Tuesday, February 15, 2011

चौथी पास


गेल्या महिन्यात आम्ही सर्व नातेवाईक अलिबाग जवळील आक्शी येथे एका वीकएंडला गेलो होतो. नातेवाईक म्हणजे माझ्या सर्व चुलत, आत्ये भाऊ आणि बहिणी, आणि त्यांची कुटुंबे! माझा मोठा भाऊ आणि आत्येभाऊ कार्यबाहुल्यामुळे येवू न शकल्याने मी एकटा भाऊ आणि बाकी सर्व बहिणी आणि त्यांचे यजमान अशी परिस्थिती उदभवली. धाकटी चुलत बहिण पंचविशीतील तर मोठीने नुकतीच पन्नाशी गाठलेली.

रविवारी सकाळी नास्ता करताना कशावरून तरी आजच्या बिकट कौटुंबिक परिस्थितीचा विषय निघाला. चर्चेला मजेशीर वळण देण्यासाठी मी विधान केले की यावर उपाय म्हणून मी एका नवीन संस्थेची स्थापना करीत आहे. चौथी पास झालेल्या मुलींना यात प्रवेश दिला जाईल. त्यांना पुढील १०- ११ वर्षे भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, पारंपारिक पद्धतीचे जेवण याबरोबर आधुनिक जगाचेही शिक्षण दिले जाईल. मोठ्यांशी कसे वागावे हे ही त्यांना शिकवले जाईल. २१- २२ व्या वर्षी या संस्थेतून बाहेर पडलेल्या मुली एक आदर्श पत्नी म्हणून संसार करण्यासाठी सज्ज असतील आणि उच्च विद्याविभूषित मुलांचे आई वडील त्यांना सून बनविण्यासाठी संस्थेच्या दारापुढे रांग लावतील. मी हे विधान करताच माझ्या लहान चुलत बहिणींनी माझ्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला, कर्मठ, बुरसटलेल्या विचाराचा म्हणून माझी बोळवण केली.

ह्या हल्ल्यामुळे हतबल होऊन मी माझ्या संस्थेची घोषणा माघारी घेणार इतक्यात माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी माझ्या मदतीला धावून आल्या. त्यांची मुले आता २३- २४ वर्षांची आहेत. त्या म्हणाल्या की आम्ही मात्र आदुच्या संस्थेपुढे रांग लावू. त्या दोघींच्या यजमानांनी त्यांना पाठींबा दर्शविला. त्यानंतर मात्र माझ्या धाकट्या बहिणींनी माझ्या मुलावर लक्ष केंद्रित करीत तुला तुझे बाबा चौथी पास बायको करून देतील असा नारा चालू केला.

वर वर मजेत चालू झालेल्या ह्या विषयावर काही वेळानंतर माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी गंभीर चर्चा करताना मला दिसल्या!

(Disclaimer - या लेखातील विचार हे केवळ एक विचार म्हणून पाहावेत. त्यावरून लेखकाच्या मनोवृत्तीचा निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न करू नयेत ही विनंती! )

No comments:

Post a Comment