Thursday, February 27, 2014

थरार भाग ९..


त्या दिवशी बराच वेळ भोसले काका सायलीच्या घरी थांबले होते. "अग पण त्या डेटाबेसवर केलेल्या चौकशीचे निकाल काय आले हे तर कळेल का? त्यांनी विचारले. "तुम्ही पण, काका! मी स्वतःची बॉसच्या चौकशीसत्रातून कशी सुटका करून घ्यायची ह्याच्या मागे होते, माझे लक्ष थोडेच त्या गोष्टीकडे असणार!" सायली उद्गारली. "थांबा, मी तुम्हांला चहा ठेवते, मी पण अशी ना, इतका वेळ मी तुम्हांला चहाशिवाय ठेवलं!" काहीशा अपराधी भावनेने सायली उद्गारली. चहा बनविण्यात सायलीचा हातखंडा होता. बॉसने तिची चौकशी केली होती त्यावेळचा घटनाक्रम आठवायचा ती प्रयत्न करू लागली. बॉसने केवळ अर्धा मिनिटभर तिच्याभोवती त्या डेटाबेस क्वेरीच्या पानाची छापील कॉपी तिच्यासमोर धरली होती. इतक्यात चहाच्या उकळत्या वाफांकडे तिचे लक्ष गेले.








आणि अचानक तिच्या मेंदूत एक चमक गेली. उकळत्या चहाखालील गॅस बंद करून धावतच ती भोसलेकाकांकडे गेली. "काका, त्या छापीलकॉपीत जावा हा शब्द होता! हा उकळता चहा पाहून मला आठवलं!" भोसले एकदम खुश झाले. त्यांना इतकी माहिती पुरेशी होती. त्यांनी तात्काळ आपला पुतण्या नंदनला फोन लावला. नंदन हा एकदम होतकरू तरुण, व्यावसायिक क्षेत्रातील सर्व संधी सोडून तो समाजाची सेवा करायला पोलिसदलात सामील झाला होता. अर्ध्या तासातच त्याचा परत फोन आला. मुलकानी आडनाव असलेल्या दोन व्यक्तींनी काही दिवसाच्या अंतरावर बंगलोर ते जकार्ता आणि पुढे जावा असा प्रवास केला होता. भोसले एकदम खुशीत होते. आणि सायली सुद्धा! "अग, मला एक तत्काळ उद्या सकाळचे जकार्ताचे तिकीट बुक करून देशील का?" त्यांनी तिला विचारलं. "नक्की काका!" सायली अगदी उत्साहित होऊन म्हणाली. तिकिटाचे आरक्षण करताना आपण दोन तिकिटाचे आरक्षण करीत आहोत हे थोडेच ती भोसलेकाकांना सांगणार होती! देवाच्या कृपेने भारतीयांना इंडोनेशिया सरकारने आगमनाच्या वेळीच विसा मिळवून देण्याची सोय करून ठेवली होती.


भल्या पहाटे भोसलेकाका निघाले आणि काही वेळात सायलीसुद्धा! विमानाच्या गेटपर्यंत सायली भोसलेकाकांना चुकवत होती. न जाणो ह्यांनी आपल्याला इथून परत पाठवलं तर! पण एकदा विमानात प्रवेश केल्यावर मात्र तिने आपल्या चेहऱ्यावरील ओढणी काढून घेतली. खिडकीजवळची आपली सीट पकडून तिने अगांथा ख्रिस्तीचे पुस्तक डोळ्यासमोर धरून बसली. त्या पुस्तकाच्या आडून भोसलेकाकांचा शोध घेत असतानाच एक देखणा तरुण तिच्यासमोर आपला बोर्डिंग पास घेऊन आला. "हीच C१२ सीट आहे का?" असे त्याने इंग्रजीतून सायलीला विचारले. जरा आगाऊच आहे कार्ट! मनातल्या मनात सायलीने विचार करत त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. पण तो तरुण काही हार मानण्यातल्यापैकी नव्हता. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. "सीट क्रमांक इथे लिहिला आहे!" सायलीने ठसक्यात उत्तर दिले. "बाकी दिसायला तसा बरा आहे!" मनातल्या मनात सायली म्हणाली. आता हा बाजूला बसला, कधी एकदा जकार्ता येईल ह्याचा ती विचार करू लागली.


विमानाने उड्डाण केल्यावर मात्र सायलीला राहवेना. आता भोसलेकाका तिला परत पाठवायची शक्यता कमीच होती. तिने उठून पाहिलं तर पुढच्या दोन सीट सोडून तिला भोसलेकाका दिसले. सायलीला पाहून त्यांना काय बोलावे तेच सुचेना! "तू थांब, मी तिथे येतो" असे तिला नजरेनेच खुणावून ते उठले! सायलीच्या सीटजवळ पोहोचल्यावर तिच्या बाजूला ब्लैंकेट ओढून झोपलेल्या तरुणाला पाहून त्यांना आयुष्यातील सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का बसला.


नंदन, सायली आणि भोसलेकाकांनी दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्व जावा बेटाचा तपास चालू ठेवला होता. परंतु तिथे काहीच सुगावा लागत नव्हता. संध्याकाळ होत होती, नंदनने आपले सर्व माहितगार मित्र कामाला लावले होते. बालीमध्ये काही भारतीय आले आहेत ह्या त्यांच्या माहितीनुसार ह्या तिघांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बालीला प्रयाण केले.


तिवारीच्या बायकोने त्याच्या सर्व मित्रांना सळो की पळो करून सोडले होते. तिवारी बेपत्ता होऊन दोन दिवस होत आले तरी काही पत्ता लागत नव्हता. हे सर्व मित्र पोलिसात तक्रार नोंदवायला टाळत होते. आणि त्यांनी तिवारीच्या बायकोलाहि पोलिसात तक्रार न करण्याबाबत बजावून सांगितले होते. शेवटी ती बिचारी धाय मोकलून एकटीच घरात रडत बसली होती. पैशाचा मोह आपल्याला नडला हेच तिला समजून चुकले होते.


"मुलकानी तो कब का मर गया!" रामलालचे फटके खात खात तिवारी बोलत होता. "बेणं पक्कं बेरक दिसतेय!" रामलाल मनातल्या मनात म्हणत होता. शेवटी संध्याकाळच्या वेळेला तिवारीला चांगली पाजायची असा त्याने विचार केला. आणि रामलाल घराबाहेर पडला.


व्हिक्टर आपल्या चुकीला दोष देत बसला होता. रामलालचा पत्ता वगैरे घेण्याची त्याने तसदीसुद्धा घेतली नव्हती. आता रामलाल गायब होता आणि तिवारीसुद्धा! आधी चांगल्या भाषेत बोलणाऱ्या तिवारीच्या मित्रांनी त्याच्या शोधासाठी आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. आता आपली बेप्पता व्हायची वेळ आली आहे असे व्हिक्टर विचार करीत बसला होता.


दारूच्या बाटल्यांची नावे सांगताना रामलालच्या नाकी नऊ आले होते. शेवटी त्या दुकानादारापुढे शरणागती पत्करून त्याने तीन चार बाटल्या उचलल्या आणि तो दुकानाबाहेर पडला. समोरच समुद्रकिनारा होता. आणि सूर्यास्ताची वेळ झाली होती. रामलाल ची पावले आपसूक समुद्रकिनाऱ्याकडे वळली. अस्ताला जाणारे सूर्यबिंब अगदी झकास दिसत होते. घराच्या आठवणीने रामलाल भावूक झाला. आणि त्याचे लक्ष किनाऱ्याकडे केले. किनाऱ्यावर बनविलेले वाळूचे सुबक किल्ले आणि शिखराकडे जाणारा वळणावळणाचा रस्ता पाहून थक्क होण्याची आता रामलालची पाळी होती! 

Tuesday, February 25, 2014

थरार भाग ८..


