Thursday, November 8, 2012

अंतर्मन एक पहारेकरी!




आधुनिक जमान्यात मानवाला सतत बदलत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागतं. ह्यात काही प्रसंग (बहुदा व्यावसायिक जीवनात) मानवाच्या सद्य क्षमतेच्या पलीकडचे असतात. हे प्रसंग उपलब्ध शाब्दिक, व्यवहारचातुर्य ह्या कौशल्याच्या आधारावर मानवास निभावून न्यावे लागतात. कालांतराने मानव ह्या परिस्थितीला सरावतो आणि तो पर्यंत मानवाला नवीन भूमिका मिळते आणि मग पुन्हा हे चक्र सुरु होते.
वैयक्तिक जीवनात हल्ली एक नवीन खूळ निघाले आहे. बालकांच्या मनोभूमिका समजून घेणे, त्यांना कोणत्या मानसिक संघर्षास सामोरे जावे लागते ह्यावर बरेच लेख लिहून येतात, दूरदर्शन वाहिन्यावर बऱ्याच चर्चा घडून येतात. मला हा गेल्या १० वर्षात पालकत्वाची भूमिका पत्करलेल्या पालकांवर अन्याय वाटतो. ही पिढी ज्यावेळी बालक होती त्यावेळी सुजाण पालकत्व असा शब्द अस्तित्वात नव्हता. एकत्र कुटुंबपद्धती आणि वडिलधाऱ्या माणसांचा धाक यावर बरीचशी पालकत्व निभावून गेली.
थोडक्यात सांगायचे झाले तर सध्या तीस - चाळीस ह्या वयोगटात असलेल्या पिढीकडून वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अपेक्षांचे ओझे वाढले आहे. आणि बिचाऱ्यांना सहानुभूती सुद्धा मिळत नाही. अगदी लोकसत्ताच्या चतुरंग पासूनची प्रसारमाध्यमे बालक आणि प्रौढ यांच्या समस्यावरील विषयांनी ओसंडून वाहत असतात. मग ही मधली पिढी आपल्या परिस्थितीचा कसा सामना करते हे पाहणे मनोरंजनाचे ठरते!
मनुष्याला पूर्वीपासून अंतर्मन ही देणगी देवाने दिली आहे. हल्लीच्या काळात मनुष्याचा हा अदृश्य अवयव अधिकाधिक जागृत / सक्रीय झाला आहे. अंतर्मन सतत मानवाला सामोरे जाणार्या प्रसंगाचे ग्रहण करीत असतं. थोडा एकांत मिळाला की अंतर्मन, मानवाशी संवाद साधत, त्याला आपण विचार म्हणतो. अंतर्मनाकडे मानवाने अनुभवलेल्या प्रसंगाचा माहितीसंग्रह (data ) असतो. बहुतांशी सर्वांच्या अंतर्मनाकडे भोवतालच्या परिस्थितीत आपलं स्वतःचे स्थान कोठे आहे हे ठरविण्याची क्षमता असते.
काही माणसे अंतर्मनाचे हे विश्लेषण जसेच्या तसे स्वीकारतात आणि मग खुल्या दिलाने बाह्य जगाला सामोरे जातात.
काही माणसांच्या बाबतीत अंतर्मनाचे हे विश्लेषण त्यांना सांगत की अरे बाबा तू बाह्य जगतापेक्षा पुढारलेला आहेस. अंतर्मनाची विश्लेषण क्षमता बरोबर आहे असे गृहीत धरल्यास दोन शक्यता निर्माण होतात. पहिली म्हणजे मानव खुश होवून त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि क्वचितच त्याचे गर्वात रुपांतर होत. दुसर्या शक्यतेत मनुष्य स्वतःसाठी अधिक आव्हानात्मक परिस्थितीचा शोध घेवू लागतो.
जर समजा अंतर्मनाच्या विश्लेषणाने मानवाला सांगितलं की तू सभोवतालच्या जगापेक्षा जरा मागासलेला आहेस तर पुन्हा वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतात. पहिली म्हणजे माणसात न्यूनगंड निर्माण होवू शकतो. काही माणसे अशा वेळी कमी आव्हानात्मक परिस्थितीचा शोध घेवून ती स्वीकारतात.
काही माणसे अंतर्मनाचे हे विश्लेषण धुडकावून लावतात, ते अंतर्मनातील विश्लेषणावर एक रुपांतरक बसवितात जो ह्या माणसास बाह्य जगतात आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची धडपड करण्यास भाग पाडतो.
आतापर्यंतच्या लेखात अंतर्मन आणि मानव हा संवाद ध्यानात घेतला. परंतु जेव्हा दोन व्यक्ती संवाद साधतात तेव्हा खर तर मानव १, मानव २, अंतर्मन १ आणि अंतर्मन २ हे घटक समाविष्ट असतात. असो एका कंटाळवाण्या लेखाच्या ह्या शेवटापर्यंत तुम्ही पोहचला असाल तर तुमचे आभार!  

1 comment:

  1. विचारांना चालना देणारा लेख आवडला.

    ReplyDelete