Sunday, December 16, 2012

पट मांडला! भाग दुसरा


एकदा सरपंच झाल्यावर संपतरावांनी मागे वळून पाहिलेच नाही. गावातील माध्यमिक शाळेला जोडून उभे केले गेलेले महाविद्यालय, मातीच्या रस्त्यांची जागा घेतलेले डांबरी रस्ते असो अथवा जवळच बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित धरणाची जागा असो सर्वांमध्ये त्यांचा पुढाकार राहिला. आतापर्यंत सर्व कसे सुरुळीत चालले होते, संसारवेलीवर दोन सुंदर फुलेही फुलली होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मध्येच येऊन गेलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊरावांना निवडून आणून देण्यात विश्वासरावांबरोबर संपतरावांनी खांद्याला खांदा लावून काम केले. निवडणुकीत विरोधी पक्षाचा धुव्वा उडविल्यावर मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचे नियोजनही अर्थात संपतरावांनी केले. म्हणायला तसे एक गालबोट लागले ते मिरवणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयसभेच्या वेळी. व्यासपीठावर आपली जागा संपतरावांनी गृहीतच धरली होती. परंतु ऐनवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आले आणि संपतरावांचे व्यासपीठावरील स्थान हुकले. त्यांच्या मनाला हे कुठेतरी लागून राहिले.
विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षातच विश्वासरावांचा संचालकपदाचा कालावधी संपला. भाऊराव आणि विश्वासरावांच्या बैठकी आता परत जोरात रंगू लागल्या. संपतराव सुद्धा त्यात असायचेच परंतु चर्चा होतेय ती फक्त बुजुर्गात आणि आपण केवळ नावापुरते तिथे असतो हे लक्षात आल्यावर संपतरावांनी तिथे आपले जाणे कमी केले. आता हळूहळू संपतरावांनी आजूबाजूच्या गावाकडे मोर्चा वळविला. निर्मळ गावाच्या प्रचारात त्यांना भाग घेण्याचे आलेले आमंत्रण त्यांनी खुशीने स्वीकारले. त्या गावातील पक्षाच्या विजयाचा आनंद त्यांनी स्वतःच्या विजयापेक्षा जास्त खुशीने साजरा केला. झाई गावाच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना होता आणि त्यावेळी त्यांना प्रचारासाठी खास बोलावणे आले. इथेही आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर आणि केलेल्या कामगिरीची उदाहरणे देत त्यांनी गावकऱ्यांना जिंकून घेतले. ही ग्रामपंचायत जिंकताच संपतराव हे नाव परिसरात मोठ्या आदराने घेवू जावू लागले.
इथे भाऊराव मात्र राज्यपातळीवरील राजकारणात गुंग झाले होते. मुख्यमंत्री अण्णासाहेबांच्या विरोधात सुजीतकुमार सक्रियपणे पक्षांतर्गत आघाडी चालवत होते. अण्णासाहेबांच्या खुर्चीवर त्यांचा डोळा होता. अण्णासाहेबांच्या वा त्यांच्या सहकार्यांच्या कारभारात कुठे काही खुसपट काढता येईल का याची ते कधीपासून वाट पाहत होते. त्यांनी ह्या कामासाठी स्थापन केलेल्या खास गटात भाऊरावांना आघाडीचे स्थान होते. परंतु ह्या कामानिमित्त आपल्याला मुंबईतच सतत राहावे लागते ह्याची खंत भाऊरावांना लागून राहिली होती. त्यांची अस्वस्थतता वाढली जाण्याचे अजून एक कारण होते ते जिल्ह्यातून येणाऱ्या संपतरावांच्या कामगिरीच्या बातम्या.
दुसरा दिवस उजाडला. संपतराव सकाळची आन्हिक आटपून पेपर चाळत चहाचा घोट घेत बसले होते. इतक्यात महादेव जोरात आपली बाईक घेवून घराच्या दिशेने येताना त्यांना दिसला. महादेव त्यांचा सच्चा कार्यकर्ता. नवीन युगाशी, त्यातील सगळ्या नवनवीन गोष्टींशी नाते जोडून असणारा. महादेवने बाईक घाईघाईतच अंगणात लावली आणि तो संपतरावांकडे आला. 'परवा केंद्रीय शिष्टमंडळ मुंबईला येतेय', संपतरावांनी दिलेल्या खुर्चीवर बसता बसता महादेव म्हणाला. 'अरेच्चा पण हे सगळे पेपर तर मी चाळून काढले पण ही बातमी कोठे दिसली नाही! आश्चर्य चकित होवून संपतराव म्हणाले. 'इंटरनेटवर बातमी आलेय' असे महादेव म्हणताच संपतरावांचे आश्चर्य ओसरले. जी काही धडपड करायची ती येत्या दोन दिवसातच ह्याची जाणीव त्यांना झाली.
केंद्रीय शिष्टमंडळाला भेटायला जाणाऱ्या जिल्ह्यातील पक्षाच्या गटाचे नेतृत्व विजयराव करणार हे माहित करून घ्यायला संपतरावांना फारसा वेळ लागला नाही. दुपारचे जेवण घाईघाईतच आटपून ते आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी जायला निघाले. 'जाताना आबांना भेटून जा' हा सगुणा बाईंनी त्यांना दिलेला सल्ला त्याच्या कपाळावर आठ्या उमटवून गेला हे सगुणा बाईंच्या लगेच लक्षात आले. नाईलाजास्तव त्यांनी आपली गाडी विश्वासरावांच्या बंगल्याकडे वळविली. 'साहेब आताच बाहेर कामानिमित्त गेले आहेत' हे सासू बाईंच्या तोंडचे उद्गार ऐकताच खुश होवून त्यांनी सासू बाईंचे आशीर्वाद घेतले आणि ते तडक निघाले.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात तुफान गर्दी होती. विजयरावांनी विविध मतदारसंघांचे क्रम आखून दिले होते. दिवेपुरचा क्रमांक बराच मागे होता. इतर मतदारसंघांची चर्चा अपेक्षेपेक्षा जास्तच लांबली. एकेका मतदार संघात ५ - ५ इच्छुक मंडळी होती. सर्वांचे म्हणणे ऐकून घेताघेता विजयरावांच्या नाकी नऊ आले. दिवेपुरचा क्रमांक आला त्यावेळी रात्रीचे ११ वाजून गेले होते. संपतरावांना पाहताच विजयरावांची कळी खुलली. ह्या तरुण कार्यकर्त्याविषयी ते बरेच ऐकून होते. महादेवने बनवून दिलेले संपतरावांच्या कामगिरीचे पॉवर पॉईटचे प्रेसेंटटेशन पाहून विजयराव अत्यंत खुश झाले. त्यांची ही खुशी पाहून संपतरावांना खूप बरे वाटले. त्या खुशीतच ते आपल्या सहकार्याच्या निवासस्थानी झोपावयास गेले. बिछान्यावर पहुडता पहुडता आपल्या मतदारसंघातून दुसरे कोणीच इच्छुक कसे आले नाहीत याचा त्यांना अचंबा लागून राहिला. 
 
