Wednesday, June 5, 2013

सापुतारा प्रवास भाग २

आपल्या मुलांच्या चालण्याबोलण्याचे जवळून निरीक्षण केल्यास आपल्या स्वभावातील काही गुणधर्म त्यात जवळून दिसून येतात. सहलीनिमित्त बाहेर गेल्यास अशी संधी जवळून मिळते. केरळ प्रवासातही हे मला जाणवले होते. त्यावेळी ड्रायव्हर आपल्यासोबत जेवायला येत नाही, त्याला झोपायला आपल्यासारखी रूम मिळत नाही अशी निरीक्षणे सोहमने मांडली होती. आता तो थोडा मोठा झाला असला तरी ही निरीक्षणे बर्याच प्रमाणात कायम राहिली. इथे सावंत ह्यांची जेवण्याची सोय आमच्याबरोबरच होती. परंतु ते आपल्या टेबलवर का बसले नाहीत असा प्रश्न सोहम विचारता झाला. मी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. थोडा विचार केल्यावर आमची ओळख ६ तासांची आणि त्यांना आमच्याबरोबर जेवायला काहीसे अवघडल्यासारखे होण्यापेक्षा त्याना मोकळेपणाने स्वतंत्रपणे जेवून देणे उत्तम असा सोयीस्कर विचार मी केला.
प्रत्येक कुटुंबाची प्रवास करण्याची एक पद्धत जाणते अजाणतेपणी विकसित होत असते. काहींना बरीच स्थळे थोड्या दिवसात आटपणे जमते तर काहींना मोजकी स्थळे अभ्यासूवृत्तीने पाहणे आवडते. आम्ही ह्या दोन्ही वर्गात मोडत नाही! आम्हाला अशा हिल स्टेशनच्या हॉटेलमधील जेवण, नाश्ता हादडणे आवडते. असल्या दोन हादडण्याच्या वेळांमध्ये झोप काढून उरलेला मोकळा वेळ आम्ही स्थळदर्शनासाठी वापरतो. महाबळेश्वर, माथेरानची हॉटेल्स ह्या बाबतीत माणसाला अधिक लाडावतात. तिथल्या मेनुचे वैविध्य अफाट असते. आणि वर्षभर आहारात शिस्त पाळण्याचा प्रयत्न करणारे आम्ही अशा वैविध्याला बळी पडतो. हीच गोष्ट कंपनीच्या पार्टीमध्ये घडते. सोहमला हे सर्व खात असताना तिथल्या सेवकवर्गाची दया आली. ते पहा कसे बिचारे आपल्याला सर्व काही आणून देतायेत. मग मी त्याला सांगितले की आपल्या देशात त्यांच्याहून अनेक गरीब लोक आहेत ज्यांना एक वेळेला सुद्धा पोटभर जेवावयास मिळत नाही. सोहमला हे तत्वज्ञान देताना गरजेपेक्षा बरेच अधिक पदार्थ खाणाऱ्या माझ्या दांभिकपणाची मला बरीच खंत वाटली. पण ही खंत केवळ वाटण्यापुरता आणि इथे लिहिण्यापुरता मर्यादित आहे हे कटू सत्य आहे. पूर्वी कधी एकदा वाचले होते कि आदिमानवाला अन्न मिळण्याची शाश्वती नसायची त्यामुळे जेव्हा केव्हा अन्न मिळेल त्यावेळी ते सर्व ग्रहण करण्याची त्याची वृत्ती असायची. आपल्या कोणत्याही कृतीचे समर्थन करण्यासाठी अंतर्मनाकडे एखादा तरी मुद्दा शोधून काढण्याची क्षमता असते नाही का?