बाली बेटावरील एस्टेट दलाल व्हिक्टर खुशीत होता. गेल्या पाच महिन्यात त्याचे सात बंगले दीर्घ मुदतीच्या भाड्याने गेले होते. त्यातील काहींनी तर बंगले विकत घेण्याची इच्छा दर्शविली होती. आता त्याच्याकडे खूप काम होते. ह्या बंगल्यांच्या मूळ मालकांशी वाटाघाटी करून ह्या होतकरू मालकांना योग्य भावात हे बंगले मिळवून द्यायचे आणि त्यात आपला नफाही कमवायचा हे जरा डोक्याचे काम होते आणि ह्यात थंड डोक्याने वाटाघाटी करणारा माणूस हवा होता. आपला तापट स्वभाव इथे धोकादायक ठरू शकतो हे व्हिक्टर जाणून होता. म्हणून त्याने स्थानिक वर्तमानपत्रात एका सहायकाची जाहिरात दिली होती. परंतु आतापर्यंत थंड प्रतिसाद लाभला होता. हे सर्व होतकरू मालक भारताच्या विविध भागातून आले असल्याने त्याला भारतीय लोकांशी व्यवहार करण्याचा पूर्वानुभव असलेला माणूस मिळाला तर हवे होते.
असाच सकाळी आपल्या कार्यालयात व्हिक्टर बसला असताना एक पन्नाशीच्या आसपासचा माणूस त्याच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराशी आला. त्याला सहायकाच्या पदासाठी अर्ज करायचा होता. व्हिक्टरने त्याला आत बोलावले. माणूस तसा मोजके बोलणारा होता. त्याने हैद्राबाद, बंगलोर, कोची वगैरे भागात काम केले होते. आणि आता तो इंडोनेशियात आपले नशीब आजमावायला आला होता. त्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. व्हिक्टर एकंदरीत त्याची निवड करण्याच्या मार्गावर होता. त्याचे सर्व भाडेकरू भारताच्या उत्तर भागातून आले असले तरी हा माणूस त्यांच्याशी सुद्धा चांगले संभाषण साधू शकेल असा व्हिक्टरला विश्वास वाटू लागला होता. त्याने त्या माणसाला त्याचे नाव विचारले. "रामलाल" तो इसम उत्तरला.
त्या संध्याकाळी बालीच्या एका कोपऱ्यातील त्या बंगल्यात पार्टी मोठी जोरात आली होती. तिवारी आणि त्याच्या पत्नीने ह्या पार्टीचे आयोजन केले होते. भारतातून ती बातमी आली होती. सर्व पुरावे नष्ट झाले हे मानायला आता काहीच हरकत नव्हती. तिवारीची पत्नी गेल्या आठवड्यातच बालीला आली होती. त्याची मित्रमंडळी आणि तिवारी कुटुंबीय एकदम खुशीत होते. खाणेपिणे, मदिराप्राशन आणि नाचगाण्याला अगदी उधाण आले होते.   इतक्यात तिवारीचा फोन खणखणला. व्हिक्टरचा आवाज ऐकून तिवारी वैतागला. पण त्याने स्वतःला थोडे सावरले. "तिवारी, तू भी आजा पार्टीमें!" व्हिक्टरने मोठ्या खुशीत हे आमंत्रण स्वीकारलं. काही वेळातच तो पार्टीत येऊन पोहोचला. व्हिक्टर तसा मोठा धूर्त माणूस होता. पहिलं आपलं काम आणि मग बाकी धमाल हे यशस्वी व्यावसायिकाचे तत्व तो पुरतं जाणून होता. शेंगदाणे तोंडात टाकत टाकत त्याने चौघा पाच जणांना आपल्याभोवतीच्या कोंडाळ्यात एकत्र आणण्यात यश मिळविले. "सुनो, मुझे एक एकदम ब्रिलीयंट एजंट मिला है! जल्दही हम मालिकसे बात शुरू करेंगे!" त्याच्या ह्या प्रस्तावास बाकीच्या लोकांकडून जरी थंडा प्रतिसाद मिळाला तरी तिवारी मात्र ह्यात बराच उत्सुक दिसला. व्हिक्टरला एका कोपऱ्यात घेऊन त्याने लवकरात लवकर त्या एजंटबरोबर मीटिंग ठरवायला सांगितलं. तिवारीकडे भरपूर पैसा दिसतोय व्हिक्टरने अंदाज बांधला.
तिसऱ्याच दिवशी सकाळी रामलाल तिवारीच्या घरी पोहोचला होता. रामलालच्या हुशारीने तिवारी एकदम खुश झाला होता. मालकाची विचार करण्याची पद्धत, ह्या बंगल्याचा सद्य स्थितीतील बाजारभाव ह्याविषयी रामलाल पूर्ण अभ्यास करून आला होता आणि त्याने आपलं प्रपोजल त्या दोघांपुढे ठेवले. तिवारीची पत्नी शीतपेये आणायला आत गेली. परत येताना रामलालच्या हातात शीतपेयाचा ग्लास देताना तिला काहीतरी जाणवले. ती अगदी बेचैन झाली. तिने तिवारीला नजरेनेच आत येण्याची खुण केली. काहीशा नाखुशीनेच तिवारी आत गेला. ती संधी साधून रामलालने एक ध्वनीमुद्रण करण्याचे यंत्र सोफ्यामागे दडवले.
"मी ह्या माणसाला आधी कोठेतरी पाहिलं आहे!" तिवारीची पत्नी अगदी छातीठोकपणे सांगत होती. "अगं, असं कसं होईल? हा तर दक्षिण भारतात काम करीत होता आणि आता थेट इथे आला. आपण कधी त्या भागात गेलोच नाहीत तर!" तिची कशीबशी समजूत काढत तिवारी बाहेर आला.
रामलालने एव्हाना गॉगल घातला होता. तिवारी काहीसा आश्चर्यचकित झाला. परंतु रामलालने पुन्हा एकदा त्याचे लक्ष ह्या डीलच्या चर्चेकडे वळविले आणि दोन दिवसात मालकाबरोबर बैठक ठेवण्याचे आश्वासन देऊन रामलालने ठेवून काढता पाय घेतला.
दुपारी तिवारीची पत्नी झोपली होती. अचानक तिला रामलालचे डोळे आठवले, ती खडबडून झोपेतून उठली. आणि मग तिला आठवलं की ह्या इसमाला आपण पूर्वी कोठे पाहिलं आहे ते! तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला होता. घाबरीघुबरी होऊन तिने तिवारीचा शोध सुरु केला. तिवारी घरात नव्हताच!

Sunday, February 23, 2014

थरार भाग ७..


सायली मोठ्या मुश्किलेने दिवस ढकलत होती. पाच सहा दिवस गेले असतील आणि मग ती बातमी आली. दरीमध्ये एक छिन्न विछिन्न झालेला मृतदेह सापडला होता. सायलीला ओळख पटवून देण्याच्या पलीकडची त्या देहाची स्थिती होती. आणि सायलीला केलेल्या केवळ एका फोनवर  पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार करून टाकले. सायली आता पुरती अनाथ झाली होती. निदान अंत्यदर्शन घ्यायला मिळायला हवे होते असे तिला राहून राहून वाटत होते. परंतु आता कोणाशीही संघर्ष करण्याच्या पलीकडे तिची स्थिती होती.
सायलीची मनःस्थिती आता खूप खराब झाली होती. रात्र रात्र ती जागून काढायची. अशाच एका रात्री तिला मामांबरोबर कोकणात घालविलेल्या सुट्टीची खूप आठवण आली.  सायंकाळी मामा तिला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जायचे. वाळूत किल्ले बनविण्यात मामांचा हातखंडा होता. असाच एकदा त्यांनी बराच वेळ घालवून मोठा वाळूचा किल्ला बनविला होता. आणि त्या किल्ल्याच्या भोवतालच्या बाजूने वरवर जाणारा एक रस्ता. तो रस्ता किल्ल्याच्या शिखरावर पोहोचला होता. तिथे एक झेंडा रोवून मामा म्हणाले होते, "सायली, तुलाही असेच यशाचे शिखर काबीज करायचं आहे. जे काही क्षेत्र निवडशील त्यात!" ह्या आठवणीनंतर तिला काहीसं बरं वाटलं. "होय मामा, मी तुमचं स्वप्नं पुरं करीन!"
त्या आठवड्याच्या शुक्रवारी सायली ऑफिसात गेली त्यावेळी वातावरण गंभीर होते. सर्वजण चुपचाप संगणकासमोर बसून काम करीत होते. सायलीच्या बॉसने सायलीला केबिनमध्ये बोलावलं. त्यांचा प्रोजेक्ट बंगलोर विमानतळावरून सुटणाऱ्या सर्व विमानाच्या माहितीसंबंधित बनविलेल्या डेटाबेसचा होता. सायलीच्या  घरच्या संगणकावरून कोणीतरी ह्या डेटाबेस मधील माहिती मिळविण्याचा परवाच्या दिवशी प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला होता. बॉसने तोवर माहिती काढून ठेवली होती. त्यावेळी सायली ऑफिसातच होती. त्यामुळे तिच्यावरचा संशय दूर झाला होता. पण आता तिचा घरचा संगणक  कोणी वापरला ह्याकडे सर्व लक्ष केंद्रित झालं होतं. ताबडतोब सर्वांची घरून काम करण्याचे सोय बंद करण्यात आली होती. सायलीचा संगणक कंपनीला तपासणीसाठी हवा होता त्यामुळे सायलीला घेऊन एक सुरक्षाअधिकारी तिच्या घरी आला. त्याच्या हाती संगणक सोपवून सायली घरीच थांबली. घोटभर चहा घेत ती सुन्न होऊन बसली होती. इतक्यात तिचे लक्ष मेजावरील एका कापडाच्या फडक्याकडे गेले. "अरे, हा फडका इथे आला कोठून?" ती स्वतःशीच विचार करू लागली. तिने जवळ जाऊन तो फडका बाजूला केला आणि तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्या फडक्याखाली समुद्रकिनाऱ्यावरील किल्ल्याची प्रतिकृती होती आणि अगदी न जाणवेल असा शिखराकडे जाणारा रस्ता!
राजवाडे ह्यांचा मृतदेह सापडला अशी बातमी भोसलेच्या कानी पडली तेव्हा मात्र त्यांना राहवले नाही. त्यांनी कसाबसा सायलीचा पत्ता मिळविला. आणि रविवारी ते सायलीच्या घरी दाखल झाले. प्रथम सायली त्यांना घरात येऊ देण्यास तयार नव्हती पण भोसलेंनी बाहेर उभे राहूनच तिला इतक्या आठवणी सांगितल्या की तिलाही राहवेना. तिने त्यांना आता येण्याची विनंती केली. मायेचे कोणी माणूस मिळाल्यावर सायलीचे भावनाबंध मोकळे झाले आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली. "काका, ह्याच वेळी माझ्या ऑफिसात सुद्धा गडबड झाली आहे हो" असे सांगत तिने भोसलेकाकांना सर्व हकीकत सांगितली. आता भोसलेंचे कान टवकारले होते. "अग, त्या डेटाबेसवर कोणत्या प्रकारची चौकशी करण्यात आली होती, हे तरी माहित आहे का?" सायलीचे उत्तर भोसलेंच्या अपेक्षेनुसारच होते, "मुलकानी ह्या आडनावाच्या माणसांनी कसा प्रवास केला ह्यावर!"

