Saturday, March 12, 2011

क्रिकेट आणि निराशा


कालचा सामना आपण हरला. काही वर्षापूर्वी मला ह्याचा खूप त्रास बराच वेळ व्हायचा. जावेद मियांदादचा शारजाह मधील शेवटच्या चेंडूवरचा षटकार, तेंडूलकरने पाकिस्तान विरुद्ध १३६ धावांची खेळी केल्यावर विजयासाठी १६ धावा हव्या असताना तो बाद झाला आणि मग बाकीचे चार गडी १० धावात बाद झाले. ह्या दोन प्रसंगांनी माझ्या निराशेची परिसीमा गाठली होती.

हल्ली खूप त्रास होतो पण त्या मनःस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी मी वापरत असलेले उपाय थोडेसे टोकाचे असतात, पण ते मला उपयोगी पडतात. पहिला मार्ग म्हणजे देवाने आपल्याला आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टींचे स्मरण करणे आणि ह्या पराभवानंतर सुद्धा त्या गोष्टी आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही याची स्वतःला आठवण करून देणे. दुसरा मार्ग म्हणजे किशोरकुमारची ७० च्या सुमारातील गाणी लावून ऐकणे. तिसरा मार्ग म्हणजे कार्यालयातील किचकट कामाची स्वतःला आठवण करून देणे. अशा गोष्टींचा विचार करता करता पराभवाची तीव्रता थोडी कमी होते. मग मी साखळीचा गुण तक्ता घेवून बसतो आणि अजून सुद्धा भारत कसा उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो ह्याचे गणित मांडू लागतो.

अशा पराभवानंतर मी दोन गोष्टी टाळतो आणि त्या म्हणजे थिल्लर हिंदी बातमी वाहिन्या आणि दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील क्रीडा सदर. हल्ली प्रत्येकजण समीक्षक बनला आहे. मी सुद्धा समीक्षा करतो परंतु मी मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंची क्षमता, कप्तानाला निर्णय घेण्याचे असलेले स्वातंत्र्य याचा आदर करतो. ८५ च्या batch बरोबर झालेल्या ८ षटकाच्या सामन्यानंतर प्रत्यक्ष सामना खेळणे आणि बाहेरून टीका करणे यातील जमीन आसमानाचा फरक मला जाणवला.

असो ह्या निराशेच्या परीसीमेवरून आठवले की आपण निराश झालो हे स्वतःशी किंवा जवळच्या कोणाशी तरी मान्य करणे ही निराशेतून बाहेर पडण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हल्लीच्या जगात बरेचजण आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले पण यातील एक तरी पूर्णपणे सुखी झाला का? बहुतांशी सर्वांना कोणत्या तरी चिंतेने, निराशेने ग्रासलेले आहे. आपण जर दुसर्या एखाद्याच्या परिस्थितीशी स्वतःशी तुलना करून जर निराश होत असाल तर नीट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीच्या निराशा तुम्हाला माहीत नाहीयेत. योग्य मार्गाने निराशेवर मात करा आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी बघा, चांगल्या गोष्टींचे महत्व त्या आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर कळल्या अशी वेळ येवून देवू नका!

No comments:

Post a Comment