Wednesday, January 8, 2014

जाणता अजाणता - भाग ३


शंतनुला पहाटेच जाग आली. तन्वी बाजूला नव्हती. अभ्यासिकेतील दिवा चालू होता. डोळे चोळत शंतनू तिथवर गेला. तन्वी टेबललैम्पच्या उजेडात तिच्या वहीत काही नोट्स काढीत होती. "तन्वी, इतक्या सकाळ सकाळी काय लिहितेयस?" शंतनूने तिला विचारलं. तन्वीने वही पुढे केली. मुन्नारच्या स्थलांतरासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टींची ती यादी होती. "आपण गणपतीच्या सुट्टीत इथे परत येऊ, फ्लैट भाड्याने द्यायचा की  नाही त्यावेळी ठरवू" तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. "तन्वी, तुझ्या नोकरीचं काय? समजा मी सुद्धा इथे दुसरी नोकरी शोधली तर आपल्या दोघांना अगदी मजेत राहता येईल" शंतनु म्हणाला. "नको राहू दे, मी चहा ठेवते आता!" असं म्हणून तन्वी तिथून पटकन उठून गेली. शंतनूची झोप आता पूर्ण उडाली होती. त्याने पटकन ब्रश केलं आणि तन्वीने आणून दिलेला चहा घेऊन तो स्वयंपाकघरात आला. बोलणं टाळायचं असेल तर कामात गढून जायची किंवा गढून जायचं नाटक करायची तिची सवय त्याला काही नवी नव्हती.  शंतनू असाच काही क्षण तिच्या मागे उभा राहिला. नेहमीप्रमाणे तन्वीला त्याची चाहूल लागलीच. न राहवून तिने मागं वळून पाहिलं आणि नजरेनेच काय म्हणून विचारलं.
"तन्वी, मनातलं खरं खरं सांगून टाक!" शंतनु म्हणाला. तन्वी मागं वळाली. खिडकीतून खालून जाणारा रस्ता दिसत होता. त्या रस्त्यावर जर पुढे गेल्यावर दोन फाटे यायचे. त्यातील एक नेहमीचा गावात जाणारा रस्ता होता पण दुसरा रस्ता कोठे जातो हे तन्वीला माहित नव्हतं. "आपण त्या रस्त्यावरुन पुढे जाऊन पाहूयात ना!" तन्वीने बराच वेळा शंतनुकडे आग्रह धरला होता. "जाऊ कधीतरी एकदा, बाकी पुढे कुठे हरवून गेलो तर?" शंतनु म्हणाला होता. "शंतनु, तू सोबत असशील तर दाट जंगलात सुद्धा हरवायची भीती नाही रे!" तन्वी त्यावेळी म्हणाली होती. हे सारे तन्वीला आठवत होते. ती पुन्हा एकदा वळाली. शंतनु तसाच उभा होता. "शंतनु, आज आपल्याकडे दोन पर्याय आहेत. खरं सांगू ह्यातील कोणताही एक १०० टक्के बरोबर नसणार आहे. कोणताही एक स्वीकारला तर काही मनासारखं होईल तर काही मनाविरुद्ध! जो मार्ग आपण स्वीकारू त्यात काही जास्तच मनाविरुद्ध घडलं तर कितीही इच्छा झाली तरी आपण आज उपलब्ध असलेला दुसरा पर्याय त्यावेळी स्वीकारू शकणार नाहीत! आणि मी स्वार्थी आहे शंतनु! मी त्याग  केला ही भावना मला माझ्या करियरपेक्षा महत्वाची वाटतेय! एक काका आणि आई सोडले तर दोन्ही बाजूंचे नातेवाईक, आपण मुन्नारला जावे असेच म्हणणार! माझ्यावर इतकी मेहरबानी कर!" शंतनु निरुत्तर झाला.
पुढे बाकी सर्व घडामोडी अगदी झटपट झाल्या. आई आणि काकांच्या कटकटीकडे तन्वीने अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं. सामानाची आवराआवर करून हवं असेललं सामान मुन्नारला निघालं सुद्धा! आणि मग एका शनिवारी सकाळी विमानानं दोघंजण कोचीला पोहोचले सुद्धा! कोचीहून मुन्नारचा वळणावळणाचा रस्ता तन्वीला खूप भावला. आणि मुन्नारचे छोटे टुमदार घर पाहून तर ती बेहद्द खुश झाली. खिडकीतून समोर हिरवेगार पर्वत दिसत होते. पावसानं चांगलाच जोर धरला होता. शनिवार - रविवार अगदी बेधुंद गेले. शंतनुने  रसिकतेच्या बाबतीत अगदी परिसीमा गाठली होती.