Saturday, February 22, 2014

थरार भाग ६..


राजवाड्यांच्या मनात विचारचक्र सुरूच होते. इतक्यात त्यांचा भ्रमणध्वनी पुन्हा खणखणला. पुन्हा अनोळखी नंबर. पहिल्या दोन रिंगला राजवाड्यांनी प्रतिसाद दिलाच नाही. शेवटी त्यांनी न राहवून फोन उचलला. पुन्हा एकदा भोसले! "राजवाडे कोठे आहात तुम्ही?" ते अगदी घाबरलेल्या स्वरात विचारत होते. "मी घराबाहेर पडलो आहे" राजवाडे आपल्या ठिकाणाचा किमान आपल्या बोलण्यातून सुगावा लागू नये ह्याची काळजी घेत म्हणाले. तसे म्हटले तर भ्रमणध्वनीच्या ठिकाणावरून त्यांचा माग काढणे आरामात शक्य होते ह्याची त्यांना जाणीव होती. "राजवाडे, तुमच्या घरावर हल्ला झाला आहे. मला तुमचीच काळजी वाटत होती. नशीब तुम्ही बाहेर आहात!" भोसले सुटकेचा निश्वास टाकून बोलत होते. राजवाड्याचा मेंदू आता अतिदक्षता पातळीवर काम करू लागला होता. त्यांनी ड्रायव्हरला गाडी बाजूला लावायला सांगितली. काही मिनिटातच त्यांचा निर्णय पक्का झाला होता. त्यांनी त्या ड्रायव्हरला गाडी परत घेऊन जायला सांगितले.
आपल्या बंगलोरच्या घरात सायली निवांतपणे सकाळचा चहा घेत बसली होती. इतक्यात तिचा फोन खणखणला. फोनवरील बातमी ऐकून ती सुन्नच झाली. तिच्या पायाखालील जमीन सरकली. तिचे मामा राजवाडे ह्यांच्या अपघाती निधनाची बातमी होती. राजवाडे हे भल्या पहाटे एकटेच बंगलोरला चालले असताना एका दरीत त्यांच्या मोटारगाडीचा अपघात होवून त्यांचे निधन झाले होते. गाडी खोल दरीत कोसळली होती.
पुढील काही दिवस सायलीसाठी अगदी कठीणच गेले. मामा एकटेच होते आणि त्यांनी अनाथ सायलीचे लहानपणापासून खूप लाड केले होते. तिच्या शिक्षणाचा सर्व खर्चहि त्यांनी सांभाळला होता. आता बंगलोरला एका नामवंत कंपनीत सायली स्थिरस्थावर होत असल्याचे पाहून ते तिच्या मागे लग्नासाठी लागले होते. तुझे एकदा दोनाचे चार हात केले की माझी जबाबदारी संपली असे ते सांगत असत. आणि आता ही अशी बातमी! "देवा, मला तू कायमची अनाथच ठेवणार का रे?" मनातल्या मनात ती विचार करीत होती. दुःख करायला तिला वेळ नव्हता. सर्व सोपस्कार तिलाच पार पाडायचे होते. दरीत कोसळल्याने मृतदेह शोधण्याचे काम फार कठीण होवून बसले होते. राजवाड्यांनी अगदी १० मैलापूर्वीच गाडी भाड्याने घेतली होती. तिथल्या नोंदीवरूनच राजवाडे ह्या गाडीत होते हे निष्पन्न झाले होते. त्यांचा भ्रमणध्वनी सुद्धा अजून सापडला नव्हता. राजवाडे तिथपर्यंत पोहोचले कसे? पोलिसांना हा प्रश्न छळत होता. त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेले शेवटचे दोन फोन कोठले हे ही शोधण्याचा पोलिस कसोशीने प्रयत्न करीत होते.
राजवाड्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात छापून आली. आणि भोसले अगदी नखशिखांत हादरले होते. राजवाड्यांच्या शेवटच्या दिवसातील हालचालींची माहिती फक्त त्यांना होती. आणि ज्या कोणी राजवाड्यांचा काटा काढला ते आता आपल्यावर नजर ठेवून असणार ह्याची त्यांनी मनोमन खात्री करून घेतली होती. राजवाड्यांनी ज्याच्याकडून गाडी आणि ड्रायव्हर घेतला होता, तो त्यांचा मित्रही खूप  दुःखी झाला होता. हे फार मोठे कारस्थान आहे असे राजवाडे त्या रात्री त्याला म्हणाले होते. आणि मग अचानक त्यांनी अर्ध्या वाटेवरून ड्रायव्हरला परत पाठवलं होते. त्या प्रवासात असे नक्की झाले ज्यामुळे राजवाड्यांनी आपला बेत बदलावा हे त्यांना कळत नव्हते. मध्ये आलेल्या फोनविषयी ड्रायव्हर त्यांना बोलला होता. परंतु राजवाड्याशी त्या रात्री झालेल्या बोलण्यावरून त्या मित्राने एकंदरीत गप्प बसणेच योग्य समजले होते.
दोन तीन दिवस झाले तरी मामाचा मृतदेहसुद्धा न मिळाल्याने सायली अगदी निराश झाली होती. परंतु शेवटी तिच्या मित्रमैत्रिणींनी तिची समजूत काढून तिला परत बंगलोरला नेले होते. परत एकदा आपल्या फ्लैटमध्ये प्रवेश करताना सायलीच्या मनात निराशेचे ढग दाटून आले होते.

Monday, February 17, 2014

ब्लॉगच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त !


