Thursday, June 5, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ७


आज सहलीचा सातवा दिवस! ३१० किमी प्रवासाची नकोशी जाणीव मनात दडी धरून होती. सकाळी लवकर उठून, बॅगा वगैरे भरून आम्ही चंदीगडच्या प्रवासासाठी निघालो. काही वेळातच वैष्णो माता देवीचे (सुप्रसिद्ध वैष्णोदेवीचे नव्हे)  मंदिर आलं. हे मंदिर एका मध्यम उंचीच्या डोंगरात वसलेलं आहे. ह्या मंदिराचं नाव आधी केव्हा ऐकलं नव्हतं. परंतु विविध उंचीवर असलेल्या देवांच्या अनेक मूर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटलं. सर्व देवांचे दर्शन घेण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावं लागतं. पण हे सर्व बंदिस्त असल्याने फारसा त्रास जाणवला नाही. 
प्रत्येक मूर्तीभोवतालच नक्षीकाम मनाला थक्क करून सोडणारं होतं. त्यावरील कलाकुसर इतकी सूक्ष्म होती की हे इतक्या प्रमाणातील नक्षीकाम करायला किती वेळ लागला असेल ह्याचा विचार करणे सुद्धा कठीण होतं. पूर्वीची लोक विविध रूपांत तपस्या करीत. पाठांतर, संगीत, चित्रकला, शिल्पकला ह्या सर्व माध्यमातून वर्षोनवर्षे आपली कलाकुसर घडवीत. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ही माध्यमे असावीत असे कधी कधी वाटून जातं. अशा ठिकाणच्या वातावरणात का कोणास ठाऊक एक प्रकारची गूढ शांतता असते असे मला वाटतं. ईश्वराचं वास्तव्य काही प्रमाणात आपल्या मनात कुठेतरी दडलं असणार, ह्या कलाकारांनी बहुदा त्या अंतर्मनातील ईश्वराला साद देण्याचा कलामाध्यमातून प्रयत्न केला असणार. 
ह्या मंदिराच्या परिसरात छायाचित्रणास सक्त मनाई होती. तिथे नवग्रहांचे मंदिर सुद्धा होते. आणि मग शनीची एक वेगळी मूर्ती होती. शनिवारच्या दिवशी शनीला तेलाभिषेक करण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. ह्या मंदिराच्या जवळून नदीचा खळखळ आवाज करणारा प्रवाह होता. 
आज बसमध्ये लेज आणि फ्रुटी ह्यांचं प्रवाशी मंडळींना वाटप करण्यात आलं. त्यामुळे बच्चेमंडळी तर खुश झालीच पणआई बाबालोक सुद्धा खुश झाले. स्वतःची अशी फ्रुटी आपल्या लहानपणी फार कमी वेळा मिळाली असेल आणि आता मोठेपणा (वयाचा!) आपली स्वतःची फ्रुटी असावी असा विचार मनात बहुदा आणून देत नाही. पण ह्यापुढे संधी मिळाल्यास महिन्यातून एकदा तरी शांतपणे फ्रुटी प्यावी आणि लेज वगैरे खाऊन घ्यावेत असा निर्धार करण्याचा विचार मनात डोकावला. 

बाकी परतीचा प्रवास बऱ्याच भागापर्यंत सिमल्याहून येतानाच्या मार्गाचाच होता. त्या प्रवासाची ही काही चित्रे!
















दोन डोंगराच्या मधून आपली वाट शोधणारी ही नदी मला खूप भावली! मार्गात अनेक संकटे आली तरी त्यातून आपला मार्ग शोधावा असा सल्ला देण्याचा दृष्ट विचार सुद्धा त्यावेळी माझ्या मनात आला नव्हता. भोवतालच्या निसर्गाचा परिणाम असावा! पण आज मात्र तो विचार माझ्या मनात आला. भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव; बाकी काय!




पुन्हा एकदा पायऱ्यापायऱ्यांची शेती! मला इथे आपले एक छोटे घर असावे असे राहून राहून वाटत होते. 



नदीची अनेक नयनरम्य वळणे टिपण्याचा हा प्रयत्न!












बाकी बसमध्ये अमेय आणि मंडळी खाद्यपदार्थांच्या नावाच्या भेंड्या खेळत होते. नाचणीचे सत्व, ठेचा, थालीपीठ वगैरे प्रकारापासून सुरु झालेली गाडी आधी लाल भात आणि मग बदकाचे मटण वगैरे प्रकारावर येऊन पोहोचली तेव्हा मग मंडळी वैतागली आणि मग आपसूक गाण्यावर वळली.

