Saturday, March 1, 2014

थरार भाग १०..

तिवारीला आता आपल्या नशिबाला दोष द्यायची वेळ आली होती. आता रामलालचा कोठेच पत्ता नव्हता. पण त्याच्या बदली आलेले दोघेजण मार देण्याच्या बाबतीत अगदी तज्ञ होते. तिवारीचे अंग अगदी काळेनिळे पडले होते. आणि अशाच एका कमकुवत क्षणी त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली ह्या दोघांना दिली होती. ह्या एकंदर कारस्थानाची व्याप्ती पाहून नंदन आणि भोसलेकाका अगदी अवाक झाले होते. मुलकानीने  केलेल्या १२० कोटीच्या अफरातफरी मध्ये तो केवळ एक प्यादे होता. तो आणि त्याच्याचसारख्या पाच सहाजणांनी 'सुप्रीम' च्या सांगण्यावरून आणि मार्गदर्शनाखाली अशा संघटीत अफरातफरीच्या अनेक गोष्टी केल्या होत्या. 'तुमचे आम्ही पूर्ण संरक्षण करू, पूर्ण काळजी घेऊ' असे सुप्रीमने त्यांना सांगितले होते. परंतु मुलकानी अडकला आणि सर्वत्र बदनाम झाला तसे ह्या लोकांची बेचैनी वाढली होती. पैसा तर भरपूर होता पण मुलकानीपाठोपाठ अजून कोण अडकणार ह्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे जसजसे अजून पुरावे बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली तसतसे सर्वांनी 'सुप्रीम' ला देशाबाहेर एका सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्याची गळ घातली होती. मुलकानीच्या कुटुंबियांना त्याची ह्या सर्व प्रकरणात झालेली बदनामी अजिबात पसंत नव्हती आणि त्यामुळे त्याने एखादे नवीन व्यक्तिमत्व / रूप धारण करावे अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. परंतु त्यासाठी सुप्रीमने अवलंबिलेला मार्ग पाहून त्यांचे धाबे दणाणलेले होते. हा सुप्रीम नक्की कोण हे ह्यातील कोणालाच माहित नव्हते. त्याने दिलेल्या आज्ञा पाळायच्या आणि लगेच बँकेत पैसा जमा झालेला पाहायचा ह्याचीच त्यांना सवय होती. बालीत येऊन रहायची सुप्रीमची आज्ञा / योजना सर्वांनाच पसंत होती असे नव्हे. परंतु आता नाईलाज होता.


तिवारी गायब होऊन तिसरा दिवस झाला होता आणि तिवारीच्या बायकोच्या सोबतीला दोन कुटुंबे येऊन राहिली होती. तिवारीच्या बायकोची राजवाडे थिअरी कोणालाच पटत नव्हती. इतक्यात त्यातील एकाला भारतातील संकेतस्थळावर एक बातमी दिसली. त्याने मोठ्या खुशीने ती सर्वांना दाखविली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गुप्तहेर राजवाडे जे मागील आठवड्यातील अपघातात मरण पावले असा सर्वांचा समज झाला होता ते जखमी अवस्थेत त्या दरीतल्या एका कुटुंबांच्या घरी पोहोचले होते. आणि त्या कुटुंबाने त्यांना स्थानिक पोलिसांपर्यंत सोपवले होते. नंदन आता चांगलाच सक्रिय झाल्याने राजवाडे लगेचच त्यांच्या घरी पोहोचले होते.


मुलकानीची माहिती ऐकून नंदनने लगेचच आपल्या वरिष्ठांना सर्व खबर दिली होती.  आणि केंद्रीय गुप्तहेरांचे पथक तातडीने बालीत बोलावले होते. हा आंतरराष्ट्रीय मामला असल्याने इंटरपोलला सुद्धा सहभागी करून घेण्यात आले होते.


थकलेभागले नंदन आणि भोसलेकाका बिछान्यावर पडल्या पडल्या झोपेच्या आधीन झाले होते. भोसलेकाकांची सकाळी उठण्याची सवय इथेही कायम राहिली होती. सकाळी पाचच्या सुमारास त्यांना जाग आली. मुलकानीच्या खोलीत एक नजर टाकायला म्हणून ते गेले आणि ते दृश्य पाहून त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मुलकानी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची अगदी निष्ठूरपणे हत्या करण्यात आली होती. भोसले काका इतके अनुभवी पण ते ही हादरले होते. "नंदन, नंदन उठ लवकर!" "काय आहे काका! जरा झोपू द्या आता!" असे म्हणणाऱ्या नंदनला त्यांनी तत्काळ मुलकानीच्या खोलीत नेले. तिथले दृश्य पाहून नंदनही हादरला. पण लगेच त्याचा मेंदू सक्रिय झाला. पटकन त्याने भोसलेकाकांना खुण केली. दोघांनी मिळून सर्व घराची तपासणी केली. घर सुरक्षित आहे ह्याची खात्री करून घेतली. आपल्या फोनवरच्या बोलण्यातून कोणाला तरी सुगावा लागला हे त्या ही परिस्थितीत नंदनने जाणले. दोघेजण सुन्न होऊन बसले असतानाच बाहेर कसला तरी आवाज झाला. नंदनने खिडकीजवळ जाऊन पाहिले त्यांच्या घराला बाली पोलिसांच्या गाड्यांनी घेरले होते!

No comments:

Post a Comment