Saturday, September 21, 2013

पृथ्वीचा आयुष्यकाल



आपण सारे पामर दैनदिन समस्यांनी इतके ग्रासलेले असतो की आपणास वैश्विक समस्यांकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. साधू संत लोक हे ज्या प्रमाणे वैश्विक समस्यांकडे लक्ष देत असतात त्याचप्रमाणे संशोधक हा वर्ग देखील दैनदिन समस्या दुर्लक्षून वैश्विक समस्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. मी अशा समस्यांसंबंधित बातम्या ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपण कसे क्षुद्र समस्यांचा विचार करीत आहोत ह्या विचाराने मला काहीसे खजील व्हायला होते.
अशीच एक बातमी आठवड्याच्या मध्यावर वाचण्यात आली. पृथ्वीचा आयुष्यकाल केवळ २.२५ बिलियन वर्षे बाकी आहे. १ बिलियन म्हणजे १००० मिलियन. आणि १ मिलियन म्हणजे १० लाख. एकंदरीत २.२५ गुणिले दहा हजार लाख वर्षांनी पृथ्वी संपुष्टात येणार आहे. आता २.२५ बिलियन वर्षांनी होणार तरी काय? तर सूर्याची उष्णता वाढत जावून किंवा सूर्य प्रसरण पावून पृथ्वीला गिळंकृत करणार आहे. ह्या बातमीवर वाचकांच्या प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षित / विनोदी होत्या.
१> मनुष्यजात पृथ्वीला इतके वर्ष सुद्धा ठिकाणावर ठेवणार नाही, त्याआधीच आपण पृथ्वीचा आणि आपल्या स्वतःचा विनाश ओढवून घेवू
२> मी एक सदनिका विकत घ्यायचे ठरविले होते पण आता ही बातमी वाचून विचार बदलला!
बातमीत पुढे मनुष्यप्राणी मग पर्यायी ग्रहाचा कसा शोध घेईल आणि आपल्यापुढे असलेले पर्याय कोणते ह्याचा उहापोह करण्यात आला होता. अपेक्षेनुसार मंगळ ग्रह उपलब्ध पर्यायात पहिल्या क्रमांकावर होता. पृथ्वीपासूनचे तुलनात्मक दृष्ट्या कमी अंतर हा एक ह्यात महत्वाचा घटक होता. परंतु अजून काही वर्षांनी (ह्यातील वर्ष मोजण्याचे एकक ओघाने पुन्हा बिलियन मध्येच आले!) मंगळावर सुद्धा हीच परिस्थिती ओढविणार वगैरे वगैरे!
मी ह्यावर अजून विचार करू लागलो.

उष्ण कटिबंधातील (ह्यात आपला भारत आलाच! ) देशांना ह्याची झळ पोहोचण्यास प्रथम सुरुवात होणार. हा भाग मनुष्यवस्तीसाठी अधिकाधिक प्रतिकूल बनत जाणार. मग ह्या भागातील लोक शीत कटिबंधातील भागात स्थलांतर करण्याचा विचार / प्रयत्न करणार जे शीत कटिबंधातील लोकांना नक्कीच आवडणार नाही. मग पृथ्वीवर संघर्षाचे / युद्धाचे बरेच प्रसंग ओढवणार! ह्यात उष्ण कटिबंधातील बलवान लोकांना शीत कटिबंधातील लोकांकडून फितविले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही! फितविले जाणार म्हणजे फक्त त्यांनाच शीत कटीबंधातील देशात प्रवेश देणार आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले जाणार!
 
उष्ण कटिबंधातील सामान्य लोकांना मग  दुसरे काहीतरी मार्ग शोधावे लागणार. जमिनीखाली वसाहती निर्माण करणे असा बालिश विचार मी केला. सूर्याने पृथ्वीलाच गिळले तर जमिनीखाली तू काय जिवंत राहणार? मनाने मला प्रश्न केला. पण जमिनीखाली अस्तित्व टिकविण्यासाठी काही अधिक (लाखो) वर्षे मिळतील हे मात्र नक्की! मग जमिनीखालील वसाहतीतील आयुष्य कसे असेल ह्याचा विचार करण्यात मी मग्न झालो. ह्या आयुष्यात माणसाच्या खेळ आणि शारीरिक व्यायामासंबंधित कार्यक्रमावर बंधने येतील हे नक्की. पृष्ठभागावरील वाढलेल्या उष्णतेचा वापर ही जमिनीखालील वसाहत आपल्या गरजा भागविण्यासाठी करील!
 
असो परत मुख्य मुद्द्याकडे येऊयात. समजा मनुष्य प्राण्याने मंगळ ग्रहाची स्थलांतरासाठी निवड केली तरीही तिथे मनुष्यासाठी योग्य वातावरण नाही हे आपणास माहित आहे आणि लेखातही त्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे जो कोणी मंगळावरील उपलब्ध वायुंचा ऑक्सिजन मध्ये रुपांतर करण्यात यश मिळवेल त्याला नोबल पारितोषक नक्कीच मिळेल! पण हे न जमल्यास पृथ्वीवरील वायू प्रचंड प्रमाणात मंगळावर पोहोचवावे लागतील! आता राहता राहिला तो मंगळावर जाण्यासाठी निवड करण्यात येणाऱ्या सुदैवी मानवांचा विषय. ह्यासाठी निकष कोणते लावावेत हा कठीण प्रश्न. धनवान लोक जे ह्या प्रोजेक्टच्या खर्चात मोलाचा वाटा उभारतील त्यांना प्रथम निवडले जाईल. मग बुद्धिवान लोक, कलाकार, खेळाडू, सत्ताधारी लोक ह्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील. मनात अजून एक प्रश्न आला कि पृथ्वीवरील देश रचना पुन्हा तशीच मंगळावर निर्माण होईल काय? पृथ्वीवरील भ्रष्टाचार, अतिरेकी ह्या समस्या तिथेही उद्भवतील का? इतक्यात जाणविले की वर्षाच्या सुरुवातीला जवळपास हाच विषय मी लिहिला होता.
 
इतक्यात स्वयंपाकघरातून हाक ऐकू आली. "संकष्टी असली म्हणून काय झाले? भाज्या तर आणायच्या आहेत!" २.२५ बिलियन वर्षानंतरच्या प्रश्नाचा विचार करण्याचे काही काळ प्रलंबित करून मी बाजारचा रस्ता धरला!



 

3 comments:

  1. विश्वात नवनिर्मिती आणि अंत यांचे चक्र अहोरात्र चालुच असते. खुद्द या विश्वाला सुद्धा अंत आहे असे Big-Bang Theory सांगते तर Steady State Theory हे विश्व अनादी अनंत असून त्याला जन्म वा म्रुत्यू असे नाहीच असे मानते. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपली 'आकाशगंगा' हि एक दिर्घिका (MilkyWay Galaxy) त्यात २०० अब्जापेक्षा जास्त तारे त्यात प्रत्येक ताऱ्याची आपली अशी माला (System) त्यात आपला सुर्य हा एक तारा, त्याची सूर्यमाला आणि त्यात पृथ्वी हा आपला ग्रह.. हुश्श !!!

    सूर्याचा अंत तसा दोन टप्प्यात होइल असे मानले जाते. पहिल्या टप्प्यात तो अतिशय तापून शुक्राला सुद्धा भस्मसात करेल त्यानंतर आकुंचन पावेल आणि पुन्हा स्फोट होउन हळुहळू कृष्णविवरात (BlackHole) रुपांतरीत होइल. पण तोपर्यंत आपले वंशज पुढारलेले असतील आणि नेपच्यन वगैरे दुरग्रहांवरसुद्धा आपली वसाहत स्थापन करतील आणि सुर्याच्या अंतानंतर दुसऱ्या ताऱ्याच्या मालेत आपली वसाहत नेतील असा आशावाद ठेवुयात.

    एक चांगला विषय लेखासाठी निवडल्याबद्दल आभार आणि अभिनंदन !!!

    योगेश
    (http://manmokal.blogspot.com)

    ReplyDelete
  2. योगेश, आपल्या आर्थिक विषयातील लेखाप्रमाणे आपली प्रतिक्रियासुद्धा माहितीपूर्ण आहे. एकंदरीत तुम्ही उल्लेखलेला विश्वाचा व्याप लक्षात घेता पृथ्वी आणि मनुष्यजात किती छोट्या स्वरुपात आहे हे लक्षात येते. सूर्यमालेबाहेर आपल्याला मोठ्या प्रमाणात स्थलांतर करायचे असेल तर विज्ञानाला फार मोठी झेप घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या वैज्ञानिकांना शुभेच्छा!
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  3. आदित्य, हे एक (अजुनपर्यंततरी) कटू सत्य आहे कि विश्वात आपण एकटेच आहोत. याविषयी फर्मी या शास्त्रज्ञाने विरोधाभासाचा सिद्धांत मांडलेला आहे त्याला Fermi Paradox असे म्हणतात. ३० वर्षांपुर्वी विश्वात भमंतीसाठी सोडलेली Voyager-1&2 याने आत्ताशी कुठे अंतरतारका प्रदेशामधून विहार करत आहेत. अजुनपर्यंततरी त्यांना कोणी सजीव भेटलेला जाही.

    प्रुथ्वीचे सूर्यापासुनचे अंतर, तिची फिरण्याची गती, तिचा कललेला अक्ष, तिला चंद्र घालत असलेली प्रदक्षिणा हे केवळ तंतोतंत जुळून आलेले आहे (Its a PERFECT accident). यामध्ये एखाद्या घटकाची कमी-अधिकता सजिवांना मारक ठरू शकते. म्हणुनच आपल्याला प्रुथ्वीवर मिळालेली जगण्याची संधी हि एक नामी संधी आहे.

    विश्वात बरेचसे तारे द्वैती तारे (Twin) आहेत. ते एकमेकांना फारच लांबून प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यालासुद्धा असाच एक जोडीदार असावा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तो अजुनतरी दिसलेला नाही परंतु त्याचे नाव 'नेमेसिस' असे ठेवण्यात आलेले आहे. शास्त्रज्ञांना वाटते कि जेंव्हा जेंव्हा हा नेमेसिस सूर्याच्या जवळ येतो तेंव्हा तेंव्हा तो प्रुथ्वी निर्वंश करतो. डायनासॉरांची जमात संपवायला नेमेसिसच कारणीभुत असावा असाही एक अंदाज आहे. असो-

    मध्यांतरी एक फारच मजेशीर वाक्य वाचनात आले ते असे.'The strongest evidence that there exists intelligent species somewhere in the universe is that so far they have not contacted us' :-).

    ReplyDelete