Tuesday, May 11, 2010

‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’

मध्यंतरी अनघाने मनशुद्धीविषयी एक उत्तम लेख लिहिला. आपणास आपले मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे असे तिचे म्हणणे होते. त्या अनुषंगाने मी काही विचार मांडू इच्छितो.

या लेखातील विचार हे व्यावसायिक जीवनाशी निगडीत आहेत. बालपणी आपले मन एका ओल्या मातीच्या गोळ्यासारखे असते. कुंभार ज्याप्रमाणे मातीला जसा आकार देतो त्याप्रमाणे त्याचे भांडे बनते, त्याचप्रमाणे आपल्यावर जसे संस्कार होतात त्याप्रमाणे आपण घडतो. परंतु हे घडणे बहुतांशी शालेय जीवनापर्यंत मर्यादित राहते / राहायचे. त्यानंतर व्यावसायिक जीवनात मात्र आपण जीवनाच्या कठोर वास्तवाला सामोरे जातो. अनुपचे २००९ च्या स्नेहसामेंलानातील भाषण आठवा. जर आपणास व्यावसायिक जीवनात रूढ अर्थाने (आर्थिकदृष्ट्या) यशस्वी व्हायचं असेल तर आपले संस्कार आपण व्यावसायिक जीवनात जसेच्या तसे वापरू शकत नाहीत. या संस्कारांना आपणास बर्याच ठिकाणी मोडता घालावा लागतो. आणि मग तेथेच आपल्या मनाच्या भ्रष्टीकारणाची प्रकिया सुरु होते.

जन्मताच प्रत्येक माणूस हा एक मूळ स्वभाव घेवून येतो. हा मूळ स्वभाव आणि बालपणीच्या संस्काराची पातळी हे प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी घडविण्यास कारणीभूत ठरतात. हीच सदसद्विवेकबुद्धी आपल्या संस्कारांना कितपत मोडता घालायचा हे ठरवते. शेवटी आयुष्यात आपणास काय हवे आहे हे आपणास माहित असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक जीवनात संस्काराशी तडजोड करण्याचे प्रसंग म्हणजे भ्रष्टाचाराचा मोह, सहकाऱ्याला डावलून बढतीसाठी स्वतःची वर्णी लावणे, आपले काम करून घेण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करणे, वस्तुस्थितीचा विपर्यास करून ती वरीष्टासमोर मांडणे हे होत. आता यातील प्रत्येक उदाहरणात नीती - अनीतीच्या रेषा अंधुक बनू शकतात. शेवटी रात्री झोपण्याआधी आपण आजच्या दिवसात किती पैसा मिळवला याला महत्व देतो कि मी चुकीचे कोणतेही काम केले नाही याला महत्व देतो यावर सर्व काही अवलंबून आहे.

आपण भारतीयांनी व्यावसायिक यश हा सुखाचा मापदंड मनाला आहे. या रविवारच्या लोकसत्तेतील लोकरंगमधील कुमार केतकरांचा भूतान वरील लेख वाचा. त्यातील काही भाग मी इथे उद्धृत करीत आहे

भूतानच्या राजाने त्यांच्या देशाला एक दृष्टिकोन आणि दिशा दिली आहे. त्यांच्या पंतप्रधानांनी, म्हणजे जिग्मी थिनले यांनी भूतानचे ‘व्हिजन स्टेटमेण्ट’ अतिशय ओजस्वीपण सांगितले आहे. त्यानुसार राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न, राष्ट्रीय संपत्ती, लोकांची ऐहिक श्रीमंती यापेक्षा ‘राष्ट्रीय समाधान’ अधिक महत्त्वाचे आहे. ‘सुख’ आणि ‘समाधान’ त्याचप्रमाणे ‘भोग’ आणि ‘आनंद’ या वेगवेगळ्या बाबी आहेत. प्रचंड संपत्ती असलेली व्यक्ती समाधानी असेलच असे नाही. याचा अर्थ गरिबी वा दारिद्रय़ाचे उदात्तीकरण करायला हवे असेही नाही. विकास हवाच, पण भोगाची वखवख म्हणजे सुख नव्हे. म्हणूनच ‘ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट’ ऊर्फ ‘जीएनपी’पेक्षा ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ ऊर्फ ‘जीएनएच’ अधिक महत्त्वाचे मानले जाते. (याच अंकातील ‘लोकमुद्रा’ पानावर पंतप्रधान थिनले यांचे भाषण वाचण्यासारखे आहे.) मुद्दा हा की, भूतानचे उद्दिष्ट ‘समृद्ध’ होणे, हे नसून जनतेने ‘समाधानी’ जीवन जगणे- हे आहे. हे उद्दिष्ट आध्यात्मिक वाटेल असे आहे, पण लोकांना मात्र आता समाधानाबरोबर ऐहिक सुख हवे असल्याची लक्षणे दिसू लाागली आहेत. भूतानच्या पंतप्रधानांनी ‘सार्क’मधील देशांनाही ऐहिकतेपेक्षा समाधानी समाज निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्याचे आवाहन केले आहे. ‘बॉलीवूड’चा संदेश वेगळा आहे हे खरे, पण कुणी सांगावे, भूतानी समाज ऐहिक सुख व समाधान यांचा वेगळाच समन्वय साधू शकेलही!

शेवटी एका हिंदी गाण्यात म्हटल्याप्रमाणे थोडा हैं थोड़े की जरुरत हैं! फक्त एकाच लक्ष्यात असू द्या कि आपण व्यावसायिक यशाच्या मागे लागलेल्या आधुनिक भारतात वावरत आहोत!
थोडे विषयांतर झाले त्याबद्दल क्षमस्व.

No comments:

Post a Comment