Wednesday, August 29, 2012

गुलजार भाग ३ - 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं'



१९८७ च्या सुमारास आलेला इजाजत हा चित्रपट तसा चिकित्सक लोकांसाठी! दोन नायिकेंमध्ये गुंतलेल्या नायकाच्या मनाचे हिंदोळे ह्या चित्रपटात सुरेखरीत्या मांडले गेले आहेत. एक प्रेयसी आणि एक पत्नी. प्रेयसी आणि पत्नीमध्ये नायकाची ये जा चालू असते. ह्या चित्रपटाच्या कथानकात काही मी खोलवर जात नाही. पण त्यातले एक गाणे, 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं' केवळ अप्रतिम. अशाच एका प्रेयसीकडून पत्नीकडून परत गेल्यानंतरच्या क्षणी नायक प्रेयसीला तिच्या राहिलेल्या वस्तू परत पाठवून देतो. आपल्या ह्या वस्तू परत करून नायक आपली आठवण विसरण्याचा प्रयत्न करतोय हे जाणवून दुःखी झालेली अनुराधा पटेल हे सुंदर गाणे गाते.

ती नायकाला भौतिक वस्तूंच्या पलीकडील राहिलेल्या आठवणींची जाणीव करून देते. यात श्रावणातील (सावन ह्या शब्दाची शृंगारिक जाणीव श्रावण ह्या शब्दात येत नाही, असो!) एकत्र घालविलेले पावसातील भिजलेले क्षण, तिच्या पत्रात गुंतलेल्या रात्रीच्या आठवणी परत करण्याची ती मागणी करते. पानझडीच्या मौसमात पानांचा पडणारा आवाज मी कानात साठवून मी परत आले होते, ती झाडाची फांदी अजूनही माझ्या मनात थरथरत आहे. ती फांदी, त्या फांदीच्या आठवणी मिटवून टाक असे ती म्हणते. एका पावसाच्या वेळी एका छत्रीत आपण अर्धे सुके आणि अर्धे भिजले होतो. त्यातला केवळ सुका भागच (तुझा रुक्षपणा) मी घेवून आले आहे. त्यातला तुझा प्रेमाचा ओलावा तुझ्याचकडे राहिला आहे, तो मला परत पाठवून दे.

ह्या पुढील भाग माझ्या आकलन शक्तीपलीकडील. अनुराधाला नायकासोबत घालविलेल्या एकशे सोळा चांदण्या रात्री आठवतात! आता ११६ च का यावर मी बरीच डोकेफोड केली. वर्षाच्या रात्री ३६५. त्यातील शुक्ल पक्षाच्याच रात्री समाविष्ट करायच्या असे ठरविले तर १८२ रात्री. पावसाळ्यातील १२० पैकी ६० शुक्ल पक्षाच्या रात्री ढगाळ वातावरणाने गेल्या तर राहिल्या १२२ रात्री. असा विचार करता करता डोक्यात प्रकाश पडला की इथे कविमन पाहिजे, यांत्रिकी नव्हे! असो, त्या नायकाबरोबर घालविलेल्या ११६ रात्रीतील एक त्याच्या खांद्यावर टेकून घालविली होती आणि त्यावेळी आपण दोघांनी खोट्या खोट्या तक्रारी, खोटी खोटी आश्वासने दिली होती. त्या तक्रारी, ती आश्वासने तू मला परत दे!

ह्या गाण्याचा शेवट पहाना! ह्या सर्व आठवणी परत दे आणि ह्या सर्व आठवणी जमिनीत पुरून टाकण्याची तू मला परवानगी दे असे हरिणाक्षी अनुराधा बोलते. ह्या आठवणी पुरल्यावर मी पूर्णपणे तुझ्यापासून मोकळी होईन आणि मग माझ्याकडे काहीच बाकी उरणार नाही आणि मग मी तिथेच निद्रिस्त (कायमची) होऊन जाईन! वा गुलजार साहेब वा! प्रेमभंग झाल्यानंतरची विरहिणीचे दुःख याहून अचूक शब्दात कोण पकडू शकेल असे मला वाटत नाही.

एकंदरीत प्रेमिकांच्या विश्वात नात्यांच्या अनेक छटा असतात. एक गीतकार म्हणून विविध चित्रपटांसाठी गाणी लिहिताना ह्या छटा गीतकारास अचूक पकडाव्या लागतात (किंवा लागत असत). गुलजार यांच्या विविध गाण्यांचा अभ्यास करता करता त्यांनी ह्या विविध छटा कशा ओळखल्या आहेत आणि एकाच भावनेला वेगवेगळ्या चित्रपटात समर्पक शब्दांद्वारे / रुपकांतून कसे अचूकपणे पकडले आहे हे पाहून मन थक्क होते.

1 comment:

  1. Eka khas mitrachi pratikriya तुझ्या गुलझार लेखमालेच्या निमित्ताने एक प्रसंग आठवला.

    " माझ्यासारखाच बालपण वसईत जगलेला वसईकर एका प्रकल्पावर सतत भेटत असे. एकदा म्हणाला की तुला वसईत जाऊन स्थाईक व्हावेसे वाटत नाही का? प्रश्न वाटतो तेवढा सरळसोट नव्हता. कळले नाही की तो प्रश्न बालपणाविषयी आहे की वसईविषयी आहे? नंतर जाणवले की बालपण तर कधीच संपले आणि ज्या वसईशी बालपण जोडले आहे ती वसई. ती ही ती राहिली नाही. विचार गद्यात करणे कठीण वाटू लागले. आणि माझ्यातला गुलझार जागा झाला.

    बालपणाबरोबर हरवलेली वसई .......

    झुळझुळणारे वारे होते, मतलई तर कधी खारे होते
    बिदीत पकडलेले मासे तर जिवापेक्षा प्यारे होते

    त्या काळात सण होते, गावात आपलेपण होते
    निवांत असे क्षण होते, शाळेत बालपण होते

    मैत्री प्रेमाचे बंध होते, निश्शब्द अदृश्य गंध होते
    सोपे साधे छंद होते, क्षितिजावरचे वास्तव मात्र बेबंद होते

    यथावकाश बदलले सारे, झुळझुळणारया वार्याच्या वेगाने
    अजूनही आठवते सारे, हळहळणारया स्वप्नाच्या आवेगाने......

    ReplyDelete