Tuesday, July 24, 2012

रिकामी न्हावी...



मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या की शहरातील पालक धास्तावतात! पूर्वीसारखा नातेवाईक, शेजारी असणारा समवयस्क मुलांचा घोळका हल्ली कमी होत चालला आहे आणि त्यामुळे मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी पालकांना उद्योग शोधावे लागतात. हे झाले एकदम प्राथमिक उदाहरण, पण ह्या प्रश्नाची प्रगतावास्थेतील उदाहरणे अनेक, सतत कामात गुंतून राहणाऱ्या नोकरपेशा किंवा व्यावसायिक माणसाला अचानक मोकळी अशी साप्ताहिक सुट्टी मिळाली किंवा त्याने / तिने एका आठवड्याची सुट्टी टाकली तर ही व्यक्ती घरी शांतपणे बसू शकत नाही. व्यावसायिक स्त्रियांना बाळंतपणानंतरची अल्पमुदतीची किंवा कायमची सुट्टी, नवऱ्याच्या नोकरीनिम्मित परदेशी / परगावी स्थायिक व्हावे लागल्यामुळे सुटलेली नोकरी ही अजून काही उदाहरणे. माणसाची नोकरी गेली किंवा माणूस निवृत्त झाला तरी हा प्रश्न उद्भवतो.

कधीतरी वाचले होते की माणसाचे अर्धे प्रश्न त्याच्या एका खोलीत शांतपणे बसू शकण्याचा क्षमतेच्या अभावामुळे निर्माण होतात. हे विधान बऱ्याच प्रमाणात मला पटले. आता हा प्रश्न गावापेक्षा शहरात अधिक उग्र स्वरूप निर्माण करतो. अमेरिकेतील कुटुंब फोन न करता अगदी जवळच्या मित्राच्या घरी देखील जाणार नाहीत. मुंबईत फोन न करता घरी जाण्याचा हक्क आपण काही मोजक्या कुटुंबात गाजवू शकतो. वसईत मात्र आपण बहुतांशी सर्वांच्या घरी हा हक्क बजावू शकतो. समजा एखादे आई, बाबा आणि मुल असे छोटे कुटुंब आहे तर हे कुटुंब रविवारी संध्याकाळी काही न करता दूरदर्शन न लावता, संगणक सुरु न करता किती वेळ घरात सुसंवाद साधू शकते हा ह्या कुटुंबातील सुसंवाद किती आहे याचा मापदंड असू शकतो.

माणसाला समाजाशी संवादाची गरज का भासते? आपल्याला समाजाने स्वीकारले आहे ह्या जाणीवेवर माणसाला वेळोवेळी शिक्कामोर्तब हवे असते. हे शिक्कामोर्तब किती प्रमाणात हवे आणि त्याची वारंवारता किती असावी हे व्यक्तीनुसार बदलते. निवृत्त माणसांना हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. ह्यातील काही नशीबवान माणसे सामाजिक संस्थावर एखादे मानाचे स्थान मिळवून वर्षोनवर्षे बसून राहतात. आणि आपल्या अनुभवाचा समाजाला उपयोग करून देतात! पण एक क्षण असा येतो की ज्या क्षणी ह्या पदावरील ह्या व्यक्तीचे अस्तित्व ही समाजापेक्षा त्या व्यक्तींची गरज बनते. एकंदरीत हा आपण भारतीयांचा सामाजिक आणि राजकीय जीवनातील प्रश्नच आहे ना! तरुणपणीच्या उमेदीच्या वर्षात आपल्याला कधी संधीच मिळत नाही मग ते सामाजिक जीवन असो की राजकीय जीवन. ८० व्या वर्षी राष्ट्रपती झालेल्या प्रणावदांचे अभिनंदन!

माणसाला मोकळा वेळ घरी शांतपणे घालविता येत नाही ह्या गृहितकावर अनेक उद्योगधंदे सध्या निर्माण झाले आहेत. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ओसंडून वाहणारे मॉल, मे महिन्यात पालकांचा खिसा रिकामी करणारे तथाकथित ज्ञानी लोकांनी चालविले सुट्टीतील वर्ग ही त्याची उदाहरणे होत. अरेच्या हा ब्लोग पण त्याचे उदाहरण नव्हे ना :)

No comments:

Post a Comment