Monday, January 20, 2014

जाणता अजाणता - अंतिम भाग!


शरीराने शंतनु ऑफिसात असला तरी त्याचं मन मात्र भरकटत होतं. हा सर्व प्रकार मुन्नारला आल्यापासून सुरु झाला म्हणजे इथलाच कोणता तरी घटक ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असणार असाच त्याचा समज झाला होता. तन्वीच्या पूर्वायुष्यातील कोणती तरी घटना ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असली तर? असा विचारही त्याच्या मनात डोकावला होता. पण असं असतं तर तन्वीने हे आपणास केव्हाच सांगितलं असतं इतका मात्र त्याचा तिच्यावरचा विश्वास शाबूत होता. इथे नोकरीचा जम तर चांगलाच बसत चालला होता आणि भविष्यही उज्ज्वल दिसत होतं. पण तन्वी आणि तिची मानसिक स्थितीसुद्धा महत्त्वाची होती. ह्या सगळ्या प्रकाराने तिचे मनःस्वास्थ्य बिघडलं तर? मग आपली कितीही प्रगती झाली तर काय उपयोगाची? शंतनुचे हे भरकटत चाललेले विचारचक्र त्याच्या साहेबांच्या येण्यानं थांबलं. "काय शंतनु इतका वेळ असाच बसून राहिला आहेस?" साहेब विचारात होते. एका क्षणी त्यांना हा सारा प्रकार सांगावा असेही त्याच्या मनाने घेतलं. पण हा सगळा प्रकार तिसऱ्या कोणाला सांगण्याआधी तन्वीला विश्वासात घेणं आवश्यक होतं. त्यामुळे शंतनुने तो विचार प्रयत्नपूर्वक मागे लोटला. "नाही हो साहेब, इथल्या ह्या पावसाळी हवेने माझं डोकं धरलंय?" तो म्हणाला. त्याच्या ह्या स्पष्टीकरणावर बॉसचा अजिबात विश्वास बसला नसला तरी त्याला आपल्याशी ही गोष्ट सध्या शेयर करायची नाहीय हे बॉसने ताडलं. बॉस व्यावहारिक होता. सध्यातरी शंतनु कामाच्या बाबतीत जोरात होता. त्याचे असे काही ताणग्रस्त क्षण पेलायची त्याची तयारी होती.
शंतनु संध्याकाळी थोडासा लवकरच घरी आला. तन्वीने दुपारी जागल्यापणीच एक दोन डुलक्या काढल्या होत्या. सकाळी ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विचारपूर्वक ठरविलेल्या मार्गाची तिने दिवसा एक दोनदा उजळणी केली होती.  घरात मल्याळी अबोला पुन्हा एकदा साथीला होता पण भावना मात्र मराठीच होत्या. आणि डोळ्यात सतत डोकावू पाहणाऱ्या अश्रूंची भाषा तर जगभर सारखीच असते. चहाचे कप घेऊन तन्वी दिवाणखान्यात आली. एक कप शंतनुसमोर टीपॉयवर ठेवून आपला कप घेऊन ती खिडकीपाशी आली. आज ढगाळ हवा होती. वातावरणात उकाडाही होता. शंतनुविषयी तन्वीची एक तशी जुनीच तक्रार होती. भांडण झालं की दूर करण्यासाठी तो केव्हा पूर्ण पुढाकार घेत नसे. "आज मला तुझी फार गरज आहे, शंतनु!" चहाचा घोट घेता घेता तन्वी मनात विनवणी करीत होती. आणि इतक्यात शंतनुच्या दोन्ही हातांची अलगद पकड तिच्या कमरेभोवती पडली. अगदी नाजूक मनःस्थितीत असणाऱ्या तन्वीच्या मनाचे सर्व बांध त्या क्षणी मोडून पडले. बराच वेळ मग ती शंतनुच्या मिठीत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होती.
"शंतनु, मला कसंही करून ह्या सर्व प्रकारातून बाहेर पडायचं आहे रे, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवीय! एकदा त्या दुनियेत माझा प्रवेश झाला की तिथल्या माझ्या वागण्यावर माझे अजिबात नियंत्रण नसतं. इतकंच काय तर तिथल्या कालावधीत माझ्या मनातील भावनाही मला पूर्णपणे आठवत नाहीत." शंतनु तिच्याशी पूर्ण सहमत होता. "तन्वी, खरतरं तू झोपली असताना जागं राहून मला तुझ्यावर लक्ष ठेवायला हवं, पण मी पडलो मुलखाचा झोपाळू!जर मला जागं राहता आलं असतं तर ज्या वेळी तो नकुल तुझ्या स्वप्नात येतो ते मी तुझ्या हावभावांवरून मी ओळखलं असतं!" "आणि मग तू काय केलं असतं रे शंतनु?" तन्वीचा हा प्रश्न शंतनुला फारसा आवडला नाही कारण त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ नव्हते. "बाकी तन्वी, तुला एक प्रयत्न करून पाहायला हवा. त्या स्वप्नात तुला तुझे हे विश्व आठवता यायला हवं! तुझ्या ह्या विश्वातील चांगल्या गोष्टी (स्वतःकडे मिश्किल नजरेने पाहत) तुला त्याच्याशी लढल जाणारं हे मनोयुद्ध जिंकायला मदत करेल!" आपल्या मनातील सकाळचेच विचार काही प्रमाणात शंतनुच्या तोंडून ऐकून तन्वीला खूप बरं वाटलं. आणि त्याचा तो मिश्किलपणा, तो जर ह्याने परत प्राप्त केला असेल तर मला खूप बरं वाटेल शंतनु! सुखावलेली तन्वी विचार करीत होती.
रात्रीचे जेवण शांतपणे पार पडले. तणावपूर्ण दिवसानंतर मनोमिलन झाल्याने एक प्रकारची मनःशांती दोघेही अनुभवत होते. फरक इतकाच होता  ऑफिसातील कामाने दमलाभागला एक जीव शंतनु होता आणि कितीही झालं तरी ऑफिसातील विचार अधूनमधून त्याच्या मनातील तन्वीबद्दलच्या विचारांशी त्याच्या मनाचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. तन्वीलाही हे अपेक्षितच होते. काही वेळातच शंतनु झोपी गेला. तन्वी त्या तीन भेटीतील आठवणाऱ्या वातावरणाची उजळणी करण्याचा प्रयत्न करीत होती. मंद मेणबत्तीचा प्रकाश मिणमिणत होता.
आजचं वातावरण अगदी वेगळं होतं. नेहमीचा राजदरबार, महाराज ह्याचं विश्व गायब झालं होतं.  तिथं आता एक रम्य संध्याकाळ होती. सुर्य अस्ताला निघाला होता. एका छोट्या टेकडीवर तन्वी बसली होती. समोर दूरवर एक सुंदर नगर दिसत होते. आणि हो हे नगर पुराणकाळातील नव्हतं. आधुनिकतेच्या काही खुणाही तिथे दिसत होत्या. त्या तांबड्या आकाशात बगळ्यांची एक रांग आकाशात दूरवर कोठेतरी जात होती. ह्या बगळ्यांचं कसं बरं असतं असा एक विचार तिच्या मनात येऊन गेला. आपण इथे एकटेच काय करतो आहोत ह्याचा एव्हाना तन्वी अचंबा करू लागली होती. इतक्यात दूरवरून येणाऱ्या एका मोटारीच्या आवाजाने तिचे लक्ष वेधलं गेलं. ती कार तर एकदम मस्त होती. आणि चालविणाऱ्याचे सारथ्यकौशल्य वाखाणण्याजोगं होतं. टेकडीवरील थोडीफार वळणं झपाट्याने पार करीत तो कारला घेऊन तन्वीजवळ येऊन पोहोचला देखील. ती कार होंडा सिटी होती. आणि त्यातून अगदी आधुनिक वेशातील एक देखणा तरुण तिच्यासमोर उतरला. क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. आणि मग अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे हा तर नकुल! नकुलने अगदी आधुनिक  कपडे परिधान केले होते. हातात चकाकते घड्याळ होतं. अरे हे तर टायटनचे घड्याळ! अगदी शंतनु घालतो तसं! शंतनु! कोण हा शंतनु? तन्वीच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. शंतनु म्हटल्यावर अगदी ओळखीचं वाटत होतं. पण नक्की कोण हे आठवत नव्हतं.
"ओळखलं, मला?" नकुल विचारत होता. "आपण कोण?" आपल्याच दोन रूपांमधील तर्कसंगती लावण्याच्या प्रयत्नात असलेली तन्वी त्याचवेळी नकुलच्या ह्या दुसऱ्या रूपाचे प्रयोजन काय ह्याचा विचार करीत होती. "अरे हो, आपण नकुल नाही का?" तन्वी म्हणाली. त्याचवेळी तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचाही ड्रेस अगदी आधुनिक होता. टी शर्ट आणि जीन्स! "अरे अशीच जीन्स शंतनुने आपल्याला घेऊन दिली होती" आता शंतनु तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. "लवकर ओळखलं म्हणायचं," नकुल हसतच म्हणाला. त्याच्या हास्यात तन्वीला काहीसा खलनायकपणा दिसला. "आपण फिरायला जाऊयात?" नकुल विचारत होता. शंतनुला असं विचारायची कधीच गरज पडली नव्हती. "अरे, हा कोण शंतनु, हा सारखा सारखा माझा पिच्छा का पुरवतोय?" तन्वी काहीशी त्रस्त झाली होती. नकुलचे बारीक लक्ष तिच्याकडे होते. "तिथे शहरात आभूषणांच मस्त प्रदर्शन भरलं आहे?" एव्हाना तन्वी पुरती त्रस्त झाली होती. "हो, येते मी" असं म्हणत ती उठली. तो रस्ता ओळखीचा वाटत होता. "अरे हा तर कोल्हापुरातील रस्त्यासारखाच वाटतोय!" मनातल्या मनात तन्वी म्हणाली. आता हळूहळू तर्कसंगती लागत होती. नकुलने गाडी पार्क केली. हे प्रदर्शन अगदी अप्रतिम होतं. एकाहून एक अतिसुंदर दागिन्यांची तिथे रांग लागली होती. पण नकुल कोणत्याही ठिकाणी तिला जास्त वेळ थांबू देत नव्हता. एका ठिकाणी तन्वीला एक मोत्यांची माळ खूप आवडली. "मला ही माळ हवीय!" ती म्हणाली. आता मात्र नकुलचा संयम सुटला. "नाही, आपल्याला हिऱ्यांच्या विभागात जायचं आहे" जवळजवळ रागावतच तो म्हणाला. तन्वी घाबरली. "शंतनु असा कधी रागवायचा नाही." नकुलच्या मागे तन्वी भीतीनेच चालली होती. शेवटी एकदाचे ते हिऱ्यांच्या विभागात पोहोचले. बहुदा काय विकत घ्यायचं आहे हे नकुलला माहित असावं. तो थेट तिथपर्यंत पोहोचला. तिथे एक अतिशय मौल्यवान हिर्याने जडवलेली अंगठी होती. ती त्याने उचलली. तन्वीच्या समोर ती अंगठी आणून नकुल म्हणाला, "तन्वी, तू माझ्याशी लग्न करशील?" आता हा अगदी शेवटचा  बिंदू होता. शंतनूने कसं तिला हळुवारपणे मागणी घातली होती. आणि त्या क्षणी तिला सर्व काही आठवलं. कोल्हापूर, मुन्नार, शंतनु आणि सकाळचा निर्धार, अगदी सारं काही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ!
"नकुल मला माझ्या शंतनुकडे जाऊ देत!" विनवणी करीत ती म्हणाली. "शेवटी माझा अंदाज खरा ठरला तर!" काहीसा त्रस्त होऊन  नकुल म्हणाला. "तन्वी, मी तुला अगदी सुखात ठेवीन! माझ्या विश्वात तुझ्या साऱ्या काही इच्छा पुऱ्या होतील! मी तुला दुःखाचा लवलेशही लागू देणार नाही!" तन्वी अगदी काळजीपूर्वक नकुलकडे पाहत होती. त्याची नजर तिने ओळखली होती. ह्याचं हे बोलणं आपण ऐकल नाही तर दुसऱ्या मार्गाचा तो वापर करणार अशी तिला चिन्ह दिसत होती. एकंदरीत प्रकरण हुशारीनं हाताळायचं तिने ठरविलं.
"अरे इतकी घाई कशाला? आताच तर आपण एकमेकाला ओळखू लागलो आहोत. आणि मला ह्या विश्वाशी जरा सरावू तर दे!" तन्वी जरा वेळ काढायला पाहत होती आणि त्याचवेळी नकुलच्या चेहऱ्यावरील हावभाव निरखत होती. आता ह्या क्षणी तन्वीला दोन विश्वाच्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव झाली होती. आणि आपले डावपेच खेळायला ती पूर्ण तयार होती. "पण नकुल, मला कायमचं ह्या दुनियेत कायमचं राहता येईल का? प्रत्येक वेळी मला शंतनुच्या विश्वात जावं तर लागेलच ना?" नकुलला हा प्रश्न काहीसा अनपेक्षित होता. क्षणभर थांबून तो उत्तरला, "तुला शरीराने कायमच शंतनुच्या विश्वात राहावं लागेल. फक्त एक घडू शकत. तू मनानं कायमची ह्या विश्वात राहू शकतेस. जागेपणी आणि झोपेतसुद्धा!" "मग माझ्या शंतनुच्या दुनियेतील वागण्यावर त्याचा परिणाम नाही होणार का?" "हो अर्थातच होईल! तू त्या दुनियेत वावरताना सुद्धा माझ्या दुनियेतील संदर्भ  घेऊनच वावरशील!" "म्हणजे मी त्या दुनियेच्या हिशोबाने वेडी समजली जाईल तर!" तन्वी म्हणाली. "अगं शहाणपणा आणि वेडेपणा ह्या सर्व सापेक्ष गोष्टी आहेत! शंतनुच्या दुनियेतील शहाणपणाच वागणं दुसरे कोणते संदर्भ लावले तर वेडेपणाचच होईल की!" आपला बुद्धिभ्रम करण्याचा नकुलचा प्रयत्न तन्वी चांगलाच ओळखली होती.
"चल, ते सर्व राहू दे! बाहेर हवा कशी मस्त पडली आहे! आपण फिरून येवूयात की!" तन्वी म्हणाली. "तो पहा, तिथे कसा उंच पहाड दिसतोय, आणि आता चंद्र तर उगवतच असेल!" "पण तिथवर पोहोचायला वेळ लागेल की" नकुल कुरकुरला! "नकुल, तू ठरवलं तर एका क्षणात आपण तिथं पोहोचू शकू, मी ओळखून आहे!" तन्वीच्या ह्या वाक्यावर नकुल चमकला. "म्हणजे हिला सर्व काही समजलं आहे की!" दुसऱ्या क्षणी ते दोघे त्या उंच पहाडावर होते. सूर्य मावळला असला तरी त्याची तांबडी प्रभा आकाशात रेंगाळत होती. हवेत मस्त थंडावा होता. पूर्वेला अपेक्षेनुसार चंद्राचे आगमन झाले होते. बाजूला खोलवर दरी होती. त्या दरीकडे पाहताना तन्वीच्या मनात एक नाही दोन विचार चमकून गेले. आता तन्वी परिस्थितीच्या पूर्ण नियंत्रणात होती. तिनं मागे वळून पाहिलं. एक आलिशान प्रासाद तिथं उभा होता. नकुलचा हात तिने हळूच हातात घेतला. तिचं मन वेगाने धावत होते. तिच्यापुढे एक संधी होती. प्रणयाराधन करण्यात नकुलचा हात धरणारं कोणी नव्हतं. तो तिला प्रणयातील उत्कटता दाखवू शकला असता. अगदी शेवटापर्यंत हा क्षण तिने आयुष्यभर लक्षात ठेवला असता आणि हे कोणालाच कधी कळलं नसतं. आणि ह्यातून कधी आणि कसं बाहेर पडायचं ही ती ठरवू शकणार होती.
..............


काही वेळानं तन्वीने नकुलला एक सुंदर फुल दाखवलं. "नकुल, मला ते फुल हवंय!" नकुल एकदम खुशीत होता. तो तत्काळ ते फुल आणण्यासाठी पुढे सरसावला. तिथल्या निसरड्या वाटेकडे त्याचं दुर्लक्ष झालं. आणि अचानक त्याच्या नजरेसमोर खोल दरी दिसली. खोल दरीत पडत असताना तो कायम तन्वीच्या डोळ्यात पाहत होता. "तू मला फ़सविलस" हेच भाव त्याच्या डोळ्यात होते.
सकाळ प्रसन्न होती. तन्वी अगदी मजेत होती. शंतनुने तिची ही ख़ुशी पाहून हा विषय काढायचं टाळल. पुढे बरेच दिवस असच चाललं. तन्वी अगदी नेहमीसारखी झाली होती. अगदी कोल्हापुरासारखी! दोन आठवड्यांनी न राहवून शंतनुने हा विषय काढला. तन्वी हसतहसत म्हणाली, "नकुल केव्हाच इतिहासजमा झालाय, शंतनु!" त्याला बिलगताना "नकुल केवळ आभासी दुनियेत भेटला म्हणून बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं, हा विचार तिच्या डोक्यात आलाच!"
(समाप्त!)
वाचकहो, जमल्यास प्रतिक्रिया द्या!

6 comments:

  1. Avadali. Pan faarach short cut marlya sarakhe vatate.
    Ajunhi katha vistaar karata alaa asata.

    ReplyDelete
  2. धन्यवाद धीरज आणि एकनाथ!




    एकनाथ,

    कथाविस्ताराची संधी होती हे मान्य! पण उत्कंठा कायम ठेवत कथाविस्तार करण्याचे कौशल्य विकसित करावं लागलं! आणि हो, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या स्वभावात सातत्य दाखवता यायला हवं आणि प्रत्येक घटनेला एकंदरीत कथानकाच्या दृष्टीने काही संदर्भ असावा. ह्या गोष्टी सांभाळणं थोड्या भागानंतर कठीण बनत जातं



    बघूयात प्रयत्न करून पुढच्या कथेच्या वेळी!

    ReplyDelete
  3. पुढील लेखनासाठी शुभेच्छा

    ReplyDelete