आज ब्लॉगचा चौथा वाढदिवस! दीपकने २०१० ला हा आमच्या बॅचसाठी हा ब्लॉग स्थापन केला. सुरुवातीला दर्शन, अनघा ह्यांनी त्यात सहभाग घेतला. मग दर्शनने माझं मराठीवेड पाहत आपला इंग्लिशमधील प्रवासवर्णनाचा एक सुंदर ब्लॉग वेगळा सुरु ठेवला.
सुरुवातीला मध्यमवर्गीय संस्कृतीची शिकवणूक घेत वाढलेल्या आणि आता तिशी- चाळीशीत पोहोचलेल्या पिढीचे मनातील मानसिक संघर्षावरील लेख आले. आर्थिक प्रगतीचा मोह सोडवत नाही आणि त्यापायी विस्कटलेल्या नात्यांची स्थिती पाहवत नाही हे कुठेतरी पकडायचा प्रयत्न केला. विवाहसंस्थेवर सुद्धा काही ब्लॉग लिहिले. पत्नीची आधुनिकता आणि विचारस्वातंत्र्य समजून घेण्याचं प्रशिक्षण, सामंजस्य  किती आधुनिक नवरोजींकडे आहे हा प्रश्न! विवाहसंस्थेतील वेग जरा जास्तच वेगाने झाले हे माझे मत! मग हळूच एकदा मदिराप्राशनाच्या मला अजिबात न पटणाऱ्या परंतु झपाट्याने फैलावणाऱ्या रूढीवर एक ब्लॉग आला.
त्यानंतर आलं ते वसई. वसईच्या आठवणी, मग त्यात पांगारा, बावखल, होळीबाजार, लग्नात आनंद मानणारा वसईचा आमचा समाज, वसईची पिशवी, शाळेच्या आठवणी ह्या सर्वांना जसं आठवलं तसं लिहिलं.
मग आले ते दैनदिन दिवसात अनुभवावं लागणार व्यावसायिक जीवन आणि त्या जीवनातील संकल्पना! अशा संकल्पना ज्या प्रत्यक्ष जीवनात सुद्धा वेगळ्या स्वरुपात समोर येतात! व्यावसायिक जीवनानिमित्त अनुभवलेल्या काही देश परदेशातील आठवणी सुद्धा ह्यात समाविष्ट झाल्या. ब्लॉग हिटची संख्या पहाता लोकांना अशा आठवणी वाचायला आवडतात हे जाणवलं.
मग आलं ते काही प्रवासवर्णन! केरळ, सापुतारा, सासुरवाडीच्या मंडळीबरोबर केलेलं एकवीरा दर्शन! हे जणू काही आपली दैनंदिनी सर्वांसमोर मांडण्यासारखे झाले. ह्यात प्राजक्ताचे विशेष कौतुक! तिच्यावरील टिपण्णीला तिने न वैतागता दाद दिली!
मध्येच गणिताचा किडा वळवळला! मग त्यावर काही ब्लॉग लिहिले. बहुदा विद्यार्थ्यांनी ते वाचले असावेत. त्यांची हिट संख्या वाढली. अभ्यासपद्धतीवरील एक दोन ब्लॉग चांगले जमले असे माझे वैयक्तिक मत!
असंच एकदा अच्युत गोडबोले ह्यांचं मुसाफिर वाचलं. एव्हाना वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांना ई मेलही पाठवलं. त्यांना ते आवडलं असावं असा अंदाज. त्यांच्या पुस्तकातील काही प्रकरणांचा सारांश त्यांची परवानगी घेत इंग्लिश ब्लॉगवर प्रसिद्ध केला. त्यावेळी त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांनी प्रत्येक वाक्याचं परीक्षण केलं होत आणि त्यातून बऱ्याच सुधारणा सुचविल्या! आपण जे काही लिहितो त्यात परिपूर्णतेचा हव्यास हवा हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
त्यानंतर मध्येच सद्यस्थितीवर (आत्मक्लेश, सचिनची निवृत्ती, दिल्लीतील घटना, आप) ह्यावर लेख लिहिले. परंतु ह्यात सखोल अभ्यास हवा हे जाणवलं आणि त्याचा आपल्याकडे अभाव आहे ही मनातल्या मनात कबुली दिली.
शालेय मित्र अनुप एखादं चांगलं पुस्तक वाचलं की लगेच मला फोन करून कळवितो आणि बऱ्याच वेळा पाठवूनही देतो. ब्लॉगला पुढे विषय काय ही माझ्यासोबत त्यालाही पडलेली चिंता!
मग आल्या त्या काही कथा! पट मांडला, आभास, भेदी, तपोवन, जाणता अजाणता आणि आता थरार! काही चांगल्या जमल्या, काही चांगल्या सुरुवातीनंतर मध्येच ढेपाळल्या! ह्यात आभास आणि जाणता अजाणता ह्या काहीशा वाचकांना आवडलेल्या असाव्यात असे जाणवले!
मध्येच आत्मविश्वासाला उधाण आलं. लोकसत्तेला ह्यातील बरेच ब्लॉग पाठविले, पण एकही प्रसिद्ध झाला नाही! परंतु व्यावसायिक जगातील 'चलते रहो!' ह्या वाक्याला अनुसरून प्रयत्न चालू ठेवला! एकदा तर 'आली लहर आणि केला  कहर' नुसार मान्यवर प्रकाशकांना ह्या ब्लॉगचे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी फोन वगैरे केले. पुन्हा निराशा! बाकी 'होऊ दे खर्च!' ह्या उक्तीनुसार मी केव्हातरी ह्या ब्लॉगचे पुस्तक प्रसिद्ध करणारच! मध्येच आत्येबहीण प्राची आणि तिचे यजमान संदेश ह्यांनी ह्याबाबत प्राथमिक हालचाली सुद्धा केल्या होत्या!
प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी! परंतु त्यातील काही अगदी निष्ठावंत! प्रत्येक ब्लॉगला प्रतिक्रिया देणार! आणि त्यातील कोणतं वाक्य आवडलं हे ही सांगणार! "तुझ्या दोन ओळीच्या मध्ये बराच अर्थ दडलेला असतो" ही मला आवडलेली प्रतिक्रिया! मी तसा गंभीर माणूस. पण गंभीर लेख लोक वाचत नाहीत हे मनीचे शल्य. असाच एखादा गंभीर ब्लॉग मनासारखा उतरून सुद्धा ब्लॉग हिट संख्या कमी असते त्यामुळे नाराज मन एखाद्याच पण मनापासूनच्या प्रतिक्रियेने सुखावते. शाळेतील माझे आवडते भिडे सर ज्यावेळी तू चांगला लिहितोस असे सांगतात त्यावेळी मी धन्य होतो. माझी अमेरिकेत वास्तव्य करणारी बहिण निवेदिता (निऊ) "आदुदादा तुला हे सुचतं तरी कसं" असे अगदी गहिवरून सांगते. मग ती स्तुती करताना अगदी शब्दांचे भांडार मोकळे करते!  असेच एकदा "माझ्या मुलाचा अभ्यास" ह्या ब्लॉगवर आमच्या शाळेतील एका माजी विद्यार्थिनीने अभिनंदनाचा फोन केला हे ही लक्षात राहिले!
मध्येच माझे दोन शालेय मित्र बारमध्ये बसले असताना त्यांनी माझ्या ब्लॉगची चर्चा केली. हे ऐकून मला स्वर्ग दोन बोटे उरला! ऑफिसात एक आमचा डिनर ग्रुप आहे. त्यातील सुजित हे ब्लॉग जमेल तितके वाचतो आणि चांगल्या प्रतिक्रिया देतो. बाकीचे दोघं खट्याळ वर्गात मोडतात. माझा ब्लॉग न वाचता त्याची चांगलीच टर उडवितात!
ब्लॉग लिहिण्यात एक चांगली गोष्ट झाली. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या वेळी आपल्या मनात कोणते कोणते विचार आले होते ह्याची एक नोंद राहिली. बहुदा निवृत्त झाल्यावर वाचायला अजून मजा येईल!
पुढे किती वर्षे ब्लॉग लिहिणार? माहित नाही! परंतु एक गोष्ट खरी - बाकी सर्व माध्यमात थिल्लर गोष्टींचा कल्लोळ चालला असताना साध्या माणसाचे साधे विचार आत्मविश्वासाने मांडणारा हा ब्लॉग! साध्या माणसांनो, ह्या जगात अनाडी लोक आत्मविश्वासाने वावरतात तर आपण का वावरू नये! हाच संदेश मी देऊ इच्छितो!
सर्व वाचकांचे, दीपकचे आणि ह्या ब्लॉगमध्ये वेळ घालविणाऱ्या मला सहन करणाऱ्या प्राजक्ताचे आभार मानून हा पाचव्या वर्षात पदार्पण करणारा ब्लॉग इथेच आटोपता घेतो!

Saturday, February 15, 2014

थरार भाग ५..


राजवाड्यांना आता अजून दगदग करण्याचं त्राण शिल्लक राहिलं नव्हतं. कसं बसं घरी पोहोचून त्यांनी बिछान्यावर अंग झोकून दिले. सकाळी केव्हातरी उशिरा त्यांना जाग आली. झटपट तयार होऊन त्यांनी गण्या शिंदेची वस्ती गाठली. सर्व वस्तीची राखरांगोळी झाली होती. सुदैवाने टपरीवाला शाबूत होता. "साहेब, काय सांगायचं! दुपारच्या सुमारास अचानक एका घरातून आग सुरु झाली आणि पाहता पाहता पूर्ण वस्ती डोळ्यादेखत भस्मसात झाली! अग्निशामक दल येईपर्यंत सर्व खेळ खल्लास!" टपरीवाला राजवाड्यांना सांगत होता. "मग गण्याचे कुटुंबीय गेले कोठे?" राजवाड्यांनी विचारलं. "साहेब, मदत शिबिरात जाऊन पहा!" टपरीवाल्याच्या ह्या सल्ल्यावर राजवाडे तत्काळ निघाले आणि मदत शिबिरात जाऊन पोहोचले. मदत शिबिरात गण्याच्या कुटुंबियांचा पत्ता नव्हता. राजवाड्यांना हे काहीसे अपेक्षितच होते.
आता भोसले ह्यांच्याबरोबर संपर्क करणे राजवाड्यांनी इष्ट समजले. आपल्या नेहमीच्या ठिकाणी दोघे भेटले. राजवाड्यांनी आपली सर्व कहाणी भोसलेंना सांगितली. भोसलेंना सुद्धा ह्या कहाणीत आता रस वाटू लागला होता. आता मोटवानीच्या पत्नीचा बंगलोरचा पत्ता काढणे आवश्यक होते. त्यासाठी हवे ते सहकार्य करण्याची भोसलेंनी तयारी दाखवली.
भोसलेंशी भेटून राजवाडे घरी परतले. संध्याकाळी बंगलोरला जायची त्यांनी तयारी चालवली होती. फ्लाईटचे तिकीटसुद्धा आरक्षित करून झाले. सहज म्हणून त्यांनी टीव्ही सुरु केला. "ब्रेकिंग न्यूज... दामिनी एक्प्रेसच्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार सापडला!" वृत्तवाहिन्यांची आरडओरड चालू होती. एका माथेफिरूचे चित्र सतत वाहिन्यांवर दाखविले जात होते. त्याने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली होती. त्याच्याबरोबर ह्या कटात कोण सहभागी आहे ह्याची आता अधिक चौकशी सुरु होती. त्याने एका संघटनेचे नावसुद्धा घेतले होते, परंतु त्याविषयी फारशी कोणालाच माहिती नव्हती. राजवाड्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ भोसलेंना फोन लावला. ते फोनवर उपलब्ध नव्हते. राजवाडे तत्काळ पोलिस स्टेशनात गेले.  भोसलेंना वरिष्ठ साहेबांनी एका महत्वाच्या बैठकीला बोलावलं आहे असे त्यांना सांगण्यात आले. राजवाडे विचारात पडले होते. एकंदरीत सर्व प्रकरण अगदी गुंतागुंतीचे बनत चालले होते. संध्याकाळी बंगलोरला जायचा प्लान राजवाड्यांनी तात्पुरता रहित केला.
अचानक त्यांना घटनास्थळी भेटलेल्या माणसाची आठवण झाली. त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक त्यांनी शोधून काढला. बराच वेळ फोन वाजत होता, परंतु कोणी उचलला नाही. शेवटी राजवाड्यांनी त्याचा नाद सोडून दिला. रात्रीचे जेवण आटपून ते झोपायचा बराच वेळ प्रयत्न करीत होते. शेवटी त्यांना कधीतरी झोप लागली.
गाढ झोपेत असलेल्या राजवाड्यांची झोप फोनच्या आवाजाने मोडली गेली. अनोळखी फोन क्रमांक पाहून ते काहीसे वैतागले. परंतु आता उठलो तर आहोतच तर फोन घेवूयात असा विचार करून त्यांनी फोन उचलला. समोर भोसले होते. "राजवाडे माझी जळगावला बदली करण्यात आली आहे. मला रात्रीच्या रात्री तिथे पोहोचावे लागत आहे. एकंदरीत काहीतरी मोठा घोटाळा आहे इथे! राजवाडे तुम्ही सांभाळून राहा! मी तिथे जाऊन पाहतो आणि जमेल तितकी तुम्हांला मदत करीन!"
राजवाड्यांची झोप पूर्णपणे उडाली होती. भोसलेसारखा माणूस काहीतरी मोठा घोटाळा आहे म्हणतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड होती. बॉम्बस्फोटाचा सूत्रधार सापडणे, गण्या शिंदेची वस्ती आगीत भस्मसात होणे आणि भोसलेची बदली होणे ह्या सर्व गोष्टी म्हटल्या तर एकमेकाशी संबंधित नव्हत्या पण त्यात एक समान सूत्र राजवाड्यांना दिसत होते. हे आपण दिल्लीला गेल्यापासून चालू झाले म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी धागा होता. अचानक त्यांना सहा महिन्यापूर्वीच्या आर्थिक घोटाळ्याची आठवण झाली. त्या संबंधी उपलब्ध असलेल्या मुलकानीच्या सर्व बातम्या त्यांनी इंटरनेटवरून गोळा करण्यास सुरुवात केली. मुलकानीविरुद्ध सबळ पुरावे होते आणि त्याला प्रदीर्घकाळ तुरुंगात जावे लागणार हे नक्की होते. ह्या सर्व माहितीतील बातम्या होत्या. अचानक एका काहीशा अपरिचित बातमीकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. मुलकानीला बळीचा बकरा बनविण्यात आले असावे असा संशय त्यात व्यक्त करण्यात आला होता. आणि त्यामागे एखादी बडी असामी असावी असा कयास बांधण्यात आला होता.
झोपेतून आता पूर्णपणे जाग्या झालेल्या राजवाड्यांचे विचारचक्र जोरात चालू होते. "मुलकानीला अडकविताना त्याच्या सुटकेचीही जबाबदारी घेण्यात आली असणार. पण त्यासाठी इतका मोठा अपघात?" राजवाड्यासारख्या ह्या क्षेत्रात इतके पावसाळे घालविलेल्या माणसाला सुद्धा ह्यावर विश्वास ठेवायला कठीण जात होते. आता त्यांना वेगळीच काळजी वाटायला लागली होती. आपल्याविषयी सुद्धा ह्या लोकांना माहिती असणार आणि … पुढचा विचार करण्याचीही त्यांची तयारी नव्हती. ते अचानक उठले आणि आणि दहा मिनिटात तयार होऊन त्यांनी आपली बाईक काढली.
पुढच्या अर्ध्या तासात आपल्या एका विश्वासू मित्राची कार आणि ड्रायव्हर घेऊन राजवाड्यांनी बंगलोरच्या रस्त्याने मागर्क्रमण सुरु केले. आता त्यांना आपला पत्ताही कोणालाच लागू द्यायचा नव्हता. पहिल्यांदाच त्यांना भोसलेची कमतरता वाटू लागली होती.










