Showing posts with label अण्णा हजारे आंदोलनांनिम्मित. Show all posts
Showing posts with label अण्णा हजारे आंदोलनांनिम्मित. Show all posts

Saturday, August 27, 2011

अण्णा हजारे आंदोलनांनिम्मित




अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाबाबत माझी मते मांडण्याचा हा प्रयत्न.

कधीकाळी वाचलेली एक गोष्ट! एका अपराध्याला दगडाने ठेचून मारण्यासाठी एकत्र आलेला जमाव. शिक्षेचा हा अघोरी प्रकार सुरु होणार तितक्यात तिथे एक महात्मा येतो आणि म्हणतो ज्या माणसाने आयुष्यात एकही गुन्हा केला नाही त्यानेच फक्त दगड उचलावेत. आपसूकच सर्वांचे हात मागे येतात. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात हा प्रकार तसा लागू होत नाहीय. भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागणारे असे दोन प्रकार मानले तर अण्णांचे आंदोलन हे दुसर्या प्रकारच्या लोकांनी पहिल्या प्रकारच्या लोकांविरुद्ध चालू केलेले. गोष्टीतील महात्म्याचे तत्व लावायचे झाले तर बहुदा आपल्या सर्वांना ह्या आंदोलनात भाग घेण्याचा हक्क नाही.

सामान्य माणसाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची इच्छा असूनही ही तो असे का करू शकत नाही हे शोधण्याचा इथे मी प्रयत्न करतोय.
  1. आजूबाजूच्या परिस्थितीने भांबावून गेलेल्या मध्यमवर्गीय माणसाची आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि जे आधीच गर्भश्रीमंत आहेत त्यांची आपले सांपत्तिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक संपत्ती गोळा करण्यासाठी चाललेली धडपड. ह्या धडपडीमुळे मर्यादित संपत्तीवर पडलेला ताण. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे कोणत्याही मार्गाने आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळविण्याची वृत्ती.
  2. जीवनातील मुलभूत गोष्टी जसे की सार्वजनिक वाहतूक, आरोग्यव्यवस्था यांचा अभाव. यामुळे सामान्य माणसाकडे असलेला वेळेचा अभाव.
  3. छुप्या स्वरुपात अस्तित्वात असलेली गुंडगिरी. सर्वांना माहित असलेल्या समांतर व्यवस्थेला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरोध केल्यास जीवाला धोका होवू शकतो ह्याची प्रत्येकाच्या मनात असणारी भीती.
  4. मध्यमवर्गीयातील एकीचा अभाव आणि जोपर्यंत अन्यायाची झळ स्वतःला लागत नाही तोपर्यंत गप्प बसण्याची वृत्ती.
  5. बौद्धिकदृष्ट्या संपन्न अशा वर्गाची विविध कारणांमुळे शासकीय सेवांपासून झालेली फारकत आणि त्यामुळे शासकीय धोरणांमध्ये कल्पकतेचा अभाव.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गृहस्थाला म्हणायचे आहे तरी काय? जन लोकपाल विधेयक उद्या संसदेत येईल आणि संमत सुद्धा होईल. काही भ्रष्ट जनप्रतिनिधी ह्या विधेयकाच्या अंमलाखाली अटकही होतील. पण त्यांच्या जागी स्वच्छ लोकप्रतिनिधी येण्याची शक्यता निर्माण होणार कशी? वरील दिलेले प्रश्न जन लोकपाल विधेयक सोडवणार काय?

केव्हातरी ही सर्व चर्चा आपण लोकशाहीस लायक आहोत का? की पर्यायी शासनव्यवस्थेचा आपण विचार करावा या दिशेने जाईल. माझे तरी म्हणणे असे की अशा एखाद्या लायक माणसाचा शोध घेवून त्याला हुकुमशहा बनवावा! बरेच काही कठोर निर्णय बराच काळ घेतल्याशिवाय परिस्थती सुधारणे शक्य नाही.