आणि मग दुष्ट सोमवार आला. शंतनुलासुद्धा आज ऑफिसला जावेसं वाटत नव्हत. पण नाईलाज होता. तिथे गेल्यावर मात्र शंतनु अगदी कामात गढून गेला. ह्या ऑफिसचा विस्तार होणार होता. परदेशी लोकांसाठी खास नवीन अद्ययावत सोयींनी युक्त असे हॉटेल उघडायचा त्याच्या पर्यटक कंपनीचा विचार होता. ह्या नवीन क्षेत्रात पाय ठेवताना नवीन रक्ताला वाव देण्यासाठी म्हणून शंतनुची निवड करण्यात आली होती आणि ह्यात चमक दाखवली तर त्याला भरभर पुढे जाण्याचा वाव होता. पहिल्याच दिवशी शंतनुला यायला रात्रीचे नऊ वाजले. तन्वीने आपला सगळा समजूतदारपणा एकत्र करून हसत हसत त्याचं स्वागत केलं. दमलाभागला शंतनु जेवल्यावर दहा मिनिटातच झोपी गेला. दिवसभर हिरव्यागार पर्वतराजीच्या दर्शनाने मूड खुललेल्या तन्वीला त्याच्याशी गप्पा मारण्याची फार इच्छा होती. ती तशीच मारून टाकून ती बिछान्यावर पहुडली. बराच वेळ तिचा डोळा लागत नव्हता.
दुसरा दिवशी सकाळी शंतनुला लवकर निघायचं होतं. रात्री बोलायचं राहून गेलं होतं. तन्वीने सकाळी सातचा गजर लावला होता. त्याच्या तिला आवाजाने जाग आली तर शंतनु निघतच होता. आता मात्र तन्वीचा संयम सुटला. "रात्री मला सांगायचं ना? मी उठले असते लवकर!" ती रागानेच बोलली. शंतनुला आपली चूक कळली होती. "सॉरी तन्वी" असं बोलून तिच्याजवळ तो येणार तितक्यात त्याचा भ्रमणध्वनी वाजला. पलीकडे त्याचा बॉस होता. "हो हो आलोच" असं म्हणत शंतनू धावतच बाहेर पडला. खिडकीतून त्याला टाटा करणाऱ्या तन्वीकडे पाहायचं भानसुद्धा त्याला राहिलं नाही.
शंतनुचा दिवस कामात अगदी  बिझी होता. ह्या प्रोजेक्टला अर्थसहाय्य करणाऱ्या बँकेची अधिकारीमंडळी  दुसऱ्या दिवशी येणार होती. त्यांना प्रेसेंटेशन द्यायचं होत. संध्याकाळी सात वाजत आले तरी ते काही मनासारखं बनत नव्हत. त्यात बरीच माहिती हव्या तशा स्वरुपात बसवायची होती. आणि बॉसचा होकार मिळत नव्हता. "यंग मॅन, आज रात्रभर बसून हे प्रेसेंटेशन आपण पूर्ण करूयात! उद्या आपल्याला बँकेकडून होकारच हवाय!" बॉसचे हे शब्द ऐकून शंतनु हादरलाच. निघताना आपण परत वळून पाहिले सुद्धा नाही हे त्यालाही दिवसा कधीतरी जाणविले होते. बराच वेळ तन्वीला फोन करायचा प्रयत्न त्याने केला होता. पण "तुम्ही प्रयत्न करीत असलेला  भ्रमणध्वनी संपर्ककक्षेच्या बाहेर आहे" असा ध्वनिमुद्रित संदेश ऐकून त्याचा संयम सुटत चालला होता. इतक्यात त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला. तन्वी समोर