काही का असेना पण प्रवासीमंडळी आज विचारात गढली होती. इतके दिवस, महिने जिची उत्सुकतेने वाट पाहिली, ती सहल जवळजवळ संपली होती. मनाला एक नवीन उत्साहाचं भरतं आलं होतं. वर्षभर तणावाचे, नैराश्याचे अनेक प्रसंग येतात. हयावर मात करण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी तंत्रे असतात. अशा सहलीतील अनुभवलेले मनमोकळे क्षण आपल्या मनाला सर्व बंधनातून मुक्त करून आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याची क्षमता देतात. हे जग, आपलं आयुष्य एक मोठं विस्तृत पसरलेलं अंतराळ आहे. शहरात आपण जे आयुष्य जगतो ते ह्या विस्तृत पसाऱ्याचा एक छोटासा भाग आहे. त्यामुळे ह्या छोट्या भागाचं फारसं दडपण घेऊ नये ही दृष्टी, हा विचार मनात निर्माण करण्याची क्षमता पर्यटनामुळे आपल्यास लाभावयास हवी. उत्साहाचं भरलेलं हे लोणचं वर्षभरात जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा बाहेर काढावं!



प्रवास चालूच होता. जेवणाचं ठिकाण हॉटेल वैली व्यू साडेअकरा वाजताच आलं त्यामुळे लवकर भोजन करणे क्रमप्राप्त होते. सव्वा बाराच्या उन्हात पुन्हा त्या बसमध्ये बसणे अगदी जीवावर आले होते. परंतु नाईलाज होता.



वाटेत ऋषी धवनचे गाव मंडी लागलं. त्यानंतर हळूहळू प्रदेश रुक्ष होत चालला होता. आणि मग एका वळणावर सिमल्याचा रस्ता सुटून आम्ही बिलासपुरच्या मार्गे लागलो. कुलकर्णी ह्यांना बिलासपूर विषयी, हे शहर कसे असेल ह्याविषयी  जरा उत्सुकता होती. परंतु एकंदरीत त्या गावाने त्यांची निराशा केली. आता बर्यापैकी खाली उतरल्याने आजूबाजूची झाडी सुद्धा वेगळी दिसत होती. विशेष म्हणजे आंब्यांची झाडे सुद्धा होती. त्यांना आताशा कैऱ्या लागल्या होत्या. एक दीर्घ प्रवास सुरु होता. आता पुन्हा चढ लागला होता. उंच पर्वतांना वळसा घालून जावं लागत होत. अशा दोन उंच डोंगराना जोडणारे पूल बांधल्यास ह्या प्रदेशातून प्रवास करणाऱ्या असंख्य मालवाहू ट्रक, प्रवासी बसेस ह्यांचा वेळ आणि इंधन ह्यात खूपच बचत होईल असा प्रस्ताव कुलकर्णी ह्यांनी मांडला. एक पर्यावरणाची हानी हा भाग सोडला तर त्यांच्या ह्या प्रस्तावात मला खूपच तथ्य वाटलं. ह्या प्रस्तावाच्या अनुकूल / प्रतिकूल बाबींचा (Feasibility Study) अभ्यास करण्यासाठी सरकारने एक शीघ्र समिती नेमावी अशी मागणी मी इथे करीत आहे. 


महामार्गाचा हा भाग (जवळजवळ ४० किमी) खराब असल्याने प्रवासास जास्तच वेळ लागत होता. साडेतीन - चारच्या सुमारास एका सुमार धाब्यावर चहापानासाठी आम्ही थांबलो. वीणा वर्ल्डवाल्यांनी नेहमीप्रमाणे गल्ल्याचा ताबा घेतला. पुन्हा बसमध्ये बसलो. आता अमेयने चित्रपटांच्या नावांच्या भेंड्या सुरु केल्या. The Last of the Mohicans, The Two Days in Valley, Last Samurai अशा नावांचा मी त्याच्यावर मारा केल्यावर बिचारा हतबल झाला. चेहऱ्यावर कसनुसं हसू आणत ही नावे स्वीकारण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आमच्या गटातील बाकी मंडळींनी सुद्धा चांगली कामगिरी बजावल्याने भेंडी चढायची राहिली. 

मग अचानक रस्ता सुधारला. महामार्ग सुरु झाला. पंजाब आलं होते. ह्याच सुमारास धुळीचे मोठे वादळ सुरु झाले. त्यामुळे एकदम बदल झाल्यासारखं वाटत होते. पंजाबातील कालवे, गव्हाची शेती, केवळ लाकडासाठी पैदास केलेले वृक्ष ह्यांची सुंदर दृश्ये बसमधून दिसत होती. ह्या वृक्षांची नावे कोणाला माहित असल्यास जरूर सांगा! 



कालव्याचे विहंगम दृश्य!



पंजाबला गव्हाचे कोठार म्हणतात ह्या लहानपणी शिकलेल्या वाक्याची प्रचीती देणारी दृश्ये! 










पंजाब खरोखर खूप समृद्ध आहे ह्याची केवळ बसमधील पंजाबच्या दर्शनाने खात्री पटत होती. परंतु ह्याच पंजाबातील तरुण पिढी व्यसनी पदार्थांच्या अधीन होत चालली आहे ह्याच्या बातम्या वाचून फार दुःख होत होते. समृद्धी कशी पचवावी ह्यावर आता भारतात धडे घ्यावे लागतील अशीच लक्षणे दिसू लागली आहेत. 


