Sunday, August 31, 2014

अंक १, २, ३…


अंक १
शालेय जीवनात चंद्राचे निरीक्षण करण्याचा माझा छंद होता. वसईच्या घरी रात्री शहरातील दिव्यांचा किमान हस्तक्षेप असल्याने आकाशनिरीक्षणासाठी अतिशय अनुकूल वातावरण असे आणि अजूनही असतं. आकाशातून जाणारा एखादा मिणमिणता ठिबका दिसला की हा मानवनिर्मित उपग्रह असल्याची मी समजूत करून घेत असे. त्याचप्रमाणे आकाशात एका विशिष्ट ठिकाणी एकमेकाला लागून असणारे ग्रह म्हणजे जोडग्रह असा ग्रह मी करून घेतला होता. त्यावेळी एक आकाशदर्शनावरील एक पुस्तक सुद्धा मी विकत घेतलं होतं. बहुदा जयंत साळगावकरांच असावं. त्यात प्रत्येक महिन्यात आकाशात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ऊर्ध्व दिशेचा नकाशा दिलेला होता आणि त्यात एका विशिष्ट वेळी दिसणाऱ्या तारे, ग्रह ह्यांची नावे दिली होती. त्यानुसार मी अभ्यास करण्यास सुरुवात सुद्धा केली होती. परंतु त्यानंतर काही कारणांनी हा अभ्यास थांबला. फक्त आकाशात सप्तर्षी आणि त्यातील सहाव्या ताऱ्याजवळील अरुंधती मी हमखास ओळखू शकत होतो आणि अजूनही शकतो. ह्या सप्तर्षींची हल्ली दिसणारी विशिष्ट संरचना ही दहा लाख वर्षापूर्वी वेगळी होती आणि अजून दहा लाख वर्षानंतर वेगळी असणार असेही वाचल्याचे लक्षात आहे. आता ही दोन्ही विधाने पडताळून पाहण्याचं कोणताच मार्ग माझ्याकडे किंवा आपणा कोणाकडे नाही. बाकी बऱ्याच ताऱ्यापासून निघालेला प्रकाश आपणापर्यंत पोहोचायला काही दशलक्ष वर्षे लागतात हे वाचून अचंबा वाटे.
असो आकाशातील माझे मुख्य आकर्षण चंद्र असे. शुक्ल पक्षात चंद्र दिवसा लवकर उगवत असतो परंतु सूर्याच्या प्रकाशामुळे आपणास तो सहजासहजी दिसत नाही. तर अशा ह्या चंद्राला आकाशात दिवसा शोधून काढणे हा माझा आवडता छंद होता. दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाच्या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीला चंद्र सकाळी पाच सव्वा पाचच्या दिशेला उगवतो. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा चंद्र आपल्याकडे आग्नेय दिशेलाच बऱ्याच वेळा उगवतो. तर नरकचतुर्दशीला हा चंद्र अगदी छोट्या कोरीच्या रुपात असतो त्यामुळे सुर्योदयाआधी त्याचे दर्शन घेण्याची माझी धडपड असे. आग्नेय दिशेला असणाऱ्या चिंचेच्या झाडामुळे ह्या प्रयत्नांत थोडा अडथळा येत असे. ह्या चंद्रकोरीच्या विविध रूपांचे निरीक्षण करताना माझी बरीच वर्षे अशी समजूत असे की आकाशात एकदा उगवलेला चंद्र त्या दिवसापुरता आकाराने कायम असतो आणि मग दुसऱ्या दिवशी / रात्री उगवताना त्याच्या आकारात वाढ / घट होते. पण एका कृष्ण द्वितीयेच्या रात्री झोपताना चंद्र पाहून झोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आल्यावर चंद्रदर्शनासाठी पुन्हा गच्चीवर गेलो तेव्हा त्याचा आकार कमी झाल्याचं जाणवलं. थोडा विचार केल्यावर डोक्यात प्रकाश पडला. चंद्रकला म्हणजे शेवटी काय तर चंद्राचा प्रकाशित भाग कमी जास्त प्रमाणात दिसण्याची प्रक्रिया. एकदा का चंद्र आकाशात उगवला म्हणून काय त्या दिवसापुरता ही प्रक्रिया थोडीच थांबून राहणार आहे?