होती. स्वागतकक्षातून हा नंबर मिळविण्यासाठी तिला बरेच प्रयास करावे लागले होते. "शंतनु, घरी कधी येणार आहेस? आणि एक फोन सुद्धा केला नाहीस" तिच्या आवाजात राग जाणवत होताच. हिला आपण रात्री बहुदा येऊ शकणार नाही हे कोणत्या तोंडाने सांगावे हा गहन प्रश्न शंतनुला पडला होता. "सर, रात्री जेवणाला काय मागवायचं?" नेमका त्याच वेळी अगदी जवळ येऊन बोललेल्या ऑफिसबॉयचे हे शब्द तन्वीपर्यंत पोहोचलेच. "तन्वी…. " शंतनु तिला हे सांगणार तितक्यात समोरून एक हुंदका त्याला ऐकू आला.  आणि फोन कट झाला होता. शंतनुचा पुन्हा मोबाईलवरून फोन लावायचा प्रयत्न अयशस्वी होत होता. "साहेब, ऑफिसातून रेंज मिळत नाही, तुम्हांला बाहेर जाऊन फोन करावा लागेल" ऑफिसबॉय पुन्हा वदला. "ह्याला आपण आधीच विचारायला हवे होते" शंतनुच्या मनात विचार येऊन गेला. त्याने ताबडतोब बाहेर जाऊन फोन लावला. "ठीक आहे, शंतनु! मी थांबेन एकटी रात्रभर आणि खाईन पावभाजी एकटी!" तन्वीच्या आवाजात दुखावलेपणा आणि राग एकाच वेळी जाणवत होता. "आणि हो आता परत फोन करू नकोस, मी झोपले वगैरे असेल तर!" असे म्हणून तन्वीने फोन ठेवला. शंतनु क्षणभर सुन्न होऊन बसला. पण पुन्हा एका झटक्यात उठला. जे झाले ते झाले पण आता साहेबाला खुश करून दाखवणारच असा पक्का निर्धार त्याने केला.
तन्वीला एकटेपण खायला उठलं होतं. अजून केबल टीव्ही वगैरे चालू नव्हता. संध्याकाळी मोठ्या प्रयत्नाने केलेली पावभाजी खायची तिला फारशी इच्छा नव्हती. नाईलाज म्हणून तिने एका डिशमध्ये थोडी भाजी आणि एक पाव घेऊन आपलं जेवण आटपून घेतलं. वातावरणात बराच उकाडा होता. पाऊस केव्हाही चालू होईल अशी लक्षणं दिसत होती. तन्वी बराच वेळ एकटी खिडकीतून दिसणाऱ्या अंधाराकडे पाहत होती. ढगाळ वातावरणामुळे आकाशात एकटी चांदणी शोधायचा तिचा प्रयत्न निष्फळ ठरणार होता असा कयास तिने आधीच बांधला होता.
केव्हातरी तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. "अरे बापरे, साडेदहा वाजले, झोपायला हवं" तिने मनाशीच विचार केला. "बिचारा शंतनु, दिवसभर त्याने काय खाल्लं असेल" ह्या विचाराने तिच्या मनात काळजी निर्माण झाली. तन्वी बराच वेळ बिछान्यावर तळमळत होती. पाऊस अजूनही सुरु न झाल्याने उकाडा यं जाणवत होता. डोक्यावर उशी घेवून जोरात पंखा सुरु करूनही काही उपयोग झाला नव्हता. आणि अचानक बाहेर पावसाच्या थेंबांचा आवाज सुरु झाला. त्या आवाजावर आणि त्याबरोबर आलेल्या आवाजाने तन्वीला हळूहळू झोप येऊ लागली.
तन्वीला समोरचा डोंगर दिसत होता. ती त्या रस्त्यावरून पुढे पुढे जात होती. उंच डोंगरात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. आणि तन्वी त्या ढगांच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्या ढगांना स्पर्श केल्यानंतरचा ओलावा तिला खूप भावून गेला. तिची नजर अचानक खाली गेली. ती एका रथात बसून तिचा प्रवास सुरु होता. ह्या सर्व गोष्टींचं आश्चर्य करण्याचं तिने सोडून दिलं. रथ तसाच पुढे पुढे चालला होता. आता काळे ढग मागे पडून अगदी नयनरम्य परिसर सुरु झाला होता. हिरव्यागार मैदानातून प्रवास करताना तिला दूरवर एक सुंदर नगरी दिसत होती. त्यातील एका वैभवशाली वस्तूकडे तिची नजर पुन्हा पुन्हा जात होती. "बहुदा हा ह्या नगरीचा राजवाडा असावा" तिने कयास केला. अचानक तिच्या रथाची गती कमी झाली असे तिला जाणवलं म्हणून तिने समोर पाहिलं. शुभ्र अश्वावर बसून आलेल्या एका देखण्या युवकाने त्यांचा रस्ता अडविला होता. "आपण कोण आहात आणि ह्या नगरीत प्रवेश करण्याचं आपलं प्रयोजन काय?" तो शस्त्रधारी युवक तिला प्रश्न करता झाला. त्या प्रश्नाचं उत्तर तिला काही देता आलं नाही. "मला आपणास महाराजांपुढे हजर करावं लागेल" तो युवक बोलता झाला. तन्विपुढे काही पर्याय दिसत नव्हता. "आपलं नाव काय? तन्वीने प्रश्न केला. "नकुल" काहीशा आश्चर्यचकित  झालेल्या त्या युवकाने उत्तर दिलं. सैनिकांच्या नजरांना तोंड देत तन्वी आणि नकुल ह्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. राजवाड्यात थोडा गहन प्रश्न निर्माण झाला होता. सीमेवर असलेल्या सैनिकांच्या खर्चासाठी आणि प्रशासनीय व्यवस्थेसाठी द्रव्याचं विभाजन कसं करावं ह्यावर प्रधान, सेनापती आणि महाराज ह्यांच्यात खल सुरु होता. मुद्रांच्या वाटपावर घोडं अडलं होतं. "सोपं आहे, सद्याची संभाव्य युद्धस्थिती पाहता चौसष्ट हजार सुवर्ण मुद्रा प्रशासकीय कारभारासाठी आणि शहाण्णव हजार सुवर्ण सैनिकी खर्चासाठी!" न राहवून तन्वी बोलली. आणि बाकी कोणाला बोलण्याची संधी न देताना त्यामागील पृथ्थकरण विशद केलं. ह्या अनोळखी विदुषीच्या ह्या विद्वत्तापूर्ण विवेचनाने महाराज बेहद्द खुश झाले. नकुलाकडून ती सुरक्षेसाठी मोठा धोका नाही ह्याची खातरजमा करून घेत त्यांनी तन्वीला प्रश्न केला, "आमची खजिनदार होण्यास आपणास आवडेल काय?" तन्वीने नकळत होकार दिला. मग महाराजांनी नकुलास तिला तिच्या दालनात सोडण्याची आज्ञा केली. आपल्या दरबारातील विद्वत्तेने प्रभावित झालेल्या नकुलाची नजर तिला मनात खूप आवडली. दालन दाखवून परतणाऱ्या नकुलाने एकदा तरी मागं वळून पाहावं अशी तिची इच्छा पूर्ण होताच तिच्या चेहऱ्यावर लज्जापूर्ण स्मित आलं. तिने लाजूनच द्वार बंद केलं!
शंतनु अगदी झपाटून गेला होता. त्याने अडीच वाजता बनवून आणलेलं  प्रेसेंटेशन पाहून साहेब बेहद्द खुश झाले. हे असंच आपण उद्या सादर करायचं. "यंग मॅन! आता तू घरी जावून झोप घेऊ शकतोस! ग्रेट जॉब!" पडत्या फळाची ही आज्ञा मानत आणि जरासं जेवण घेऊन शंतनु घरी परतला. गाढ झोपी गेलेल्या तन्वीची मुद्रा पाहून एकाच वेळी त्याच्या मनात प्रेम, अपराधीपणाच्या भावना दाटून आल्या. तिथेच खुर्चीवर बसल्याबसल्या त्याला कधी झोप लागली हे त्यालाच कळलं नाही.
सकाळी तन्वीचे डोळे उघडताच समोर बसलेल्या शंतनुला पाहुन तिला आश्चर्याचा धक्का बसला. रात्रीचा आपला त्याच्यावरील राग तिला आठवला. आणि अचानक नकुलही आठवला. नकुलच्या आठवणीने तिचा मूड बराच चांगला झाला. झटपट तिने ब्रश करून चहा बनविला आणि शंतनुला हळूच उठवीत ती म्हणाली "खूप दमला असशील नाही ? हा चहा घे! मी पटकन पोहे बनविते!" शंतनू आ वासून पाहताच राहिला!




No comments:

Post a Comment