Wednesday, February 12, 2014

थरार भाग ४..


राजवाड्यांनी आपली सुटका केली म्हणून टॅक्सीवाला खुश झाला. त्यांनी दिलेले पैसे त्याने मोजूनही घेतले नाहीत. बहुदा त्यांनी पैसे दिले नसते तरीही त्याला चाललं असतं. त्यांचा विचार बदलायची संधी न देताच तो आपली टॅक्सी घेऊन विमानतळाबाहेर धूम निघाला. राजवाड्यांचे विचारचक्र सुरु होते. परतीचे मुंबईचे तिकीट होते. पण ह्या बाईचा पाठलाग करायचा तर ती जिथे जाईल तिथे जाणे आवश्यक होते.
आपल्याच विचाराच्या तंद्रीत असलेल्या राजवाड्यांचे लक्ष मुलकानीची पत्नी सोडता आजूबाजूला फारसे नव्हते. त्यामुळे त्यांच्या वावराची चाहूल लागलेल्या दोन इसमांची त्यांनी दखल घेतली नाही. राजवाड्यांच्या आगमनाची चाहूल लागताच मुलकानी कंपूत खळबळ उडाली. परंतु ही खळबळ फक्त भ्रमणध्वनीवरील चर्चेत होती. बाकी त्यांच्या वावरण्यात काही फरक दिसत नव्हता. त्यांची दुसरी योजना अमलात आणण्याचा विचार पक्का झाला.
मुलकानीची पत्नी महिला प्रसाधनगृहाकडे जाऊ लागली तसे राजवाडे थोडे निवांत झाले. त्यांनी पटकन थोडेसे खाऊन घ्यायचे ठरविले. जवळच एक पाश्चात्य उपहारगृह होते त्यातील एका विभागातून महिला प्रसाधनगृहाच्या बाहेर येण्याच्या मार्गावर लक्ष ठेवणे शक्य होते. राजवाड्यांनी तिथे जावून एक ऑर्डर दिली. त्यांचे विचारचक्र चालूच होते. आता ही बाई जिथे जाईल तिथे तिच्यामागे जाणे आवश्यकच होते. "बंगलोरला जाणाऱ्या विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही शेवटची उद्घोषणा!" विमानतळावरील ह्या सुमधुर घोषणेकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्याचवेळी वेटरने त्यांनी ऑर्डर केलेली दिश समोर आणून ठेवली. क्षणभर त्यांचे प्रसाधनगृहाकडे दुर्लक्ष झाले. परंतु लगेचच त्यांनी आपली नजर तिथे वळवली. मुलकानीच्या पत्नीचा मागमूस तिथे नव्हता. एक बुरखाधारी स्त्री लगबगीने बंगलोरच्या विमानाच्या गेटकडे जाताना दिसली. "ह्या स्त्रियांना सगळीकडेच कसा उशीर होतो"' राजवाड्यांच्या मनात विचार डोकावलाच. पुन्हा त्यांनी आपले लक्ष आपल्या लक्ष्याकडे केंद्रित केले. विमानतळाच्या काचेच्या भिंतीतून त्यांना एक विमान उड्डाण करताना दिसले. "बहुदा हे बंगलोरचे विमान असावे आणि त्या बुरखाधारी स्त्रीला ते मिळाले असले  म्हणजे झाले" त्यांच्या मनात विचार डोकावला. त्याच क्षणी त्यांची ट्यूब पेटली. आपल्याकडून अशी कशी हयगय झाली ह्याचे त्यांना तीव्र दुःख झाले. पक्षी पिंजऱ्यातून निसटला होता. क्षणभर त्यांना निराशेने ग्रासले.
काही क्षणातच त्यांनी स्वतःला सावरले. तत्काळ त्यांनी तिकीटखिडकीवर जाऊन बंगलोरला गेलेल्या विमानातील प्रवाशांची यादी पाहू देण्याची विनंती केली. परंतु ही यादी त्यांना अशी सहजासहजी प्राप्त होणार नव्हती. त्यासाठी त्यांना बऱ्याच परवानग्या लागणार होत्या. "बंगलोरचे पुढील फ्लाईट केव्हा आहे?" त्यांनी आपल्या दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली. "रात्री दहा वाजता" ह्या काऊटरवरील स्त्रीच्या उत्तराने त्यांची घोर निराशा झाली. आपले मुंबईचे तिकीट वापरून तिथे जाऊन पुढील योजना आखुया असे त्यांनी ठरविले.
मुंबईपर्यंतच्या उड्डाणात राजवाडे स्वतःलाच दोष देत होते. ह्या सगळ्या मनःस्तापात मुंबई केव्हा आले ते त्यांना समजले सुद्धा नाही. मुंबईला उतरून बाहेर पडता पडता त्यांचे लक्ष टीव्हीवरील बातम्यांकडे गेले. मुंबईच्या एका वस्तीला मोठी आग लागली होती आणि सर्व घरांचा आगीत फडशा पडला होता. राजवाड्यांचे लक्ष तिथे वेधले गेले. त्यांच्या मनात त्या वस्तीतील रहिवाशांबद्दल सहानभुतीची भावना निर्माण झाली. "ह्या घटनेत जीवितहानी झाली नाही" टीव्हीवरील ह्या घोषणेने त्यांना हायसं वाटलं. अचानक त्यांना धक्का बसला. टीव्हीचा कॅमेरा आजूबाजूच्या वस्तीवर फिरत होता. "अरे ही तर गण्या शिंदेची वस्ती"! एकाच दिवसात आपल्याला इतके सगळे धक्के कधी बसले होते हे आठवण्याचा राजवाडे प्रयत्न करू लागले.

Tuesday, February 11, 2014

थरार भाग ३..




