Thursday, April 11, 2013

अभिमन्यु सारे


महाभारतातील अभिमन्यु परिस्थिती प्रतिकूल आहे ह्या वास्तवाचे भान असूनसुद्धा जाणीवपूर्वक युद्धात शिरला. आजच्या युगात मात्र आपल्या अवतीभवती पर्याय नसलेले अनेक अभिमन्यु दिसत आहेत. किंबहुना फारच थोडे जण मुक्त वावर करताना दिसतात.
जगात खास करून भारतात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले बालक पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यात दबून जाण्याच्या चक्रव्युहात फसण्यासाठी येते.
शालेय कालावधीत काही मोकळे क्षण अजूनही मिळतात. त्यानंतर बालकाचा मेंदू त्याला तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकवतो. आपण ह्यात फसलो गेलो आहोत हे त्या बालकास समजत सुद्धा नाही.
त्यानंतर लवकरच तरुण व्यक्तीची स्वतःची ठाम मते निर्माण होतात. ही मते त्या व्यक्तीला आयुष्यभर आपल्या जाळ्यात फसवितात. ही मते आपल्या आयुष्यातील आरंभीच्या वर्षातील अनुभवांवर अवलंबून असलेल्या गृहीतकांनी प्रभावित असतात.
त्यानंतर मनुष्य पैसे कमविण्याच्या जबाबदारीच्या जाळ्यात अडकतो. हे ही एक आयुष्यभर पुरणारे जाळे असते. काही माणसे चांगल्या मार्गाने पैसे मिळविण्यात यशस्वी होतात. परंतु एकदा का हे यश मिळाले, की हे यश टिकविण्याच्या अपेक्षांच्या ओझ्यात माणूस अडकतो.
काही लोक पैसे कमाविण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात. एकदा का माणूस ह्या जाळ्यात सापडला की ती यंत्रणा (system) त्या माणसाची नंतर कितीही इच्छा झाली तरीही त्यातून बाहेर पडून देत नाहीत .
एकंदरीत तुमची आता अपेक्षा झाली असेल की मी आता विवाहबंधनातील अडकलेल्या अखिल मानव जातीतील पुरुष स्त्री अभिमन्यु वर्गाविषयी बोलणार. परंतु मी उलट ह्या नात्याला मनुष्याच्या स्वार्थीपणापासून वाचविणारा जालीम उपाय समजतो. एक मात्र खरे की कोणाला काही मनसोक्त जगावेगळे करायचे असेल तर मग मग त्याचा विवाहबंधनात अभिमन्यु होतो. त्यानंतर अपत्यप्रेमाचे जाळे मनुष्यास अडकवते
बाकी थोडी छोटी छोटी जाळी असतात. जसे की ब्लॉग लिहिण्याचा किडा!

 

No comments:

Post a Comment