सकाळ सकाळी विजय रावांच्या दूरध्वनीची बेल खणखणली तेव्हा त्यांनी अगदी वैतागून फोन उचलला. रात्री झोपताना त्यांना दोन वाजले होते आणि मुंबईला घेवून जाणारी जीप सकाळी १० वाजता निघणार होती. तोपर्यंत चांगली झोप काढावी असा त्यांचा मनसुबा होता. पण समोर भाऊराव आहेत हे समजताच त्यांचा नाईलाज झाला. बाकीच्या मतदारसंघांचा आढावा घेत चर्चेचा ओघ दिवेपुरकडे वळला. आता मात्र विजय रावांच्या बोलण्यात नवीन चैतन्य आले. संपत रावांची स्तुती करतांना त्यांना जणू काही शब्द कमी पडत आहेत असा भाऊरावांना भास झाला. आपला राग मोठ्या मुश्किलीने आवरून त्यांनी फोनवरील बोलणे आटोपते घेतले. हा फोन संपताच त्यांनी सुजितकुमारांना फोन लावला. सुजित कुमारांनी फोन उचलल्यावर त्यांच्या स्वरात नेहमीचे चैतन्य नाही अशी संशयाची पाल भाऊरावांच्या मनात चुकचुकली. 'भाऊराव, श्रेष्ठींनी यंदा नवीन रक्ताला वाव द्यायचे  ठरविले आहे' हे सुजितकुमारांचे शब्द तप्त आगीच्या गोळ्याप्रमाणे त्यांच्या कानी पडले. पुढचे सुजीतकुमारांचे बोलणे ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नव्हतेच. हा फोन संपताच ते रागारागाने अंगणात फेऱ्या मारू लागले. इतक्यात त्यांच्या मनात असे काही विचार आले की त्यांची मुद्रा खुशीने उजळून निघाली. त्यांनी तडक विश्वासरावांना फोन लावला. आजूबाजूचे बोलणे झाल्यावर त्यांनी मुद्द्याला हात घातला. 'विश्वासराव, तुम्ही बघा इतकी वर्ष साथ दिलीत आम्हाला! आता यंदा तुम्हीच निवडणुकीला उभे राहावे असे म्हणतो मी!' त्यांचे हे अनपेक्षित बोलणे ऐकून विश्वासराव प्रथम थोडे आश्चर्यचकित झाले पण आपल्या मनातली भावना कोणीतरी ओळखली ह्याचा त्यांना जबर आनंद झाला. 'आता बघा तशी काही माझी इच्छा नाही पण जर तुम्ही म्हणत असालच तर मी तयार आहे' विश्वासरावांचे हे बोलणे ऐकून मागे उभ्या असलेल्या इंदुमती बाई एकदम चकित झाल्या!

क्रमशः

1 comment:

  1. आता पटातील राजकीय प्यादी भरभर हालचाल करणार.

    ReplyDelete