Saturday, February 1, 2020

नात्यांचा जीवनक्रम !



नात्यांचे अनुबंध प्रत्येकाभोवती कळत नकळत गुंतले जातात. काही नाती रुढार्थानं नावं बाळगुन असतात तर काहींना तितकेही भाग्य नसतं. नाती कधी, कुठं जुळावी ह्याविषयी लिखित नियम असणं शक्य नाही. ह्या  पोस्टमध्ये नाती म्हणजे रक्ताची नाती, मैत्रीची नाती असे सर्व काही अर्थ अभिप्रेत आहेत. 

आयुष्याच्या पुर्वार्धात माणसाला बरीच नाती आपसुकच मिळतात. लहानपणीची नाती ही वारसाहक्कानं मिळालेली असतात. बालपणी अनुभवलेल्या नात्यांत खुपदा निरागसतेचा अनुभव आल्यामुळं आपण एकंदरीत नात्यांविषयी  खुप आशादायक दृष्टिकोन घेऊन पुढील आयुष्यात पाऊल ठेवतो.  शिक्षण संपल्यानंतर  माणसाचं आयुष्य खुपच गतिमान बनतं . त्यामुळं काही मोजकी नाती सोडली तर बाकीच्या नात्यांकडं लक्ष देण्यास फुरसत मिळत नाही. 

एखाद्या नात्याचा जीवनक्रम कसा असतो? जीवनक्रम म्हणजे नक्की काय? नातं जुळणं, दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना ओळखुन घेऊन नातं स्थिरतेकडं नेणं आणि मग त्यानंतर नात्यांतील स्थिरतेचा काळ ! आदर्श स्थितीमध्ये नात्यांचा जीवनक्रम काहीसा वर उल्लेखल्याप्रमाणं असायला हवा ! परंतु जीवनात आदर्श असं काही नसतं ! त्यामुळं ह्या नात्यांच्या जीवनक्रमात बरेच चढावउतार येतात. सहजासहजी जुळू शकणारी नाती काही कारणानं  जुळत नाहीत, कमी माहितीवर आधारित नाती जोडली जातात आणि मग अपेक्षाभंगाचं शल्य उरी बाळगत निभावली जातात किंवा मोडली जातात, काही नाती सुरुवातीच्या काळात अत्यंत वादळी प्रवास करुन त्यातील प्रवाशांना शहाणं करुन सोडतात, आपल्या भुमिकांच्या आणि नात्यांच्या पुर्नव्याख्येनंतर मग एक शांत संयत वाटचाल करतात. काही शहाणी नाती आयुष्यभर समजुतदार प्रवास करतात. काही उत्साही नाती आयुष्य अगदी रसरसुन जगतात. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर माणुस स्वतःकडं अलिप्ततावादी दृष्टीनं पहायला शिकतो. हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी येत असला तरी तो कधीतरी नक्कीच यायला हवा. ह्या घटनेनंतर मनुष्याच्या आयुष्यातील नात्यांमध्ये काहीसा फरक पडत असावा. नात्यांतील उत्कटता काहीशी संपुष्टात येत असावी! अहम भावनेचा त्याग करुन माणसं स्वत्वाच्या शोधात निघतात ! आपल्या संपुर्ण आयुष्याकडं तटस्थेनं पाहण्याची क्षमता त्यांच्यात येते ! पैलतीराचा शोध वगैरे म्हणतात ते हेच असावं कदाचित !  

वायनाड भेटीच्या वेळी काढलेल्या दोन छायाचित्रांची ह्यावेळी आठवण झाली. दूरवर पाहिस्तोवर दिसणारी हिरवाई , जाणवणारी शांतता! आयुष्यात सुद्धा अशी मनःस्थिती लाभणं किती भाग्याचं नाही का?



No comments:

Post a Comment