हॉटेलच्या स्वच्छतेच्या मापदंडानी आमची निराशा केली. न्हाणीघर म्हणावे तितके स्वच्छ नव्हते. बिछान्यावर काही बारीक झुरळ सदृश प्राणी आढळले. त्यामुळे पुन्हा एकदा महाबळेश्वर, माथेरानलाच जायला हवे होते असा विचार मनात डोकावला. सकाळी लवकर उठल्यामुळे आणि भरपेट जेवणामुळे दुपारी आम्ही व्यवस्थित झोपलो. हॉटेलच्या वरच्या बाजूने डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बनविला जात आहे. तिथे माती खणण्याचे मोठे मशीन आवाज करून आमची झोप अधून मधून उडवत होते. चार साडे चारला उठून रूम सर्विसद्वारे चहा मागविला. पुढच्या पिढीचे काही खरे नाही आपण त्यांना अशा सवयी लावत आहोत ज्या आयुष्यात आरामात मिळतात असा त्यांचा समज होवू शकतो. चहा प्यायला तर खरे पुन्हा डायनिंग रुममध्ये जायला हवे पण बहुदा जेवणांनी जडावलेल्या देहांना तितकेही कष्ट घ्यायची इच्छा नसावी. ऐदीपणाने  भारताच्या मध्यमवर्गात केवळ शिरकाव केला नाही तर त्याने चांगलेच बस्तान मांडले आहे असा विचार मनात डोकावला.
इथवरील लेखावर आताच नजर टाकली. प्रवासवर्णनापेक्षा मनुष्यस्वभावाचेच वर्णन चालू आहे. बाकी जास्त काही फिरणे केलेच नाही तर मग हेच होणार नाही का? चहाप्राशनानंतर आम्ही तलावाकडे कूच केले. मी सध्या कंपनीत दिवसाला दहा हजार पावले परिक्रमण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यामुळे आम्ही चालणेच पसंत केले. मधली दोन संग्रहालये पत्नीला खुणावत होती परंतु त्यांना भेट देण्याचा तिचा मानस माझ्यापेक्षा सोहमने मोठ्या हिरीरीने हाणून पाडला. अस्मादिक धन्य झाले.  आधुनिक हिल स्टेशनला आवश्यक असलेली ठिकाणे म्हणजे संग्रहालये, सरोवर, सूर्योदय, सूर्यास्त बिंदू, घोड / उंट सवारी, उंच ठिकाणी सापडणारी स्ट्रोबेरी आणि सदृश्य फळांच्या बागा, आणि हल्ली नव्याने उदयास आलेला प्रकार म्हणजे तकलादू राइड्स आणि तितकेच तकलादू खेळ. ह्यातील बरीच आकर्षणे सापुतार्यात आहेत.
तलावातील फेरफटक्यात काही विशेष नव्हते. पत्नीचे आणि सोहमचे विविध फोटो काढण्यात मी गुंग होतो. एक मोठा गुजराथी गट बोटीत शिरला. त्यामुळे बोटीच्या संतुलनाची काळजी करण्यात आमचा सुरुवातीचा काही वेळ गेला. त्या फेरीत आमच्या बोटीला दुसऱ्या बोटीने मागे टाकण्यात जवळजवळ यश मिळविले. त्यावेळी आमचा नाविक गुजराथी आहे आणि त्यात आम्ही तिघे मांसाहारी आहोत याउलट बाजूच्या बोटीचा नाविक मांसाहारी आहे आणि बाकी सर्व प्रवासी गुजराथी आहेत त्यामुळे असे झाले असावे अशी हसतखेळत टिपण्णी आमच्या सहप्रवाशाने केली. बोटीच्या फेरफटक्यानंतर मका कणीस खावून आम्ही हॉटेलला परतलो. आता हवा मस्त गार झाली होती आणि हॉटेलचा परिसर रमणीय भासू लागला होता. संध्याकाळच्या  मेनूत चायनिस पदार्थ असल्याची कुणकुण लागल्याने आम्ही सर्वच जोरात चालण्यात गुंग झालो. जेवण सुरेख होते पुन्हा एकदा पोटावर  अत्याचार करून आम्ही रूमवर परतलो. प्राजक्ता बहुदा खुश असावी त्याचा फायदा घेत मी champions ट्रॉफीच्या फार जुन्या सामन्याची क्षणचित्रे तासभर पाहण्यात यश मिळविले.