अंक २ 
आपल्या आयुष्याचं पण असंच आहे नाही का? क्षणाक्षणाला, दिवसामागे आपल्यात, आपल्या स्वभावात सुक्ष्म का होईना पण बदल होत राहतो पण आपणा स्वतःला किंवा आपल्या अगदी जवळच्या लोकांना तो कधी जाणवत नाही. पण एखादा दूरगावी / परदेशी गेलेला मित्र अचानक काही वर्षांनी आपल्याला भेटतो आणि मग आपल्या बदललेल्या स्वरूपाविषयी (माझ्या बाबतीत अगदी दुर्मिळ झालेल्या केसांविषयी!) आश्चर्य व्यक्त करतो . आणि मग तासभर गप्पा मारून झाल्यावर "आता तू बराच बोलका झालास हं!" अशी टिपण्णी सुद्धा करतो!
काही का असेना आयुष्यातील सरती वर्षे हा प्रकार कोणालाच मनापासून आवडत नसणार! ज्या लोकांचं आयुष्य बऱ्यापैकी सुखासमाधानात चाललं आहे अशांना तर मुळीच नाही. पण नाईलाज असतो. भोवतालची परिस्थिती बदलण्याची क्षमता जरी देवाने मनुष्याला बहाल केली असली तरी कितीही सुखद बनविलेल्या ह्या सुखद परिस्थितीचा अनंत काळापर्यंत उपभोग घेण्याची मनुष्याला देणगी देण्याची चूक मात्र देवाने केली नाही.
 अंक ३
अशाच अनंत अवकाशातून देहविरहीत "क्ष" विहार करीत चालला होता. पृथ्वीवरील त्याचं आयुष्यकाल संपून किती वर्षे होऊन गेली ह्याची त्याला जाणीव नव्हती. पृथ्वीच्या सापेक्ष त्याची सध्याचं ठिकाण कोठे आहे हे ही त्याला कळत नव्हतं. फक्त मनःपटलावर एका कोपऱ्यात मिणमिणणारा ठिबका म्हणजे पृथ्वी असे मानायला त्याला फार आवडत होत. आपल्या मनाला खूप काही सामर्थ्य लाभलं आहे ह्याची त्याला जाणीव झाली होती. भूतलावरील आपल्या आयुष्यातील कोणताही क्षण, त्या क्षणाला मनात आलेल्या भावना सर्व काही पुन्हा निर्माण करण्याची क्षमता त्याला लाभली होती. लहानपणाचा अल्लडपणा, खेळण्याची उत्स्फुर्त वृत्ती जशी त्याच्या मनात अचानक डोकावे तशीच शालेय जीवनातील परीक्षेचं भय, परीक्षा जवळ आली असूनसुद्धा पुस्तक न उघडल्याची भावनासुद्धा त्याला भेट देत असे. तारुण्यातील अंगातील विश्वाला जिंकून घेण्याची खुमखुमी मध्येच त्याला आतुर बनवी तरी वृद्धापकाळातील असहायपणा अस्वस्थकरून जाई. अशा ह्या शरीरविरहीत अवस्थेत विहार करून अगणित काल लोटला तरी ह्या अवस्थेचे त्याच भय मात्र दूर झालं नव्हतं. हो मधल्या काळात असंच काही अंतरावरून आपल्यासारख एक असंच मन गेल्यासारखा त्याला भास होऊन गेला.
हा प्रकार किती काल चालणार हेच त्याला कळत नव्हत! ह्या अंतराळातील तीव्र हिवाळा मात्र शरीर नसलं तरी त्याला बोचत मात्र राहणार होता!


 

1 comment: