Friday, February 25, 2011

वटवृक्ष



वसईत आणि एकंदरीत आमच्या समाजात वावरताना अनेक एकत्र कुटुंबांना जवळून पाहण्याचा योग आला. एकत्र कुटुंबाचा चेहरा म्हणजे त्या कुटुंबातील कर्ता पुरुष! ह्या कर्त्या पुरुषावर कुटुंबांची वाटचाल अवलंबून असायची. असायची म्हणायचे कारण म्हणजे आता एकत्र कुटुंब ही संस्था जवळपास नामशेष झाली आहे. हा कर्ता माणूस कुटुंबातील बर्याच गोष्टींवर आपले नियंत्रण ठेवू शकत असे.

ह्यात दोन प्रकारची कुटुंबे पाहण्यात आली. पहिल्या प्रकारात हा कर्ता माणूस समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेला असे. समाजातील बर्याच लोकांची ह्या घरी उठबस असे. एकंदरीत हे कुटुंब आणि घर ह्या कर्त्या माणसाच्या कर्तुत्वाने भारावून गेले असे. टोकाची भूमिका घेत मी ह्या माणसांना स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसे असे म्हणतो. ह्याचा एक परिणाम कुटुंबातील बाकीच्या सदस्यांवर होत असे. ह्या कुटुंब प्रमुखाची मुले, भाऊ ह्यांच्या व्यक्तीमत्वाची वाढ काहीशी खुरटली जात असे.

दुसर्या प्रकारात कर्ता माणूस हा सामान्य वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा असे. ह्या माणसाने आपले आयुष्य एका धोपटमार्गाने जगलेले असते. पापभीरू असा हा माणूस पहिल्या प्रकारातील व्यक्तींच्या कामगिरीने भारावून गेलेला असे. आपल्याला न गाठता आलेली यशाची शिखरे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या रूपाने गाठण्यासाठी जीवनात वाटेल तितका त्याग करण्याची त्याची तयारी असे.

अर्थात ह्या दोन टोकाच्या उदाहरणामध्ये मधल्या बर्याच छटा आहेत. आज एकत्र कुटुंब नाहीत. छोट्या कुटुंबात नवरा बायकोला विविध भूमिका निभावाव्या लागतात. ह्यातून एकाच मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आयुष्यात कोणत्या क्षणी तुमची PRIORITY ही तुमच्या स्वतःच्या कार्य क्षेत्राकडून निघून तुमच्या मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या सर्वागीण विकासावर येवून स्थिरावते. हा क्षण ओळखणे आणि तो पकडणे फार महत्वाचे असते. परंतु ह्या क्षण ठरविण्याचे प्रत्येकाचे मापदंड वेगवेगळे हे मात्र लक्षात येते!

No comments:

Post a Comment