Tuesday, June 30, 2020

अनुपमा १९६६


शनिवारी रात्री ९ वाजता जेव्हा मन साप्ताहिक सुट्टीमुळं निर्माण झालेल्या आनंदाच्या परमोच्च क्षणी असतं त्यावेळी लोकसभा वाहिनी सुरु करुन त्यावर कोणता चित्रपट दाखविला जात आहे हे मी बऱ्याच वेळा तपासुन पाहतो. काही अनमोल रत्नं ह्यावेळी प्रदर्शित केली जातात. काल रात्री प्रदर्शित केला गेलेला आणि आज दुपारी पुनर्प्रसारित केला गेलेला अनुपमा हे एक असंच अनमोल रत्न ! 

पत्नीवर अपार प्रेम असणारा पती तरुण बोस ! बाळंतपणात आपल्या पत्नीला गमावुन बसल्यावर आपल्या पत्नीच्या मृत्यूला आपली नवजात मुलगीच जबाबदार आहे असा ग्रह करुन घेतो; आणि आयुष्यभर बाळगत बसतो. तरीही आपल्या मुलीला योग्य शिक्षण मिळावं, तिचं लग्न एखाद्या सुस्थितीतल्या घरात व्हावं असं प्रेमळ पित्याला वाटणाऱ्या सर्व भावना त्याच्या मनात असतात. 

चित्रपटातील संगीत श्रवणीय ! 

धीरे धीरे मचल ये दिले बेकरार 
कुछ दिल ने कहा 
या दिल की सुनो दुनियावालो 

ही ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी !  सुंदर शर्मिला टागोर, देखणा धर्मेंद्र आणि बाह्यदर्शनी अल्लड रुप धारण करणारी शशिकला! शर्मिलेचे सौंदर्य मोहक ! भुमिकेतील शालीनता कायम ठेवत आयुष्यात धर्मेंद्र आल्यानंतरचा होणारा बदल तिनं सुरेख साकारलाय ! धर्मेंद्र एका क्षणी तिला म्हणतो सुद्धा - तु हसताना कधी आरशात पाहिलं आहेस स्वतःला ? तु किती सुंदर दिसतेस ते तुला जाणवेल! देवेन वर्माला जास्त वाव मिळत नसला तरी तो आणि डेविड ह्या चित्रपटातील विनोदी भूमिकांची गरज पार पाडतात ! डेविडची माहिती मायाजालावर शोधली असता तो बेणे इस्त्राईल वंशातील असुन मराठी भाषिक होता हा रंजक इतिहास सामोरा आला ! शशिकला पुर्वीच्या काळात खलनायिकेची भूमिका बजावणारी अभिनेत्री, पण इथं तिनं आधी अल्लड आणि मग नायक - नायिकेला मदतगार अशी सकारात्मक भुमिका बजावली आहे! चित्रपटातील सुरुवातीच्या काही प्रसंगांत दोन तीन वाक्य बोलुन धावत जातानाच ती दिसते! त्यामुळं हिला बहुदा चालता येत नसावं असा काही काळ माझा ग्रह झाला होता ! 

चित्रपटाची पातळी अभिजात. अर्थपुर्ण संवांदांची रेलचेल!  प्रत्येक प्रसंगांचा चित्रपट पुढं सरकण्यासाठी हातभार लावतानाच बऱ्याच वेळा चित्रपटांतील पात्रांच्या स्वभावांच्या छटा उलगडुन दाखवणारा ! आपल्या मालकाकडं आयुष्यभर  नजर वर करुन बघण्याची हिंमत नसलेली घरातील आया अगदी मोक्याच्या क्षणी शर्मिलाच्या आयुष्याविषयी त्याला दोन शब्द सुनावते. तिच्यापासुन स्फुर्ती घेऊन शर्मिला आपलं मनोगत पित्याला सांगते. त्यात आपल्या पित्याची मानसिकता तिनं ज्याप्रकारे समजावुन घेतली आहे ते केवळ अप्रतिम ! आपल्या पदरी ज्यानं केवळ उपेक्षा आणि रागाचं माप टाकलं त्याच्याविषयी तिरस्कारसदृश्य भावना असणं स्वाभाविक होतं आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांनी माफसुद्धा केलं असतं. पण ती त्याची मानसिकता समजावुन घेते. आईनं तुमच्या हृदयात जे स्थान प्राप्त केलं होतं तसंच स्थान मला कोणाच्या तरी हृदयात निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. हे ती एका दमात सांगुन टाकते. पिताही तिच्या टोक्यावर हात ठेऊन निःशब्द आशिर्वाद देतो. तुमचं एकाकीपण मी जवळुन पाहिलं आहे त्यामुळं तुम्ही केवळ एका शब्दानं हाक द्या, मी धावत येईन! जाता जाता ती सांगते! 

धर्मेंद्र कथानकाची गरज म्हणुन कथालेखक असतो असं जरी बराच काळ वाटत राहिलं तरी आपलं प्रेम प्रेयसींपुढं व्यक्त करण्यासाठी त्याला त्यानं लिहिलेल्या कादंबरीची बरीच मदत होते. भावना थेट व्यक्त करण्यात जास्त धोका वाटत असल्यास अशा अप्रत्यक्ष मार्गाचा प्रथम वापर करणे  ह्याला धोरणात्मक चाल असं म्हटलं जातं !

जाता जाता चित्रपटातील बंगला सुद्धा मला आवडुन गेला ! चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण महाबळेश्वर इथं झालं. त्यामुळं १९६६ च्या आसपास महाबळेश्वर किती सुंदर होतं हे पाहुन जीव हळहळला.  हे सारं आपण का गमावलं ?  ५४ वर्षांआधीचा चित्रपट रविवारी दुपारी पाहुन तो इतका परिणाम करु शकतो की पुढे ठाकलेल्या भरगच्च आठवड्याची चिंता करायचं सोडुन एक चिंतातुर जंतु रात्री अकरा वाजेपर्यंत जागुन ही पोस्ट लिहितो ! May be Sharmila effect! 

एक गोष्ट नमूद करायची राहुन गेली. हिंदी चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटांत परगावी एकट्याच निघालेल्या नायक - नायिकेचं चित्रीकरण असलेला हा अजुन एक चित्रपट. भारतीय रेल्वेने कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात अशी अनमोल भुमिका बजावलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची नावे सांगा! जा सिमरन जी ले अपनी जिंदगी ! 

Saturday, May 2, 2020

सांजशकुन - भाग १


सद्यकाळात घरातुन पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती व्यवस्थित आहे. आज बऱ्याच दिवसांनी आलेल्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीमुळं वसईच्या घरातील कपाटाची तपासणी केली असता सांजशकुन हे जी. ए. कुलकर्णी ह्यांचं पुस्तक हाती लागलं. त्यातील सत्यकथा ह्या मासिकात १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या अस्तिस्तोत्र आणि १९७० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रिका ह्या कथांचा मला झालेला बोध ! जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथांमध्ये बरंचसं गुढ वातावरण असतं. त्यातील पात्रे ही कोणत्या तरी अद्भुत शक्तीच्या प्रभावाखाली वावरताना आढळतात. त्या कथांमधील विश्वही आपल्या भोवताली असणाऱ्या विश्वापासुन बरंच फारकत घेऊन आपलं वेगळं असं एक अस्तित्व जपते. 

अस्तिस्तोत्र

कथेची सुरुवात होते ती "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणं वाटणाऱ्या स्वच्छ चकचकीत आभाळाखाली समुद्र स्थिर आहे " ह्या खोलवर अर्थाच्या वाक्यानं ! आभाळाच्या कवटीशी केलेल्या तुलनेशी आपण स्वतःला काहीसं सरावून घेत असतानाच जी. ए. समुद्राकडं वळतात.  प्रत्येक परिच्छेदानंतर ते समुद्राच्या शांततेकडं, स्तब्धतेकडं, निर्ममतेकडं आणि त्यानं बजावलेल्या केवळ निरीक्षकाच्या भूमिकेकडं अंगुलीनिर्देश करीत राहतात. 

समुद्र केवळ शांत आहे, समुद्र केवळ स्तब्ध आहे....  

कथा संपुर्णपणे प्रतीकात्मक विश्वात वावरत राहते. त्यामुळं कवटीमय वाटणारं आकाश, अनासक्त पाणी बाळगणारा समुद्र, त्यातील विक्षिप्त आकृतीचे क्षारांचे खडक, भोवताली पसरलेली रखरखीत वाळु हे सर्व घटक मानवी मर्त्य किंवा त्यापलीकडील जीवनातील ज्ञात / अज्ञात शक्तींचे रुपक असावेत असं सदैव वाटत राहतं. 

त्यानंतर सुरु होते ती एक श्रुंखला ! आभाळ ही एक कवटी, त्यानं आच्छादलेल्या वाळवंटात पसरलेले टेकाड्याएवढ्या कवट्या असलेल्या अतिप्राचीन प्राण्यांचे सांगाडे, त्या कवट्यांचं उन्हानं कोलमडून जाणे, तरीही एका कवटीने तग धरुन राहणे, दुरवरुन आलेल्या एका वृद्धाने ह्या एकमेव कवटीचा सहारा घेणे, कालपरत्वे त्या महाकाय कवटीने सुद्धा धगीपुढे कोलमडुन जाणे. धगीपासुन आपले रक्षण करणाऱ्या त्या कवटीच्या विनाशामुळं त्या वृद्धाचे सुद्धा कोलमडणे. त्याची जगण्याची जिद्द संपताच त्याच्या कवटीच्या सावलीत आलेला कीटक, कालांतरानं त्याचा संपलेला प्रवास आणि त्याच्या शरीराच्या आधाराला आलेली मुंगी ! ही शृंखला जी. ए. इथेच संपवतात ती "कोठेतरी तिच्याहुनही लहान जीवाणू वाट पाहत आहे" ह्या वाक्यानं ! 

संपुर्ण कथेत रंगविलेल्या जीवनाच्या एकमेव चाहुलीचा प्रतीकात्मक पुरावा! त्यानंतर जी. ए. मृत समुद्रातील जीवनाच्या संपुर्णपणे अभावाकडं वळतात. मृत समुद्राच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे! कथा संपते ती "आता समुद्र केवळ आहे !" ह्या वाक्यानं !

एकंदरीत विविध रुपातील मनुष्यजन्माच्या श्रुंखलेतील प्रवास आणि त्यानंतर अस्तित्वात असु शकणाऱ्या मुक्तीचे रुपक असणारा समुद्र ! जो आपले कायमस्वरुपी अस्तित्व बाळगुन असतो!    


पत्रिका

एका प्रासादाच्या विशाल पायऱ्यांपाशी आलेला परंतु आपली स्मृती गमावुन बसलेला हा कथेचा नायक ! प्रथमदर्शी उघडण्यास कठीण परंतु नायकाच्या हळुवार स्पर्शानं सहज उघडणारं प्रासादाचे महाकाय द्वार !प्रासादाच्या अंतर्भागात व्यापुन टाकणारा किट्ट अंधार ! अंधाराला सरावलेली त्याची नजर. त्या प्रासादात कोणी आहे का हे जाणुन घेण्यासाठी त्यानं दिलेल्या अनेक हाका  ! आणि प्रत्युत्तर म्हणुन आलेले केवळ त्याचेच शब्द !  

 मग त्याला दिसलेला अनेक वेटोळी घेतलेला आणि बऱ्याच उंचावर जाणारा एक जिना. त्या जिन्याच्या वरच्या सज्ज्यावर कठड्यावर तेजस्वी कृष्ण्वस्त्रे परिधान केलेली आकृती ! त्या जिन्याची एकेक पायरी ओलांडण्यासाठी त्यानं केलेला कष्टप्रद प्रवास ! शेवटी एकदाचा त्या आकृतीसमोर उभं ठाकून त्यानं माझ्या सादीला तुम्ही उत्तर का नाही दिलंत असा केलेला निकराचा प्रश्न ! त्यावर त्यानं ऐकलेली प्रत्युत्तरे म्हणजे माझीच उत्तरे असा त्या आकृतीने केलेला खुलासा ! त्यानंतर तु उंबरा ओलांडुन मला ती पत्रिका दे आणि मला मुक्त कर ही त्या आकृतीने केलेली विनंतीवजा आज्ञा ! तो उंबरा ओलांडताना सर्पमुखांनी केलेले विषारी फुत्कार ! 

ती पत्रिका त्या आकृतीला सुपूर्द केल्यानंतर त्या आकृतीने मानलेलं आभार आणि त्यासोबत परत जाण्याची धुडकावून लावलेली विनंती ! त्या आकृतीने ती कृष्ण्वस्त्रं ह्याला परिधान करायला लावत तुला मुक्तीसाठी असंच कोणीतरी पत्रिका घेऊन घेण्याची वाट पाहत राहावं लागेल हे सांगणं ! मग त्या व्यक्तीचं निर्भरपणे उंबरा ओलांडून, जिना उतरत, महाद्वार उघडून प्रासादाच्या बाहेर पडणे ! 

आता ह्या नायकाच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा, ती त्याची पत्रिका घेऊन येणाऱ्या दुसऱ्या कोणाची ! ह्या प्रतिक्षेचा कालावधी किती असणार हे कोणीच सांगु शकणार नाही ! तोवर सहन करावं लागणारं प्रदीर्घ एकटेपण! 

पुन्हा एक प्रतीकात्मक कथा ! बहुदा जन्म-मृत्यू, आत्मा ह्यांच्यातील मनुष्याच्या प्रवासाची ! ह्यातील कोणतं रुपक कसलं ते फक्त जी. ए. च जाणोत !

प्रत्येक कथा केवळ ३-४ पानांची पण समजण्यास प्रचंड वेळ लावणारी ! आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा आपणास समजलेला अर्थ जी. ए. ना अभिप्रेत असलेल्या अर्थाशी अंशतः तरी जुळला असेल ह्याची शाश्वती नाही !

शीर्षक भाग १ जरी असलं तरी हे धाडस सातत्यानं करण्याची हिंमत मी पुन्हा करेनच ह्याची हमी मी सध्यातरी देणार नाही !

Monday, March 30, 2020

Discovery Time






जगावर येणाऱ्या भयावह संकटाच्या संकल्पनेवर बेतलेले अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. जगाचा शेवट जवळ आला आहे, केवळ नायक, मोजकी मंडळी त्या संकटाचा मुकाबला करत आहेत असं काहीसं चित्र ह्यात रेखाटलं गेलेलं असतं. आज आपण ज्या परिस्थितीत सापडलो आहोत ती परिस्थिती काहीशी ह्या चित्रपटांची आठवण करुन देणारी आहे. 



करोना पुर्वीचे जग !

करोनापुर्वीचे जग काहीसं वेगळं होतं. तुमचा पैसा, तुमची पत ह्याचा तुम्हांला गर्व करता येत असे. पैसे खर्च करुन तुम्ही काहीही विकत घेता येण्याची घमेंड बाळगु शकत होता. निसर्गानं सर्व माणसांना एका पातळीवर निर्माण केलं असलं तरी माणसानं कृत्रिम पातळ्या निर्माण केल्या होत्या. आभासी दुनिया निर्माण करुन त्यात आभासी चलनाद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या मागे बहुतांशी मनुष्यजात लागली होती. 

सद्यस्थिती 

आजच्या परिस्थितीत हे सर्व काही नाहीसे झालं आहे. आपला जीव वाचवण्याची काळजी घेणे हा सर्व मानवजातीचा प्राधान्यक्रम झाला आहे. ह्यात राव-रंक सर्वजण एका पातळीवर आले आहेत. 

मनःपुर्वक आभार !

इथं आपल्या सर्वांचा दिनक्रम सुरु ठेवण्यास जी मंडळी हातभार लावत आहेत, त्यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात. किराणामाल दुकानदार, दूधवाला, सफाई कामगार, पोलीस,टोलनाक्यावरील  कर्मचारी हे सर्व कोणाचे तरी पती, मुलगा, पिता आहेतच.  आपण साधं थोडा वेळ बाहेर पडलो तर घरात आल्यावर तातडीनं हात स्वच्छ धुण्याच्या मागे लागतो, अंघोळ करतो. ही मंडळी मात्र दीर्घकाळ बाहेर राहत आहेत ते केवळ आपला दिनक्रम सुरळीत चालु राहावा ह्यासाठी! 

इस्पितळात काम करणारे नर्स, डॉक्टर आणि बाकीचा कर्मचारीवर्ग हे तर अधिक धोकादायक परिस्थितीत कार्य करत आहेत. ज्यांना करोनाची लागण झाली आहे अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात ही मंडळी येत आहेत ते केवळ मास्क, बाकीच्या प्रतिबंधात्मक आवरणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवून ! त्यांच्या स्वाथ्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ईश्वराकडे प्रार्थना! 

दृढ मनोबलाची आवश्यकता 

ह्या करोनाने काही वेगळ्या परिस्थिती निर्माण केल्या आहेत. दहावीच्या एस. एस. सी. बोर्डाचा शेवटचा पेपर बाकी आहे. वर्षभर अभ्यास करुन सतत तणावाखाली राहणाऱ्या मुलांना कधी एकदा आपण ह्या तणावातुन मुक्त होऊ असं झालं असेल. परंतु आता त्यांना परिस्थिती निवळण्याची वाट पाहावी लागणार! ह्या प्रदीर्घ कालावधीनंतर ज्यावेळी पेपर पुन्हा घेतले जातील त्यावेळी अशा परीक्षांसाठी लागणारी मनःस्थिती पुन्हा आणणे कठीण असणार आहे. एस. एस. सी. परीक्षा हे केवळ एक उदाहरण झाले अशा अनेक परीक्षांत मुलं अडकून बसली आहेत. त्यांनी ह्या काळात आपलं मनोधैर्य शाबुत ठेवावं ! ज्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत त्यांनासुद्धा घरातच बसावं लागणार आहे! वर्षभराच्या अभ्यासाच्या तणावमुक्तीसाठी ज्या काही योजना आखल्या होत्या त्या सर्वांवर पाणी पडलं आहे ! 

परदेशी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेल्या तरुण मुला-मुलींसाठी हा कसोटीचा काळ आहे. आपल्या कुटुंबियांपासुन दुर तर राहावे लागणार आहे त्याचवेळी प्रदीर्घ काळ मोजक्या जागेत आपल्या रूममेट्स सोबत एकत्र राहावे लागणार आहे. 

मोजक्या जागेत एकत्र राहण्याचा प्रसंग एखाद्या कुटुंबासाठीसुद्धा कठीण ठरु शकतो. संवाद,चर्चा काही काळ ठीक असते परंतु प्रदीर्घ चालत राहिल्यास त्याचं परिवर्तन विसंवादात होऊ शकतं. त्यामुळं ह्या काळात कुटुंबाने संवाद कसा साधायचा ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आखुन घ्यावीत.  आलटुन पालटुन कुटुंबसदस्यांनी संवाद - पर्यवेक्षकाची भुमिका बजावावी. संवाद जराही कटुतेकडे जात असल्याची शक्यता निर्माण झाल्यास टाईमआउट घोषित करावा.

काही कुटुंबांना एकत्र बसुन संवाद करण्याची कदाचित सवयही नसेल. ह्या निमित्तानं जी संवादसंधी निर्माण झाली आहे त्याचा पुरेपूर लाभ उठवावा. एका घरात वेगवेगळी आयुष्य जगणारी अनोळखी माणसे ह्या निमित्तानं एकत्र येऊ शकतात. माझ्या नोकरीधंद्यात  काय घडत आहे, मला ह्या क्षणी कोणत्या गोष्टींविषयी आशावादी वाटत आहे, कोणत्या गोष्टींविषयी असुरक्षितता वाटत आहे इथुन प्रारंभ करावा ! 

नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर आपलं बोलणं कमी झालं आहे. प्रथम फोन कोणी करावा हा इगोचा भाग सर्वप्रथम आडवा येतो. त्याला सरळ बाजुला सारावे. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या मंडळींशी आपण संपर्क गमावलेला असतो तो केवळ वेळ नाही ह्या कारणास्तव ! त्यांचा फोन नंबर चिकाटीनं शोधुन काढुन मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलावं !  

कार्यालयात एकत्र येऊन काम केल्यामुळं संघभावनेस चालना मिळत असे. आता सर्वजण घरुन काम करत असल्यानं केवळ कामासाठी फोन कॉल्स होतात. ह्या रिमोट काम करण्याच्या कार्यपद्धतीत संघभावनेस चालना देण्यासाठी काही नवीन सर्जनशील पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे. लंच अवर ऑन व्हिडिओ कॉल  असं काही थोड्याच दिवसात ऐकायला मिळालं तर आश्चर्यचकित होऊ नकात ! 

एकंदरीतच हा काळ सर्वांसाठी कसोटीचा असणार आहे ! ज्यांचं मनोबल चांगलं आहे अशी मंडळी ह्यातुन सहजपणे तावूनसुलाखून बाहेर निघतील. भविष्यात असले प्रसंग वारंवार येऊ शकतात. त्यामुळं पुढील पिढीला मानसिकदृष्ट्या कणखर बनविणं किती महत्वाचे आहे ह्याची जाणीव करोनाने आपल्या सर्वांना करुन दिली आहे. 

करोनानंतरचे जग !

जग करोनामुक्त कधी होईल हे आजच्या घडीला छातीठोकपणे कोणीच सांगु शकत नाही. किंबहुना करोनाचा प्रभाव कमी झाला तरी त्याची भिती सदैव मनुष्यजातीच्या आसपास राहणारच आहे. सध्याच्या काळात आपल्या वागण्यात करोनाने काहीसा बदल घडवुन आणला आहे. जीवनाच्या अशाश्वततेच्या जाणिवेनं आपल्या सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडलं आहे. 

पण ज्या क्षणी ह्या भयाची तीव्रता काहीशी कमी होईल किंवा पैशाच्या जोरावर करोनापासुन जीव वाचविण्याची हमी माणसाला प्राप्त होईल त्यावेळी माणसांचे वागणं कसे असेल? करोनापुर्वीची मग्रुरी परत त्याच प्रमाणात मनुष्यजातीतील काही लोकांना ग्रासुन टाकेल का?  हल्लीच्या जगाविषयी, त्यातील मनुष्यांविषयी भाबडेपणा बाळगणं फार कठीण आहे. त्यामुळं बहुतांशी मंडळी पुन्हा संपत्तीनिर्मितीच्या मागे लागतील. 

करोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर बरेचसे प्रतिकुल परिणाम होऊ शकतील. ही शक्यता प्रत्यक्षात उतरू शकते ह्याची जाणीव असु द्यात आणि ती प्रत्यक्षात उतरली तर आपल्या बाबतीत जो काही worst case scenario होऊ शकतो ह्याची आधीच अटकळ बांधुन ठेवा, त्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तयारी करा ! केवळ चांगला विचार केल्यानं एखादी वाईट गोष्ट घडायची टळत नाही, पण जर वाईट शक्यतेचा आधीपासुन विचार केला तर त्याचा धक्का कमी बसतो. जगात वाईट गोष्टी अहोरात्र घडत असतात त्यातील काही गोष्टी क्वचितच आपल्या वाट्यालाही येणारच. पण वाईट गोष्टी घडल्यानंतर गगनभरारी घेणाऱ्या लोकांची संख्या कमी नसते हे ही ध्यानात ठेवा ! 

Saturday, February 8, 2020

Enough is not ....


गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एक चांगलं वाक्य वाचायला मिळालं. Enough is not quantity; but it is a decision. पुरेसं हे एक प्रमाण नसुन तो एक निर्णय असतो. नेहमीप्रमाणं हे वाक्य मी माझ्या अनेक मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांच्यात चर्चेसाठी घेऊन गेलो. 

वाक्याचा अर्थ सर्वांनाच खुप भावला. मला इतका पगार मिळाला की मी समाधानी होईल, मला दादरला मोठी सदनिका मिळाली की मी सुखी होईन अशा आणि तत्सम सुखसमाधानाच्या आपण रेखा आखुन घेतो. पण भोवतालची परिस्थिती सदैव बदलत राहते. एक विशिष्ट पगारच, विशिष्ट उपनगरातील सदनिकाच आपणाला का हवीहवीशी वाटते? कारण ह्या घटकांशी आपण आपली विशिष्ट जीवनशैली, समाजातील आपली पत ह्या गोष्टींचा संबंध मनात जुळवून ठेवतो. कदाचित आपण मनातल्या मनात सुखाचं एक मोठंसं क्लिष्ट समीकरण बनवून ठेवतो. 
सुख = सदनिकेचे आकारमान ^ २ + ३.१४ * पगार + ... अजुन बरंच काही!

होतं काय की आपण सुखाची ही व्याख्या घेऊन काहीशा अजुन उच्चभ्रु गटात सहभागी व्हायला गेलो की आपल्याला कळुन चुकतं की तिथं सुखाच्या व्याख्येत केवळ सदनिकेच्या आकारमानाचा वर्ग पुरेसा नाही तर तिथं त्याचा घन घेतला जातो. तुमच्याकडील High End गाड्यांची संख्या समीकरणात समाविष्ट केली जाते. 

मग मात्र आपल्याला समजुन चुकतं की सुख, समाधान, चवीचं खाणं, चांगले कपडे, दागिन्यांची / वाहनांची हौस ह्याला कुठंच मर्यादा नाहीत! मर्यादा असल्या त्या आपल्या मनात आहेत. भाकरीचा, ब्रेडचा तुकडा खाऊन रस्त्यावर वाहनांच्या कोलाहलात झोपणारा गरीब माणुस आणि चमचमीत जेवण रिचवुन आलिशान शयनगृहात झोपणारा श्रीमंत ह्यांच्या समाधानाची पातळी कदाचित एकच असु शकते ! 

नेकीनं केलेल्या माझ्या प्रयत्नांची पातळी माझं समाधान ठरवेल हा निर्णय घेऊन पहा. कदाचित आयुष्य सोपं होईल ! 

पोस्ट आटोपती घेतोय. कारण इथंही पोस्टचा आकार नव्हे तर त्यातील सार महत्वाचं आहे. वाचकमंडळी सुज्ञ असल्यानं त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचला ह्याविषयी तिळमात्र शंका नाही ! 

हरि मुखे म्हणा  Enough is not ...!!

Saturday, February 1, 2020

नात्यांचा जीवनक्रम !



नात्यांचे अनुबंध प्रत्येकाभोवती कळत नकळत गुंतले जातात. काही नाती रुढार्थानं नावं बाळगुन असतात तर काहींना तितकेही भाग्य नसतं. नाती कधी, कुठं जुळावी ह्याविषयी लिखित नियम असणं शक्य नाही. ह्या  पोस्टमध्ये नाती म्हणजे रक्ताची नाती, मैत्रीची नाती असे सर्व काही अर्थ अभिप्रेत आहेत. 

आयुष्याच्या पुर्वार्धात माणसाला बरीच नाती आपसुकच मिळतात. लहानपणीची नाती ही वारसाहक्कानं मिळालेली असतात. बालपणी अनुभवलेल्या नात्यांत खुपदा निरागसतेचा अनुभव आल्यामुळं आपण एकंदरीत नात्यांविषयी  खुप आशादायक दृष्टिकोन घेऊन पुढील आयुष्यात पाऊल ठेवतो.  शिक्षण संपल्यानंतर  माणसाचं आयुष्य खुपच गतिमान बनतं . त्यामुळं काही मोजकी नाती सोडली तर बाकीच्या नात्यांकडं लक्ष देण्यास फुरसत मिळत नाही. 

एखाद्या नात्याचा जीवनक्रम कसा असतो? जीवनक्रम म्हणजे नक्की काय? नातं जुळणं, दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना ओळखुन घेऊन नातं स्थिरतेकडं नेणं आणि मग त्यानंतर नात्यांतील स्थिरतेचा काळ ! आदर्श स्थितीमध्ये नात्यांचा जीवनक्रम काहीसा वर उल्लेखल्याप्रमाणं असायला हवा ! परंतु जीवनात आदर्श असं काही नसतं ! त्यामुळं ह्या नात्यांच्या जीवनक्रमात बरेच चढावउतार येतात. सहजासहजी जुळू शकणारी नाती काही कारणानं  जुळत नाहीत, कमी माहितीवर आधारित नाती जोडली जातात आणि मग अपेक्षाभंगाचं शल्य उरी बाळगत निभावली जातात किंवा मोडली जातात, काही नाती सुरुवातीच्या काळात अत्यंत वादळी प्रवास करुन त्यातील प्रवाशांना शहाणं करुन सोडतात, आपल्या भुमिकांच्या आणि नात्यांच्या पुर्नव्याख्येनंतर मग एक शांत संयत वाटचाल करतात. काही शहाणी नाती आयुष्यभर समजुतदार प्रवास करतात. काही उत्साही नाती आयुष्य अगदी रसरसुन जगतात. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर माणुस स्वतःकडं अलिप्ततावादी दृष्टीनं पहायला शिकतो. हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी येत असला तरी तो कधीतरी नक्कीच यायला हवा. ह्या घटनेनंतर मनुष्याच्या आयुष्यातील नात्यांमध्ये काहीसा फरक पडत असावा. नात्यांतील उत्कटता काहीशी संपुष्टात येत असावी! अहम भावनेचा त्याग करुन माणसं स्वत्वाच्या शोधात निघतात ! आपल्या संपुर्ण आयुष्याकडं तटस्थेनं पाहण्याची क्षमता त्यांच्यात येते ! पैलतीराचा शोध वगैरे म्हणतात ते हेच असावं कदाचित !  

वायनाड भेटीच्या वेळी काढलेल्या दोन छायाचित्रांची ह्यावेळी आठवण झाली. दूरवर पाहिस्तोवर दिसणारी हिरवाई , जाणवणारी शांतता! आयुष्यात सुद्धा अशी मनःस्थिती लाभणं किती भाग्याचं नाही का?



Thursday, January 2, 2020

मावळत्या दिनकरा !


काहीशा अनामिक हुरहुरीनं सरत्या वर्षाचा आपण निरोप घेतो. जाणते झाल्यापासुन प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर आयुष्यातील अंतिम सत्याच्या  आपण अधिक जवळ पोहोचलो आहोत ही भावना मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी डोकावते. सार्वजनिकरित्या ती थेट बोलुन दाखविण्याची प्रथा नसल्यानं हुरहूर वगैरे शब्दांचा आधार आपण घेत राहतो. 

हे २०२०! एका नव्या उमेदीनं मी तुझं स्वागत करत आहे ! त्यानिमित्त माझ्या मनातील हे काही विचार !

१) आयुष्यातील तुझ्या आधीच्या साथीदारांनी मला जे काही अनुभवांचे क्षण दिले त्यांना मी संकलित स्वरुपात स्मरणात ठेऊ इच्छितो. 

२) माझ्या आयुष्यातील संकटे, कठीण गोष्टी जितक्या सुस्पष्टपणे मला जाणवतात तितक्याच सुस्पष्टपणे माझ्या आयुष्यातील अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींची, लोकांनी माझ्याशी केलेल्या चांगल्या वर्तवणुकीची मला जाणीव येऊ देत. 

३) माझ्या व्यावसायिक जीवनात मला एका विशिष्ट प्रकारची वर्तवणुक स्वीकारावी लागते. माझ्या मुळ स्वभावापासुन ही काहीशी वेगळी असु शकते. परंतु माझी व्यावसायिक आणि वैयक्तिक वर्तवणुक, विचारधारा वेगळी ठेवण्याची बुद्धी आणि शक्ती मला लाभो !

४) भोवतालचे लोक विविध ताणतणावाच्या प्रसंगातुन जात असतात. ह्याचा परिणाम त्यांच्या वर्तवणुकीवर होऊ शकतो. त्यामुळं प्रसंगी त्यांची माझ्याशी असलेली वागणुक माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळी असु शकते, मला क्लेशदायक असु शकते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांच्या अशा वागणुकीकडे तटस्थ मनोवृत्तीनं पाहण्याची शक्ती दे !

५) मी, माझं वागणं काही लोकांना आवडत / आवडणार नाही ही स्पष्ट शक्यता आहे हे सत्य मी मोकळेपणानं स्वीकारु शकु देत ! 

६) माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडुन शिकण्यासारखं बरंच काही असु शकतं. इतर गोष्टीपेक्षा ह्या शिकण्यासारख्या गोष्टीकडं माझं लक्ष सर्वप्रथम वेधलं जावो !

७) माझ्याकडुन चांगलं वाचन होवो. ह्या वाचनातील सुविचारांचे मला आकलन होवो आणि माझ्या जीवनाशी निगडित सुविचारांचे माझ्याद्वारे अंगिकरण  होवो !

८) स्थानिक, जागतिक पातळीवरील कोणत्याही ताणतणावाला तोंड देण्याची शक्ती माझे नातेवाईक, मित्र मला देतात. त्यांच्याशी मी सदैव संपर्कात राहू शको !

९) माझा निसर्गाशी असलेला संपर्क कायम राहो ! निसर्ग मला माझं जगणं समृद्धपणे जगण्याची प्रेरणा देत राहो !

आणि .... 

सातत्यानं ब्लॉगपोस्ट लिहुन त्यांच्या लिंक्स फेसबुक भिंतीवर, शेकडो व्हाट्सअँप ग्रुपवर पाठवुन नातेवाईक, मित्रगणांना त्रस्त करण्याची माझी इच्छाशक्ती कायम राहो !