मोठ्या उत्साहाने सकाळच्या  विमानाने राजवाडे दिल्लीला जाऊन थडकले. मुलकांनीचा घरचा पत्ता होताच, तो शोधण्यात फारशी काही अडचण आली नाही. वॉचमन त्यांना इमारतीत सोडण्यास आधी तयारच नव्हता. शेवटी आपण मुलकानीचे खास दोस्त आहोत आणि आपल्याला त्याच्या कुटुंबियांना भेटणे खूप गरजेचे आहे हे त्याला बराच वेळ सांगितल्यावर त्याने त्यांना आत जाण्याची परवानगी दिली. परंतु दहा मिनिटात तुम्ही परत यायला हवे असे बजावण्यास तो विसरला नाही. घरात  गेल्यावर एकंदरीत दुःखाचेच वातावरण दिसले. घरात बरेच नातेवाईक होते. परंतु राजवाड्यांनी आपण मुंबईहून मुलकानीचे परिचित आलो आहोत असे सांगितल्यावर बोलण्यात फारसा कोणी रस दाखविला नाही. उलट त्यांनी लवकर घराबाहेर निघावे अशीच सर्वांची वागणूक होती. राजवाड्यांनी कसोशीचा प्रयत्न करून मुलकानीच्या विधवा पत्नीशी भेट घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी ती एका मिनिटासाठी बाहेर आली. राजवाड्यांनी सुरु केलेली प्रस्तावना मध्येच तोडत "जो हुआ सो हुआ! आपसे हम पहेले कभी मिले नही" असे बोलून ती परत आत गेली. आता मात्र तिथून निघणे राजवाड्यांना क्रमप्राप्त झाले. मुलकानीच्या पत्नीने आपण ह्यांना ओळखत नाही हे सांगितल्यावर सर्वजण राजवाड्याकडे संशयाने पाहू लागले. दोन तीन पुरुष मंडळी कोपऱ्यात जाऊन चर्चा करू लागली. हे पाहताच राजवाडे ताडकन उठले आणि त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. ती पुरुष मंडळी त्यांच्याकडे पाहतायेत तोच राजवाडे बाहेर पडले सुद्धा !
राजवाड्यांनी आता पोलिस स्टेशनची धाव घेतली. इन्स्पेक्टर शर्मानी त्यांचे स्वागत केले. मुलकानीचा अंत्यविधी विद्युतदाहिनीत करण्यात आला होता. तेव्हा सरकारी साक्षीदारही हजर होते. एकंदरीत मुलकानी प्रत्यक्ष मरण पावला असेच मानण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यांना हवी असलेली सर्व कागदपत्रे सुद्धा शर्मांनी त्यांना दाखविली. "सरकारी साक्षीदारांची नावे मिळतील का?" राजवाड्यांनी अजून एक प्रयत्न करायचं ठरविले. "साब, आप को हमने इतनी मदद की! अभी हमें हमारा काम करने दो!" शर्मांनी त्यांना समजुतीच्या स्वरात सांगितले. इशारा समजून घेऊन राजवाडे गप्प बसले आणि पाच मिनिटात बाहेर निघाले सुद्धा! परतीचे विमान संध्याकाळचे होते.  अजून बराच वेळ बाकी होता. राजवाड्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी पुन्हा एकदा मुलकानीच्या घराभोवती फेरफटका मारायचे ठरविले. टॅक्सीवाल्याला मुलकानीच्या इमारतीच्या बाहेर काही अंतरावर थांबवून ठेवून राजवाडे बाहेर पडले. त्यांनी एका झाडाचा आडोसा शोधला आणि ते सर्व परिसराची आणि इमारतीची पाहणी करू लागले. पंधरा वीस मिनिटे गेली होती. राजवाड्यांचे लक्ष  टॅक्सीवाल्याकडे गेले. तो बिचारा कंटाळला होता. त्याने नजरेनेच त्यांना आपण निघूया असे खुणावले. राजवाड्यांनी विचार केला. फारसे काही निष्पन्न होत नव्हते. शेवटी त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. अचानक त्यांचे लक्ष इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या आधुनिक पेहराव घातलेल्या एका मध्यमवर्गीय स्त्री कडे गेले. ती दोन मोठ्या बैगा खेचून आणत होती. हिला आपण कोठेतरी पाहिले आहे असे त्यांना वाटून गेले. परंतु त्यांना नक्की लक्षात काही येईना. इतक्यात पार्किग लॉट मधून एक आलिशान गाडी त्या स्त्रीजवळ येऊन थांबली. त्यातून एक इसम उतरला आणि त्याने त्या दोन्ही बैगा गाडीच्या ट्रंक मध्ये ठेवल्या. त्या स्त्रीने एकवार इमारतीच्या दिशेने पाहिले. तिने ज्या दिशेने पाहिलं त्या दिशेलाच मुलकांनीचा फ्लैट होता. अचानक राजवाड्यांची ट्यूब पेटली. सकाळी जिला अगदी पारंपारिक वेशात पाहिली होती ती मुलकांनीची पत्नीच आता ह्या रुपात होती. कारमध्ये बसता बसता तिने आपल्या डोळ्यावरील गॉगल काढला आणि राजवाड्यांची खात्री झाली. तिची कार पुढे जायची वाट पाहत ते क्षणभर थांबले. ती कार थोडी पुढे जाताच ते तात्काळ टॅक्सीत बसले आणि  टॅक्सीवाल्याला कारचा पाठलाग करण्याचा आदेश त्यांनी दिला. आपण ह्या कोणत्या मुसिबतमध्ये पडलो असे भाव बिचाऱ्या  टॅक्सीवाल्याच्या चेहऱ्यावर उमटले. अपेक्षेनुसार कार विमानतळाच्या दिशेनेच निघाली होती. रहदारी खूप होती पण  टॅक्सीवाला तसा कुशल होता. आजूबाजूच्या बाकीच्या गाड्यांना हूल देत त्याने मुलकानीच्या पत्नीच्या कारला नजरेत ठेवण्याचे काम कुशलतेने पार पाडले.
विमानतळावर मुलकानीच्या पत्नीला बैग्स उतरवून घेण्यास थोडा वेळ लागला. ही बया आता आंतरराष्ट्रीय टर्मिनलचा रस्ता पकडेल ही राजवाड्यांची अटकळ मात्र तिने चुकीची ठरविली. ती स्थानिक टर्मिनलच्या दिशेने चालू लागल्यावर राजवाडे थोडे आश्चर्यचकित झाले. परंतु आलिया भोगाशी असावे सादर असे मनाशी म्हणत त्यांनी तिच्या पुढच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे ठरविले.



Sunday, February 9, 2014

Invest, Divest की Decommission


पुन्हा व्यावसायिक जगाचा संदर्भ घेऊन लिहिलेला हा ब्लॉग! खरतरं तपोवन अर्धवट सोडल्यापासून कोणतीही  कथा लिहिताना मध्ये दुसऱ्या विषयाला हात घालायचा नाही हा केलेला निर्धार आता मोडतोय. तर व्यावसायिक जगात Invest वा Divest ह्या विषयावर चर्चेत हल्ली हल्ली बऱ्याच वेळा सहभागी व्हावे लागले. एखादी अस्तित्वात असलेच्या कार्यप्रणालीच्या  (आता application ह्या शब्दासाठी कार्यप्रणाली हा योग्य शब्द की नाही हा वादाचा मुद्दा!) भवितव्याच्या संदर्भात Invest वा Divest ह्या पैकी एक धोरण स्वीकारण्याची पद्धती आली आहे. ह्यात अजून पुढची पातळी म्हणजे Decommission! आता ह्यांचा थोडा शोध घेवूयात!
१> invest - एखादी कार्यप्रणाली सध्या चांगल्या प्रकारे काम करतेय आणि तिचं एकंदरीत स्वरूप भविष्यातील आपण रेखाटलेल्या चित्राशी सुसंगत आहे. मग ती कार्यप्रणाली invest (गुंतवणूक) ह्या प्रकारात मोडते. म्हणजे ह्या कार्यप्रणालीला काळाशी सुसंगत ठेवण्यासाठी तिच्यावर खर्च करणे योग्य समजलं जातं.
२> Divest - एखाद्या कार्यप्रणालीला सध्या दुसरा पर्याय उपलब्ध नाही. पण भविष्यात ही कार्यप्रणाली काळाशी सुसंगत ठरणार नाही ह्यात वाद नाही. मग त्या कार्यप्रणालीला जैसे थे ह्या स्वरुपात ठेवून द्यायचं. ह्याला divest असे म्हटले जाते
३> Decommission (बाद) - ज्या कार्यप्रणालीच्या बाबतीत Divest हा पर्याय निवडला जातो तिला  काळाच्या ओघात दुसरा एखादा पर्याय सक्षम बनतो आणि मग त्या कार्यप्रणालीचे decommission करावे लागतं म्हणजे तिचा कारभार बंद! ह्यात ही कार्यप्रणाली चालू ठेवण्यासाठी लागलेल्या काही खर्चाची बचत होत असल्याने हा पर्याय लवकरात लवकर निवडण्याकडे  कंपन्यांचा कल असतो.
आता बऱ्याच वेळा हे पर्याय नकळत निवडले जात असतात. परंतु काही कंपनीच्या बाबतीत पुढील धोरण अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ ठेवण्याची पद्धत आहे त्यामुळे तिथे प्रत्येक कार्यप्रणालीच्या बाबतीत हा निर्णय घ्यावा लागतो.
आता ब्लॉगचा मूळ मुद्दा! ही तीन धोरणे आपण सुद्धा कळत नकळत (बहुदा नकळतच) आपल्या जगण्यात वापरत असतो.
१> आपल्या अवतीभोवतीच्या लोकांच्या बाबतीत - काही लोक आपल्याला मनापासून आवडतात, त्यांच्या बाबतीत आपण invest ह्या धोरणाचा वापर करतो. त्यांच्यासाठी आपण आपला वेळ काढतो, त्यांना बरे वाटेल असे वागतो. हे सर्व का? तर ही माणसे आपल्याला बरे वाटून देतात म्हणून!
आजूबाजूची काही माणसे; त्यांच्याशी खरे तर आपले पटत नाही, ती आपल्याला मनःस्ताप देतात. पण त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा सध्यातरी पर्याय नसतो. मग आपण त्यांच्या बाबतीत divest हा पर्याय वापरतो.
divest मधली काही माणसे, जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्यांना आपण आपल्या जीवनातून decommision (बाद) करून टाकतो. किंवा काही माणसे इतकी त्रासदायक असतात कि दुसरा पर्याय नसला तरी आपण त्यांना divest ही  मधली पायरी वगळून थेट बाद करून टाकतो.
२> तसेच आपल्या जीवनाच्या बाबतीत! पैसा, आपलं करियर ह्यासाठी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यापर्यंत invest करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हातरी स्वानंद हा पर्याय अचानक येऊन उभा ठाकतो! काहींना हा पर्याय उभा आहे हे समजत तरी! काही अभागी जीवांना तर हा पर्याय समोर असला तरी  कळत नाही. काहींना कळतो परंतु स्वानंदासाठी आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्याइतके ते सुदैवी नसतात. आयुष्य त्यांना ही संधीच देत नाही.
प्रत्येक मोकळा क्षण ज्यावेळी येतो त्यावेळी हे वेगवेगळे पर्याय आठवतात! ऑफिस दुपारी एकचे, सकाळी जो काही मोकळा वेळ मिळतो त्यात ऑफिसच्या बाकी राहिलेल्या कामाचा उरक पाडायचा कि ब्लॉग लिहायाचा हा सतत मनाला छळणारा प्रश्न!
हल्ली आम्ही वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलची मुले आपल्या शालेय जीवनातील मनोहर आठवणींना उजाळा देण्याच्या कार्यात invest करून बसलो आहोत. कशासाठी तर स्वानंदासोबत शाळेचे पूर्वीचे रूप मिळवून देण्यासाठी!
काही गोष्टी कशा मनातल्या मनात असलेल्या बऱ्या नाही का? त्या अशा उघडपणे मांडून त्यांचं विश्लेषण केले की कसा थोडा त्रास होतो काहीसं निष्ठुर, मतलबी बनल्यासारखं वाटतं!

