Saturday, August 9, 2014

मनाचा तो हळवा कप्पा!!


मध्यंतरी कंपनीतर्फे  एका मोठ्या तारांकित हॉटेलात प्रशिक्षणाला हजर राहिलो त्यावेळची गोष्ट! प्रशिक्षण होते भावनिक बुद्ध्यांक आणि तत्सम बाबींविषयी! ही सर्व प्रशिक्षणे एकांगी नसावीत ह्यासाठी प्रशिक्षार्थी लोकांचा ह्यात सहभाग असावा म्हणून प्रशिक्षक प्रयत्नशील असतात. एखादं पुस्तकी तत्त्व सांगून मग त्या तत्त्वाला अनुसरून आपल्या प्रत्यक्षातील आयुष्यातील उदाहरणं सांगण्यास प्रशिक्षार्थींना प्रोत्साहित केलं जातं. इथे मग एक महत्वाचा बिंदू येतो. आपल्या आयुष्यातील उदाहरण सांगताना आपला खाजगीपणा तर सांभाळावाच त्याहून अधिक म्हणजे आपल्या सहकार्यांचा आणि कुटुंबियाचा खाजगीपणा जतन करणे अपेक्षित असतं.
अशा प्रशिक्षणात बर्याच वेळा मोजकी लोक खूप बोलतात आणि काहीजण गरजेपुरता मोजकं बोलून थांबतात.
आपल्या भावनांना मोकळं कधी आणि किती करावं हे प्रत्येकावर अवलंबून असतं. हल्ली व्यावसायिक जीवनातील लोकांची दडपण वाढली आणि त्याचबरोबर वैयक्तिक जीवनही दडपणाचे बनलं. हे दडपण सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी! त्यामुळे होत काय की ह्या साचलेल्या दडपणाने प्रत्येकजण तणावाखाली येतो. आणि काहीजण हळवीसुद्धा बनतात. आता ही दडपणे मोकळी करायला अनेकांना हवी असते एक संधी, एक व्यासपीठ, एक श्रोता!
काही लोक शुक्रवारी समछंदी लोकांना एकत्र करून बारमध्ये बसतात! तिथलं वातावरण, भाषा जरी अगदी बाळबोध नसली तरी हळवा कप्पा मात्र अगदी पूर्णपणे मोकळा होत असतो. काहीजण साप्ताहिक सुट्टीत निसर्गाची साथ धरतात! "केवळ मला ह्या जगात जन्माला यावं लागलं म्हणून मी नाईलाज म्हणून ह्या व्यावसायिक जगात वावरतोय, बाकी योग्य वेळ येताच मी तुझ्याकडे परत येईन, मी केवळ तुझाच आहे" अशी त्यांची निसर्गाला साद असते. काही जण संगीताच्या मैफिलीचा आधार घेतात! काही जण सोशल मिडिया वर ज्ञात, अज्ञात मित्रांशी छोट्या छोट्या वाक्यात हा हळवा कप्पा मोकळा करत असतात.
प्रश्न असा आहे ही हा हळवा कप्पा जीवन साथीदाराबरोबर मोकळा होण्याचं प्रमाण अगदी कमी का असतं? एकतर शांतपणे दोघांना वेळ कमी मिळतो, त्यात त्या दोघांच्या मोबाईलवर सतत काही संदेश येत राहतात आणि नवरा बायको समोर दिसली की घरगुती कामाचा विचार डोक्यात येणं ही बर्याच जणांची समस्या आहे. आणि नवरा बायकोत ज्या छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात त्याही प्राधान्यक्रमाने अशा वेळी चर्चेस येतात.
खरतरं तुम्हांला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखणारा समवयस्क माणूस म्हणजे जीवनसाथी! त्याच्याकडे हा हळवा कप्पा मोकळा केल्यास तुम्हांला समजून घेतलं जाण्याची शक्यता सर्वात जास्त! पण हवा असतो त्यासाठी पूर्ण मोकळा वेळ! म्हणूनच तंत्रज्ञानाला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जीवनात स्थान देऊ नकात!
दर सहा महिन्याने ह्या तंत्रज्ञानाने तुमच्या जीवनात काय सकारात्मक बदल घडवून आणला आहे ह्याच प्रामाणिक विश्लेषण करा! माझ्या मते सर्वात मोठा खलनायक म्हणजे भ्रमणध्वनीवरील इंटरनेट आणि त्यावरील "कसकाय" हा प्रोग्रॅम! मित्रांचे कार्यक्रम, भेटीगाठी, नित्यनेमाचे अपडेट हे सर्व "कसकाय" नव्हतं तेव्हा सुद्धा व्यवस्थित चालायचंच!


शेवटी थोडं विषयांतर झालं! पण तुम्हांला हळवा कप्पा आहे की नाही ह्याची तपासणी जरूर करून पहा आणि जमल्यास तो अधूनमधून मोकळाही करत रहा!

No comments:

Post a Comment