चंडीगड शहरातील रस्ते प्रशस्त होते. एका ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला मोर दिसल्यावर आतापर्यंत शांत असलेल्या बसमध्ये थोडे चैतन्य पसरलं. हॉटेल आता १० -१५ मिनिटात येईल असे अमेय गेले दीड सांगत होता! शेवटी एकदाचे ते हॉटेल आले. चार तारांकित असलेले हे हॉटेल निर्विवादपणे आतापर्यंतच्या ह्या प्रवासातील सर्वोत्तम हॉटेल होते. त्याची ही काही दृश्ये! 












 कुलकर्णी ह्यांच्या आईवडिलांनी त्यांनी पंजाबातील लस्सी पिण्यास सांगितल होते. परंतु हॉटेलवर उशिरा पोहोचल्याने ती मनिषा पूर्ण झाली नाही. 

रात्रीचे जेवणही ह्या हॉटेलला साजेसे होते. ह्या वर्षात पहिल्यांदा शनिवारी चिकन खाण्याचा मोह आवरला नाही! शनैश्वरा, माफ करा! सकाळचा नास्ताही वैविध्यपूर्ण होता. सर्वांनी एकमेकांच्या संपर्कमाहितीची देवाणघेवाण केली. मी सर्वांना जबरदस्तीने ब्लॉगचा पत्ता दिला. हिट संख्या वाढायला नको का? आणि हे सहप्रवासी नक्कीच ह्या ब्लॉगशी अधिक जवळून समजून घेतील!

विमानतळपाच मिनिटातच आला. इथेच हा प्रवास सुरु झाला होता. इतक्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात आम्हाला अगदी सुखरूप आणणाऱ्या ड्रायव्हरचे आम्ही मनापासून आभार मानले. माझ्या जुन्यापुराण्या ब्लॅकबेरीत त्याचा फोटोही काढला.  


आदित्य, अमेय मंडळींचा आम्ही भावूक निरोप घेतला. हिमाचल कितीही सुंदर असलं तरी आता आपली मुंबई आम्हांला साद देत होती. पण ह्या मंडळींना मात्र 'Show Must Go On!' ह्या उक्तीनुसार एका नवीन सहलीला जावे लागणार होत. आदित्याची तर तेरा दिवसाची लगेचच सहल होती. त्यांच्या निग्रही मनोवृत्तीचे कौतुक करावे तितके थोडे!

विमानात सुद्धा जवळजवळ बससारखंच वाटत होतं! उड्डाणाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया करण्याचा मोह कसाबसा आवरला! विमानाने उड्डाण केलं. सोहमशी मांडवली करून खिडकीची जागा पटकावली. मध्येच ढगाळ वातावरण लागलं. त्यानंतर मात्र आकाश स्वच्छ झाले. अशाच आकाशातील ही ढगांची रांग!






विमानातले अल्पोपहार करता करता मुंबई कधी जवळ आलं ते समजलं सुद्धा नाही! मुंबई विमानतळाजवळील ही टेकडी! 






गो एयर विमान आमच्या मनातील त्याच्या प्रतिमेनुसार वेळेआधीच दहा मिनिटे मुंबईला उतरले! आणि बाहेर आल्यावर सातव्या मिनिटाला सामान हातात पडले / खेचून काढले. पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेतला. प्री पेड टॅक्सीत बसलो. पहिल्याच सिग्नलला लागलेलं हे मुंबईतील दुर्मिळ हिरवं दृश्य!




टॅक्सी भरधाव वेगाने धावत होती. अशीच आठवण निघाली. आमच्या कंपनीतील एका पार्टीत प्रत्येकाने अमेरिकेतील आणि भारतातील किती राज्ये बघितली ह्याची चर्चा चालू होती. फक्त दोघांचा अपवाद वगळता आम्ही दहा जणांनी बघितलेल्या अमेरिकेतील  राज्यांची संख्या जास्त निघाली. आज मी भारतातील राज्यांच्या संख्येत तीनाची भर घातली ह्याचा सार्थ अभिमान मला वाटला. 

दुसऱ्या दिवशीची सकाळ! नऊ वाजले तरी सोहम बिछान्यातून लवकर उठत नव्हता. प्राजक्ता जवळ जाऊन ओरडली, "वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड!" पाचव्या मिनिटाला गडी दात वगैरे घासून हॉलमध्ये येउन बसला एका सांग्रसंगीत नास्त्याच्या अपेक्षेने!

(समाप्त)
आजचा भाग थोडा आटोपता घेतला. आपल्याला ही शृंखला आवडली असल्यास प्रतिक्रिया द्या. नवीन हुरूप येईल!

आधीच्या भागांच्या लिंक्स 

3 comments: