Friday, July 22, 2011

शहरनिर्मिती

मुंबई शहरात राहताना बर्याच वेळा जाणवते की ह्या शहराचा संतृप्ततेचा बिंदू केव्हाचा ओलांडला गेला आहे. शहरात एखादी गोष्ट थोडीदेखील साधारणतेच्या व्याखेच्या पलीकडे गेली की गोंधळ चालू होतो. आता ही बाब एकदम क्षुल्लक असू शकते जशी की एका वर्दळीच्या रस्त्यावर मध्येच गाडी बंद पडली, १० मिनिटे पाऊस पडला! लगेच वाहतूक खोळंबते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो. मुंबईत राहणाऱ्या / नोकरीनिम्मित शहरात येणाऱ्या प्रत्येकाने अशा परिस्थितीसाठी मनाची तयारी ठेवलेलीच असते. मुंबईतला प्रत्येक नागरिक हा सहनशीलतेचा तसा पुतळा असतो. सहनशीलता म्हटले तर चांगला गुण आणि म्हटले तर परिस्थिती न बदलता येण्याचा कमकुवतपणा!
प्रत्येक शहर हे वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते. माणसाच्या इतिहासामध्ये शहरनिर्मितीचा टप्पा बर्याच आधी येवून गेला. भारतामध्ये देखील तो सतराव्या - अठराव्या शतकात आला आणि शहरे उदयास आली असावी. मी या विषयातील अज्ञानी, त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी! बाल्यावस्थेतील ही शहरे बरीच काही वर्षे (हा कालावधी दशकात / शतकात मोजावा) सुसंकृतावस्थेत होती. परंतु गेल्या काही दशकात ह्या शहरांच्या वाढीने अवाढव्य रूप धारण केले.
शहरांच्या वाढीची अंतिम अवस्था ही मृतावस्था होय. शहरातील नागरीकरणाची संयंत्रणा एका बिंदूवर कोलमोडून पडते. उद्योगधंद्यासाठी वातावरण प्रतिकूल होते. आणि मग उद्योगधंदे, नागरिक, शैक्षणिक संस्था यांचे शहराबाहेर स्थलांतर होते. ही एकदम टोकाची स्थिती मी वर्णिली. परंतु ह्या स्थितीचे भान आपल्या सर्वांना असणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणात आपल्या लोकसंख्येची वाढ होत आहे ते पाहता आपणास नवीन शहरांची निर्मिती करणे आवश्यक आहे. आता ही शहरे महानगरे नसावीत तर छोटी नगरे असावीत. मध्येच दोन लेख वाचनात आले, एक होता आपल्या अभिनेता अतुल कुलकर्णीचा. त्याने आपल्या मित्र- नातेवाईकांसोबत मिळून गावाबाजुला ओसाड जमीन विकत घेतली आणि बर्याच प्रयत्नानंतर तिथे घनदाट जंगलसदृश्य झाडी निर्माण केली. दुसरा लेख होता अण्णा हजारे यांच्याविषयी, त्यांनी राळेगण सिद्धी या गावात सिंचनाची सुनियोजित व्यवस्था निर्माण केली आणि त्याद्वारे तिथे विविध धान्य / फळे याचे उत्पादन करून ते गाव स्वयंपूर्ण केले. ह्या दोन लेखांनी मला एकदम भारावून टाकले आणि माझ्या एका जुन्या स्वप्नाने पुन्हा भरारी घेतली.
समविचारी सुशिक्षित अश्या नागरिकांचा समूह एकत्र येवून गावरान भागात एकत्र ओसाड जमीन खरेदी करणार. तिथे साधी पण सर्व मुलभूत सुविधांनी परिपूर्ण अशी घरे उभारणार. पाण्याची सोय भागविण्यासाठी एका मोठ्या जलाशयाची निर्मिती करणार. आणि ह्या जलाशयातील पाण्याच्या आधारे ह्या ओसाड भागाचे एका हिरव्यागार प्रदेशात रुपांतर करणार! हळूहळू मग ह्या भागात छोट्या शिक्षण संस्थाची निर्मिती करून आजूबाजूच्या गावातील मुलांची शिक्षणाची सोय करणार. पुढचा टप्पा म्हणजे इथे शिकलेल्या मुलांसाठी रोजगाराची सोय करण्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदे उभारणार! हे वाचताना एक गोष्ट लक्षात आलीच असेल की हा नागरिकांचा समूह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हवा आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर असावा की त्यांना फारशे काही पाश नसावेत. आयुष्यातील १०-१५ वर्षे ह्या असल्या उद्योगासाठी घालविण्याची तयारी असावी. साधारणतः वयाच्या ५०-५५ वर्षी ह्या समूहाने असला उद्योग करण्यास करण्यास सुरवात करावी!
कसे वाटले हे स्वप्न? विचार जरूर कळवा! आणि हो २०२५ सालच्या आसपास सगळा गाशा गुंडाळून विदर्भातील एकाद्या भागात स्थलांतरित होण्याचे माझ्याकडून निमंत्रण आल्यास त्याला हो म्हणण्याची तयारी ठेवा!


No comments:

Post a Comment