Friday, August 2, 2019

संसार से भागे फिरते हो !





एका निवांत अशा शनिवार सकाळी आज फुरसतीने जाग आली. कोणालाही शाळा ऑफिसात जायचे नसल्यामुळे जाग येऊन सुद्धा घड्याळाकडे पाहण्याची तसदी घेतली नव्हती. परंतु ज्यावेळी उठून घड्याळाकडे पाहिलं, त्यावेळी सव्वासात वाजलेले पाहून काहीसं आश्चर्यच वाटलं. पावसाळी ढगांनी अंधार केला असल्यामुळे इतके वाजून गेले तरी कळलंच नाही. 

प्रत्येक शनिवारी सकाळी मनात काहीशी संभ्रमाची परिस्थिती असते.  पुढील दोन दिवस नक्की काय करावं म्हणजे मनाला समाधान वाटेल हा विचार शनिवार सकाळी चहा पिताना प्रकर्षानं वावरत असतो. ह्या क्षणी आपल्यासमोर काही पर्याय असतात. वसईला एखादी फेरी मारावी, सर्व कुटुंबियांना भेटुन यावे, मुंबईतील नातेवाईकांना भेटावं  हा पहिला विचार डोक्यात घोळत असतो. 

कार्यालयीन कामांमध्ये विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासारख्या काही बाबी असतात. पाचही दिवस यावर सखोल विचार करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला नसतो.  साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी यासाठी काही वेगळा वेळ काढून मनातील विचार सुसंगतपणे मांडावेत, ते योग्य लोकांपुढे ई-मेल द्वारे पोहोचवावे हा विचार प्रामुख्यानं मनात येतो. 

घरातील पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत क्वालिटी टाइम व्यतित करावा हाही विचार मनात असतोच! परंतु आपण ज्यावेळी क्वालिटी टाइम व्यतित करण्याच्या, त्यांच्यासोबत गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतो त्यावेळी त्यांनीसुद्धा त्याच मूडमध्ये असणे आवश्यक नसते. अशाप्रकारे चहा संपेपर्यंत मनामध्ये ह्या सर्व आदर्शवादी विचारांची यादी अस्ताव्यस्त स्वरुपात का होईना पण तयार झालेली असते!

शनिवार हळूहळू पुढे सरकत जातो. दैनंदिन व्यवहारातील गोष्टी बऱ्याच वेळा प्राधान्यक्रमात आदर्शवादी विचारांच्या वरती जात राहतात. या सर्व प्रकारात अजून एक गोष्ट होत राहते. शनिवारचे इतके तास गेले तरीही आपण ठरवलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट सुरु केली नाही ह्याविषयी काहीशी अस्वस्थता मनात निर्माण झालेली असते. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आधी जे काही घडून गेलं ते विसरून जाऊन उपलब्ध असलेल्या साप्ताहिक सुट्टीचा उर्वरित प्रत्येक मिनिट आणि तास ह्यांचा आपण मुळ उत्साहाने आदर्शवादी गोष्टींवर काम करण्यासाठी वापर करू शकतो. 

या आठवड्यात एका रात्री परत येताना मीनाकुमारीची बरीचशी गाणी कारमध्ये ऐकण्याचा योग आला. त्यामध्ये आधी ऐकलेलं, पुन्हा आवडून गेलेलं "संसारसे भागे फिरते हो भगवान को क्या पाओगे " हे गाणं पुन्हा ऐकलं.  दुसऱ्या दिवशी सकाळी ते युट्युबवर पाहिलं, व्हाट्सअप स्टेटसवर टाकून दिलं! व्हाट्सअँप स्टेटस किती दिवसांनी, मिनिटांनी बदलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? शेवटी भगवंत हा काही केवळ मंदिरात, तीर्थक्षेत्रातच वास्तव्य करत नाही. आपली जी काही कर्तव्यं आहेत ती कर्तव्यं व्यवस्थितपणे पार पाडत असताना, पार पाडल्यावर जी काही कर्तव्यपूर्तीची भावना वा समाधान मनात निर्माण होते ते सुद्धा भगवंताचे एक रूप होय! त्यामुळे आपल्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेकडे प्रत्येकाने योग्य लक्ष देणे हे आवश्यक आहे. 

आता परत वळुयात ते शनिवार सकाळच्या चहाच्या वेळी बनवलेल्या आदर्शवादी दृष्टिकोनातून बनवलेल्या आपल्या टुडू लिस्ट मधील गोष्टींकडे! शनिवार पुढे सरकत जातो, शनिवारी रात्री थोडं उशिरा झोपुन विकेंडला अजून जास्त लांबवल्याचं समाधान मानता येतं! 
ह्या सर्वात कधी एकदाचा रविवार उजाडतो ते समजत नाही! एकदा का रविवार उजाडला की रविवारचे सर्व व्याप आटपून सायंकाळ कधी उजाडते हेही समजत नाही! मग मनात उतरते ती एक असमाधानाची भावना!! शनिवारी सकाळी बनवलेल्या आदर्शवादी यादीतील फार कमी कामे पूर्ण झालेली असतात, एका अत्यंत व्यग्र अशा सप्ताहाची चाहूल तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करीत राहते!

परंतु याच गोष्टीकडं तुम्हांला दुसऱ्या प्रकारे पाहता येईल. तुमच्यापुढं व्यग्र राहण्यासाठी बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत,  तुमच्याभोवती तुमच्याकडून अपेक्षा असणारी बरेच माणसे आहेत! हे सर्व घटक तुम्ही दुनियेतील काही सुदैवी माणसांपैकी एक असल्याचे प्रतिक आहे.  त्यामुळे रविवार संध्याकाळी केवळ एकच गाणे ऐकावे संसार से क्या भागे फिरते हो !

जाता जाता आज सकाळी पडणाऱ्या धुंद पावसाचं एक छायाचित्र ह्या पोस्टच्या सुरुवातीला ! पावसामुळं काही कामं टाकुन घरात बसणाऱ्या मला माझे ऑफिसात गेलेले मित्र कदाचित "बारिश से क्या डरके बैठे हो !" म्हणत असावेत !!

No comments:

Post a Comment