यांनी ग्रासल्याने ह्या सर्वाला निरंजन जबाबदार आहे अशी भावना तिच्या मनात निर्माण झालेली असते हे एकेका दिवसावर अवलंबून असते.
१०) बाथरूम मधून फ्रेश होऊन आलेला निरंजन क्षणभर सोफ्यावर बसतो. मंद दिव्यात आपल्या सजवलेल्या घराकडे पाहत जुनी गाणी सुरु करतो. गाणं सुरु असतं - "दिल ढूँढता फिर वही फुरसत के रातदिन!"  


.
. . .
. .
.
.
. .
. . .


अशाच काही मोजक्या फुरसतीच्या क्षणांनंतर निरंजनच्या मनात सुरु  होतात ते दुसऱ्या दिवशीच्या महत्वाच्या मीटिंगचे विचार!

5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. हा निरंजन म्हणजे तुम्ही आम्ही सर्व बुद्धी जीवी चाकरमनी बरोबर ना ! तुमच्या सर्व पोस्ट मी वाचत असतो पण comment कधी केली नाही आज पहिल्यांदाच ............... धन्यवाद !

    ReplyDelete
  3. बरोबर राजुसाहेब! आपल्या सर्वांचीच ही कहाणी!

    दुनियेच्या नजरेतून सुखी असणाऱ्या, पण आजूबाजूला वावरणाऱ्या तथाकथित सुखात समाधानाच्या शोधात असणाऱ्या आपल्या सर्वांची!

    ReplyDelete