Sunday, September 16, 2012

सामाजिक वर्गांचे विश्लेषण



मध्यमवर्गातील काही वर्गास हल्ली वाटत असते की सद्ययुगात महागाई, भ्रष्ट्राचार अनागोंदी वाढली आहे. प्रसारमाध्यमांवर चुकीच्या वृत्तींचे नियंत्रण आहे. आंग्ल भाषेतील एका अग्रगण्य दैनिकाने सभ्येतेच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. साधारणतः २५ वर्षांपूर्वी असलेली मराठी वर्गाची सभ्यतेची व्याख्या लयास गेली आहे. एकंदरीत परिस्थितीचा भावनात्मक न होता विचार करण्याचा हा प्रयत्न. इथे मराठी समाजातील विविध वर्गांच्या दृष्टीने ह्या परिस्थितीचे पृथ्थकरण करण्याचा हा प्रयत्न!
१> मध्यमवर्गीय नोकरपेशा बुद्धीजीवी प्रगत वर्ग
साधारणतः ६० -७० च्या सुमारास हा वर्ग शिक्षकी पेशात, सरकारी नोकरीकडे वळला होता. ह्या वर्गाने बदलत्या सामाजिक परिस्थितीचा वैयक्तिक पातळीवर अभ्यास केला. आपल्याला आपली शैक्षणिक पातळी उंचावली पाहिजे हे त्याने जाणले. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन ह्या क्षेत्रात ह्या वर्गाने आपल्या पुढील पिढीला गुंतवले. आर्थिक उदारीकरणाच्या सुमारास उत्तम संधी उपलब्ध होताच ह्या वर्गाने त्या हस्तगत केल्या. परदेश, शहरात ह्या वर्गाने स्थलांतर केले. ह्या वर्गाची वैयक्तिक प्रगती होत असतानाच ह्या वर्गाचा सामाजिक जीवनातील सहभाग कमी झाला. सार्वजनिक जीवनातील कार्यक्रमांच्या दर्जावर ह्याचा विपरीत परिणाम झाला. ह्या वर्गाने आपली आर्थिक परिस्थिती महागाईने परिणाम होण्याच्या पलीकडे नेल्याने हा वर्ग सद्यस्थितीत गप्प बसला आहे. आपली उर्जा आपली वैयक्तिक परिस्थिती अजून उंचावण्याच्या कामी राखून ठेवण्याचा ह्या वर्गाचा कल आहे. आपली आर्थिक स्थिती ह्या वर्गास इतकी प्यारी झाली की ह्या वर्गातील उरलासुरली वीरता नाहीशी होण्याच्या मार्गावर आली आहे.
२> इतर मध्यमवर्गीय वर्ग
ह्यात आपण दोन गट पाडू शकतो.
अ> पहिल्या गटाने सामाजिक , व्यावसायिक जीवनात उपलब्ध असलेल्या संध्या (संधी ह्या शब्दाचे अनेकवचन) हेरल्या. ह्या वर्गाने योग्य वेळी धाडस दाखवीत ह्या संधी हस्तगत केल्याने, त्यांचा पुढील मार्ग सुकर झाला. आपल्या आर्थिक स्थितीच्या जोरावर ह्या वर्गाने एकंदरीत सामाजिक जीवनावर प्रभाव प्रस्थापित केला. परंतु समाजाला योग्य वैचारिक दिशा देण्याच्या क्षमतेचा ह्या वर्गाकडे अभाव असल्याने परिस्थिती एकंदरीत दीनवाणी झाली. ह्या वर्गाचे बाकी व्यावहारिक कौशल्य वाखाणण्याजोगे! मॉल, व्यापारीकरण केलेले गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र ह्या सारख्या उत्सवाद्वारे त्याने मूळ समस्यांपासून लक्ष दूर नेण्यात यश मिळविले.
ब> दुसरा गट तसा काहीसा कमनशिबी ठरला. कमनशिबी हा शब्दच ह्या वर्गाची कथा सांगून जातो. ह्या वर्गाने आपले भविष्य नशिबाच्या हाती सोपविले, आपल्या हाती घेतले नाही. ह्या वर्गाला ना शैक्षणिक क्षेत्रातील बदलाची चाहूल लागली ना सामाजिक क्षेत्रातील संधींची. सध्याच्या परिस्थितीत सर्वात भरडला गेला असेल तो हाच वर्ग. सरकारच्या मदतीची सर्वात जास्त गरज ह्याच वर्गास असते. परंतु ती न मिळाल्यास आवाज उठविण्यासाठी आवश्यक असलेला संघटीतपणा अथवा आत्मविश्वास याचा ह्या वर्गाकडे अभाव आहे.
३> सामाजिक अपवृत्ती
ह्या वर्गाने सुरवातीला २ अ वर्गाला पुढे करीत सामाजिक जीवनात चंचुप्रवेश केला आणि कालांतराने आपले पुन वर्गीकरण करीत सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली.
४> सुसंस्कृत गर्भश्रीमंत वर्ग
हा वर्ग समाजात एकंदरीत आपली आब राखून होता. आणि ह्या वर्गाचे वागणेही जबाबदारीचे. परंतु कालौघात ह्या समाजाचे आर्थिक वर्चस्व तितकेसे कायम राहिले नाही. २ अ आणि ३ ह्या वर्गाने ह्या वर्गास स्पर्धा प्रस्थापित केली. २ अ आणि ३ ह्या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची असलेली सवय. परंतु ४ वर्गाने आपला आब कायम ठेवीत आपल्या वागण्यात फारसा बदल केला नाही.
एकंदरीत हल्लीच्या समाजाचे ढोबळमानाने वर्गीकरण करण्याचा हा एक प्रयत्न. राजकारणी वर्गाला ह्या परिस्थितीचे योग्य आकलन आहे. २ ब हाच खरा गांजला गेलेला वर्ग, त्याला संघटीत होवू न देणे, सार्वजनिक उत्सवांद्वारे, IPL द्वारे त्याचे लक्ष विचलित केले जाते. प्रश्न असा आहे की ही परिस्थिती किती काळ कायम राहणार? दोनच गोष्टी ही परिस्थती बदलू शकतात. १> आर्थिक मंदीने वर्ग १ प्रभावित होवून त्याचा बफर नाहीसा झाला. २> २ अ आणि ३ ह्यांच्यात एका बिंदूवर स्त्रोतांसाठी संघर्ष निर्माण होऊन माफिया राज निर्माण झाले तर.....

 

No comments:

Post a Comment