दुसऱ्या दिवशीच्या सकाळी खोलीच्या वऱ्हांड्यातून एक नयनरम्य दृश्य पहावयास मिळाले. काळ्या नभांनी आजूबाजूच्या डोंगरांना व्यापले होते आणि त्यातील काही खट्याळ ढग हॉटेलच्या परिसरात उतरले होते. एकदम दिल खुश झाले. अंघोळ वगैरे आटपून आणि बटाट्याची भाजी घातलेला सामोसा, उपमा आणि ब्रेड बटर असा भरपेट नास्ता करून आम्ही जैन मंदिराकडे प्रस्थान केले. सावंत ह्यांचा चांगला कंपू बनला होता. त्या सर्वांची झोपण्याची सोय एका हॉलमध्ये करण्यात आली होती. तिथे कॅरम, टेबल टेनिस, पूल अशा खेळांची सोय होती. एक नवीन ड्रायवर आला होता ज्याला चढणीवर गाडी चालविता येत नव्हती आणि म्हणून मालकानेच गाडी चढणीवर चालविली होती. त्याच्या सारथ्यकौशल्यावर सावंतांनी नाराजी व्यक्त केली. जैन मंदिरातील कलाकुसरीच्या कामाचे आम्ही आपल्या मर्यादेनुसार कौतुक केले आणि अचंबाही व्यक्त केला. त्यानंतर उन्ह वाढीला लागली होती. आम्ही मधमाशी पालन केंद्रास धावती भेट दिली. एव्हाना सोहम आणि सावंत चांगले दोस्त बनले होते आणि त्यामुळे त्याने पुढील सीट पटकावली होती. सावंतांनी त्याला आधीच मधमाशीपालन केंद्राच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली त्यामुळे आम्ही लगेचच चॉकलेट खरेदीकडे मोर्चा वळविला. त्यांनतर आम्ही गाडीतून आजूबाजूच्या ठिकाणाचा धावता दौरा केला. दुपारचे जेवण प्रयत्न करूनही मला कमी जेवता आले नाही. आता जेवणात तोचतोच पणा जाणवू लागला होता. थोड्या निद्रेनंतर आम्ही तरणतलावाकडे प्रस्थान केले. सोहमला रबरी ट्यूबच्या सहाय्याने पोहोण्यास यश मिळाले. त्यामुळे पुढील तासभर सोहमने खूप आनंदात पोहणे केल. संध्याकाळी आम्ही सूर्यास्त बिंदू, घोडासवारी अशा ठिकाणांना भेटी दिल्या. बरेचसे सापुतारा पाहून झाले होते आणि अजून एक दिवस बाकी होता.  आम्हासर्वांनाच थोडा कंटाळा आला होता  हॉटेलच्या व्यवस्थापकाने एका दिवसाचे आरक्षण अर्ध्या भाड्याच्या भुर्दडावर रद्द करण्याची तयारी दर्शविली. सावंतानी सप्तशृंगी आणि शिर्डी असे पर्याय सुचविले. त्यावर विचार चालू असताना वसईला फोन केला. आईने तुम्ही उद्या परत येत असल्यास होळी बाजारातून मासे आणते असा पर्याय सुचविला. मग आमची / माझी मती भ्रष्ट झाली.
बुधवारी सकाळी नास्ता आटपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत रस्त्याच्या कडेला उसाचा रस प्यालो. केसरचे ६० रुपये दराने आंबे घेतले. प्राजक्ता गाडीतच बसल्याने हा भाव चागला की वाईट हे कळायला मार्ग नव्हता. परंतु हे आंबे अगदी सुरेख निघाले आणि कमीत कमी १० किलो आणायला हवे होते असे आई म्हणाली. पुढे वापिपर्यंतच्या रस्त्यात एक अपघात दिसला. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. वापिपासून पुढे मात्र अपघातांची रांगच लागली होती. सर्वात भीषण अपघात चारोटी नाक्यानंतर दिसला रस्त्यावरील दुभाजक ओलांडून आलेल्या ट्रेक्टरने विरुद्ध बाजूने येणाऱ्या बसमधील १४ दुर्दैवी जीवांचा बळी घेतला होता. अपघाताला आठ तास होवून सुद्धा त्या अपघाताची भीषणता कळून येत होती. १४० वेगमर्यादा गाठणाऱ्या सावंतांना आम्ही सबुरीचा सल्ला दिला.
दोन वाजता रात्रीच्या पावसानंतर अधिकच उकडणाऱ्या वसईत पोहोचून आईने बनविलेल्या सुरेख पापलेट कालवणाच्या जेवणाचा आस्वाद घेत आम्ही ह्या सहलीची सांगता केली. 

No comments:

Post a Comment