Thursday, February 6, 2014

थरार भाग २..


आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत ही केस राजवाड्यासाठी नक्कीच सर्वात कठीण केसमध्ये मोडत होती. कुठेच काही धागेदोरे मिळत नव्हते आणि त्यामुळे सर्व काही ठप्प असल्यासारखे झाले होते. सर्व थरांतून भोसलेवर दबाव येत होता आणि तो राग भोसले हल्ली सतत राजवाड्यावर रात्रीच्या फोनवरील संभाषणात काढत असत. राजवाड्यांनी मानसशास्त्रात बरीच पुढची पातळी गाठल्याने ते त्याचा स्वतःवर परिणाम न होऊन देण्याची काळजी घेत आपले काम चालू ठेवण्याची दक्षता घेत होते.
राजवाड्यांच्या घटनास्थळाच्या फेऱ्या सतत चालूच होत्या. असेच एक दिवस तिथून परतताना त्यांना एका वस्तीत एक आक्रोश करणारी स्त्री आणि आणि तिच्या सांत्वनाचा प्रयत्न करणाऱ्या शेजारी स्त्रियांची गर्दी दिसली. ह्यात म्हटलं तर लक्ष देण्याचं राजवाड्यांना काहीच कारण नव्हतं. परंतु आपल्या मुख्य कामात काहीच प्रगती होत नसल्याने त्यांनी तिथे वळून पाहायचं ठरवलं. त्यांनी टपरीवर बाईक लावून'कटिंगची ऑर्डर दिली. चहावाला तसा त्यांना ओळखून होता. थेट पोलिसातील नसला तरी हा अधिकृत माणूस आहे हे त्याला माहित होते. "काय झालं रे इथे?" पहिला घोट घेत राजवाड्यांनी त्याला विचारलं. "साहेब, परवाच्या ट्रेन अपघातात इथला माणूस गेला. तेव्हापासून त्याच्या बायकोला असले अधूनमधून झटके येतात आणि ती ओरडओरडा करते." चहावाला म्हणाला. राजवाड्यांना नक्कीच मोठा झटका बसला. दामिनी एक्स्प्रेस महागडी गाडी होती आणि त्यात ह्या वस्तीतला माणूस प्रवास करत होता म्हणजे जर आश्चर्य करण्याचीच बाब होती. "त्याचं नाव काय रे?" "गण्या शिंदे" टपरीवाला उत्तरला. "काय करायचा तो? "साहेब, एका बिल्डरकडे मदतनीस म्हणून काम करायचा" राजवाड्यांच्या डोक्यात काही विचार आला, उरलेला चहा एका घोटात संपवून ते तडक त्या वस्तीत घुसले. अजूनही आजूबाजूला घुटमळणाऱ्या गर्दीमुळे गण्याचे घर शोधण्यास त्यांना फारसा वेळ लागला नाही. 
एव्हाना गण्याच्या विधवा बायकोला आतल्या खोलीत नेण्यात आले होते. घरी गण्याचे आई वडील आणि भाऊ बसला होता. राजवाड्यांनी आपली खोटीच ओळख करून दिली. बिल्डरकडील कामाच्या निमित्ताने आपला आणि गण्याचा परिचय झाला होता वगैरे वगैरे. तिथे कोणीच बोलायच्या मूडमध्ये नव्हते हे पाहून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. बाकी गण्याच्या घरातील अत्यानुधिक टीव्ही, फ्रीज, फर्निचर पाहून ते काहीसे हैराण झाले होते. त्या वस्तीच्या आणि गण्याच्या त्यांना सांगितल्या गेलेल्या पेशाशी सुसंगत असे हे राहणीमान नव्हते.
घरी परतल्यावर चपला तशाच एका कोपऱ्यात भिरकावून एका झटक्यात त्यांनी भोसलेंनी दिलेली मृतांची यादी शोधून काढली. त्यांची शंका खरी ठरली होती, ह्या यादीत गण्याचे नाव नव्हतं. भोसलेंना त्यांनी फोन लावला. त्यांना ही यादी रेल्वेकडून मिळाली होती. पहिल्या दोन डब्यातील आरक्षण केलेल्या प्रवाशांची यादी आणि त्यातील जे जिवंत असल्याचा पुरावा आहे त्यांना वगळून ही यादी बनविण्यात आली होती. १७ जणांच्या ह्या यादीत गण्याचे नाव नसल्यावर त्यांनी ज्यांची नावे ह्या यादीत आहेत त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यास सुरवात केली.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून राजवाड्यांनी नवीनच उद्योग सुरु केला. ह्या यादीतील प्रत्येकाच्या परिसरात त्यांनी फेरफटका मारण्यास सुरुवात केली. दुपारी चारपर्यंत त्यांनी सात घरे आटपली. प्रत्येक ठिकाणी खरोखर दुःखाचे वातावरण दिसले आणि अंत्यविधीला जाऊन आलेली माणसेही भेटली. आठवं नाव होतं मनोज मुलकानी. हे नाव त्यांना आधी कोठेतरी ऐकल्यासारखे वाटत होते. थोडावेळ मेंदूला ताण दिल्यावर त्यांना अचानक आठवलं. अरे हा तर सहा महिन्यापूर्वीच्या १२० कोटीच्या अफरातफरीच्या प्रकरणात अडकलेला माणूस! त्याचा पत्ता त्यांनी भोसलेकडून मिळविला.
शहरातील एका अलिशान वस्तीतील मुलकानीच्या बिल्डींगमध्ये राजवाड्यांनी प्रवेश केला त्यावेळी सायंकाळचे सात वाजले होते. "साहेब, कोणत्या फ्लैट मध्ये जायचे आहे?" इमारतीचा गुरखा विचारत होता. "साहेब त्या फ्लैट मध्ये सध्या कोणीच राहत नाही सर्व जण दिल्लीला आहेत." राजवाड्यांनी फ्लैट क्रमांक सांगितल्यावर गुरखा उत्तरला. गुरख्याने सांगितलेल्या माहितीनुसार अंत्यसंस्कार सुद्धा दिल्लीला करण्यात आले होते. आता मुलकांनीचा दिल्लीचा पत्ता शोधण्यासाठी सोसायटीच्या ऑफिसात राजवाडे शिरले तेव्हा सेक्रेटरी ऑफिस बंद करण्याच्या तयारीत होते. "तुम्हाला मला पत्ता देता येणार नाही" सेक्रेटरी संशयाने म्हणाले. शेवटी भोसलेची मदत घेऊन राजवाड्यांनी दिल्लीचा पत्ता मिळविला. तत्काळ सकाळच्या फ्लाईटचे मोबाईलवरून आरक्षण करून राजवाडे घरी परतले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. बऱ्याच दिवसांनी दमलेल्या त्यांना बऱ्याच दिवसांनी काहीशी मनःशांती मिळाली होती.

Wednesday, February 5, 2014

थरार भाग १..






गाढ झोपेत  असलेल्या राजवाड्यांचा फोन खणखणला. बातमी अगदी धक्कादायक होती. दामिनी एक्प्रेस शरयू नदीवरील पुलावरून जात असताना ह्या पुलावर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. आणि दामिनी एक्प्रेसचे पहिले दोन डबे खाली नदीत कोसळले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने शरयू नदीने रौद्र रूप धारण केले होते आणि त्यामुळे कोणी वाचण्याची शक्यता तर जवळजवळ नव्हतीच.
पाच मिनिटातच राजवाडे घराबाहेर पडले. ओल्या रस्त्यावरून बाईक जमेल तितक्या वेगाने दौडवत ते अर्ध्या तासातच घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासारख्या गेले वीस वर्षे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसासाठी सुद्धा समोरील दृश्य पाहण्यास कठीण होते. सकाळचे चारच वाजले असल्याने अंधारात बचावकार्य करण्यास बरीच अडचण येत होती. अजूनही ही बातमी प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचली नसल्याने किंवा नुकतीच पोहोचत असल्याने त्यांची गर्दी अजून झाली नव्हती. राजवाड्यांना पाहताच इन्स्पेक्टर भोसलेंच्या कपाळावर आठ्या पडल्या. "इथे मध्ये लुडबुड करू नका!" भोसलेंच्या ह्या उद्गाराची राजवाड्यांना सवय होती. हा माणूस गेले कित्येक वर्षे ह्याच वाक्याने आपले स्वागत करतो. काहीतरी नवीन वाक्य शोधा असे त्यांना सुचवायची खुमखुमी राजवाड्यांनी दाबून ठेवली.
प्रसारमाध्यमांची पहिली गाडी एव्हाना येवून पोहोचली होती. राजवाडे पुलाजवळ जाऊन पोहोचले होते. मोटरमनने जबरदस्त प्रसंगावधान दाखवून संतुलित ब्रेक लावला होता त्यामुळे केवळ दोनच डबे पुलावरून खाली गेले होते. गाडीचे  बाकीचे डबे  आणि त्यातील लोकं वाचले होते. इतक्या मोठ्या घटनेच्या धक्क्याने आणि आपले मरण केवळ काही फुटांच्या अंतराने वाचलं ह्या विचाराने त्यातील कोणीच बोलण्याच्या मनःस्थितीत दिसत नव्हतं. पोलिसांनी  त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी वाहनांना पाचारण केलं होतं आणि त्यांच्याभोवती दोन तीन पोलिस घुटमळत होते. राजवाड्यांची नजर एका कोपऱ्यात झाडाखाली उभ्या असलेल्या मध्यमवयीन गृहस्थाकडे गेली. तो आपली ओली सिगारेट फुकण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. राजवाडे हळूच त्याच्याकडे पोहोचले. "आपण, ह्या गाडीत होतात?" राजवाड्यांनी आपला लायटर त्याच्यापुढे ठेवत प्रश्न केला. लगेच उत्तर न देता त्या इसमाने प्रथम आपली सिगार पेटवून घेतली. एक झुरका मारून अजूनही थेंब थेंब पाणी ओतणाऱ्या आकाशाकडे पाहत तो म्हणाला, "होय!" पुन्हा एक झुरका, आणि अजून एक दीर्घ उसंत! "मोटरमनने लावलेल्या  करकच ब्रेकने मी जागा झालो, बहुदा त्याच्यासमोर पूल कोसळला असावा आणि जीवाच्या आकांताने त्याने आपला आणि प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी ब्रेक लावला. परंतु उशीर झाला होता."  तो गृहस्थ बोलत होता. "हो, पण त्याच्या त्या ब्रेकने आमचा जीव मात्र वाचला!" दोन तीन झुरक्यानी तो मनुष्य बोलू लागला होता.
त्याच्याशी बोलता बोलता राजवाड्यांच्या मनात विचारचक्र चालू होते. ही जागतिक पातळीवरील बातमी होती. दहशतवादी संघटनांचा ह्यात हात असावा ही खात्रीच होती. आता केव्हाही केंद्रीय गुप्तचर विभागाचे अधिकारी, आणि उच्च पोलिस अधिकारी ह्या ठिकाणाचा ताबा घेणार होते. त्यांनी गृहस्थाचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला.
अचानक पुलाजवळ गडबड ऐकू आली. दोन्ही डबे खाली पडताना काहीशा कमी वेगाने खाली गेले होते. नदीचे पात्र पुढे अरुंद झाले होते आणि त्यात प्रवाहाचा वेग कमी झाला होता. त्यामुळे तिथे काहीजण अडकून बसले होते. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी धावपळ सुरु झाली होती. राजवाडे तत्काळ तिथे पोहोचले. परंतु आता तिथे पोलिसांनी पूर्ण कब्जा घेतला होता. नदीच्या पात्रात बचावकार्यासाठी जवान उतरले सुद्धा होते.
राजवाड्यांनी पटापट काही फोटो काढून घेतले.  एव्हाना संपूर्ण जागेला पोलिसांनी वेढले होते. आपल्याकडे पाहणाऱ्या भोसलेंच्या आश्चर्यपूर्ण नजरेकडे दुर्लक्ष करणे योग्य असे ठरवून आपली बाईक काढून घेत ते तिथून निघाले.
पुन्हा झोप लागणं तर शक्य नव्हतच! राजवाड्यांनी बातमी देणाऱ्या वाहिन्या सुरु केल्या. सर्वत्र हीच बातमी होती. नशिबाने स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील वाहिन्यांनी थोडा संयम दाखवला होता आणि त्यांचे संवाददाते कमी आरडओरड करीत होते. त्यांच्याकडून काही फारसं गवसत नाही हे पाहून राजवाडे आंतरराष्ट्रीय बातमी वाहिन्यांकडे वळले. धीरगंभीर स्वरात त्यांचे विश्लेषण चालू होते. अचानक एका वाहिनीवर घरून बोलणाऱ्या स्फोटतज्ञाच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. "मी जरी प्रत्यक्षघटनास्थळी नसलो तरी उपलब्ध माहितीनुसार ह्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा सहभाग असण्याची शक्यता कमी दिसतेय! हे कोण्या नवशिक्याचे काम असावे!" राजवाडे काहीसे अचंबित झाले. त्या तज्ञाचे अधिक बोलणे ऐकायची त्यांची इच्छा होती पण लगेचच त्या वाहिनीवर आर्थिक घडामोडीच्या चर्चेचा कार्यक्रम सुरु झाला. राजवाड्यांनी त्या तज्ञाचे नाव मात्र नोंदवून घेण्याची दक्षता घेतली होती.
राष्ट्रीय वाहिन्यावर मात्र गदारोळ सुरु झाला होता. घटनास्थळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गुप्तचर पथक ह्यांचे आगमन झाले होते.
पुढील दोन तीन दिवस अगदी गोंधळाचे वातावरण होते. सुदैवाने जीवितहानी फारच कमी झाली होती. बॉम्ब तुलनेने कमी शक्तीशाली होता आणि त्यामुळे पूल कोसळताना त्याचे तुकडे वगैरे झाले नव्हते आणि गाडीचे पहिले दोन डबे जरी खाली कोसळले तरी मोटरमनच्या कौशल्याने त्यांचा वेग कमी झाल्याने त्यातील काही प्रवाशांना बाहेर पोहून जायची संधी मिळाली होती. शेवटी जीवितहानीचा विसाच्या आतल्या आकड्याचा अंदाज हाती आला तेव्हा राजवाड्यांना बरं वाटलं. परंतु मनात संशयाची पाल चुकचुकत होती. अजून कोणतीही दहशतवादी संघटना ह्या घटनेची जबाबदारी घेण्यास पुढे येत नव्हती.
कोणताच पुरावा मिळत नसल्याने राजवाडे आणि पोलिससुद्धा बेचैन होते. प्रसारमाध्यमाचे पोलीसावरील दडपण वाढत होते. शेवटी भोसलेंनी राजवाड्यांना फोन करून बोलावले. नेहमी भोसलेकडून फोन आला की राजवाडे खुश होत असत. "कशी जिरली ह्याची!" असे त्यांना वाटे. परंतु ह्या वेळी मात्र असे काही नव्हते. परंतु भोसलेकडे जाणे क्रमप्राप्तच होते.
"या, बसा!" एका उपहारगृहातील आतल्या खास खोलीत भोसलेंनी राजवाड्यांचे स्वागत केले. हा माणूस आपणास कधीच पोलिस स्टेशनात बोलावत नाही ह्याची खंत सुरुवातीची वर्षे राजवाड्यांना वाटायची. परंतु आता त्यांनाही अशा भेटीच आवडू लागल्या होत्या. गुप्तहेराला उगाच नको ती प्रसिद्धी नको हे त्यांना कळून चुकले होते. "बाकी काय मग लिंबू सरबत घेणार की पन्हे!" भोसलेंच्या ह्या खोचक प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत राजवाड्यांनी साध्या पाण्याचा ग्लास उचलला. मद्यपानाची सवय त्यांनी जाणीवपूर्वक टाळली होती.
बाकी भोसलेंकडे काही ठोस पुरावे नव्हते. चर्चेतून काही निष्पन्न होत नाही हे पाहून राजवाड्यांनी बैठक आटोपती घेतली. निघता निघता भोसलेंनी अपघातातील मृतांची यादी राजवाड्याकडे सोपवली.


(क्रमशः)