Saturday, November 17, 2012

सरमिसळ

 



१> प्रेमात पडलेली माणसे!



माणसे पूर्वीपासून प्रेमात पडतात. साधारणतः दुसर्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेली माणसे सहज ओळखु येतात. ही माणसे एका वेगळ्याच विश्वात वावरत असतात. लोक अशा माणसांपासून जरा दोन हात दूरच राहतात. प्रेमात पडण्याची प्रक्रिया कधी दीर्घ तर कधी अल्प काळ घेते. ती एका व्यक्तीकडून आरंभिली जाते आणि प्रेमाचे दृश्य / अदृश्य संदेश आपल्या लक्ष्य व्यक्तीच्या दिशेने पाठविले जातात. लक्ष्य व्यक्तीकडून ह्या संदेशांचे वस्तुनिष्ठरित्या मूल्यमापन केले जाते आणि कधी हे संदेश स्वीकारले जातात तर कधी धुडकावले जातात. ज्या उदाहरणात हे संदेश स्वीकारले जातात तेव्हा त्या लक्ष्य व्यक्तीची वस्तुनिष्ठरित्या मूल्यमापन करण्याची क्षमता धुळीस मिळते. स्त्रोत व्यक्तीने ही क्षमता आधीच गमाविलेली असते. त्यामुळे हे दोघे एका वेगळ्याच दुनियेत वावरत असतात असे आपण म्हणतो.



प्रेमात पडलेल्यांची ह्यापेक्षा एक वेगळी जमात असते. ही जमात चक्क स्वतःच्या प्रेमात पडलेली असतात. हे प्रेमात पडणे एकतर पूर्णपणे स्वतःच्या प्रेमात पडणे अथवा स्वतःच्या एखाद्या गुणाच्या / कलेच्या प्रेमात पडणे असतं. हे लोकं सुद्धा प्रमाणात लौकिकार्थाने वस्तुनिष्ठ विचार करण्याची क्षमता गमावितात. काही क्षेत्रात हे स्वतःच्या प्रेमात पडणे आवश्यक असत जसा की एखादा गायक किंवा धडाकेबाज फलंदाज. आता वीरेंदर सेहवाग हा स्वतःच्या प्रेमात पडलेला माणूस आहे. तो लौकिकार्थाने वस्तुनिष्ठ विचार करीत नाही म्हणून तो आपल्यासारख्या चाकोरीबद्ध जीवन लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो. एक जातिवंत कलाकार स्वतःच्या प्रेमात पडला असेल तरच तो अलौकिक कलेची निर्मिती करू शकतो. परंतु सामान्य माणसे जेव्हा स्वतःच्या प्रेमात पडतात तेव्हा ती डोकेदुखी बनतात! आधीच्या एका ब्लॉगमध्ये उल्लेखलेली नवलेखक, नवकवींची जमात हे एक उदाहरण! अशी स्वप्रेमाच्या कोशात गुरफटलेली माणसे दुसर्या व्यक्तीकडून वेळोवेळी दाद अपेक्षितात. हे स्वप्रेम जोपर्यंत निरपेक्ष असते तोपर्यंत ठीक असते पण ज्यावेळी ह्या स्वप्रेमाने आंधळी झालेली माणसे जेव्हा दुसर्याशी तुलना करतात तेव्हा परिस्थिती काही प्रमाणात धोकादायक बनते.



२> सद्यकालीन पालक!



१९९० च्या दशकातील आर्थिक बदलांमुळे पालकांचे वर्गीकरण करणे सोपं झालं आहे. १९९५ च्या आसपास आणि त्यानंतर पालकत्व स्वीकारलेल्या पिढीविषयी आपण बोलूयात. ह्या पिढीवर जुन्या पद्धतीनुसार संस्कार झाले परंतु बाह्यजगतात त्यांना एकदम नवीन, आधुनिक असे जग पहावयास मिळाले. आता आपल्या मुलांशी कोणत्या प्रकारे नात विकसित करायचं याचा ह्या नवपालकांनी आपापल्या परीने विचार केला असावा. मी समवयस्क पालकांचे निरीक्षण करतो त्यावेळी असे आढळून येते की त्यातील बहुतांशी पालकांनी नवसंस्कृतीला अंगिकारिले आहे. माझा त्यांच्या नवसंस्कृतीला स्वीकारण्याविषयी आक्षेप नाहीय, आक्षेप आहे तो त्यांच्या काहीश्या प्रमाणात हतबल होवून ही नवसंस्कृती स्वीकारण्याला! इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पूर्वीच्या पालकांनी १०० टक्के संस्कृतीचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला तर आज त्याचे ५०% हस्तांतरण (आज पालक असलेल्या पिढीकडे) झाल्याचे आपण पाहतो. जर आजच्या पिढीने केवळ थोडाफार प्रयत्न केला तर मात्र पुढील पिढीकडे झालेले हस्तांतरण शुन्य टक्क्यांकडे झुकेल यात शंका नाही. तेव्हा प्रत्येक पालकांनी विचार करायला हवा की मला हेच हवे आहे काय?



३> सर्वसामान्यांशी संवाद!



सर्वसामान्य माणसांशी संवाद ही एक महत्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्य माणूस जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जात असतो. ह्या प्रसंगावरील आपली टिपण्णी तो खुल्या दिलाने सार्वजनिक ठिकाणी (बस, लोकल ) सर्वांशी चर्चित असतो. त्यामुळे अशा ठिकाणाचा आम आदमीबरोबरचा संवाद ही आपली जीवनाची विविध रूपे समजून घेण्याची संधी असते. परंतु मला अचानक जाणविले की आजचा सुशिक्षित वर्ग चारचाकी वाहनातून/ रिक्षातून फिरणारा झाला आहे, तो काम करतो ते परदेशी लोकांच्या संगणक प्रणालीवर, बोलतो ते परदेशी लोकांशी, भाजी घेतो ती mall मधून! अशा प्रकारे आपण आम आदमीबरोबरचा संवाद ही एक महत्वाची गोष्ट गमावून बसलो आहोत! तेव्हा जमेल तेव्हा ही संधी निर्माण करावी हेच माझे म्हणणे!



No comments:

Post a Comment